हिमालयाच्या सहवासात लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
हिमालयाच्या सहवासात लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शनिवार, ३१ मार्च, २०१८

हिमालयाच्या सहवासात प्रस्तावना


प्रस्तावना
     हिमालयाच्या सावलीत हे माझे प्रवास वर्णनात्मक साहित्य वाचकांच्या समोर सादर करताना मला अतिशय आनंद होत आहे. १४ मार्च २०१६ ते ३१ मार्च २०१६ या काळात मी एका प्रदिर्घ सहलीत सहभाग घेतला होता. नोकरीतुन स्वेच्छानिवृत्ती घेतल्यानंतर माझे महाराष्ट्रा बाहेर प्रवास करणे सुरु झाले.
नोकरीत असताना रजेची अडचण असायची. याच्याही पेक्षा मुख्य अडचण असायची ती दामाजीपंतांची. केंद्र सरकारमध्ये नोकरी करत असल्याने एल्. टी. सी. ची  सवलत मिळत असे परंतु त्यात मेख अशी होती, की सरळ एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणाकडे जाण्याकरीता कमीत कमी अंतराचे फक्त प्रवास भाडे मिळत असे. सहलीकरीता जायचे म्हणजे हे अडचणीचे होई. कारण प्रवास थांबत थांबत मुक्काम करीत करीत जावे लागते. प्रत्येक ठिकाणी हॉटेल अथवा तत्मम ठिकाणी मुक्काम करणे, सकाळच्या चहा पासुन सर्वच विकतचे पदार्थ घेणे याकरीताचा खर्च खूप होत असे त्यामुळे कधी एल् टी सी ची सवलत घेतली नव्हती. सरकारी नोकरीत पगारही बेताचाच असतो त्यातच मुलांची शिक्षणे याला प्राधान्य द्यावे लागते.
सेवा निवृत्ती घेतल्यानंतर मुलांची शिक्षणे पूर्ण झाली होती. त्यामुळे जबाबदारी कमी झाली होती. आता या काळात सहलीचा विचार करणे शक्य होते. तरीही मी या सहलीला तयार नव्हतो. परंतु त्या वैष्णो देवीनेच तिच्या दर्शनाला बोलावल्यामुळे मी सहलीला जायला तयार झालो. आम्ही ठरवलेली ही सहल कोणत्याही ट्रॅव्हेल एजन्सी मार्फत न करता नातेवाईकांचाच एक ग्रुप तयार करुन आमची आम्ही आयोजित केली होती. त्यामुळे आमचे वेळापत्रक, प्रवासाचा मार्ग आमचा आम्हीच ठरवला होता. त्यात आयत्यावेळी बदल करण्याचे स्वातंत्र्य आम्हाला होते.
या प्रदिर्घ प्रवासाचे वर्णन मी लिहायचा प्रयत्न केला आहे. या प्रवासात आम्ही जम्मु, काश्मिर, पंजाब, हिमाचल प्रदेश, हरीयाणा या राज्यांमधुन मुक्काम केले आणि तिथले निसर्ग सौंदर्य अनुभवले. काश्मिरमध्ये असताना एकीकडे बर्फात वावरण्याचा आनंद तर दुसरीकडे अतिरेक्यांच्या प्रभावाखाली असलेल्या भागात वावरत असल्यामुळे धास्ती अशा दुहेरी भावना होत्या. आमच्या सुदैवाने आम्हाला कोणत्याही वाईट अनुभवाला सामोरे जावे लागले नाही.  श्रीनगरमधल्या लोकांच्या मनाचा मोठेपणाही अनुभवायला मिळाला. पंजाबमध्ये बाघा सिमेवरील बिटींग रिट्रीटचा भव्य सोहळाही अनुभवायला मिळाला. अमृतसरमध्ये जालियनवाला बागेच्यारुपाने ब्रिटिशांची क्रुरता पहायाला मिळाली. सुवर्णमंदिरामध्ये शिख समाजाची भक्ती पहायला मिळाली. कुरुक्षेत्रामध्ये महाभारतकालीन स्थळांना भेटी देता आल्या. अर्जुन  भिष्म, श्रीकृष्ण यांच्याशी संबधित क्षेत्रांचे दर्शन घेता आले. पानिपत मध्ये मराठ्यांच्या इतिहास अनुभवता आला.
प्रवासवर्णन म्हणजे टिपीकल इथुन आलो तिथुन गेलो असे न लिहीता भेट दिलेल्या स्थळांची जास्तित जास्त माहिती मिळवुन ती देण्याचा प्रयत्न केला आहे. आपण भेट देत असलेल्या स्थळांची माहिती असेल, त्याचे वैशिष्ट काय हे माहिती असले की, त्या स्थळाकडे पहाण्याचा दृष्टीकोन मिळतो. आमच्या कडे लोक जंजिरा किल्यावर जातात आणि म्हणतात की, तिथे बघण्यासारखे काहीच नाही. वास्तविक तिथे जाण्यापूर्वी त्या किल्याचा इतिहास त्याचे जलदुर्ग म्हणून असलेले महत्व विचारात घेऊन किल्ला पाहिला की, हा किल्ला उभा करण्यामागे निर्मात्यांचे कष्ट आणि त्यांची दूरदृष्टी याचा प्रत्यय येतो. किल्यात असणारे गाईड चुकीचा इतिहास सांगतात आणि आपण आपला गैरसमज वाढवुन परत येतो. असाच प्रकार श्रीनगर येथिल प्रसिद्ध अवंतीस्वामी मंदिराचे बाबतित होतो. मंदिराचा खरा इतिहास समजतच नाही. गाईड त्यांना सोयीची  माहिती सांगतात. असो मी काही त्यातला तज्ञ नाही परंतु मनात आले ते व्यक्त केले एवढेच.
हा माझा प्रयत्न आपल्यला आवडल्यास मला अवश्य कळवावा. आपला अभिप्राय मला लिहिण्याचा नवा उत्साह देईल.

अनिल अनंत वाकणकर.
   

