मंगळवार, २२ सप्टेंबर, २०२०

समर्थ रामदास स्वामी विरचित मारुती स्तोत्रे, स्तोत्र आठवे.

 

समर्थ रामदास स्वामी विरचित मारुती स्तोत्रे

      भुवन दहन काळीं काळ विक्राळ जैसा ।

      सकळ गिळित ऊभा भासला भीम तैसा ।।

      दुपटत कपि झोकें झोकिली मेदिनी हे ।

      तळवट धरि धाकें धोकली जाउं पाहे ।।१।।

      गिरिवरूनि उडाला तो गिरी गुप्त झाला ।

      घसरत दश गांवें भूमिकेमाजि आला ।।

      उडति झडझडाटें वृक्ष हे नेटपाटें ।

      पडति कडकडाटें अंग घाते धुधाटें ।।२।।

      थरथरित थरारी वज्र लांगूल जेव्हां ।

      गरगरित गरारी सप्तपाताळ जेव्हां ।।

      फणिवर कमठाचे पृष्ठिशीं आंग घाली ।

      तगटित पवनाची झेंप लंकेसि गेली ।।३।।

      थरकत धऱणी हे हाणतां वज्रपुच्छें ।

      रगडित रणरंगीं राक्षसें तृणतुच्छें ।।

      सहज रिपुदळाचा थोर संव्हार केला ।

      आवघड गड लंका शीघ्र जाळून आला ।।४।।

      सहज करतळें जो मेरुमांदार पाडी ।

      दशवदन रिपू हे कोण कीती बराडी ।।

      अगणित गणवेना शक्ति काळासि हारी ।

      पवन तनुज पाहो पूर्ण रुद्रावतारी ।।५।।

     

।। जय जय रघूवीर समर्थ ।।

1 टिप्पणी: