शनिवार, ३१ मार्च, २०१८

हिमालयाच्या सहवासात प्रस्तावना


प्रस्तावना
     हिमालयाच्या सावलीत हे माझे प्रवास वर्णनात्मक साहित्य वाचकांच्या समोर सादर करताना मला अतिशय आनंद होत आहे. १४ मार्च २०१६ ते ३१ मार्च २०१६ या काळात मी एका प्रदिर्घ सहलीत सहभाग घेतला होता. नोकरीतुन स्वेच्छानिवृत्ती घेतल्यानंतर माझे महाराष्ट्रा बाहेर प्रवास करणे सुरु झाले.
नोकरीत असताना रजेची अडचण असायची. याच्याही पेक्षा मुख्य अडचण असायची ती दामाजीपंतांची. केंद्र सरकारमध्ये नोकरी करत असल्याने एल्. टी. सी. ची  सवलत मिळत असे परंतु त्यात मेख अशी होती, की सरळ एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणाकडे जाण्याकरीता कमीत कमी अंतराचे फक्त प्रवास भाडे मिळत असे. सहलीकरीता जायचे म्हणजे हे अडचणीचे होई. कारण प्रवास थांबत थांबत मुक्काम करीत करीत जावे लागते. प्रत्येक ठिकाणी हॉटेल अथवा तत्मम ठिकाणी मुक्काम करणे, सकाळच्या चहा पासुन सर्वच विकतचे पदार्थ घेणे याकरीताचा खर्च खूप होत असे त्यामुळे कधी एल् टी सी ची सवलत घेतली नव्हती. सरकारी नोकरीत पगारही बेताचाच असतो त्यातच मुलांची शिक्षणे याला प्राधान्य द्यावे लागते.
सेवा निवृत्ती घेतल्यानंतर मुलांची शिक्षणे पूर्ण झाली होती. त्यामुळे जबाबदारी कमी झाली होती. आता या काळात सहलीचा विचार करणे शक्य होते. तरीही मी या सहलीला तयार नव्हतो. परंतु त्या वैष्णो देवीनेच तिच्या दर्शनाला बोलावल्यामुळे मी सहलीला जायला तयार झालो. आम्ही ठरवलेली ही सहल कोणत्याही ट्रॅव्हेल एजन्सी मार्फत न करता नातेवाईकांचाच एक ग्रुप तयार करुन आमची आम्ही आयोजित केली होती. त्यामुळे आमचे वेळापत्रक, प्रवासाचा मार्ग आमचा आम्हीच ठरवला होता. त्यात आयत्यावेळी बदल करण्याचे स्वातंत्र्य आम्हाला होते.
या प्रदिर्घ प्रवासाचे वर्णन मी लिहायचा प्रयत्न केला आहे. या प्रवासात आम्ही जम्मु, काश्मिर, पंजाब, हिमाचल प्रदेश, हरीयाणा या राज्यांमधुन मुक्काम केले आणि तिथले निसर्ग सौंदर्य अनुभवले. काश्मिरमध्ये असताना एकीकडे बर्फात वावरण्याचा आनंद तर दुसरीकडे अतिरेक्यांच्या प्रभावाखाली असलेल्या भागात वावरत असल्यामुळे धास्ती अशा दुहेरी भावना होत्या. आमच्या सुदैवाने आम्हाला कोणत्याही वाईट अनुभवाला सामोरे जावे लागले नाही.  श्रीनगरमधल्या लोकांच्या मनाचा मोठेपणाही अनुभवायला मिळाला. पंजाबमध्ये बाघा सिमेवरील बिटींग रिट्रीटचा भव्य सोहळाही अनुभवायला मिळाला. अमृतसरमध्ये जालियनवाला बागेच्यारुपाने ब्रिटिशांची क्रुरता पहायाला मिळाली. सुवर्णमंदिरामध्ये शिख समाजाची भक्ती पहायला मिळाली. कुरुक्षेत्रामध्ये महाभारतकालीन स्थळांना भेटी देता आल्या. अर्जुन  भिष्म, श्रीकृष्ण यांच्याशी संबधित क्षेत्रांचे दर्शन घेता आले. पानिपत मध्ये मराठ्यांच्या इतिहास अनुभवता आला.
प्रवासवर्णन म्हणजे टिपीकल इथुन आलो तिथुन गेलो असे न लिहीता भेट दिलेल्या स्थळांची जास्तित जास्त माहिती मिळवुन ती देण्याचा प्रयत्न केला आहे. आपण भेट देत असलेल्या स्थळांची माहिती असेल, त्याचे वैशिष्ट काय हे माहिती असले की, त्या स्थळाकडे पहाण्याचा दृष्टीकोन मिळतो. आमच्या कडे लोक जंजिरा किल्यावर जातात आणि म्हणतात की, तिथे बघण्यासारखे काहीच नाही. वास्तविक तिथे जाण्यापूर्वी त्या किल्याचा इतिहास त्याचे जलदुर्ग म्हणून असलेले महत्व विचारात घेऊन किल्ला पाहिला की, हा किल्ला उभा करण्यामागे निर्मात्यांचे कष्ट आणि त्यांची दूरदृष्टी याचा प्रत्यय येतो. किल्यात असणारे गाईड चुकीचा इतिहास सांगतात आणि आपण आपला गैरसमज वाढवुन परत येतो. असाच प्रकार श्रीनगर येथिल प्रसिद्ध अवंतीस्वामी मंदिराचे बाबतित होतो. मंदिराचा खरा इतिहास समजतच नाही. गाईड त्यांना सोयीची  माहिती सांगतात. असो मी काही त्यातला तज्ञ नाही परंतु मनात आले ते व्यक्त केले एवढेच.
हा माझा प्रयत्न आपल्यला आवडल्यास मला अवश्य कळवावा. आपला अभिप्राय मला लिहिण्याचा नवा उत्साह देईल.

अनिल अनंत वाकणकर.
   