गुरुवार, २९ मार्च, २०१८

हिमालयाच्या सहवासात भाग ११


११. डलहौसी दर्शन
     आज दिनांक २४ मार्च २०१६! आमच्या सहलीचा ११वा दिवस! डलहौसी येथे बघण्यासाठी बरेच पॉईंट आहेत. त्यामुळे आज आम्ही आमचा पूर्ण दिवस येथेच घालवणार आहोत. सकाळचे प्रातर्विधी आणि चहापाणी झाल्यावर हॉटेलवर आणलेले सामान गाडीत चढवुन हॉटेलमधुन चेक आऊट केले.
     सर्वात प्रथम आम्ही पंचफुला येथे दाखल झालो. पंचफुला येथे छान धबधबा आहे. तो पाहून मला शिवथर घळीची आठवण झाली. शिरथर घळी येवढ्या उंचीवरुन हा धबधबा पडत नव्हता तरीही स्पॉट खूपच छान होता. जवळच दोरीच्या सहाय्याने तयार केलेला पुल होता. धबधब्याचे पडणारे पाणी शेवटी एका विशाल तलावात जाते त्या ठिकाणी बोटींगची सोय आहे. त्या तलावाच्या काठावर परम देशभक्त सरदार अजीत सिंह  यांचे स्मारक आहे. त्यांचा पुतळा येथे उभा केलेला आहे. हे अजित सिंग म्हणजे शहिद भगत सिंग यांचे काका होते. या ठिकाणी एक माणूस ससे घेऊन बसला होता. आश्चर्याची गोष्ट म्हणजे तिथे असलेले ससे शांत बसले होते.
     पंचफुला येथिल निसर्ग सौंदर्याचा आनंद घेतल्यानंतर आम्ही जवळच असलेल्या सातधारा या प्रसिध्द स्थळी आलो. समुद्रसपाटीपासुन २०३६ मिटर उंचीवर असलेल्या या ठिकाणी सात झरे छोट्याशा धबधब्याच्या स्वरुपात पडतात. या सातधारांच्या पाण्यात औषधी गुण आहेत असा लोकांचा विश्वास आहे. या पाण्यात गंधकाचा अंश असल्याने त्वचा रोग तर बरे होणारच. येथिल निसर्ग सौंदर्याचा आस्वाद घेण्याकरीता तर लोक येथे येतातच शिवाय हे सात अप्सरांचे किंवा देवीचे स्थान आहे असाही लोकांचा समज आहे. आपल्याकडे कोंकणातही अशी सात आसरांची अशी बरीच स्थाने आहेत.
            सातधारा नंतर आम्ही सुभाष बोहली या पवित्र स्थळाला भेट दिली. आपल्या देशाच्या स्वातंत्र्य संग्रामात मह्त्वाची भूमिका बजावणाऱ्या नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्याशी निगडीत असे हे स्थळ आहे. सन १९३७ मध्ये इंग्रजांच्या कैदेत असताना नेताजींना टी.बी. झाला होता. त्यावेळी उपचारासाठी आक्टोबर ते मे १९३७ या काळात ते पंचफुला रोडवरील डॉ.धर्मवीर यांच्याकडे ते राहिले होते. त्यावेळी ते दररोज या रोडवर फिरायला येत असत आणि या विहिरीचे पाणी पित असत. येथिल औषधी पाण्याने आणि शुध्द हवेने ते बरे झाले व नंतर नव्या उत्साहाने त्यांनी परत स्वातंत्र्य संग्रामात उडी घेतली. या ठिकाणी आम्ही नेताजींच्या पवित्र स्मृतीला वंदन केले.
     डलहौसी येथिल आणखी एक प्रसिध्द ठिकाण म्हणजे गांधी चौक. येथे प्रसिध्द तिबेटी बाजार आहे. चिनने जेव्हा तिबेटवर हल्ला केला तेव्हा हजारे तिबेटी आश्रयासाठी येथे स्थलांतरीत  झाले होते. त्यातिल बरेचसे कालांतराने हे शहर सोडून गेले. मात्र जाताना रस्त्याच्या कडेला त्यांनी निर्माण केलेली लेणी आणि गांधी चौकातिल तिबेटी बाजारच्या स्वरुपात आपल्या खूणा ठेवुन गेले. आमच्यापैकी काहीजणांनी येथे खरेदी केली.
     त्यानंतर आम्ही भेट दिली सुभाष चौकाला. येथे नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा पुतळा उभारला आहे. या चौकातच फ्रान्सिस चर्च आहे. त्या चर्चला आणि तेथिल झूला भेट दिली. या ठिकाणी असलेल्या मोराने चक्क पिसारा उभारला होता. तसे जामनगरला आम्ही दररोज मोर बघतो परंतु पिसारा उभारलेला मोर बघणे हा वेगळाच अनुभव आहे.
     फ्रान्सिस चर्चला भेट दिल्यानंतर आम्ही डलहौसी शहराच्या बाहेर पडलो ते सरळ चमेरा लेकच्या दिशेने निघालो. डलहौसीहून चमेरा लेक ३४ किलोमिटर आहे. परंतु रस्ता वळणा वळणाचा आणि पूर्णपणे घाट रस्ता आहे. धरण दिसायले लागले होते परंतु रस्ता काही संपतच नव्हता. शेवटी एका बोगद्यातुन गेल्यावर धरणाचा बोटींग करता असलेला स्पॉट दिसायला लागला. तेथुन जवळच भालेई मातेचे मंदिर होते. आम्ही आधी भालेई मातेच्या मंदिरात जायचा निर्णय घेतला.
     आपल्याकडे ज्याप्रमाणे दक्षिण काशी म्हणून अनेक देवस्थानांचे नांव घेतले जाते. त्याच प्रमाणे वैष्णोदेवीच्या खालोखाल प्रसिध्द असणारी बरीच मंदिरे आहेत त्यापैकीच हे एक मंदिर आहे. या मंदिरात जाण्यासाठी साधारण शंभर पायऱ्या चढाव्या लागतात. मंदिराला छान दगडी कमान केलेली आहे.
भद्रकालीला येथे भालेई माता असे संबोधले जाते.  हे स्थळ भाल्यासारख्या टोकदार असणाऱ्या डोंगरावर असल्याने त्याला भालेई असे म्हणातात. समुद्रसपाटीपासुन याची उंची ३८८० फुट आहे. हे मंदिर चंबा या जिल्हाच्या ठिकाणापासुन ४० किलोमिटर तर डलहौसी पासुन ३५ किलोमिटर आहे. आश्विन आणि चैत्र महिन्यांत येथे नवरात्री उत्सव साजरा केला जातो.
या मंदिराची कथा मोठी रंजक आहे. माता भद्रकाली राजा प्रतापसिंग यांच्या स्वप्नांत आली व तिने मी भ्रण येथे गाडलेल्या अवस्थेत आहे, तिथुन मला बाहेर काढ आणि योग्य जागी माझे मंदिर बांध असे सांगितले. हे भ्रण गांव सध्याच्या मंदिरापासुन तिन किलोमिटर अंतरावर आहे.  
राजा प्रताप सिंग यांना आपली राजधानी चंबा येथे मंदिर बांधायचेच होते. त्याला शुभ शकुन झाला असे म्हणुन ते आपल्या सैनिकांसह मूर्ती शोधण्याकरीता निघाले. मूर्तीचा शोध घेतल्यानंतर परत येताना वाटेत ते सर्वजण भालेई येथे विश्रांतीसाठी थांबले. विश्रांती झाल्यावर परत चंबाच्या दिशेने निगण्याकरीता मूर्ती उचलु लागले असता मूर्ती जागची हालेना. याच्यावर तोडगा काढण्याकरीता किलोद येथिल ब्राह्मणाला बोलावुन उपाय विचारला तेव्हा त्याने सांगितले की, देवीची इच्छा इथेच रहाण्याची आहे. दुसऱ्या कथेनुसार येथिल ग्रामस्थांचा देखिल देवीला येथुन हलवुन चंबाला नेण्यास विरोध होता, म्हणून त्यांनीही राजाला भालेई येथेच मंदिर बांधण्याची विनंती केली.
कारण काही असो राजा प्रताप सिंग यांनी भालेई येथे हे मंदिर बांधले. कालांतराने राजा श्री सिंग यांनी त्याचे नूतनिकरण केले. दुर्दैवाने सन १९७३ मध्ये मंदिरामधिल मूर्तीची चोरी झाली. परंतु सुदैवाने ती मूर्ती परत सध्याच्या धरणाच्या परिसरात सापडली. परंतु तेव्हापासुन त्या मूर्ती मधुन घामाच्या धारा लागु लागल्या असे म्हणतात. भालेईमाता मंदिराच्या टेकडीवरुन चमेरा धरणाचा परिसर अगदी लॅंडस्केप सारखा दिसतो. एवढ्या उंचीवरुन चंबा खोरे पहाणे म्हणजे डोळ्यांना मेजवानीच आहे.
भालेई मातेचे दर्शन करुन झाल्यावर आजच्या लंचचा मेनू कोंकणातिल दडपे पोहे करायचे असा ठरवला. त्याकरीता पोहे, मीठ, तिखट, तेल ही सर्व सामुग्री रोह्याहून येताना बरोबर आणलेली होती. फरसाण, टॉमॅटो आणि कांदे मुंबईहून आणलेले होते. हिरवी मिरची आणि कोथिंबीर भालेई मातेच्या पायथ्याशी असलेल्या सब्जीच्या दुकानातुन घेतली. ओला नारळ देखिल होता परंतु तो किसायचा कसा हा प्रॉब्लेम होता. पोहे कालवण्याकरीता आमच्या सामानात प्लॅस्टीकची बालदी होती.
पोहे बनविण्याकरीता आमच्या सोबत गब्बुपण कामाला लागला होता. सुरीने कांदे कापण्यात तो मदत करत होता.  ते सर्व साहित्य एकत्र करुन प्लॅस्टीक बादलीत ते दडपे पोहे कालवले आणि ते खायला मात्र खाली चमेरा लेकपाशी गेलो. दडपे पोह्यांचा बेत मस्तच जमला होता. भरपुर दडपे पोहे खाऊन झाल्यावर आम्ही लेक पहाण्याकरीता बोटींग करण्याच्या धक्यावर गेलो.
लेकमध्ये बोटींग करण्याच्या दृष्टीने चौकशी करायला गेलो असता त्यांनी सांगितलेले दर ऐकुन चाटच पडलो. बोटींग करायचे अंतर आणि वेळ याचा विचार करता दर खूपच जास्त होते. याच्यापेक्षा खूप कमी पैशात आम्ही मांडवा ते मुंबईमधिल गेट वे पर्यंतचे अंतर अगदी कमी पैशात पार करतो. त्या जलप्रवासाला वेळ देखिल बराच लागतो. त्यामुळे आमच्यापैकी कोणीही बोटींग करीता गेले नाही. लेकच्या पार्श्वभूमीवर फोटो मात्र काढले. त्यावेळी तिथे लेकमध्ये बरीच बदके पोहताना दिसत होती.
चमेरा लेक पाहून होईपर्यत बराच वेळ झाला होता. आज आम्हाला पठाणकोट येथे वस्तीला जायचे होते. त्यामुळे आमचा प्रवास आता त्या दिशेने सुरु झाला. पठाणकोटच्या रस्त्याच्या दोन्ही बाजुला बरीच आंब्याची झाडे दिसत होती. वाटेत एक शहरवजा  गांव लागले. तेथे गब्बुने गाडी थांबविली.रस्त्याच्या बाजुला अनेक दुकाने होती. त्या दुकानांमध्ये विकायला ठेवलेली एक वेगळीच वस्तु होती. तिचे नांव होते आमके पपड. आंब्याच्या रसापासुन बनविलेले हे पापड म्हणजे आपल्याकडे बनवतात ती आंबापोळी अथवा साठे होती. रायवळ सारख्या आंब्यापासुन बनविलेली असल्यामुळे आंबट लागत होती. आपल्याकडे चिपळुण रत्नागिरी येथे मिळतात तशा जेलीच्या स्वरुपातही आंब्याच्या वड्या विकायला ठेवलेल्या होत्या. अशाप्रकारच्या आंब्याच्या जेली आम्हाला अमृतसर मध्येही नंतर बघायला मिळाल्या.
पठाणकोट येथिल गुरुदास पुर रोड वरील न्यू पटेल नगर मधिल गुरुराज गेस्ट हाऊस मध्ये आम्ही उतरलो होतो. वास्तविक आमच्या सहलीच्या नियोजनात पठाणकोट येथे जायचे नव्हते परंतु डलहौसीला झालेल्या हॉटेलच्या बुकींगमध्ये झालेल्या घोळामुळे आम्ही फक्त पठाणकोट येथे वस्तीला आलो होतो. तेथिल कोणतेही स्पॉट बघण्याचा आमचा शेड्युल नव्हता. कारण उद्या आम्हाला धरमशाला येथे जायचे होते.