गुरुवार, २९ मार्च, २०१८

हिमालयाच्या सहवासात भाग ११


११. डलहौसी दर्शन
     आज दिनांक २४ मार्च २०१६! आमच्या सहलीचा ११वा दिवस! डलहौसी येथे बघण्यासाठी बरेच पॉईंट आहेत. त्यामुळे आज आम्ही आमचा पूर्ण दिवस येथेच घालवणार आहोत. सकाळचे प्रातर्विधी आणि चहापाणी झाल्यावर हॉटेलवर आणलेले सामान गाडीत चढवुन हॉटेलमधुन चेक आऊट केले.
     सर्वात प्रथम आम्ही पंचफुला येथे दाखल झालो. पंचफुला येथे छान धबधबा आहे. तो पाहून मला शिवथर घळीची आठवण झाली. शिरथर घळी येवढ्या उंचीवरुन हा धबधबा पडत नव्हता तरीही स्पॉट खूपच छान होता. जवळच दोरीच्या सहाय्याने तयार केलेला पुल होता. धबधब्याचे पडणारे पाणी शेवटी एका विशाल तलावात जाते त्या ठिकाणी बोटींगची सोय आहे. त्या तलावाच्या काठावर परम देशभक्त सरदार अजीत सिंह  यांचे स्मारक आहे. त्यांचा पुतळा येथे उभा केलेला आहे. हे अजित सिंग म्हणजे शहिद भगत सिंग यांचे काका होते. या ठिकाणी एक माणूस ससे घेऊन बसला होता. आश्चर्याची गोष्ट म्हणजे तिथे असलेले ससे शांत बसले होते.
     पंचफुला येथिल निसर्ग सौंदर्याचा आनंद घेतल्यानंतर आम्ही जवळच असलेल्या सातधारा या प्रसिध्द स्थळी आलो. समुद्रसपाटीपासुन २०३६ मिटर उंचीवर असलेल्या या ठिकाणी सात झरे छोट्याशा धबधब्याच्या स्वरुपात पडतात. या सातधारांच्या पाण्यात औषधी गुण आहेत असा लोकांचा विश्वास आहे. या पाण्यात गंधकाचा अंश असल्याने त्वचा रोग तर बरे होणारच. येथिल निसर्ग सौंदर्याचा आस्वाद घेण्याकरीता तर लोक येथे येतातच शिवाय हे सात अप्सरांचे किंवा देवीचे स्थान आहे असाही लोकांचा समज आहे. आपल्याकडे कोंकणातही अशी सात आसरांची अशी बरीच स्थाने आहेत.
            सातधारा नंतर आम्ही सुभाष बोहली या पवित्र स्थळाला भेट दिली. आपल्या देशाच्या स्वातंत्र्य संग्रामात मह्त्वाची भूमिका बजावणाऱ्या नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्याशी निगडीत असे हे स्थळ आहे. सन १९३७ मध्ये इंग्रजांच्या कैदेत असताना नेताजींना टी.बी. झाला होता. त्यावेळी उपचारासाठी आक्टोबर ते मे १९३७ या काळात ते पंचफुला रोडवरील डॉ.धर्मवीर यांच्याकडे ते राहिले होते. त्यावेळी ते दररोज या रोडवर फिरायला येत असत आणि या विहिरीचे पाणी पित असत. येथिल औषधी पाण्याने आणि शुध्द हवेने ते बरे झाले व नंतर नव्या उत्साहाने त्यांनी परत स्वातंत्र्य संग्रामात उडी घेतली. या ठिकाणी आम्ही नेताजींच्या पवित्र स्मृतीला वंदन केले.
     डलहौसी येथिल आणखी एक प्रसिध्द ठिकाण म्हणजे गांधी चौक. येथे प्रसिध्द तिबेटी बाजार आहे. चिनने जेव्हा तिबेटवर हल्ला केला तेव्हा हजारे तिबेटी आश्रयासाठी येथे स्थलांतरीत  झाले होते. त्यातिल बरेचसे कालांतराने हे शहर सोडून गेले. मात्र जाताना रस्त्याच्या कडेला त्यांनी निर्माण केलेली लेणी आणि गांधी चौकातिल तिबेटी बाजारच्या स्वरुपात आपल्या खूणा ठेवुन गेले. आमच्यापैकी काहीजणांनी येथे खरेदी केली.
     त्यानंतर आम्ही भेट दिली सुभाष चौकाला. येथे नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा पुतळा उभारला आहे. या चौकातच फ्रान्सिस चर्च आहे. त्या चर्चला आणि तेथिल झूला भेट दिली. या ठिकाणी असलेल्या मोराने चक्क पिसारा उभारला होता. तसे जामनगरला आम्ही दररोज मोर बघतो परंतु पिसारा उभारलेला मोर बघणे हा वेगळाच अनुभव आहे.
     फ्रान्सिस चर्चला भेट दिल्यानंतर आम्ही डलहौसी शहराच्या बाहेर पडलो ते सरळ चमेरा लेकच्या दिशेने निघालो. डलहौसीहून चमेरा लेक ३४ किलोमिटर आहे. परंतु रस्ता वळणा वळणाचा आणि पूर्णपणे घाट रस्ता आहे. धरण दिसायले लागले होते परंतु रस्ता काही संपतच नव्हता. शेवटी एका बोगद्यातुन गेल्यावर धरणाचा बोटींग करता असलेला स्पॉट दिसायला लागला. तेथुन जवळच भालेई मातेचे मंदिर होते. आम्ही आधी भालेई मातेच्या मंदिरात जायचा निर्णय घेतला.
     आपल्याकडे ज्याप्रमाणे दक्षिण काशी म्हणून अनेक देवस्थानांचे नांव घेतले जाते. त्याच प्रमाणे वैष्णोदेवीच्या खालोखाल प्रसिध्द असणारी बरीच मंदिरे आहेत त्यापैकीच हे एक मंदिर आहे. या मंदिरात जाण्यासाठी साधारण शंभर पायऱ्या चढाव्या लागतात. मंदिराला छान दगडी कमान केलेली आहे.
भद्रकालीला येथे भालेई माता असे संबोधले जाते.  हे स्थळ भाल्यासारख्या टोकदार असणाऱ्या डोंगरावर असल्याने त्याला भालेई असे म्हणातात. समुद्रसपाटीपासुन याची उंची ३८८० फुट आहे. हे मंदिर चंबा या जिल्हाच्या ठिकाणापासुन ४० किलोमिटर तर डलहौसी पासुन ३५ किलोमिटर आहे. आश्विन आणि चैत्र महिन्यांत येथे नवरात्री उत्सव साजरा केला जातो.
या मंदिराची कथा मोठी रंजक आहे. माता भद्रकाली राजा प्रतापसिंग यांच्या स्वप्नांत आली व तिने मी भ्रण येथे गाडलेल्या अवस्थेत आहे, तिथुन मला बाहेर काढ आणि योग्य जागी माझे मंदिर बांध असे सांगितले. हे भ्रण गांव सध्याच्या मंदिरापासुन तिन किलोमिटर अंतरावर आहे.  
राजा प्रताप सिंग यांना आपली राजधानी चंबा येथे मंदिर बांधायचेच होते. त्याला शुभ शकुन झाला असे म्हणुन ते आपल्या सैनिकांसह मूर्ती शोधण्याकरीता निघाले. मूर्तीचा शोध घेतल्यानंतर परत येताना वाटेत ते सर्वजण भालेई येथे विश्रांतीसाठी थांबले. विश्रांती झाल्यावर परत चंबाच्या दिशेने निगण्याकरीता मूर्ती उचलु लागले असता मूर्ती जागची हालेना. याच्यावर तोडगा काढण्याकरीता किलोद येथिल ब्राह्मणाला बोलावुन उपाय विचारला तेव्हा त्याने सांगितले की, देवीची इच्छा इथेच रहाण्याची आहे. दुसऱ्या कथेनुसार येथिल ग्रामस्थांचा देखिल देवीला येथुन हलवुन चंबाला नेण्यास विरोध होता, म्हणून त्यांनीही राजाला भालेई येथेच मंदिर बांधण्याची विनंती केली.
कारण काही असो राजा प्रताप सिंग यांनी भालेई येथे हे मंदिर बांधले. कालांतराने राजा श्री सिंग यांनी त्याचे नूतनिकरण केले. दुर्दैवाने सन १९७३ मध्ये मंदिरामधिल मूर्तीची चोरी झाली. परंतु सुदैवाने ती मूर्ती परत सध्याच्या धरणाच्या परिसरात सापडली. परंतु तेव्हापासुन त्या मूर्ती मधुन घामाच्या धारा लागु लागल्या असे म्हणतात. भालेईमाता मंदिराच्या टेकडीवरुन चमेरा धरणाचा परिसर अगदी लॅंडस्केप सारखा दिसतो. एवढ्या उंचीवरुन चंबा खोरे पहाणे म्हणजे डोळ्यांना मेजवानीच आहे.
भालेई मातेचे दर्शन करुन झाल्यावर आजच्या लंचचा मेनू कोंकणातिल दडपे पोहे करायचे असा ठरवला. त्याकरीता पोहे, मीठ, तिखट, तेल ही सर्व सामुग्री रोह्याहून येताना बरोबर आणलेली होती. फरसाण, टॉमॅटो आणि कांदे मुंबईहून आणलेले होते. हिरवी मिरची आणि कोथिंबीर भालेई मातेच्या पायथ्याशी असलेल्या सब्जीच्या दुकानातुन घेतली. ओला नारळ देखिल होता परंतु तो किसायचा कसा हा प्रॉब्लेम होता. पोहे कालवण्याकरीता आमच्या सामानात प्लॅस्टीकची बालदी होती.
पोहे बनविण्याकरीता आमच्या सोबत गब्बुपण कामाला लागला होता. सुरीने कांदे कापण्यात तो मदत करत होता.  ते सर्व साहित्य एकत्र करुन प्लॅस्टीक बादलीत ते दडपे पोहे कालवले आणि ते खायला मात्र खाली चमेरा लेकपाशी गेलो. दडपे पोह्यांचा बेत मस्तच जमला होता. भरपुर दडपे पोहे खाऊन झाल्यावर आम्ही लेक पहाण्याकरीता बोटींग करण्याच्या धक्यावर गेलो.
लेकमध्ये बोटींग करण्याच्या दृष्टीने चौकशी करायला गेलो असता त्यांनी सांगितलेले दर ऐकुन चाटच पडलो. बोटींग करायचे अंतर आणि वेळ याचा विचार करता दर खूपच जास्त होते. याच्यापेक्षा खूप कमी पैशात आम्ही मांडवा ते मुंबईमधिल गेट वे पर्यंतचे अंतर अगदी कमी पैशात पार करतो. त्या जलप्रवासाला वेळ देखिल बराच लागतो. त्यामुळे आमच्यापैकी कोणीही बोटींग करीता गेले नाही. लेकच्या पार्श्वभूमीवर फोटो मात्र काढले. त्यावेळी तिथे लेकमध्ये बरीच बदके पोहताना दिसत होती.
चमेरा लेक पाहून होईपर्यत बराच वेळ झाला होता. आज आम्हाला पठाणकोट येथे वस्तीला जायचे होते. त्यामुळे आमचा प्रवास आता त्या दिशेने सुरु झाला. पठाणकोटच्या रस्त्याच्या दोन्ही बाजुला बरीच आंब्याची झाडे दिसत होती. वाटेत एक शहरवजा  गांव लागले. तेथे गब्बुने गाडी थांबविली.रस्त्याच्या बाजुला अनेक दुकाने होती. त्या दुकानांमध्ये विकायला ठेवलेली एक वेगळीच वस्तु होती. तिचे नांव होते आमके पपड. आंब्याच्या रसापासुन बनविलेले हे पापड म्हणजे आपल्याकडे बनवतात ती आंबापोळी अथवा साठे होती. रायवळ सारख्या आंब्यापासुन बनविलेली असल्यामुळे आंबट लागत होती. आपल्याकडे चिपळुण रत्नागिरी येथे मिळतात तशा जेलीच्या स्वरुपातही आंब्याच्या वड्या विकायला ठेवलेल्या होत्या. अशाप्रकारच्या आंब्याच्या जेली आम्हाला अमृतसर मध्येही नंतर बघायला मिळाल्या.
पठाणकोट येथिल गुरुदास पुर रोड वरील न्यू पटेल नगर मधिल गुरुराज गेस्ट हाऊस मध्ये आम्ही उतरलो होतो. वास्तविक आमच्या सहलीच्या नियोजनात पठाणकोट येथे जायचे नव्हते परंतु डलहौसीला झालेल्या हॉटेलच्या बुकींगमध्ये झालेल्या घोळामुळे आम्ही फक्त पठाणकोट येथे वस्तीला आलो होतो. तेथिल कोणतेही स्पॉट बघण्याचा आमचा शेड्युल नव्हता. कारण उद्या आम्हाला धरमशाला येथे जायचे होते.

*******
 
          

बुधवार, २८ मार्च, २०१८

हिमालयाच्या सहवासात भाग १०


१०. जम्मु आणि डलहौसी दर्शन.
     आज दिनांक २३ मार्च २०१६! आज होळी पोर्णिमा आहे. आज जर घरी असतो तर होळीच्या सणाची वेगळीच गडबड असती. घरच्या पुरणपोळीची चव होळीचा दिवस असुनही चाखता येणार नव्हती. इकडच्या लोकांना पुरणपोळी हा प्रकार तरी माहित असेल असे वाटत नाही. इकडचा आलु पराठा म्हणजेच इकडची तिखट पुरणपोळी. आज बहूदा तिच खावी लागेल असे दिसते.
            सकाळी साडेदहाला रघुनाथ मंदिरात आलो. संपूर्ण परिसर सिमा सुरक्षा दलाच्या तैनातिखाली होता. मंदिराच्या प्रवेशद्वारावर असलेले जवान मराठी होते. आम्ही मराठी बोलत होतो ते ऐकुन त्यांनी आमची आस्थेन चौकशी केली. मंदिराच्या परिसरात सर्वत्र सावधान पोझिशन मधेले हत्यारी जवान दिसत होते. मंदिरात प्रवेश केल्यावर समोरच मंदिराचे निर्माते(patron) राजे रणबिरसिंग यांचे पोर्ट्रेट होते.
     जम्मु शहराच्या मध्यवर्ती भागात असणारे रघुनाथ मंदिर हे मुख्यत: रामाचे मंदिर आहे. मुख्य मंदिराचा गाभारा सोन्याच्या पत्र्याने मढविलेला आहे. गाभाऱ्यात श्रीराम, सिता, लक्ष्मण यांच्यासह एकूण सात मूर्ती आहेत. या मंदिराचा परिसर भव्य असुन त्या परिसरात रामायणातिल सर्व व्यक्तिमत्वांची वेगवेगळी मंदिरे आहेत. तसेच संपूर्ण प्रदक्षिणा मार्गावर अनेक मंदिरे आहेत.
     मंदिराच्या परिसरात बांधलेल्या हॉलमध्ये असंख्य शालिग्राम बसविले आहेत. त्यांना तेहतिस कोटी देवांच्या स्वरुपात पूजले जाते. मंदिरात प्रवेश करताना प्रथम हनुमानाचे दासमारुतीच्या स्वरुपातिल मूर्ती असलेले मंदिर आहे. या शिवाय एक स्वतंत्र गणपति मंदिर आहे. त्या मंदिरात पंचमुखी गणेशाच्या मूर्ती  आहेत. या मंदिराच्या निर्मितीचे काम या राज्याचे महाराज गुलाबसिंग यांनी सन १८३५ मध्ये सुरु केले ते त्यांचे पुत्र महाराजा रणविर सिंग यांनी सन १८६० मध्ये पूर्ण केले.
     आम्ही मंदिरात प्रवेश केला तेव्हा श्रीरामांच्या आरतीची सुरवात झालेली होती. आरती झाल्यावर आम्ही विधीपूर्वक दर्शन घेतले. तेथे असलेल्या पूजाऱ्यांकडे आम्ही रामरक्षा स्तोत्राचे पठण करण्याची परवानगी विचारली. तेव्हा त्यांनी दर्शन घेणाऱ्यांना त्रास होणार नाही आणि आम्हालाही सहज दर्शन होईल अशी जागा आम्हाला बसण्यासाठी दाखवली. त्यांनीच आम्हाला बसण्यासाठी गालिचा देखिल आणून दिला. मग त्या गालिचावर बसुन आम्ही सर्वांनी रामरायाचे दर्शन घेत घेत रामरक्षा स्तोत्राचे संथ सुरात सामुदाईक पठण केले. त्यामुळे मनाला एक वेगळेच समाधान मिळाले. त्यानंतर पंचमुखी गणेश मंदिरातही असेच श्री गणपति अथर्वशिर्षाचे पठण केले. या पठनात तेथिल पूजारीही सामिल झाले. त्यानंतर सर्व परिवार देवतांचे दर्शन घेतले.
     जामनगरहून प्रवासाला निघाल्यापासुन जास्त रोकड जवळ बाळगायची नाही हे धोरण ठेवले होते. त्याप्रमाणे जसे जसे पैसे लागतिल तसे ए. टी. एम्. मधुन काढत असे. आज आता जवळची रोकड संपली होती. त्यामुळे पैसे काढण्याकरीता रघुनाथ मंदिराच्या जवळ असणारे स्टेट बॅंकेचे ए. टी. एम्. शोधुन काढले.
      ए. टी. एम्. मधुन येईपर्यंत बाकी सर्वजण गाडीत सामान भरुन तयारच होते. मी आल्यावर लगेचच गाडी सोडण्यांत आली. या नंतर आम्ही जम्मुचा किल्ला पहायला गेलो. बाहू या नावाने या किल्याचा ओळखले जाते. या किल्याचे बांधकाम राजा बाहूलोचन याने सुमारे तिन हजार वर्षांपूर्वी केले आहे. या किल्यावरुन तावी नदीचे अद्भूत दृष्य दिसते. येथे काली मातेचे मंदिर आहे. मंदिराच्या परिसरात असलेल्या जंगलाचे सुंदर बगिचामध्ये रुपांतर करण्यात आलेले आहे. या बागेला बाहू बाग म्हणून ओळखले जाते.
     पांढऱ्या संगमरवरात बांधलेले हे मंदिर आकाराने मात्र छोटे आहे. याची उंची केवळ ३.९ फुट आहे. त्यामुळे मंदिरात एकावेळी मोजकेच भक्त जाऊ शकतात. येथे रोज कुमारीकांची ओटी भरुन पूजा केली जाते. हे मंदिर महाराजा गुलाबसिंग सत्तेत आल्यावर १८व्या शतकांत सन १८२२ मध्ये बांधले गेले असे मानले जाते. या संबंधी एक कथा सांगितली जाते. सुमारे ३०० वर्षापूर्वी पंडित जगतराम याच्या स्वप्नात माता महाकाली आली होती. तिने त्यांना सांगितले की, मी पिडींच्या(स्वयंभू) स्वरुपात डोंगराच्या माथ्यावर आलेली आहे. त्यानंतर लोकांना सध्या मंदिर आहे त्या ठिकाणी पिंडीच्या स्वरुपातिल देवी आढळुन आली. काही काळाने त्या ठिकाणी मंदिर बांधण्यात आले. सध्याच्या काळ्या पाषाणातिल मूर्तीची शिला अयोध्येच्या राजाकडून मिळाली होती.
     मंदिर परिसरात आणखिही देवीच्या मूर्ती आहेत. मंदिराचा परिसर छान स्वच्छ होता. या ठिकाणचे एक वैशिष्ट म्हणजे येथे येणाऱ्या प्रत्येक भक्ताला अस्सल साजुक तुपातला शिरा आणि हरभऱ्याची उसळ प्रसाद म्हणून देण्यांत येतो. खास बाब म्हणजे ते पदार्थ वाटी आणि चमच्या सह दिले जात होते. प्रसाद ग्रहण करुन झाल्यावर वाटी चमचा घासण्याकरीता लगेच सेवेकरी हजर असतात.
     या किल्याच्या तटाच्या पार्श्वभूमीवर अनेक फोटो काढुन झाले. किल्यातल्या गार्डन मध्ये देखिल फोटो काढले. अशा तऱ्हेने बाहू किल्ला पाहून झाल्यावर डलहौसीच्या दिशेने प्रवासाला सुरवात झाली.  काही काळ प्रवास झाल्यावर जम्मु काश्मिरची बॉर्डर लागली. सिमेवरचा टोल क्रॉस करताच सगळ्यांची प्रिपेड सिम चालू झाली. त्यामुळे सर्वांनी भराभरा फोन लावायला सुरवात केली. माझा काही प्रश्न नव्हता कारण मी पोस्टपेड सिम बरोबर ठेवले होते.
     आता आम्ही पंजाबमध्ये प्रवेश केला होता. दुपारचे दोन वाजुन गेले होते. सगळ्यांच्या पोटात कावळे काव काव करायला लागले होते. गब्बुला सांगितल्यावर त्याने एका पंजाबी धाब्यावर गाडी थांबवली. त्या हॉटेलमधिल सरसोका साग आणि मकईकी रोटी हा स्पेशल मेनू होता. सगळ्यांनी तोच मेनू ऑर्डर केला. जेवण खरोखरच चविष्ट होते. भरपेट जेवण झाल्यावर परत पुढचा प्रवास सुरु झाला. आता आपण पंजाब मधुन प्रवास करीत आहोत हे रस्त्याच्या दुतर्फा असणाऱ्या गव्हाच्या शेतांवरुन जाणवत होते.
     दुपारच्या तिन साडेतिनच्या सुमारास गब्बुने गाडी थांबवली आणि येथे एक खास शिवमंदिर आहे असे सांगितले. हे मंदिर म्हणजे हिमाचल मधिल प्रसिद्ध त्रिलोकीनाथाचे म्हणजेच शंकराचे मंदिर होते. हे मंदिर राजा अजब सेन याची राणी सुलतान देवी हिने सन १५२० मध्ये बांधले. या गावाचे नांव मंडी असे आहे. बयास नदीच्या किनाऱ्याला असणाऱ्या गुंफेत हे मंदिर आहे. गुंफेच्या छता मधुन सतत पाणी ठिपकत होते. जणू तेथे भगवान शंकराला संतत धारेच्या स्वरुपात अभिषेकच करीत होते.
          हे मंदिर  मंडी गावातिल व्हिक्टोरीया पुलाच्या अगदी बाजुला आहे. येथे भक्तांची खूपच गर्दी दिसत होती. बयास नदिच्या पात्रातही एक छोटे मंदिर दिसत होते. या ठिकाणचा निसर्गही समृद्ध आहे. हिरव्यागार वनराई मध्ये नदीच्या पात्राच्या अगदी बाजुला असल्याने या ठिकाणाचे आकर्षण जास्त होते. या तिर्थक्षेत्राचा विकास हिमाचल प्रदेश पर्यटन विभागा तर्फे केला गेला आहे. तिथेच असलेल्या एका धाब्यावर चहापाणी करुन पुढच्या प्रवासाला सुरवात केली.
     थोड्याच वेळात आम्ही डलहौसीच्या परिसरात पोचलो. डलहौसीची घाटी चढायला सुरवात केल्यावर रस्त्याच्या दुतर्फा अनेक प्रकारची झाडे होती. परंतु त्यात लक्ष वेधुन घेत होते ते लालफुलांचे वृक्ष. या झाडांवर जास्वंदी सारखी फुले आलेली होती. जंगलाचा मोठा भाग या झाडांनी व्यापला होता. त्या झाडांच्या फुलांमुळे सर्वत्र लाल रंग भरून राहिला होता. नंतर चौकशी केली तेव्हा त्या फुलांच्या झाडाचे नांव बुऱ्हान आहे असे समजले. या जातीच्या झाडांना लाल, पांढरी आणि गुलाबी अशी तिन प्रकारची फुले येतात. या फुलांचे सरबत, चटणी आणि जाम असे पदार्थ केले जातात. हिमाचल प्रदेश खादी ग्रामोद्योग मंडळा तर्फे या वस्तुंचे उत्पादन आणि विक्री केली जाते.
            आता आम्ही डलहौसी शहरात प्रवेश केला होता. डलहौसी हे शहर सन १८५४ मध्ये ब्रिटीश सरकारने आपल्या कर्मचाऱ्यांना उन्हाळ्याची सुट्टी घालविण्याकरीता निर्माण केले होते. या शहराचे नांव लॉर्ड डलहौसी या भारतातिल त्यावेळच्या ब्रिटिश गव्हर्नरच्या नांवावरुन दिले होते. हे धौलाधार पर्वतावरील पांच टेकड्यांवर वसविले गेले आहे. या शहराची समुद्र सपाटीपासुनची उंची ६००० ते ९००० फुटां दरम्यान आहे.
     आता संध्याकाळ झाली होती. आम्ही डलहौसी येथिल प्रसिद्ध खज्जर लेक या ठिकाणाला भेट दिली. मोठे हिरवळ असलेले मैदान, आजुबाजुला घनदाट झाडी, एक छोटा तलाव हे येथिल निसर्ग वैभव आहे. घोडेवाले, फोटोग्राफर आपापला धंदा व्हावा म्हणून पाठिशी लागले होते. होळीच्या निमित्ताने सलग चार पाच दिवस सुटी असल्याने भरपुर गर्दी होती. सशांची छोटी छोटी पिल्ले एका उभट टोपलीत घेऊन काही माणसे तेथे हजर होती. लोक त्या सशाची पिल्ले असणाऱ्या टोपल्या हातात घेऊन फोटो काढत होते. एक फोटो करीता ती टोपली वापरण्याचे दहा रुपये ती माणसे घेत होती.
     खज्जर येथिल निसर्ग सौंदर्याचा आनंद घेऊन झाल्यावर वाटेत एका टेकडीवर देवीचे मंदिर होते ते पहाण्यासाठी गब्बुने गाडी थांबवली. आम्ही चढण चढायला सुरवात केली तेव्हा दिवस मावळायला सुरवात झाली होती. सुमारे १५-२० मिनिटे चालल्यावर आम्हाला देवीचे दर्शन घेऊन येणारे काही भक्त भेटले, ते म्हणाले आता थोड्याच वेळात काळोख होईल तुम्हाला पुढे जाणे मुश्किल होईल. तरीही आम्हा मोबाईलच्या बॅटरीच्या प्रकाशात पुढे जाणे चालूच ठेवले. तेवढ्यांत वरुन भक्तांचा दुसरा ग्रुप आला. त्यामध्ये देवीच्या मंदिराचे पूजारीबाबाही होते. त्यांनी आम्हाला सांगितले, आता वरती जाण्यात काही अर्थ नाही. देवीच्या मंदिराच्या परिसरात रानटी श्वापदांचा वावर असतो म्हणून मी मंदिर बंद करुन आलो आहे. तेव्हा देवीच्या दर्शनाचा योग नाही असे समजुन आम्ही परत फिरलो. तरीही या ठिकाणी आल्याची आठवण म्हणून काही फोटो काढले.
     आता रात्र झाली होती. मुक्कामाच्या ठिकाणी जायची वेळ झाली होती. आमच्या बुकिंग मध्ये काहीतरी गडबड झाली होती. त्यामुले गब्बुची गेस्ट हाऊस शोधायची धावपळ सुरु होती. आज डलहौसीमध्ये प्रचंड गर्दी होती. त्यामुळे वाहने पार्किंग करण्याकरीता जागा देखिल मिळत नव्हती. बऱ्याच प्रयत्नानंतर आम्हाला हव्या तशा पांच रुम एकाच ठिकाणी मिळाल्या. डलहौसी हे हिलस्टेशन असल्याने गेस्ट हाऊस देखिल टेकडी टेकडीवर होती. आम्हाला मिळालेले गेस्ट हाऊस असेच उंच टेकडीवर होते. तिथे गाडी जाऊ शकत नव्हती. त्यामुळे अत्यावश्यक सामान बरोबर घेऊन गेस्ट हाऊस मध्ये दाखल झालो. महाबळेश्वर, माथेरान ही हिलस्टेशन जवळ असुनही कधी तिथे जाणे झाले नव्हते ते आता हिमाचल मध्ये शक्य झाले. रुम छानच होत्या. आज हवामानही खूपच थंड होते. परंतु आल्हाद दायक होते.
     आता उद्या डलहौसी दर्शनाचाच कार्यक्रम होता त्यामुले सकाळी लवकर उठण्याची घाई नव्हती.
*******