*******
 
          

बुधवार, २८ मार्च, २०१८

हिमालयाच्या सहवासात भाग १०


१०. जम्मु आणि डलहौसी दर्शन.
     आज दिनांक २३ मार्च २०१६! आज होळी पोर्णिमा आहे. आज जर घरी असतो तर होळीच्या सणाची वेगळीच गडबड असती. घरच्या पुरणपोळीची चव होळीचा दिवस असुनही चाखता येणार नव्हती. इकडच्या लोकांना पुरणपोळी हा प्रकार तरी माहित असेल असे वाटत नाही. इकडचा आलु पराठा म्हणजेच इकडची तिखट पुरणपोळी. आज बहूदा तिच खावी लागेल असे दिसते.
            सकाळी साडेदहाला रघुनाथ मंदिरात आलो. संपूर्ण परिसर सिमा सुरक्षा दलाच्या तैनातिखाली होता. मंदिराच्या प्रवेशद्वारावर असलेले जवान मराठी होते. आम्ही मराठी बोलत होतो ते ऐकुन त्यांनी आमची आस्थेन चौकशी केली. मंदिराच्या परिसरात सर्वत्र सावधान पोझिशन मधेले हत्यारी जवान दिसत होते. मंदिरात प्रवेश केल्यावर समोरच मंदिराचे निर्माते(patron) राजे रणबिरसिंग यांचे पोर्ट्रेट होते.
     जम्मु शहराच्या मध्यवर्ती भागात असणारे रघुनाथ मंदिर हे मुख्यत: रामाचे मंदिर आहे. मुख्य मंदिराचा गाभारा सोन्याच्या पत्र्याने मढविलेला आहे. गाभाऱ्यात श्रीराम, सिता, लक्ष्मण यांच्यासह एकूण सात मूर्ती आहेत. या मंदिराचा परिसर भव्य असुन त्या परिसरात रामायणातिल सर्व व्यक्तिमत्वांची वेगवेगळी मंदिरे आहेत. तसेच संपूर्ण प्रदक्षिणा मार्गावर अनेक मंदिरे आहेत.
     मंदिराच्या परिसरात बांधलेल्या हॉलमध्ये असंख्य शालिग्राम बसविले आहेत. त्यांना तेहतिस कोटी देवांच्या स्वरुपात पूजले जाते. मंदिरात प्रवेश करताना प्रथम हनुमानाचे दासमारुतीच्या स्वरुपातिल मूर्ती असलेले मंदिर आहे. या शिवाय एक स्वतंत्र गणपति मंदिर आहे. त्या मंदिरात पंचमुखी गणेशाच्या मूर्ती  आहेत. या मंदिराच्या निर्मितीचे काम या राज्याचे महाराज गुलाबसिंग यांनी सन १८३५ मध्ये सुरु केले ते त्यांचे पुत्र महाराजा रणविर सिंग यांनी सन १८६० मध्ये पूर्ण केले.
     आम्ही मंदिरात प्रवेश केला तेव्हा श्रीरामांच्या आरतीची सुरवात झालेली होती. आरती झाल्यावर आम्ही विधीपूर्वक दर्शन घेतले. तेथे असलेल्या पूजाऱ्यांकडे आम्ही रामरक्षा स्तोत्राचे पठण करण्याची परवानगी विचारली. तेव्हा त्यांनी दर्शन घेणाऱ्यांना त्रास होणार नाही आणि आम्हालाही सहज दर्शन होईल अशी जागा आम्हाला बसण्यासाठी दाखवली. त्यांनीच आम्हाला बसण्यासाठी गालिचा देखिल आणून दिला. मग त्या गालिचावर बसुन आम्ही सर्वांनी रामरायाचे दर्शन घेत घेत रामरक्षा स्तोत्राचे संथ सुरात सामुदाईक पठण केले. त्यामुळे मनाला एक वेगळेच समाधान मिळाले. त्यानंतर पंचमुखी गणेश मंदिरातही असेच श्री गणपति अथर्वशिर्षाचे पठण केले. या पठनात तेथिल पूजारीही सामिल झाले. त्यानंतर सर्व परिवार देवतांचे दर्शन घेतले.
     जामनगरहून प्रवासाला निघाल्यापासुन जास्त रोकड जवळ बाळगायची नाही हे धोरण ठेवले होते. त्याप्रमाणे जसे जसे पैसे लागतिल तसे ए. टी. एम्. मधुन काढत असे. आज आता जवळची रोकड संपली होती. त्यामुळे पैसे काढण्याकरीता रघुनाथ मंदिराच्या जवळ असणारे स्टेट बॅंकेचे ए. टी. एम्. शोधुन काढले.
      ए. टी. एम्. मधुन येईपर्यंत बाकी सर्वजण गाडीत सामान भरुन तयारच होते. मी आल्यावर लगेचच गाडी सोडण्यांत आली. या नंतर आम्ही जम्मुचा किल्ला पहायला गेलो. बाहू या नावाने या किल्याचा ओळखले जाते. या किल्याचे बांधकाम राजा बाहूलोचन याने सुमारे तिन हजार वर्षांपूर्वी केले आहे. या किल्यावरुन तावी नदीचे अद्भूत दृष्य दिसते. येथे काली मातेचे मंदिर आहे. मंदिराच्या परिसरात असलेल्या जंगलाचे सुंदर बगिचामध्ये रुपांतर करण्यात आलेले आहे. या बागेला बाहू बाग म्हणून ओळखले जाते.
     पांढऱ्या संगमरवरात बांधलेले हे मंदिर आकाराने मात्र छोटे आहे. याची उंची केवळ ३.९ फुट आहे. त्यामुळे मंदिरात एकावेळी मोजकेच भक्त जाऊ शकतात. येथे रोज कुमारीकांची ओटी भरुन पूजा केली जाते. हे मंदिर महाराजा गुलाबसिंग सत्तेत आल्यावर १८व्या शतकांत सन १८२२ मध्ये बांधले गेले असे मानले जाते. या संबंधी एक कथा सांगितली जाते. सुमारे ३०० वर्षापूर्वी पंडित जगतराम याच्या स्वप्नात माता महाकाली आली होती. तिने त्यांना सांगितले की, मी पिडींच्या(स्वयंभू) स्वरुपात डोंगराच्या माथ्यावर आलेली आहे. त्यानंतर लोकांना सध्या मंदिर आहे त्या ठिकाणी पिंडीच्या स्वरुपातिल देवी आढळुन आली. काही काळाने त्या ठिकाणी मंदिर बांधण्यात आले. सध्याच्या काळ्या पाषाणातिल मूर्तीची शिला अयोध्येच्या राजाकडून मिळाली होती.
     मंदिर परिसरात आणखिही देवीच्या मूर्ती आहेत. मंदिराचा परिसर छान स्वच्छ होता. या ठिकाणचे एक वैशिष्ट म्हणजे येथे येणाऱ्या प्रत्येक भक्ताला अस्सल साजुक तुपातला शिरा आणि हरभऱ्याची उसळ प्रसाद म्हणून देण्यांत येतो. खास बाब म्हणजे ते पदार्थ वाटी आणि चमच्या सह दिले जात होते. प्रसाद ग्रहण करुन झाल्यावर वाटी चमचा घासण्याकरीता लगेच सेवेकरी हजर असतात.
     या किल्याच्या तटाच्या पार्श्वभूमीवर अनेक फोटो काढुन झाले. किल्यातल्या गार्डन मध्ये देखिल फोटो काढले. अशा तऱ्हेने बाहू किल्ला पाहून झाल्यावर डलहौसीच्या दिशेने प्रवासाला सुरवात झाली.  काही काळ प्रवास झाल्यावर जम्मु काश्मिरची बॉर्डर लागली. सिमेवरचा टोल क्रॉस करताच सगळ्यांची प्रिपेड सिम चालू झाली. त्यामुळे सर्वांनी भराभरा फोन लावायला सुरवात केली. माझा काही प्रश्न नव्हता कारण मी पोस्टपेड सिम बरोबर ठेवले होते.