मंगळवार, २७ मार्च, २०१८

दुर्गा कवच भाग ४

 दुर्गा कवच

भाग ४
आज श्रावण महिन्याचा पहीला दिवस आणि पहिला सोमवार होता. गुहागर येथे व्याडेश्वर मंदिरात गर्दी दिसत होती. कालच्या पेक्षा आज हवामान जर बरे होते. म्हणजे पावसाची संततधार चालू होती त्याच्याऐवजी पाऊस थांबुन थांबुन पडत होता. अनिकेत, आर्या, अनिकेतचे आई बाबा सर्वजण सकाळी आठ वाजताच गुहागरयेथे हजर झाले होते. त्यांनी आपल्या आंघोळी देवीहंसोळच्या भक्त निवासाताच उरकल्या होत्या. गुहागरला आल्यावर ते सर्वजण थेट पाटणकरांचे नेहमीचे अंजर्लेकरगुरुजी यांच्या घरी गेले होते. त्यांच्या घरी अनिकेत आणि आर्याने आपले प्रवासी कपडे बदलुन अभिषेकाकरिता कद आणि पैठणी नेसल्यावर सगळेजण चहापाणी करुन देवळांत आले होते. तेथे अंजर्लेकर गुरुजी त्यांची वाटच पहात होते. ते येताच त्यांनी अनिकेत आणि आर्याला थेट गाभा-यात नेले. आणि त्यांच्या हस्ते संकल्प करुन यथाविधी रुद्राभिषेक संपन्न केला.
सर्वांचे विधिवत दर्शन होताच त्यांनी आपली गाडी गुहागर मध्येच असलेल्या दुर्गा देवीच्या दर्शनाला नेली. तेथुन परत ते अंजर्लेकर गुरुजींच्या घरी गेले. तिथे जाऊन त्यांच्या हॉलमध्ये बसल्यावर नाश्ता तयार होईपर्यंत वेळ जावा म्हणून त्यांनी टि. व्ही लावला. कालपासुन बातम्या बघितल्या नव्हत्या म्हणून त्यांनी प्रथम न्यूज चॅनेल लावला तो, त्यावर सतत ब्रेकींग न्यूज दाखवत होते. महाडच्या सावित्री नदीवरील पूल पुराच्या पाण्याच्या लोंढ्याने वाहून गेला. त्यामध्ये अनेक वाहने वाहून गेल्याची भीती व्यक्त करण्यांत येत होती.
ते ऐकल्यावर आर्याने धीरच सोडला. कारण तिच्या आई बाबांचा रात्री अकरा वाजता चिपळुणला असल्याचा फोन होता. त्यानंतर त्यांचा संपर्क झालाच नव्हता. पुल वाहून गेल्याची वेळ आणि त्यांची महाडच्या आसपास असण्याची वेळ एकच असल्याचे त्यांच्या लक्षांत आले. दरम्यान राजापुर डेपोची आणि रत्नागिरी डेपोची अशा दोन बस बेपत्ता असल्याचे सांगण्यात येत होते. मग मात्र अनिकेत, अशोकराव, अनिकेतची आई यासर्वांनी आपल्या मोबाईलवरुन त्यांच्याशी संपर्क करायचा प्रयत्न करायला सुरवात केली. एकुणच सर्व हकीगत समजताच अंजर्लेकर गुरुजींच्या मुलानेही आपले कॉन्टॅक्ट वापरुन बातमी काढायचा प्रयत्न करायला सुरवात केली. त्याने चिपळुण येथिल आपल्या मित्राला एस्. टी. स्टँडवर जाऊन खात्रीची बातमी द्यायला सांगितले.
मधल्या काळात माधवलाही फोन लावायचा प्रयत्न करत होते पण तो सारखा एंगेज लागत होता. थोड्याच वेळात चिपळुणहून गुरुजींच्या मुलाला त्याच्या मित्राचा फोन आला. त्याने बातमी सांगितली ती अशी होती. रात्री अकरा वाजता चिपळुणच्या कँटीनमध्ये मुंबईकडे जाणा-या तिन बसेस उभ्या होत्या पैकी जयगड मुंबई आणि राजापुर बोरीवली बस एकदम निघुन गेल्या, मात्र राजापुर मुंबई बस थोड्या उशिराने चिपळुणहून निघाली. पैकी राजापुर बोरीवली आणि जयगड मुंबई बस मिसींग असल्याचे समजते. या सर्वच गाड्यांना महाड थांबा नाही त्यामुळे पेणच्या रामवाडी स्थानकावर चौकशी करायला लागेल.
ती बातमी ऐकुन आर्या म्हणाली, आई बाबाची राजापुर बोरीवली बस चुकली होती. ते राजापुर मुंबई बसमध्येच असतिल. त्या गाडीची बातमी काढायला पाहीजे. त्या गाडीची बातमी कशी काढायची या विचारात ते सर्वजण बसले.
********
देवी हंसोळ येथे भक्तनिवासमध्ये मॅनेजर जोशी देखिल टी. व्ही.वर बातम्या बघत बसले होते. तेही पाटणकर दांपत्य सुखरुप असेल नां किंवा कसे या विचारात बसले होते. तेवढ्यांत त्याच्या मोबाईलची रींग वाजली. बघतात तर चव्हाण ड्रायव्हर यांचा फोन होता. मोठ्या उत्सुकतेने त्यांनी फोन घेतला.
फोनवर हॅलो करताच, चव्हाणांचा एकदम उत्तेजीत झालेला आवाज ऐकु येत होता. ते म्हणाले अहो जोशी तुम्हाला लाख लाख धन्यवाद. त्यावर जोशींनी विचारले मी अस काय केले म्हणून तुम्ही सकाळी सकाळी मला धन्यवाद देत आहात.
अहो! तुमच्यामुळेच आज माझ्यासह माझ्या गाडीतल्या एकोणीसजणांचे प्राण वाचले आहेत! चव्हाण म्हणाले.
ते कसे कायमी काय केले! जोशींनी विचारले.
अहो तुमच्याच सांगण्यावरुन मी तुमचे पाव्हणे पाटणकर जोडप्याला देवी हंसोळहून राजापुरला आणले. पुढे मी तिकडुन आणलेली बसच कंट्रोलरनी मुंबईकरीता लावली. आणि आम्हा दोघांची जोडीच मुंबईला पाठवली. नंतर त्यांनी सविस्तर हकिगत सांगितली. शेवटी ते म्हणाले, अहो शेवटच्या क्षणी जेव्हा त्या तुटलेल्या पुलाच्या आधी जर पाटणकर जागे नसते तर मी त्या गाडी अडवणा-या माणसाला भूत समजुन त्याच स्पीडमध्ये पुढे न्यायचा विचार करत होतो.
मग यात माझे क्रेडीट काहीच नाही. देवीचा आशिर्वादाचे कवच तुमच्या पाठीशी होते म्हणूनच देवीने ही लिला केली आहे. नाहीतर सौ पाटणकर  रुमाल विसरल्याच नसत्या. त्या रुमालाच्या रुपाने आई आर्यादुर्गेने आपले कवचच तुमच्या बरोबर दिले होते. तेव्हा तुम्ही राजापुरला आलात की सगळी कामे सोडुन आधी देवीच्या दर्शनाला या आणि माझ्या ऐवजी तिचे मनापासुन आभार माना.
**************
आता नऊ वाजुन गेले होते. आई बाबांचा पत्ता लागत नाही म्हणून आर्याचे डोळे रडुन रडुन लाल झाले होते. अशोकराव आणि अनघाताई तिला समजवायचा प्रयत्न करीत होते. ते बाहेरुन दाखवत नसले तरी त्यांचाही जीव वरखाली होत होता. सोय-यांचा फोनही लागत नव्हता. त्यांचा नाही तर नाही माधवचाही फोन लागत नव्हता. तेवढ्यात अशोकरावांचा फोन वाजायला लागला. बघतायत तो देवी हंसोळच्या जोशींचा फोन होता. तो फोन नंबर बघुनतर त्यांना धसकाच बसला, आता काय बातमी ऐकायला मिळते या चिंतेत त्यांनी आर्यादुर्गेचे स्मरण करुन फोन उचलला.
पलिकडुन जोशींचा आवाज एकदम उत्साहाने भरलेला ऐकायला येत होता. त्यावरुन त्यांनी बातमी चांगली आहे असा अंदाज बांधला. पलिकडुन जोशी म्हणत होते, तुम्ही चिंतेत आहात असा तुमचा आवाज सांगतोय. तेव्हा मी सांगतो ते ऐका तुमचे सोयरे अगदी सुखरुप आहेत. आताच मला चव्हाण ड्रायव्हर यांचा फोन आला होता. त्यांनी तुमच्या सोय-यांना पनवेलला पुण्याच्या बसमध्ये बसवुन दिले आहे. आतापर्यंत ते जागेवर पोचले असतिल. त्यांच्या फोनची बॅटरी संपल्याने ती चार्ज केल्याशिवाय त्यांचा फोन लागणार नाही. असे म्हणून त्यांनी देवीने सर्वांचे कसे रक्षण केले, ती चव्हाणांनी सांगितलेली सर्व हकीगत त्यांना सांगितली.
त्यावर अरुणरावांनी जोशींचे योग्यवेळी फोन करुन चिंतामुक्त केल्या बद्दल मनापासुन आभार मानत फोन ठेवला आणि हॉलमध्ये बसलेल्या सर्वांना सविस्तर हकिगत सांगितली. त्यावर नुकतेच ही बातमी समजली म्हणून घरी आलेले अंजर्लेकर गुरुजी म्हणाले, देवीचे कवच पाठीशी होते म्हणूनच हे सर्व शक्य झाले! नाहीतर आज काळ आलेला होताच, पण देवीने आपल्या शक्तीने त्याला पार दूर पळवुन लावला! हे नक्कीच!
तेवढ्यात आर्याचा फोन वाजायला लागला, त्यावर आईचा नंबर बघताच आर्या एकदम खूष झाली. तिने फोन उचलताच, अग आई कुठे आहेस तू इथे टि. व्हीवर निरनिराळ्या बातम्या ऐकुन आमच्या जीवाचे काय झाले असेल याची काही कल्पना ? बॅटरी संपलीतर दुस-या कोणाच्या फोनवरुन फोन करायचा नां!
अगं हो! हो! मला समजतेय तुझी काय अवस्था झाली असेल तीपण इथे काय झालेय माहीत आहे का? आताच माधवी प्रसूत होऊन कन्यारत्न झालेयअग तू आत्या झालीयसइथे उतरल्या उतरल्या हे सर्व झाल्यामुळे आम्हाला फोन चार्ज करायलाच मिळालाच नाही. अजुन आमचे माधवशी रात्रीच्या प्रवासातिल प्रसंगाबद्दल बोलणे देखिल झाले नाही. तरीपण सॉरी, मी कुठुनतरी फोन करायला हवा होता हे अगदी बरोबर. पण आजी झाल्याच्या नादात राहूनच गेले. सगळ्यांनाच मनापासून सॉरी सांग. सगळेचजण काळजीत असतिल. बाकी सर्व आपण प्रत्यक्ष भेटीतच बोलू. सगळ्यांना आम्ही इकडे बोलावले आहे असे सांग. तुझे बाबा तसा फोन करतिलच.
आईशी फोनवर झालेले बोलणे आर्याने सगळ्यांना सांगितले आणि सगळे एकदम खूष झाले. त्यामुळे मगाच पर्यंत काळजीने भरलेले वातावरण एकदम बदलुन गेले.
सगळ्या गोष्टी सुरळीत झालेल्या बघुन अंजर्लेकर गुरुजींनी सर्वांचा निरोप घेतला. त्यांनी सांगितले मला आता निघायला हवे. आज पहिला श्रावणी सोमवार असल्याने देवळात बरीच कामे आहेत. त्यामुळे मला यायला उशिर होईल. तरीही तुम्ही सर्वांनी आता इथुन जेऊनच जा. ज्याला कोणाला सोमवारचा उपवास असेल त्यांचीही सोय होईल. तेव्हा अनमान करु नका.
डेक्कन जिमखान्यावरील पाटणकरांच्या फ्लॅटमध्ये आज एकदम उत्साहाचे वातावरण होते. सनईचे मंद सूर वातावरणांत भरुन राहिले होते. सगळीकडे लगबग जाणवत होती. हॉलमध्ये फुलांनी सजवलेला पाळणा ठेवला होता. आजुबाजुला बारश्याची परंपरागत तयारी केलेली दिसत होती. पाटणकर आणि फणसळकरांच्या दोन्ही परिवारातले सर्व सदस्य आज येथे उपस्थित होते. समारंभ अगदी घरगुती स्वरुपाचा ठेवलेला होता. फक्त फणसळकर आणि माधवच्या सासुरवाडीच्या लोकांनाच कार्यक्रमाला बोलावले होते.
मुलीला पाळण्यात घालायचा मुहूर्त होताच हजर असलेल्या पांच सुवासिनींच्या हस्ते तिला पाळण्यांत घालण्यांत आले. मुलीचे नांव आजीच्या खास आग्रहास्तव दुर्गा ठेवण्यांत आले. दुर्गाच्या अंगावर घालण्यासाठी मोहिनीताईंनी म्हणजेच तिच्या आजीने खास दुलई तयार करुन घेतली होती. ती दुलई त्या प्रसिद्ध आर्यादुर्गचा प्रसाद म्हणून आणलेल्या छोट्या साडीपासुन बनवीली होती. ती तीच साडी होती. जिचा फोटो घराघरांत सगळ्यांना माहित झाला होता.
दुर्गाच्या जन्माच्या आधी झालेल्या सावित्री नदी दुर्घटनेतुन आश्चर्यकारकरीत्या बचावलेल्या पाटणकर दांपत्याचा शोध घेत घेत सगळे चॅनेलवाले पुण्याला त्यांच्या घरी पोचले होते. त्यापूर्वी म्हणजे पुलाची दुर्घटना झाली, त्याचा सविस्तर  रिपोर्ट महाड पोलीसांना दिल्यानंतर चव्हाण बस घेऊन मुंबई सेंट्रल बस स्थानकावर पोचले. तेव्हा चॅनेलच्या सर्व पत्रकारांची फौज त्यांची वाटच बघत कॅमे-यांसह हजर होती. तेव्हा चव्हाणांनी चॅनेलवाल्यांना देवी हंसोळहून निघाल्या पासुनची सर्व हकिगत सविस्तर स्वरुपांत सांगितली होती.
त्यानंतर न्यूज चॅनेल, प्रिंटमिडीयाच्या पत्रकारांनी पाटणकर दांपत्याला गाठले होते आणि देवी कवच या विषयावर वर्तमानपत्रामध्ये कव्हर स्टोरी छापली होती. त्यात आर्यादुर्गा मंदिरापासुन ते अगदी त्यांच्या जवळ असलेल्या प्रसादाच्या साडी पर्यंत सर्व बाबी फोटोसह छापल्या होत्या. तर चॅनेलवर स्पेशल स्टोरी सगळ्या व्हीडीओ सह वारंवार दाखविली होती.
सगळ्यांचे दुर्गाला औक्षण करुन झाल्यावर मोहिनीताई उठल्या आणि आपल्या जवळची ती खास दुलई दुर्गाच्या अंगावर पांघरत म्हणाल्या आई आर्यादुर्गेने आमचे जसे आलेल्या अरिष्टापासुन रक्षण केले, तसेच या तिच्या कवचाने माझ्या नातीचेही सर्वप्रकारच्या अरिष्टापासुन कायम रक्षण करो ही तिच्या चरणी प्रार्थना. त्यावर उपस्थित असलेल्या सगळ्यांनी तथाSSस्तु तथाSSस्तु  म्हणून त्याला अनुमोदन दिले.