     आता आम्ही पंजाबमध्ये प्रवेश केला होता. दुपारचे दोन वाजुन गेले होते. सगळ्यांच्या पोटात कावळे काव काव करायला लागले होते. गब्बुला सांगितल्यावर त्याने एका पंजाबी धाब्यावर गाडी थांबवली. त्या हॉटेलमधिल सरसोका साग आणि मकईकी रोटी हा स्पेशल मेनू होता. सगळ्यांनी तोच मेनू ऑर्डर केला. जेवण खरोखरच चविष्ट होते. भरपेट जेवण झाल्यावर परत पुढचा प्रवास सुरु झाला. आता आपण पंजाब मधुन प्रवास करीत आहोत हे रस्त्याच्या दुतर्फा असणाऱ्या गव्हाच्या शेतांवरुन जाणवत होते.
     दुपारच्या तिन साडेतिनच्या सुमारास गब्बुने गाडी थांबवली आणि येथे एक खास शिवमंदिर आहे असे सांगितले. हे मंदिर म्हणजे हिमाचल मधिल प्रसिद्ध त्रिलोकीनाथाचे म्हणजेच शंकराचे मंदिर होते. हे मंदिर राजा अजब सेन याची राणी सुलतान देवी हिने सन १५२० मध्ये बांधले. या गावाचे नांव मंडी असे आहे. बयास नदीच्या किनाऱ्याला असणाऱ्या गुंफेत हे मंदिर आहे. गुंफेच्या छता मधुन सतत पाणी ठिपकत होते. जणू तेथे भगवान शंकराला संतत धारेच्या स्वरुपात अभिषेकच करीत होते.
          हे मंदिर  मंडी गावातिल व्हिक्टोरीया पुलाच्या अगदी बाजुला आहे. येथे भक्तांची खूपच गर्दी दिसत होती. बयास नदिच्या पात्रातही एक छोटे मंदिर दिसत होते. या ठिकाणचा निसर्गही समृद्ध आहे. हिरव्यागार वनराई मध्ये नदीच्या पात्राच्या अगदी बाजुला असल्याने या ठिकाणाचे आकर्षण जास्त होते. या तिर्थक्षेत्राचा विकास हिमाचल प्रदेश पर्यटन विभागा तर्फे केला गेला आहे. तिथेच असलेल्या एका धाब्यावर चहापाणी करुन पुढच्या प्रवासाला सुरवात केली.
     थोड्याच वेळात आम्ही डलहौसीच्या परिसरात पोचलो. डलहौसीची घाटी चढायला सुरवात केल्यावर रस्त्याच्या दुतर्फा अनेक प्रकारची झाडे होती. परंतु त्यात लक्ष वेधुन घेत होते ते लालफुलांचे वृक्ष. या झाडांवर जास्वंदी सारखी फुले आलेली होती. जंगलाचा मोठा भाग या झाडांनी व्यापला होता. त्या झाडांच्या फुलांमुळे सर्वत्र लाल रंग भरून राहिला होता. नंतर चौकशी केली तेव्हा त्या फुलांच्या झाडाचे नांव बुऱ्हान आहे असे समजले. या जातीच्या झाडांना लाल, पांढरी आणि गुलाबी अशी तिन प्रकारची फुले येतात. या फुलांचे सरबत, चटणी आणि जाम असे पदार्थ केले जातात. हिमाचल प्रदेश खादी ग्रामोद्योग मंडळा तर्फे या वस्तुंचे उत्पादन आणि विक्री केली जाते.
            आता आम्ही डलहौसी शहरात प्रवेश केला होता. डलहौसी हे शहर सन १८५४ मध्ये ब्रिटीश सरकारने आपल्या कर्मचाऱ्यांना उन्हाळ्याची सुट्टी घालविण्याकरीता निर्माण केले होते. या शहराचे नांव लॉर्ड डलहौसी या भारतातिल त्यावेळच्या ब्रिटिश गव्हर्नरच्या नांवावरुन दिले होते. हे धौलाधार पर्वतावरील पांच टेकड्यांवर वसविले गेले आहे. या शहराची समुद्र सपाटीपासुनची उंची ६००० ते ९००० फुटां दरम्यान आहे.
     आता संध्याकाळ झाली होती. आम्ही डलहौसी येथिल प्रसिद्ध खज्जर लेक या ठिकाणाला भेट दिली. मोठे हिरवळ असलेले मैदान, आजुबाजुला घनदाट झाडी, एक छोटा तलाव हे येथिल निसर्ग वैभव आहे. घोडेवाले, फोटोग्राफर आपापला धंदा व्हावा म्हणून पाठिशी लागले होते. होळीच्या निमित्ताने सलग चार पाच दिवस सुटी असल्याने भरपुर गर्दी होती. सशांची छोटी छोटी पिल्ले एका उभट टोपलीत घेऊन काही माणसे तेथे हजर होती. लोक त्या सशाची पिल्ले असणाऱ्या टोपल्या हातात घेऊन फोटो काढत होते. एक फोटो करीता ती टोपली वापरण्याचे दहा रुपये ती माणसे घेत होती.
     खज्जर येथिल निसर्ग सौंदर्याचा आनंद घेऊन झाल्यावर वाटेत एका टेकडीवर देवीचे मंदिर होते ते पहाण्यासाठी गब्बुने गाडी थांबवली. आम्ही चढण चढायला सुरवात केली तेव्हा दिवस मावळायला सुरवात झाली होती. सुमारे १५-२० मिनिटे चालल्यावर आम्हाला देवीचे दर्शन घेऊन येणारे काही भक्त भेटले, ते म्हणाले आता थोड्याच वेळात काळोख होईल तुम्हाला पुढे जाणे मुश्किल होईल. तरीही आम्हा मोबाईलच्या बॅटरीच्या प्रकाशात पुढे जाणे चालूच ठेवले. तेवढ्यांत वरुन भक्तांचा दुसरा ग्रुप आला. त्यामध्ये देवीच्या मंदिराचे पूजारीबाबाही होते. त्यांनी आम्हाला सांगितले, आता वरती जाण्यात काही अर्थ नाही. देवीच्या मंदिराच्या परिसरात रानटी श्वापदांचा वावर असतो म्हणून मी मंदिर बंद करुन आलो आहे. तेव्हा देवीच्या दर्शनाचा योग नाही असे समजुन आम्ही परत फिरलो. तरीही या ठिकाणी आल्याची आठवण म्हणून काही फोटो काढले.
     आता रात्र झाली होती. मुक्कामाच्या ठिकाणी जायची वेळ झाली होती. आमच्या बुकिंग मध्ये काहीतरी गडबड झाली होती. त्यामुले गब्बुची गेस्ट हाऊस शोधायची धावपळ सुरु होती. आज डलहौसीमध्ये प्रचंड गर्दी होती. त्यामुळे वाहने पार्किंग करण्याकरीता जागा देखिल मिळत नव्हती. बऱ्याच प्रयत्नानंतर आम्हाला हव्या तशा पांच रुम एकाच ठिकाणी मिळाल्या. डलहौसी हे हिलस्टेशन असल्याने गेस्ट हाऊस देखिल टेकडी टेकडीवर होती. आम्हाला मिळालेले गेस्ट हाऊस असेच उंच टेकडीवर होते. तिथे गाडी जाऊ शकत नव्हती. त्यामुळे अत्यावश्यक सामान बरोबर घेऊन गेस्ट हाऊस मध्ये दाखल झालो. महाबळेश्वर, माथेरान ही हिलस्टेशन जवळ असुनही कधी तिथे जाणे झाले नव्हते ते आता हिमाचल मध्ये शक्य झाले. रुम छानच होत्या. आज हवामानही खूपच थंड होते. परंतु आल्हाद दायक होते.
     आता उद्या डलहौसी दर्शनाचाच कार्यक्रम होता त्यामुले सकाळी लवकर उठण्याची घाई नव्हती.
*******