**********

दुर्गा कवच भाग ३

 दुर्गा कवच

भाग ३

पाटणकर दांपत्य राजापुर बस स्थानकावर पोचले तेव्हा नुकतीच राजापुर बोरीवली बस सुटुन गेली होती. त्यांनी कंट्रोलरकडे कोल्हापुरला जाण्याकरिता बसची चौकशी केली तेव्हा त्यांनी गेल्या पाच सहा तासात कोल्हापुरहून एकही बस आली नाही, बहुदा कोल्हापुरला जाणारा घाट दरड कोसळुन बंद झाला असावा. नंतर त्यांनी पुण्याला जाण्यासाठी आता कसे जावे असे विचारले असता, आज सगळीकडेच जोरदार पाऊस कोसळत असल्याने कोणत्याही घाटाने जाणे धोकादायकच आहे. त्यातच चिपळुण, खेड, महाड, नागोठणे या गावांत पाणी भरल्याच्या बातम्या येत आहेत. अजुनतरी मुंबई हायवे चालू आहे, आता पांच मिनिटात येथुन मुंबईला जाणारी बस सुटेल तिने जाणार असाल तर पनवेल पर्यंत जा. पुढे पनवेलहून एक्सप्रेस हायवे ने तुम्ही पुण्याला जाऊ शकाल. असा सल्ला कंट्रोलरने दिला.
     पाटणकरांना कंट्रोलरचे म्हणणे पटले व ते दोघेजण राजापुर मुंबई बस मध्ये बसले. योगायोगाने देवी हंसोळहून ते ज्या बसने आले होते तिच बस त्याच ड्रायव्हर कंडक्टर सह मुंबईला जात होती. त्यामुळे त्यांना हायसे वाटले. त्यांना अगदी पुढची म्हणजे ड्रायव्हरच्या मागची सिट मिळाली होती. त्यामुळे रस्त्यावरच्या खड्ड्यांमध्ये गाडी आपटली तरी फारसे धक्के जाणवत नव्हते.
     बसने राजापुर सोडल्यानंतर लगेचच त्यांनी फोन करुन ही गोष्ट अनिकेतला सांगितली. त्याचप्रमाणे त्यानी आपला मुलगा माधवला बाकी सगळे मार्ग बंद आहेत म्हणून आम्ही राजापुरहून पनवेलकडे निघालो आहोत. एक्सप्रेस हायवे ने उद्या आठ वाजे पर्यंत पोचू असे फोन करुन सांगितले.
     राजापुर सोडल्यापासुन पावसाची संततधार चालू होती. रस्त्याच्या दुतर्फा पाण्याचे लोटच्या लोट वहाताना दिसत होते. बघता बघता गाडीने संगमेश्वर गाठले. संगमेश्वरला सर्वत्र पाणीच पाणी झालेले दिसत होते. पुलाच्या काठोकाठ पाणी होते. सगळीकडे काळोखमिट्ट होता. पावसामुळे हवेत गारठा आला होता. म्हणून सौ पाटणकरांनी देवीच्या देवळात घेतलेली ती छोटी साडी बाहेर काढली आणि ती रुमालासारखी डोक्याला बांधली. त्यामुळे त्यांची थंडी जरा कमी झाली.
     रात्रीचे पावणे अकरा वाजले. बस चिपळुण बस स्थानकात जेवण्यासाठी थांबली. तेव्हा पाटणकर दांपत्यही उतरले. आज बसमध्ये फारशी गर्दी नव्हती. राजापुरमधुन आठ जण बसले. त्यानंतर वैभववाडीला तिघेजण चढले होते. शेवटी संगमेश्वरला दोन जोडपी चढली होती. त्यापैकी बरीच लोक पनवेललाच उतरणार होती. कंडक्टरने नेहमीप्रमाणे गाडी जेवणासाठी वीस मिनिटे थांबेल अशी घोषणा केली. चिपळुण स्थानकातही सर्वत्र पाणीच पाणी झालेले होते.
     चिपळुणचे एस्. टि. कँटीन त्यामानाने स्वच्छ होते. पाटणकरांनी सौंना विचारले काय मागवुयात्यावर त्यांनी मला फारशी भूक नाही मी फक्त कॉफी आणि बिस्कीटे घेईन. तुम्ही पाहीजे तर जेवा नाहीतर काहीतरी खायला मागवां. त्यावर पाटणकर म्हणाले मीही कॉफीच घेईन. कँटीनमध्ये जरा गर्दी जाणवत होती. एकदम पांच सहा गाड्यांचे पॅसेंजर जमा झालेले दिसत होते.
     वेटर ऑर्डर घ्यायला आल्यावर त्यांनी त्याला कॉफी आणि गुड डे बिस्कीटपुडा आणायला सांगितला. त्यांनी सहजच वेटरला विचारले आज इथे खूप गर्दी वाटते आहे. त्यावर त्याने हो राजापुर-बोरीवली, जयगड-मुंबई, दोन मुंबईहून आलेल्या बस आणि राजापुर-मुंबई एवढ्या बस एकदम आल्याने गर्दी दिसत आहे असे सांगितले. कॉफी येईपर्यंत मी आर्याला फोन करते असे सौ. मोहीनीनी पाटणकरांना सांगितले. त्यावर कशाला उगाच एवढ्या रात्री फोन करतेस ती झोपली असेलअसे ते म्हणाले. परंतु एवढ्यात काही ती झोपत नाही, म्हणून मोहिनी यांनी तिला फोन केलाच. फार काही न बोलता, आम्ही चिपळुण पर्यंत पोचलो आहोत. आता आमच्या दोघांच्याही फोनच्या बॅट-या संपत आल्या आहेत तेव्हा परत फोन करायला जमेलच असे नाही. असे त्यांनी आर्याला सांगितले. तिनेही इकडेपण खूपच पाऊस पडतच आहे. तरीही आम्ही पहाटे साडेपांच पर्यंत गुहागरला जायला निघणार आहोत. त्यातच इकडे वीजही गेलेली आहे, त्यामुळे आमचेही फोन कितपत टिकतात ते बघुया.
            फोना फोनीच्या गडबडीत त्यांचा खूप वेळ गेला. त्यामुळे कँटीनमधील सर्वजण गाडीमध्ये निघुन गेले. गाडीमध्ये कंडक्टर सारखा बेल वाजवु लागला होता म्हणून ती दोघे गडबडीने गाडीकडे गेली. गाडीत बसल्यावर मोहीनीच्या लक्षांत आले आपला डोक्याला बांधायचा रुमाल कॅंटीन मध्येच राहीला. म्हणून त्यांनी चव्हाण ड्रायव्हरना विनंती केली, माझा देवीचा प्रसाद म्हणून घेतलेला रुमाल कॅंटीनमध्ये राहीला आहे, प्लीज तेवढा मी तो घेऊन येते. त्यावर त्यांनी झटकन या! आधीच खूप उशीर झाला आहे. आपल्या नंतर आलेल्या बसदेखिल पुढे निघुन गेल्या आहेत.
     त्यावर हो ही आलेच! असे म्हणून त्या झटकन कँटीन मध्ये गेल्या. तिथे त्यांना तो रुमाल दिसेना. म्हणून त्यांनी त्यांना सर्व्ह करणा-या वेटरला शोधुन काढले. त्याने तो रुमाल उचलुन ठेवला होता. तो काढुन दिला. या गडबडीत बसला मात्र चांगला वीस मिनीटे लेट झाला. 
*******
            चिपळुणहून सुटल्यावर कंट्रोल पॉईंटवर नोंद करण्यापुरतीच बस घाटात थांबली होती. बसमधले कंडक्टर आणि पाटणकर दोघे वगळता गाढ झोपले होते.  पोलादपुरला बस पोचली तेव्हा सव्वा बारा वाजले होते. तिथे फक्त एक  मिनिटच बस थांबली आणि भरधाव वेगाने निघाली. पहाता पहाता आठ दहा किलोमिटर अंतर मागे गेले आणि अचानक रस्त्याच्या मधोमध एक माणूस वेड्यासारखा दोन्ही हात हलवत उभा होता. हे लांबुनच चव्हाणांनी पाहिले ते बघुन त्यांनी गाडीचा स्पीड एकदम कमी केला आणि त्यांनी पाठीमागे जागे असलेल्या पाटणकरांना विचारले, पाटणकर साहेब मी बघतोय तेच तुम्ही बघताय नां?
            हो! हो!! चव्हाण, तो माणूसच आहे, काहीतरी अँक्सीडेंट झालेला दिसतोय. तुम्ही गाडी थांबवापाटणकरांचा आणि चव्हाणांचा हो संवाद ऐकुन अर्धवट झोपेत असलेले पवार कंडक्टर चांगले जागे झाले.