मंगळवार, २७ मार्च, २०१८

हिमालयाच्या सहवासात भाग ९


९. पहलगावपासुन जम्मु पर्यंत
            आज २२ मार्च २०१६! पहाटे ठिक पाच वाजुन दहा मिनिटांनी सर्वजण बसपाशी उभे होतो. काल अगदी जरुरी पुरते सामान गाडीतुन उतरवले होते. त्यामुळे सामान चढवण्याचा प्रश्नच नव्हता. गब्बुने गाडीचे इंजिन चालू केले होते. तापमान शून्य अंशापेक्षा कमी असावे कारण गाडीच्या काचेवर बर्फ साचला होता. १५-२० मिनिटे इंजिन गरम झाल्यावर प्रवासाला सुरवात झाली. वातावरण अतिशय थंड असल्याने रस्त्यावर वाहनांची गर्दी नव्हती. त्यामुळे श्रीनगर जम्मु हायवे येईपर्यंत विना अडथळा प्रवास झाला. हायवे सुरु झाल्यावर मात्र गाडी दर दहा मिनिटांनी थांबत होती. वाहतूकीचे नियंत्रण सिमा सुरक्षा दलाचे जवान करीत होते. त्यामुळे प्रवास धिमा असला तरी चालू होता. कोणतेही वाहन मधे घुसत नव्हते.
     रामबन गेल्यावर श्रीनगरला येताना जिथे जेवण केले होते त्याच्या जवळपासच्या एका वैष्णो धाब्यावर मागच्यासारखाच राजमा राईस आणि राजम रोटीची ऑर्डर दिली परंतु आज चव मात्र पूर्वीसारखी नव्हती. त्या हॉटेलच्या मागच्या बाजुला एक धरण दिसत होते. त्या धरणाचे दृष्य मात्र मनमोहक होते.
     जाताना पावसामुळे रहित झालेल्या पटणी टॉप येथिल नाग मंदिरात आज गेलो. हे नाग मंदिर क्रिमची येथे मंतालाई जवळ आहे. येथे शंकर भगवान आणि माता पार्वती यांचा विवाह झाला होता असे मानले जाते. पटणी टॉप येथिल हे सर्वात जुने मंदिर आहे. पटणी टॉप येथिल सर्वांत उंच टेकडीवर असलेले हे मंदिर ६०० वर्षे जुने आहे. नाग पंचमीच्या दिवशी येथे हजारो भक्त दर्शनाला येतात.
तावी नदी, जम्मु
     पटणी टॉपनंतर मात्र प्रवास विना अडथळा आणि पूर्ण वेगात सुरु झाला. जम्मुमध्ये प्रवेश करण्यापूर्वी तावी नदीचे दर्शन झाले. या नदीच्या नांवावरुनच जम्मु शहराचे नांव जम्मु तावी असे पडले आहे. जम्मुमध्ये पोचायला रात्रीचे आठ वाजले. जम्मुमध्ये आम्ही हॉटेल इंटरनॅशनल मध्ये उतरलो होतो. हॉटेल ए.सी. होते परंतु रिनोव्हेशनचे काम चालू असल्याने आकर्षक वाटत नव्हते. रुम मात्र प्रशस्त होत्या. हॉटेलपासुन रेल्वे स्टेशन आणि रघुनाथ मंदिर जवळच होते. आता शहरात आल्यामुळे की काय उकाडा खूपच जाणवत होता.

     हॉटेल मध्ये चेकइन करुन, फ्रेश व्हायला पावणे दहा वाजले होते. जेवण्याकरीता वैष्णोधाबा शोधुन काढी पर्यंत त्या धाब्याची बंद करण्याची वेळ झाली होती. त्या हॉटेल वाल्याला रिक्वेस्ट करुन दहा माणसांची जेवणाची सोय करायला सांगितली. जेवण झाल्यावर जवळच असणाऱ्या रघुनाथ मंदिरापर्यंत चक्कर मारुन आलो. झोपेपर्यंत अकरा साडे अकरा वाजले होते. काश्मिरमध्ये दाखल झाल्यापासुन आज पहिल्यांदा रात्रभर पंखा लाऊन झोपलो. आता उद्या जरा निवांत होते. थोडे उशिरा उठले तर चालणार होते.
*******

हिमालयाच्या सहवासात भाग ८


८. पहलगाम दर्शन
    आज दिनांक २१ मार्च २०१६! आता थोड्याच वेळात ही हाऊसबोट सोडायची होती. काल रात्री उशिरा फारुकभाई हॉस्पिटल मधुन आले होते. त्या गुजराथी माणसाच्या जिवाला असलेला धोका टळला होता. परंतु तो स्वत:च्या पायावर ऊभा रहाण्याची शक्यता कमी होती. याचा अर्थ एकच अनोळखी प्रांतात भलतेच साहस करण्याच्या भरीस पडू नये. बर्फातुन गाड्या चालवण्याचा सराव असणाऱ्या आणि सुरक्षेसाठी गाडीच्या चाकांना लोखंडी साखळीचा बेल्ट लावलेल्या गाडीमधुन प्रवास करण्याची सक्ती ही पर्यटकांच्या सुरक्षेसाठीच होती हे आता मनात पक्के झाले. आमच्याकडे देखिल हरिहरेश्वर येथे येणारे पर्यटक असेच वेडे धाडस करुन समुद्रात उतरतात आणि आपल्या जिवाला मुकतात. त्यानंतर बोंबाबोंब मात्र शासनाच्या नावाने करतात. पर्यटनाचा आनंद घ्यावा परंतु आपल्या बरोबर सगळ्यांचाच जीव धोक्यात घालू नये.
            चहा नाश्ता करुन फारुकभाईंचा सर्व हिशेब करुन आम्ही शागु पॅलेस सोडला. जाताना फारुकभाईंच्या फॅमिलीला काही गिफ्ट दिले, कारण गेले तिन चार दिवस त्यांनी आमच्यासाठी चांगली व्यवस्था ठेवली होती. सर्वांच्या बॅगा परत शिकाऱ्यामध्ये ठेवण्यात आल्या. जाता जाताच लेकला मोठी प्रदक्षिणा घालुन रस्त्यावर आलो. शिकारेवाले देखिल टीप द्या म्हणून पाठिशी लागले होते. त्यांना टिप देऊन झाल्यावर त्यांनीच रस्त्यावर हजर असलेल्या आमच्या बसमध्ये आमचे सामान चढवुन दिले. आम्हाला निरोप देण्यासाठी रस्त्यावर फारुकभाई आले होते. आम्ही गब्बुला वाटेत सफरचंदाची बाग आणि केशराची शेती दाखवायला सांगितली. काश्मिर मध्ये येऊन सफरचंदाची बाग आणि केशराची शेतं पाहिली नाहित तर काश्मिर दर्शन पूर्णच होणार नाही. साधारण दहाच्या सुमारास आम्ही श्रीनगर सोडले.


केशराची शेती
    श्रीनगरपासुन साधारण सोळ सतरा किलोमिटर आल्यावर पॅंपोर हे केशराकरीता प्रसिद्ध असणारे गांव आले. येथे रस्त्याच्या कडेला केशराचीच शेते होती. सध्या केशराला फुले वगैरे येण्याचा हंगाम नसल्यामुळे केशराची शेती म्हणजे गवताने भरलेले माळरान भासत होते. केशराच्या झुडुपांना छान निळी फुले आलेली असली की, ते एक विलोभनिय दृष्य असते. परंतु ते आता शक्य नव्हते. फक्त केशराची शेती पाहिली असे सांगता येईल एवढा अनुभव घेतला.