     गाडी अचानक थांबताच गाडीतले सगळेचजण जागे झाले आणि खाली उतरले. खाली उतरल्यावर बघतात तो एक माणूस हाफ चड्डीतच रस्त्यांत उभा होता. चेह-यावरुन खूप घाबरलेला दिसत होता. पाटणकरांनी आधी त्याला आपल्या जवळच्या बाटलीतुन पाणी प्यायला दिले. तो जरा नॉर्मल होताच त्याला काय झाले असे चव्हाणांनी विचारले. त्यावर त्याने हातातल्या बॅटरीने समोरचा रस्ता दाखवला. तो बघताच चव्हाण अक्षरशत्याच्या पाया पडले. तेव्हा बाकी सगळेजण हा काय प्रकार आहे ते विचारायला लागले. तेव्हा चव्हाण गाडीत गेले आणि त्यांनी गाडीचे हेड लाईट लावले.
     गाडीच्या हेडलाईटच्या प्रकाशात समोर पहातात तो काय? रस्त्यातल्या पुलाचा मोठ्ठा भागच गायब झालेला होता. ते दृष्य बघताच सगळ्यांच्याच काळजाचे पाणी पाणी झाले. त्यानंतर मग त्यांनी त्या रस्त्याच्या मधोमध आपल्या जीवाची पर्वा न करता बसला थांबवणा-या त्या देवदूताची चौकशी करायला सुरवात केली. तेव्हा त्याने आपण काय बघितले ते सांगितले.
     तो म्हणाला पुलाच्या पलिकडे जे गॅरेज दिसत आहे तिथे मी काम करतो. अकरा वाजे पर्यंत आम्ही काम करित होतो. त्यानंतर बाकी सगळे आपापल्या घरी गेले. मी रात्री गॅरेजमध्येच झोपतो. झोप येईपर्यंत खिडकीत बसुन मी मोबाईलवर गाणी ऐकत होतो. खिडकीतुन हायवेवरील जाणा-या येणा-या गाड्यांचे हेडलाईट मला दिसत होते. पण बघता बघता माझ्या लक्षांत आले, अरे! मुंबईकडे जाणा-या गाड्यांचे हेडलाईटस् अचानक गायब होत आहेत.
पहिल्यांदा मला हा भास वाटला. पण नंतर मला काहितरी गडवबड आहे हे लक्षांत आले. कोणाला मदतिला बोलावायला कोणीच नव्हते. शेवटी मी मनाची तयारी केली, गॅरेजमधली बॅटरी घेतली आणि या गोव्याच्या दिशेने जाणा-या नव्या पुलावरुन पलिकडे गेलो. बघतो तो जुन्या पुलाचा मधला मोठा भागच गायब झालेला होता. तेव्हा मला गाड्यांचे हेडलाईट का गायब होते ते लक्षांत आले. आतापर्यंत ब-याच गाड्या वाहुन गेल्या असाव्यात. म्हणून मग मी मनाशी ठरवले आपण आता रस्त्याच्या मधोमध उभे राहुन येणारी गाडी थांबवायची. आणखी कोणतीही गाडी वाहुन जाऊ द्यायची नाही. तेवढ्यांत तुमची गाडी आली.  तुम्ही भूत बित समजुन सरळ गाडी पुढे आणलित नाही म्हणून नशिब! नाहितर तुमच्याबरोबर मी सुद्धा नदीत गेलो असतो.
अरे बाबा! तू खरचं देवदूत म्हणून पुढे आलास! नाहीतर आज आम्ही देखिल नदीच्या प्रवाहात कुठे असतो कोण जाणेचव्हाण म्हणाले. माझी गाडी अगदी शंभरच्या स्पीडने धावत होती. तुम्हाला पाहिले तेव्हा मला क्षणभर भूतच आहे असे वाटले. परंतु हे पाटणकर काका जागे होते म्हणून मी स्पीड कमी करुन गाडी थांबवली.
बरं ते असु दे! आमच्या गाडीत फायबरचे दोन रेडीयम इंडीकेटर आहेत आपण ते रस्त्यात मधोमध दगडांच्या सहाय्याने लाऊन ठेवु. रात्रीच्या वेळी रस्त्याच्या मधोमध उभे राहुन वाहन थांबवणे धोक्याचे आहे. ही फार मोठी घटना आहे, त्यामुळे याची खबर पोलीसांना आणि बाकी सर्व सरकारी खात्यांना द्यायला हवी. तेव्हा आम्हाला जायला हवे. आम्ही महाडहून तातडीने इकडे मदत पाठवतो. तिथुन मदतीला येणा-या माणसांची गाडी येईपर्यंत आम्ही महाड सोडणार नाही. तुझ्या मदतिला कोणाला थांबवु कायपण तू ही आता गॅरेजवर जाऊन आराम कर. आपण आता हा रस्ता अडथळा लाऊन पूर्ण बंद करु.
गाडीतल्या प्रवाशांच्या मदतीने चव्हाणांनी गॅरेज मधुन गाडीच्या मोडक्या सिट आणल्या त्या, आजुबाजुचे मोठे दगड आणि त्यांच्या गाडीतल्या इंडीकेटरच्या सहाय्याने मुंबईच्या दिशेने जाणारा रस्ता पूर्ण बंद केला. नंतर सिद्धुला गॅरेजमध्ये सोडुन ते महाडला निघुन गेले. एवढे सर्व होऊन त्यांना महाडच्या एस्. टी स्टँडवर पोचायला त्यांना पाऊण वाजला होता.
महाडच्या स्थानकावर सर्वत्र काळोखाचे साम्राज्य दिसत होते. महाडच्या स्टँडवर ड्युटीवर असलेल्या ट्रॅफिक कंट्रोलरला ही सर्व घटना सांगताच त्याने पोलीस स्टेशनला फोन लाऊन घटनेची माहिती दिली. पोलीस स्टेशनमधील पोलीसांनी ताबडतोब ही घटना जिल्ह्याच्या पोलीस कंट्रोल रुमला कळवली आणि त्यांची गाडी पुलाकडे जाण्यासाठी निघाली. जाता जाता ते एस्. टी. स्टँडवर सविस्तर चौकशी करिता आले. चव्हाण आणि पाटणकर यांच्याकडे चौकशी करुन त्यांची गाडी त्वरीत घटना स्थळी रवाना झाली. त्यांच्यापैकी एकजण सविस्तर वर्दी लिहून घेण्यासाठी थांबला.
दरम्यानच्या काळांत सर्वजण सावरले होते. महाडच्या कंट्रोलरने समोरच असलेल्या रस्त्यावरच्या चहाच्या टपरीवरुन सर्वांकरिता चहा मागवला. त्यामुळे सर्वप्रवासी बसलेल्या धक्यामधुन थोडे भानावर आले. ते सर्वजण सौ पाटणकरांचे आभार मानायला लागले. त्यावर मोहीनीताईंनी माझे आभार कशाबद्दल असे विचारताच, सर्वजण त्यांना तुम्ही जर चिपळुणला कँटीनमध्ये राहिलेला रुमाल आणायचा आग्रह धरला नसतात, तर आज आपण सर्वजण नदीत पाण्याखाली असतो असे म्हणाले.
त्यावर त्यांनी जे वक्तव्य केले ते फार महत्वाचे होते. त्या म्हणाल्या, अहो तो नुसता साधा रुमाल असता तर मी परत कँटीनमध्ये गेलेच नसते. पण तो मी कालच श्री आर्यादुर्गादेवीचा प्रसाद म्हणून घेतलेला होता. तो रुमाल तिथे विसरण्यामागे तिचाच काहितरी सुप्त हेतू असला पाहिजे. नाहितर मी सहसा माझा डोक्याला बांधायचा रुमाल काढुन न ठेवता गळ्यांत अडकवुन ठेवते. मला वाटते तो रुमाल हे जणू आपल्या सर्वांकरिता देवीने दिलेले कवचच होते.
मोहिनी पाटणकरांचे हे बोलणे चव्हाण ड्रायव्हरसह सर्वांनाच पटले. मग सर्वांनीच श्री व सौ पाटणकरांचे त्या रुमालासह आपापल्या मोबाईलवर फोटो काढुन घेतले. काहींनी त्या रुमालरुपी देवी कवचाचे हात जोडून आणि तो मस्तकी लाऊन दर्शन घेतले. त्यांचे हे बोलणे पोलींसाचा तिथे थांबलेला माणूस लक्षपूर्वक ऐकत होता. मग त्यानेही त्या देवी कवचाचे हात जोडून दर्शन घेतले. त्यानतर त्याने बसमधले प्रवासीड्रायव्हरकंडक्टर यांच्याशी बोलुन सविस्तर रिपोर्ट तयार केला त्यावर त्या सर्वांच्या सह्या घेतल्या.
सर्व सोफस्कार झाल्यावर ती बस मार्गस्त झाली. आता एवढ्या रात्री कोणाला काही कळवायला नको म्हणून पाटणकरांनी कोणालाच फोन केला नाही. त्या दोघांच्या फोनची बॅटरी देखिल संपण्याच्या बेतात होती. यथावकाश त्यांची बस पनवेलला पोचली. चव्हाणांनी स्वत: थांबुन पाटणकर दांपत्याला पुण्याला जाणा-या बसमध्ये बसवुन दिले.
सकाळी आठ वाजता ते दोघे त्यांच्या सूनेला अँडमीट केलेल्या मॅटर्निटी होममध्ये पोचले. ते पोचल्यावर काही मिनीटातच त्यांची सून माधवी प्रसूत होऊन तिने गोंडस कन्यारत्नाला जन्म दिला.