उध्वस्त अवंती स्वामी मंदिर
     पॅंपोर नंतर दहा बारा किलोमिटर गेल्यावर अवंतीपुर हे शहरवजा गांव लागले. येथे काश्मिर मधिल दोन प्रसिद्ध मंदिरे आहेत. त्यातले अवंती स्वामी मंदिर पहलगावच्या रस्त्यावरच आहे. हे मंदिर भारत सरकारच्या पुरातत्व खात्याने संरक्षित स्मारक म्हणून जाहिर केले आहे. मंदिर पहाण्यासाठी आम्ही गाडीतुन खाली उतरलो. समोर भग्नावस्तेतिल मंदिर होते. त्याचे अवशेष इतस्तत: विखुरलेल्या अवस्थेत होते. भग्नावस्तेतिल हे मंदिर पाहून मन विषण्ण झाले.
     भगवान विष्णूंचे हे मंदिर नवव्या शतकातिल आहे. हे मंदिर इसविसन पूर्व ८५३ ते ८८८ या काळात या राज्याचा शासक असणाऱ्या अवंती वर्मन या राजाने बांधले होते. हे मंदिर, अवंतीपूर येथेच जिर्णोद्धार केलेले अवतेश्वर(शिव) मंदिर आणि काश्मिर मध्येच असणारे मार्तंड(सूर्य) मंदिर ही तिनही मंदिरे ग्रीक स्थापत्य शैलीतिल आहेत. या उद्धवस्त असणाऱ्या अवंती स्वामी मंदिराचे अवशेषांवरील कोरीव काम पाहून त्यावेळच्या स्थापत्यकलेच्या भव्यतेची कल्पना येते.
     पहलगामच्या दिशेने जाताना रस्त्याच्या दोन्ही बाजुला सफरचंदाच्या बागा होत्या. आपल्याकडे कोंकणात आंब्याच्या बागा असतात तशाच पद्धतिच्या त्या बागा मला वाटल्या. सध्या पाऊस, स्नो फॉल आणि पानगळीचा ऋतु चालू असल्यामुळे सफरचंदाची झाडे म्हणजे खराटे झालेले होते. नुकतिच झाडांना पालवी यायला सुरवात झाली होती. अपवाद म्हणून एक दोन झाडांवर हिरवी सफरचंदे पहायला मिळाली.  बागा मात्र मोठ्या मोठ्या होत्या. आपल्याकडे कोंकणात माझी पांचशे कलमांची, हजार कलमांची आंब्याची बाग आहे असे म्हणतात, तसे इथे पाचशे हजार झाडांची सफरचंदाची बाग आहे असे म्हणत असावेत.
     दुपारी दोनच्या सुमारास आम्ही पहलगामला पोचलो. पहलगाम येथिल मुख्य आकर्षण होते फ्लॉवर व्हॅली. त्याकरीता घोडेस्वारी करणे आवश्यक होते. पहलगाम हे अनंतनाग जिल्ह्यातिल एक शहर आहे. हे शहर लिड्डर नदीच्या किनाऱ्यावर वसले आहे. हे पर्यटकांचे अत्यंत आवडते ठिकाण आहे. या शहराची समुद्र सपाटीपासुनची उंची ७२०० फुट आहे. येथे अनेक सिनेमांचे चित्रिकरण झाले आहे. दरवर्षी अमरनाथ यात्रेला जाणारे लोक प्रथम येथे येतात. येथुन पुढे अमरनाथ लिंगापर्यंत घोड्यावरुन अथवा पायी जावे लागते. येथिल मुख्य व्यवसाय पर्यटन हाच असावा. कारण हा सर्व पहाडी भाग आहे. किंबहूना सर्व काश्मिर खोरेच पर्यटन व्यवसायावर अवलंबुन आहे.
     पहेलगाम येथे आमच्या स्वागताला तेथिल आमचे बुकींग असलेल्या हॉटेलचे मालक गफुरभाई हजर होते. त्यांच्या सल्यानुसार आम्ही आधी हॉटेलवर न जाता साईट सीइंग करुन जायचे ठरवले. त्यांच्याच मध्यस्थिने घोडे ठरवले.
     पहलगाम येथिल घोडेस्वारी हा एक वेगळाच अनुभव होता. येथे एक घोडेवाला दोन दोन घोडे मॅनेज करत होता. घोडेस्वारीची वाट अतिशय अवघड होती. कालच भरपुर पाऊस आणि बर्फ पडला होता त्यामुळे डोंगरात सर्वत्र त्या वितळलेल्या बर्फाचे झरे वहात होते. त्या वाहत्या पाण्यांतुन दगड, गोटे, चिखल यातुन वाट काढीत घोडे आपला मार्ग आक्रमत होते. अतिशय तिव्र चढण आणि उतरण असलेला हा रस्ता होता. अशा प्रकारच्या वाटेला आपल्याकडे ढोरवाट म्हणतात. आमचे घोडे त्यातुनच आमचे ओझे घेऊन जात होते कमाल त्या घोड्यांची आणि घोडेवाल्यांची. घोडेवाले आमच्याबरोबर पायी चालत त्या दगडाळ सरपटणाऱ्या रस्त्याने चालत होते. घोडेवाले जसे अगदी वृद्ध होते तसेच पोरगेले देखिल होते. तरुण मात्र फार कमी होते.
     घोडेवाल्यांनी आम्हाला कारगिल पॉईंट, पहलगाम लिड्डर रिव्हर पॉईंट, चंदनवारी, आरु व्हॅली, शिकार पॉईंट एवढे पॉईंट दाखवले. हवामान स्वच्छ असल्यास या ठिकाणाहून श्रीनगर परिसर दिसतो असे एका पॉईंटवर आम्हाला त्यांनी सांगितले.  कारगिल पॉईंटवरुन ज्या ठिकाणी कारगिल युद्ध झाले ते शिखर दिसत होते. दुसऱ्या एका पॉईंटवरुन लिड्डर नदीचे विहंगम दृष्य दिसत होते.
     पूर्ण चढण चढुन गेल्यावर एक छान पठार होते. मस्त हिरवळीला चिनार, पाईन, देवदार या वृक्षांच्या गर्द झाडीची कुंपण घातल्यासारखी भिंतच होती. त्या पार्श्वभूमिवर जमिनीवर सगळीकडे बर्फच बर्फ पसला होता. थोडे उंचवटे सोडून सर्व जमिन बर्फाने झाकलेली होती. उन्हाच्या कवडशांनी बर्फ सोन्यासारखा चकाकत होता. या पठाराला बैसरन(Baisaran) पठार असे म्हणतात. या बैसरन पठारावरील बर्फावरुन फिरायला खूपच मजा येत होती. हे पठार खूपच मोठे असल्याने तेथे असलेली गर्दी जाणवत नव्हती. या पठारावर एक झाड होते त्या झाडाला दिड दोन फुटांवर एक फांदी फुटून ती दोन झाडे झाल्यासारखी दिसत होती. खाली असलेल्या बर्फाच्या पार्श्वभूमीवर त्या बेचकीत उभे राहून  फोटो खूपच छान येत होत. त्यामुळे त्या पॉईंटवर बरेच फोटो काढुन झाले.
     आतापर्यंत कुठे बघण्यात न आलेला एक गेम तिथे पहायला मिळाला. चेंडूच्या आकाराच्या एका मोठ्या फुग्यामध्ये हायड्रोजन गॅस भरुन त्यात दोन माणसांना बसवुन ते फुगे उतारावरुन सोडून दिले जात होते. या गेमला झोर्बिंग असे म्हणतात. बैसरन पठारावर बराच वेळ घालवुन त्यानंतर तिथेच असलेल्या टपरीवजा हॉटेलमध्ये पोटपूजा केली. त्यानंतर आमचा पहेलगामकडे परतिचा प्रवास सुरु झाला.
     पहलगामकडे परत जाताना सर्व प्रवास तिव्र उताराचा होता. त्यामुळे तोल सावरणे कठीण जात होते. एकाबाजुला अतिशय खोल दरी त्यातच दगड, गोटे राडा, रोडा याने भरलेली अति चिंचोळी वाट यामुळे अक्षरश: जीव मुठीत नाही तर घोड्याच्या लगामात धरुन आम्ही जात होतो. घोड्यावर एकाबाजुलाच वजन पडणार नाही याची दक्षता घेत आमची घोडेस्वारी चालू होती. अखेर एकदाचा आमचा घोड्यावरचा प्रवास संपला आणि आम्ही आमची गाडी जेथे पार्क केली होती तेथे आलो.
     संध्याकाळी सहा वाजता आम्ही हॉटेलवर पोचलो. हे हॉटेल आमच्या पूर्ण सहलीच्या मुक्कामाच्या ठिकाणांचा विचार करता एक नंबरचे हॉटेल होते. रुमच्या खिडकीतुन बाहेरील निसर्ग सौंदर्य खूपच छान दिसत होते. रुमचे इंटीरिअरही खूप चांगले होते. बेडवर पातळ गादी होईल एवढ्या जाडीची रजई, शिवाय रग आणि इलेक्ट्रीक हिटींग रग देखिल होता. अर्थात आताचे तापमान देखिल तिन अंश सेल्सिएस होते.
     आजच्या घोडेस्वारीने अंगाचा खुर्दा झाला होता त्यामुळे कढत कढत पाण्याने आंघोळी केल्या. सकाळपासुन फारसे खाणे झाले नसल्याने आणि वातावरणाचा परिणाम म्हणून असेल् कडकडून भूक लागली होती. त्यामुळे बरोबर आणलेल्या पदार्थांचा नाश्ता केला. नाश्ता झाल्यावर येथे जवळच मामलेश्वराचे मंदिर आहे असे समजले. तेथे दर्शनाला जाण्याकरीता म्हणून निघालो तो अचानक सगळीकडचे लाईट गेले आणि पूर्ण काळोख झाला. त्यामुळे अनोळखी प्रदेशात उगाच भटकण्यापेक्षा परत हॉटेलात परत आलो. एकूणच श्रीनगरच्या परिसरात असताना देवदर्शनाचा योग काही आला नाही.
     वास्तविक मामलेश्वराचे मंदिर आमच्या हॉटेलपासून अगदी जवळ होते परंतु नेमकी जागा दाखवणारा कोणी नसल्यामुळे आम्हाला देवळात जाता आले नव्हते. त्या मामलेश्वराच्या मनांत आम्हाला दर्शन द्यायचे नव्हते. हॉटेलात आल्यावर या मंदिराची माहिती मिळाली ती फार महत्वाची होती. या मंदिराला पौराणिक संदर्भ आहे. हे मंदिर इसवीसन पूर्व ४०० वर्षांपूर्वीचे असण्याची शक्यता आहे. पार्वतीने आपल्या मळा पासुन बनविलेल्या गणपतिला स्नानाला जाताना द्वारपाल म्हणून बसविले. त्यावेळी त्याने प्रत्यक्ष शंकारांना अडविले होते तो प्रसंग येथे घडला असे म्हणतात. मा मल याचा अर्थ जाऊ नका असा होतो. म्हणून या महादेवाचे नांव मामलेश्वर असे पडले.
     हॉटेलात परत आल्यावर तासाभराने लाईट आले त्याकाळात बेडवर पडुन रहाणेच पसंत केले. कारण घोडेस्वारीचे परिणाम जाणवायला लागले होते. लाईट आल्यावर नऊच्या सुमारास सर्वांनी एकत्र डायनिंग हॉलमध्ये जेवण केले आणि जास्त टाईमपास न करता लगेचच झोपायला गेलो. उद्या जम्मुला जायचे होते. येतानाचा श्रीनगर जम्मु हायवेचा अनुभव चांगला नव्हता त्यामुळे प्रवासाला किती वेळ लागेल याचा भरवसा नव्हता. सावधगीरी म्हणून उद्या पहाटे पांच वाजताच मार्गाला लागायचे असे ठरवले होते.

*******


सोमवार, २६ मार्च, २०१८

हिमालयाच्या सहवासात भाग ७


७) गुलमर्ग आणि श्रीनगर दर्शन
            आज दिनांक २० मार्च. आज सकाळी सात वाजताच तयार होऊन डेकवर आलो. आज मुद्दामच कोणतेही गरम कपडे घातले नव्हते. आजचे तापमान ८ अंश सेल्सिएस एवढे होते. त्यामुळे थंडी होतीच परंतु ती बोचरी वाटत नव्हती. रेग्युलर टि शर्ट आणि जीन्सची पॅंट घातली होती तरी बेअरेबल वाटत होती.
     काल ठरल्याप्रमाणे फोटोग्राफर हजर झालेला होता. सर्वप्रथम आठवले दांपत्याचे फोटो सेशन झाले. आज सुरेश आठवले यांचा वाढदिवस होता. त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. त्यांचे दोघांचे त्यांच्या मोबाईलमध्ये फोटो काढुन दिले. त्यानंतर छोट्या शिकाऱ्यामध्ये काश्मिरी ड्रेसमध्ये बसुन आमचे दोघांचे फोटो सेशन करुन झाले. आम्ही फक्त चार पाच फोटो काढायचे असे ठरवले होते. परंतु प्रत्यक्ष पंधरा फोटो काढुन झाले. त्यानंतर एकेकाचे करत सर्वांचेच फोटो सेशन झाले. एकीकडे कापड खरेदी सुरु होती. सगळ्यांनीच श्रीनगरची आठवण म्हणून ड्रेसपिसची खरेदी केली. दरम्यान नाश्ता आला. आज आलु पराठा आणि लोणचे असा नाश्त्याचा बेत होता.
     आज आमचा श्रीनगर दर्शनाचा कार्यक्रम होता. त्यानिमित्ताने फारुकभाईंनी आम्हाला श्रीनगरच्या इतिहासाची आणि प्रेक्षणिय स्थळांची माहिती दिली. श्रीनगर हे जम्मु आणि काश्मिर या राज्याचे राजधानीचे शहर समुद्रसपाटी पासुन १७०० मिटर उंचीवर आहे. हे शहर हाऊस बोट आणि सरोवरांकरीता प्रसिद्ध तर आहेच. या व्यतिरिक्त पारंपारीक हस्तकला आणि सुक्यामेव्याकरीताही हे शहर प्रसिद्ध आहे. या शहराचा इतिहास तसा खूप प्राचीन आहे.
     या शहराचे मूळनांव सूर्यनगरी असे होते. श्रीनगर या शहराच्या नांवातच खरं म्हणजे त्याचा अर्थ सामावला आहे. श्री म्हणजे लक्ष्मी याचाच अर्थ हे शहर लक्ष्मीचेच नगर आहे. राजा प्रवरसेन दुसरा याने या नगरीची स्थापना २००० वर्षांपूर्वी केली  असावी याचे काही पुरावे उत्खननात सापडले होते असे म्हणतात. काही इतिहासकारांच्या मते हे शहर सम्राट अशोकाने स्थापन केले. श्रीनगर येथे अनेक सिनेमांचे शूटींग केले जात असे. जुन्या जवळ जवळ प्रत्येक सिनेमात काश्मिरचे दृष्य असणारे कमीत कमी एखादे तरी गाणे असायचेच. अगदी मराठी सिनेमातही हे चिंचेचे झाड या गाण्यात काश्मिर मधिल दृष्ये आहेत.
     श्रीनगरमध्ये निशात गार्डन, चश्मेशाही गार्डन, शालिमार गार्डन, गुलमर्ग, सोनमर्ग, पहलगाम ही पर्यटकांची आवडती ठिकाणे आहेत. हल्लीच श्रीमती इंदिरा गांधी यांच्या नावाने तुलिप गार्डन तयार करण्यांत आले आहे. येथे असणाऱ्या हजरत बल मस्जिदमध्ये हजरत मोहमंद पैगंबराच्या दाढीचा केस जपुन ठेवला आहे.
     श्रीनगर शहरामध्ये शंकराचार्य पर्वतावर शंकराचार्यांचे मंदिर आहे. याला तख्त ए सुलेमान असेही म्हटले जाते. या मंदिराची निर्मिती राजा गोपादित्याने इसवीसन पूर्व ३७१ मध्ये केली होती.  आमच्या दुर्दैवाने आम्ही येथे जाऊ शकलो नाही.
     आमच्या सर्व मेंबरची खरेदी, फोटोसेशन उरकल्यावर आजचे उत्सवमूर्ती श्री आठवले यांचे औक्षण करण्यात आले. औक्षणाची तयारी केतकीताईंनी मुंबईहून येतानाच आणलेली होती. आमच्या ग्रुपमध्ये पांच सुवासिनी होत्याच त्यांनी त्यांना औक्षण केले. त्यानंतर फारुकभाईंच्या मिसेसनीपण त्यांना औक्षण केले. औक्षण झाल्यावर श्री आठवले यांनी आमच्यात ज्येष्ठ असणाऱ्या नानांना आणि फारुकभाईंच्या आईला नमस्कार केला. केतकीताईंनी खास वाढदिवसाकरीता आणलेल्या बेसनाच्या लाडवांनी सर्वांचे तोंड गोड केले. मात्र काश्मिरच्या कडक थंडीने त्या लाडवांना देखिल कडक केले होते.
     एवढे सगळे होईपर्यंत दोन शिकारे दाल सरोवराच्या किनाऱ्यावर जाण्याकरीता हजर झाले होते. त्या शिकाऱ्यांमध्ये बसुन दाल सरोवराच्या किनाऱ्यावर आलो तेथे आमची बस हजरच होती. परंतु तेवढ्यात काही गरम टोप्या, जर्कीन असे गरम कपडे विकणाऱ्या लोकांनी आम्हाला गराडा घातला. आमच्यापैकी काही जणांनी त्यातले गरम कपडे खरेदी केले. आजचा बिझी शेड्युल विचारात घेऊन गब्बु आमचा ड्रायव्हर निघण्याची घाई करीत होता.
     आता आम्ही गुलमर्गच्या रस्त्याला लागलो होतो. हा रस्तादेखिल निसर्गसौंदर्याने नटलेला होता. दोन्ही बाजुला घनदाट झाडी, मधुन मधुन धबधबे कोसळत होते. त्यातच रिमझिम पाऊस पडत होता. त्यामुळे वातावरणात गारवा वाढला होता. एकुणच वातावरण आल्हाददायक होते.
     काश्मिरच्या खोऱ्यामध्ये श्रीनगर पासुन कोणत्याही दिशेला गेले तरी निसर्गाची इतकी लोभसवाणी दृष्ये दिसतात की, ती पाहून असे वाटते परमेश्वराने आपले सर्व वैभव येथे उधळुन टाकले आहे. या राजमार्गावरुन निघाल्यावर पर्यटक रस्त्यावर लिहिलेल्या गावांची नावे वाचुनच आकर्षित होतात आणि गुलमर्ग, सोनमर्ग आणि पहलगाम येथे फिरायला जातात.
     गुलमर्गच्या रस्त्याच्या दुतर्फा असलेली छोटी छोटी गावे आणि शेती मनाला मोहून टाकते. सरळ लांबच लाब रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या उंचच उंच झाडांच्या भव्य रांगा हिरव्या हिरव्या भिंतींप्रमाणे भासतात. जुन्या काळातिल अनेक चित्रपटामधली गाणी या रस्त्यावर चित्रित केली गेली आहेत. चढणीचा रस्ता सुरु झाल्यावर या झाडांची घनता आणखिनच वाढते. गुलमर्गला पोचल्यावर सगळीकडे गवताने भरलेली सुंदर सुंदर मैदाने दिसायला लागतात. या मैदानांना काश्मिरी भाषेत मर्ग असे म्हणतात. गुलमर्ग याचा अर्थ आहे फुलांनी भरलेली मैदाने. गुलमर्ग समुद्रसपाटी पासुन २६८० मिटर उंचीवर आहे. येथुन घोड्यावरुन खिलनमर्ग, सेवन स्पिंग आणि अलपथ्थर येथे जाता येते.
     गुलमर्ग येथे जगात सगळ्यात उंचीवर असणारा गोल्फकोर्स आहे. हिवाळ्यात येथिल धरतीने बर्फाची जणू चादरच पांघरलेली असते. त्यावेळी आईस स्केटींगचा आणि बर्फात खेळण्याची हौस असणाऱ्यांसाठी हा जणू स्वर्गच असतो. गुलमर्ग येथिल वैशिष्ट म्हणजे येथे चालवली जाणारा गंडोला. गंडोला म्हणजे बर्फाने भरलेल्या दरीची दृष्ये पहाण्याकरीता आकाशातुन केलेले भ्रमण. येथे असणाऱ्या या रोप वे किंवा केबल कारमधुन  आकाशातुन विहार करणे. येथे असणाऱ्या वृक्षराजीवर साचुन राहिलेला बर्फ पहाण्यात एक वेगळीच मजा आहे. अशा या बर्फाच्छादित शिखरांवर जर सोनेरी सूर्याची किरणे पडली तर सोनेपे सुहागा. परंतु आम्ही या गंडोला सफारीचा आनंद घेऊ शकलो नाही.