***********

दुर्गा कवच भाग २

दुर्गा कवच

भाग २
आज रविवार देवीचा वार. आज अनिकेत आणि सौ.आर्याच्या हस्ते त्यांच्या विवाहानंतर प्रथमच कुलस्वामिनी आर्यादुर्गेची षोडशोपचारे विधीवत पूजा होणार होती. त्यांच्या लग्नानंतर अनिकेतला लगेचच कंपनीच्या कामासाठी अमेरीकेला जावे लागले होते. त्यामुळे हा कुलाचार लांबणीवर पडला होता. आता त्याला रजा मिळताच सर्वप्रथम त्याने देवी हंसोळला जाण्यासाठी प्लॅनिंग केले होते. ते जाणार म्हटल्यावर त्याचे सासु सासरे आम्हालाही गुहागरला व्याडेश्वराला जायचे आहे असे म्हणून त्यांच्या सोबत आले होते. कारण उद्याच श्रावण महिना सुरु होणार होता. पहिलाच दिवस सोमवार आला होता म्हणून त्यांचा कुलस्वामी व्याडेश्वराला या नव दांपत्याच्या हस्ते  अभिषेक व्हावा ही त्यांचीही इच्छा होती.
      आज आषाढ महिन्यातला शेवटचा दिवस होता. अमावस्या दुपारनंतर संपणार होती. त्यामुळे आज देवीची यथासांग पूजा करुन सर्वजण रात्री येथेच मुक्काम करणार होते. उद्या पहाटे निघुन आठ वाजेपर्यंत गुहागरयेथे व्याडेश्वराला त्यांना जायचे होते. तेथिल अभिषेकाचा कार्यक्रम उरकुन नंतर तेथुनच सर्वजण पुण्याला जाणार होते.
      अनिकेत सकाळी लवकर उठुन आर्यासह मॉर्नींग वॉक आणि साईट सिईंग हा दुहेरी उद्देशाने फिरायला बाहेर पडला होता. त्यांना दोघांना फिरायला जाताना पाहुन जोशींनी त्यांना गुड मॉर्नींग केले. पावसाचे दिवस आहेत तेव्हा सरपटणारे प्राणी फिरत असतात त्यांच्या पासुन सावध राहुन फिरण्याचा आनंद घ्या अशी सूचनाही त्यांनी केली. नंतर ते दोघे फिरत फिरत पांडवांनी खोदलेली विहीर, कातळामध्ये कोरलेले नागयंत्र पाहून आले. आज हवामान पावसाळी होते. कोणत्याही क्षणी मुसळधार पाऊस कोसळायला सुरवात होईल असे वाटत होते.
      थोड्या वेळाने सर्वजण आंघोळी उरकुन खाली भोजनगृहात आले. सर्वांनी चहापान केले आणि मंदिरात दर्शनाला गेले. अनिकेतने आज छान कुसुंबी रंगाचा कद नेसला होता. त्यावर त्याच रंगाचे उत्तरीय घेतले होते. आर्याने त्याच रंगाची पैठणी नेसली होती. दोघांची जोडी अगदी दृष्ट लागावी अशी दिसत होती. नुकतीच देवीची पूजा झालेली होती. सर्वांनी मनोभावे देवीचे दर्शन घेतले. त्यानंतर परिसर देवतांचेही दर्शन घेतले. तिथपर्यंत उपाध्ये गुरुजी आले. गुरुजींनी येताना सर्व तयारी आणलेली होतीच.
      उपाध्ये गुरुजींना आलेले पहाताच अशोकराव पुढे झाले. त्यांनी गुरुजींना ओळखले कां म्हणून विचारले. त्यावर गुरुजींनी आपण अशोक फणसळकरच नां? असे विचारले. एकमेकांचे क्षेम कुशल विचारुन झाल्यावर अशोकरावांनी आपल्या सगळ्या परिवाराची गुरुजींना ओळख करुन दिली. त्यांनी गुरुजींना विचारले, आपले फोनवर बोलणे झाले होते त्याप्रमाणे आज माझ्या मुलाच्या हस्ते देवीला अभिषेक करायचा आहे. आपण सर्व तयारी घेऊन आला आहात नां?
            त्यावर गुरुजींनी हो! हा काय मी तयारीत आलो आहेचला, जवळपास दहा वाजलेच आहेत, आता आपण पूजेला सुरवात करु याम्हणजे अभिषेक, पूजा आरती सगळे अकरा, साडे अकरा  पर्यंत पूर्ण होईल.
      उपाध्ये गुरुजींनी अनिकेत आणि आर्याला मोठ्या माणसांना नमस्कार करुन देवीच्या गाभा-यात यायला सांगितले. त्याप्रमाणे दोघेही वडिलधा-यांच्या आणि उपाध्ये गुरुजींच्या पाया पडुन गाभा-यांत पाटावर जाऊन बसले. बाकी सर्वजण बाहेर सभामंडपात बसले.
      गाभा-यांत देवीच्या पायाजवळ बसुन देवीची पूजा सुरु झाली. उपाध्ये गुरुजी एक एक विधी सांगत होते त्याप्रमाणे अनिकेत ते करत होता. त्यानंतर गुरुजींनी अभिषेकास सुरवात केली. ते श्रीसूक्ताचा पाठ म्हणू लागले. त्यांच्या बरोबर अनिकेतही म्हणू लागला. ते बघुन गुरुजी त्याला म्हणाले तुला जर व्यवस्थित म्हणता येत असेल तर तू एक स्वतंत्र आवर्तन म्हटलेस तरी चालेल. मग त्यांच्या सूचने प्रमाणे त्याने शेवटचे सोळावे आवर्तन संथ स्वरात म्हणायला सुरवात केली.
हरिः ॐ हिरण्यवर्णां हरिणीं सुवर्णरजतस्रजाम् ।
चन्द्रां हिरण्मयीं लक्ष्मीं जातवेदो म आवह ॥
      अशा प्रकारे पूर्ण श्रीसूक्त म्हणून झाल्यावर यथावकाश त्यांची पूजा पूर्ण झाली. त्यांनी सूरतेहून येताना खास देवीसाठी तयार करुन घेतलेली साडी आणली होती. त्या खास साडीने आर्याने देवीची ओटी भरली. नंतर भक्त निवासमधुन आणलेला नैवद्य दाखवला. सर्वांनी मिळुन आरती केली. उपस्थित असलेल्या सर्वांना प्रसाद दिला.
            इकडे देवीवर अभिषेक सुरु झाला आणि आकाशांत आधिपासुनच दाटुन आलेल्या मेघांनी जोरदार बरसात करायला सुरुवात केली. अक्षरशढगफुटी झालेली दिसत होती. पावसाच्या धारा इतक्या जोरदार बरसत होत्या की देवळातुन समोरच असलेले भक्तनिवास दिसत नव्हते. आता थांबेल मग थांबेल असे करताना एक तास झाला तरी पावसाचे थांबायचे चिन्ह दिसत नव्हते.
            दरम्यानच्या काळात आर्याच्या आई सौ. मोहिनी पाटणकर, अनिकेतची आई सौ. अनघा फणसळकर आणि आर्या यांना देवीला नेसवलेल्या साड्यांचा येथे लिलाव होऊन त्यांची विक्री केली जाते असे समजले. तेव्हा त्यांनी भोपी गुरवांकडे चौकशी केली असता त्यांनी अशा साड्या आताही मिळु शकतिल असे सांगितले. तेव्हा त्या तिघींनीही देवीचा प्रसाद म्हणून अशा साड्या खरेदी करायच्या ठरवल्या. मग त्या तिघीही गुरवांच्या बरोबर त्या साड्या बघायला गेल्या. त्या तिघींनीही आपल्या स्वत:करिता तसेच आपल्या परिचयातिल व्यक्तींकरिता मिळुन पंधरा सोळा साड्या खरेदी केल्या. त्यातल्या दोन साड्या लांबीला खूपच लहान होत्या. परंतु त्या प्युअर कॉटनच्या आणि छान डिझाईन असलेल्या होत्या. त्या दोन्ही साड्या सौ पाटणकर आणि सौ फणसळकर यांनी डोक्याला बांधायला रुमाल म्हणून वापरायच्या ठरवल्या आणि आपल्या पर्स मध्ये ठेवुन दिल्या.
      बराच वेळ वाट बघुन पावसाचे थांबण्याचे लक्षण दिसेना असे पाहून शेवटी उपाध्ये गुरुजी, गुरव यांच्या सह सर्वजण भक्त निवासमध्ये भोजनाकरिता गेले. आज भोजनगृहात टेबल खुर्ची ऐवजी पंगत मांडली होती. अनिकेत आणि आर्या सोडून सर्वजण भोजनास बसले. जोशी दांपत्यालाही ते नाही म्हणत होते तरी जेवायला बसायला लावले. त्या सर्वांना अनिकेत आणि आर्या वाढायचे काम करित होते. सर्वांची जेवणे झाल्यावर सवाष्णींची साडीने ओटी भरण्यांत आली. उपाध्ये गुरुजींची योग्य ती पाठवणी करण्यांत आली. त्यानंतर अनिकेत आणि आर्या भोजनास बसले. सर्वांचे भोजन उरकताच सर्वचजण वामकुक्षी करिता गेले.
      दुपारचे चार वाजले तरी पावसाची संततधार चालूच होती. अती पर्जन्य वृष्टीमुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले होते. दरम्यान राजापुरहून भालावली मार्गे पावसकडे जाणारी एस्. टी. बस परत आली होती. पावसाच्या पाण्याने आणि एका ठिकाणी दरड कोसळल्याने रस्ता बंद झाला होता. त्या गाडीचा ड्रायव्हर भक्तनिवासच्या व्यवस्थापक जोशींच्या ओळखीचा होता म्हणून तो भक्तनिवासमध्ये त्यांना भेटायला आला होता. जोशींनी त्याला आणि कंडक्टरला आत बोलावुन चहा बिस्कीटे दिली आणि त्याच्याबरोबर गप्पा मारत बसले होते. बघता बघता एक तास निघुन गेला. दरम्यान त्या बसच्या ड्रायव्हरने डेपो मॅनेजरना फोन करुन काय करु म्हणून विचारले. त्यावर डेपो मॅनेजर साहेबांनी थोडी वाट पाहून रस्ता सुरु होत नसेल तर परत राजापुरला परत या असे  सांगितले.
*******
            पावसाच्या रिपरिपीला कंटाळुन आर्या, तिची आई आणि अनिकेतची आई पॅसेजमध्ये खुर्च्या टाकुन गप्पा मारत बसल्या होत्या. एका रुममध्ये अनिकेत, त्याचे बाबा आणि त्याचे सासरे मुकुंद पाटणकर गप्पा मारत बसले होते. तेवढ्यात मुकुंद पाटणकरांचा फोन वाजला. तो त्यांच्या मुलाचा माधवचा फोन होता. ते फोन घेण्याकरिता थोडे बाजुला गेले. फोन घेऊन परत जागेवर आल्यावर त्यांचा चेहरा चिंतेत दिसु लागला. तेव्हा अनिकेतनी विचारले, काय झाले बाबा, एनी थिंग सिरियस?
            होतसे सिरियसच म्हणायला पाहिजे. कारण आमची सूनबाई माधवीला लेबर पेन्स सुरु झाल्याचे लक्षण दिसते असे माधव म्हणत होता. तिला आता हॉस्पिटल मध्ये अँडमिट करावे लागेल असेही तो म्हणाला होता. त्यामुळे आता आम्हाला निघावे लागेल. पुण्याला जायला या पावसात कसे काय जमेल तेच आता बघावे लागेल.
      त्यावर तुम्ही आर्याच्या आईला सांगुन तयारी करा, मी खाली जाऊन जोशींशी बोलतो. ते काय म्हणतात ते बघुया, असे म्हणून अशोकराव लगेचच गडबडीने खाली निघुन गेले. तेव्हा एस् टी ड्रायव्हर चव्हाणांचे डेपो मॅनेजर बरोबरचे बोलणे चालूच होते.
      अशोकरावांना गडबडीत खाली आलेले पाहून जोशी त्यांना सामोरे गेले आणि काय गडबड आहे म्हणून विचारले. तेव्हा अशोकरावांनी पाटणकरांना तातडीने पुण्याला जावे लागत आहे तेव्हा काय करता येईल असे विचारले. त्यावर जोशींनी आपण याबाबत येथे चव्हाण ड्रायव्हर आहेत त्यांनाच विचारुया असे म्हटले.
            तेव्हढ्यात श्री पाटणकरही खाली आले. मग जोशी, पाटणकर आणि अरुणराव तिघेही चव्हाणांजवळ गेले व त्यांना परिस्थितीची कल्पना दिली. त्यावर ते म्हणाले, मला आत्ताच आमच्या साहेबांनी राजापुरला परत यायला सांगितले आहे. त्यामुळे मी आता ही बस घेऊन लगेचच राजापुरला जातो आहे. तेव्हा तुम्ही याच बस मधुन राजापुरला चला. तिथुन पुढे कोल्हापुर मार्गे पुण्याला जाता येईल. पण तो मार्ग एवढ्या पावसात चालू असेलच असे नाही. तेव्हा त्यामार्गाने नाहीच जमले तर आता राजापुरहून दोन बस सुटतात बोरीवली सहा वाजता आणि मुंबई साडेसहा वाजता दोनपैकी कुठलीतरी बस नक्कीच मिळेल तिने पनवेल पर्यंत जा. तिथुन एक्सप्रेस वेने दोन अडीच तासात पुण्याला जाल. म्हणजे सकाळी सात साडेसात पर्यंत तुम्ही पुण्यात पोचु शकाल.
***********