     आम्ही गुलमर्गमध्ये प्रवेश केला आणि स्नो फॉल व्हायला सुरवात झाली. आम्ही आणलेली मिनी बस आता पार्क करण्यात आली होती. याच्या पुढचा प्रवास सोनमर्ग प्रमाणे स्पेशल चेनवाल्या गाडीने करावा लागणार होता. तेथे हजर असणारे गाडीवाले भरमसाट दर सांगत होते. आम्ही आमच्या गाडीतुन उतरुन चौकशी केली तेव्हा समजले की, गंडोल्यापर्यंत कोणालाच जाऊन देत नाहित. तेव्हा आम्ही सगळ्यांनी निर्णय घेतला येथिल लोकल गाडिवाल्यांच्या थापांना बळी न पडता येथेच मोकळ्या जागेत स्नो फॉलचा आनंद घ्यायचा.
     सिनेमातला स्नो फॉल बघणे आणि त्याचा प्रत्यक्ष अनुभव घेणे यात खूपच अंतर आहे.  येथे बर्फात मनसोक्त खेळून त्याचे व्हीडीओ करुन झाल्यावर तेथे जवळच असणाऱ्या हॉटेलात पोटपूजा करुन घेतली. गरमा गरम कांदाभजी, त्यासोबत गरमा गरम चहा आणि बरोबर घरुन आणलेल्या पदार्थांनी पोटभरुन घेतले. त्या हॉटेलात असलेल्या फायर प्लेस जवळ बसुन बर्फात खेळून आखडलेले हात शेकून घेतले. त्या हॉटेलच्या परिसरांतच एक काश्मिरी कपड्यांचे दुकान होते. महिलांनी तेथे काही खरेदी केली. तेथे असलेल्या निरनिराळ्या प्रकारच्या टोप्या घालुन फोटो काढले.
     दुपारी तिनच्या सुमारास परत श्रीनगर शहरांत आलो. सर्वप्रथम आम्ही निशाद गार्डनला भेट दिली. निशात गार्डन नंतर आम्ही शालिमार गार्डनला भेट दिली. या बागेला पौराणिक संदर्भ देखिल आहे. सध्याच्या इतिहासानुसार शालिमार गार्डनच्या विस्तारिकरणाचे आणि मोगल गार्डनच्या सध्याच्या स्वरुपामध्ये ही बाग परिवर्तित करण्याचे श्रेय मुगल बादशहा जहांगिर याच्याकडे जाते. परंतु प्राचिन इतिहास पाहिला तर दुसऱ्या शतकात ज्या प्रवरसेन द्वितिय याने श्रीनगर शहर वसविले त्यानेच या बागेचे निर्माण केले असावे असा संदर्भ मिळतो.
     प्रवरसेन राजाने दाल सरोवराच्या दक्षिण पूर्व कोपऱ्यात एक झोपडीवजा घर उभारले होते. त्या घराचे नाव त्याने शालिमार असे ठेवले. संस्कृतमध्ये शालिमार या शब्दाचा  अर्थ प्रेम निवास अथवा प्रीती घर असा होतो.  जेव्हा प्रवरसेन राजा त्यावेळचे संत सुकर्मास्वामी यांना भेटायला येत असे तेव्हा तो या झोपडीत रहात असे. कालांतराने ती झोपडी राहिली नाही परंतु शालिमार हे या जागेचे नांव कायम राहिले.
     शालिमार गार्डन नंतर आम्ही चश्म ए शाही गार्डन बघायला गेलो. या बागेत जाण्याकरीता ५०-६० पायऱ्या चढुन जावे लागते. बागेमधुन दाल सरोवराचे आणि परिसराचे दृष्य विलोभनिय दिसते. या जागेचा शोध घेण्याचे श्रेय काश्मिर मधिल काश्मिरी पंडितांच्या कुळातिल महिला संत रुपा भवान यांच्याकडे जाते. रुपा भवानी यांच्या कुटूंबाचे आडनाव साहिब असे होते. त्यावरुन या झऱ्याला चश्मे साहिब असे संबोधले जायचे. काही कालानंतर त्याचा अपभ्रंश होऊन त्याला चश्मेशाही अथवा चश्म ए शाही या नांवाने ओळखले जायला लागले. कालांतराने मोगल शासकांनी त्याचा मुगल गार्डन स्वरुपात विस्तार केला.
     सध्या या गार्डनमध्ये जाण्याकरीता सिमा सुरक्षा दलाच्या क़डक पहाऱ्यातुन जावे लागते. सुरक्षा चौकीच्या गेटमधुन आधी आमची रिकामी गाडी पुढे गेली. नंतर आम्ही सर्वजण मेटल डिटेक्टर सारख्या मशिनमधुन पलिकडे गेलो. तेथिल सुरक्षा जवानांनी आमची आस्थेन चौकशी केली. विशेष म्हणजे चौकशी करणारा जवान मराठी बोलणारा होता.
            चश्म ए शाही बागेला भेट दिल्यानंतर आम्ही श्रीनगरचे वैभव मानल्या गेलेल्या तुलिप गार्डनला भेट द्यायला गेलो. हे गार्डन श्रीमति इंदिरा गांधी यांच्या स्मृतीप्रित्यर्थ निर्माण करण्यांत आले आहे. हे आशिया खंडातिल सर्वात मोठे तुलिप गार्डन आहे. १२ हेक्टर एवढ्या प्रचंड जागेत निर्माण करण्यांत आलेले हे गार्डन पहाणे म्हणजे डोळ्यांना मेजवानीच आहे. निरनिराळ्या रंगाच्या तुलिप फुलाचे हे गार्डन आखिव रेखिव आहे. या ठिकाणी देखिल अनेक फोटो काढले व्हीडीओ केला. श्रीनगरमध्ये आल्याचे सार्थक झाले असा भाव हे गार्डन पाहून मनात आले.
     तुलिप गार्डन एवढे भव्य होते की, ते बघता बघता वेळ कसा निघुन गेला ते कळलेच नाही. त्यामुळे आमची बघायची अनेक ठिकाणे मिस झाली. शंकराचार्य मंदिर तरी बघायला पाहिजे होते कारण शंकराचार्यांचे मंदिर कुठे असलेले ऐकले नव्हते. आज आमचा श्रीनगरचा शेवटचा मुक्काम  होता त्यामुळे इलाज नव्हता.
            संध्याकाळी हाऊस बोटीवर आलो तेव्हा एक धक्कादायक बातमी समजली. बडोदा येथिल एक फॅमिली फारुकभाईंच्या बहिणीच्या हाऊसबोटवर उतरली होती. ते एकूण तिघेजण स्वत:ची कार घेऊन आले होते. गाडी ते स्वत: चालवत होते. आज ते फारुकभाई यांच्या भाच्याला रस्ता दाखवायला घेऊन सोनमर्ग येथे गेले होते. सोनमर्ग येथे ती कार बर्फावरुन स्लिप होऊन खोल दरीत कोसळली होती. गाडी चालवणारा तो गेस्ट जिवंत होता परंतु त्याच्या शरिराची इतकी मोडतोड झाली होती की, त्याला अतिदक्षता विभागात दाखल होते. त्याची पत्नी देखिल गंभिर जखमी होती. फक्त त्याचा मुलगा आणि फारुकभाई यांचा भाचा सही सलामत होते. या घटनेमुळे फारुक भाई तिकडे हॉस्पिटल मध्ये गेले होते. 
     आज आठवले यांचा वाढदिवस होता त्यानिमित्ताने सकाळी त्यांना औक्षण करुन झाले होते. आता संध्याकाळी कापण्यासाठी केक आला होता. परंतु घडलेल्या प्रसंगाचे त्यावर सावट आले होते. रात्री जेवण्यापूर्वी केक कापण्याचा कार्यक्रम झाला. जेवणात स्विट देखिल केले होते. रात्री आम्ही झोपेपर्यंत फारुकभाई हॉस्पिटल मधुन आले नव्हते. वास्तविक आज आठवले यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने ते हाऊसबोटला लाईटिंग करणार होते. स्वत: गिटार वाजवुन बर्थ डे गीत गाणार होते. परंतु तो योग नव्हता.
     आधी ऑर्डर दिल्याप्रमाणे सुकामेव्याची पार्सल आलेली होती त्याचा हिशेब पूर्ण केला गेला. सकाळी काढलेल्या फोटोच्यादेखिल प्रिंट आलेल्या होत्या. काहीजणांनी कपडे धुण्यासाठी आणि इस्त्री करीता दिले होते ते देखिल आले होते. या सगळ्याचा हिशेब पूर्ण करुन रात्री झोपायला साडे दहा वाजले. आज श्रीनगर येथिल मुक्कामाची अखेरची रात्र होती. उद्या पहलगाम गाठायचे होते.
*******