दुर्गा कवच लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
दुर्गा कवच लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

मंगळवार, २७ मार्च, २०१८

दुर्गा कवच भाग ४

 दुर्गा कवच

भाग ४
आज श्रावण महिन्याचा पहीला दिवस आणि पहिला सोमवार होता. गुहागर येथे व्याडेश्वर मंदिरात गर्दी दिसत होती. कालच्या पेक्षा आज हवामान जर बरे होते. म्हणजे पावसाची संततधार चालू होती त्याच्याऐवजी पाऊस थांबुन थांबुन पडत होता. अनिकेत, आर्या, अनिकेतचे आई बाबा सर्वजण सकाळी आठ वाजताच गुहागरयेथे हजर झाले होते. त्यांनी आपल्या आंघोळी देवीहंसोळच्या भक्त निवासाताच उरकल्या होत्या. गुहागरला आल्यावर ते सर्वजण थेट पाटणकरांचे नेहमीचे अंजर्लेकरगुरुजी यांच्या घरी गेले होते. त्यांच्या घरी अनिकेत आणि आर्याने आपले प्रवासी कपडे बदलुन अभिषेकाकरिता कद आणि पैठणी नेसल्यावर सगळेजण चहापाणी करुन देवळांत आले होते. तेथे अंजर्लेकर गुरुजी त्यांची वाटच पहात होते. ते येताच त्यांनी अनिकेत आणि आर्याला थेट गाभा-यात नेले. आणि त्यांच्या हस्ते संकल्प करुन यथाविधी रुद्राभिषेक संपन्न केला.
सर्वांचे विधिवत दर्शन होताच त्यांनी आपली गाडी गुहागर मध्येच असलेल्या दुर्गा देवीच्या दर्शनाला नेली. तेथुन परत ते अंजर्लेकर गुरुजींच्या घरी गेले. तिथे जाऊन त्यांच्या हॉलमध्ये बसल्यावर नाश्ता तयार होईपर्यंत वेळ जावा म्हणून त्यांनी टि. व्ही लावला. कालपासुन बातम्या बघितल्या नव्हत्या म्हणून त्यांनी प्रथम न्यूज चॅनेल लावला तो, त्यावर सतत ब्रेकींग न्यूज दाखवत होते. महाडच्या सावित्री नदीवरील पूल पुराच्या पाण्याच्या लोंढ्याने वाहून गेला. त्यामध्ये अनेक वाहने वाहून गेल्याची भीती व्यक्त करण्यांत येत होती.
ते ऐकल्यावर आर्याने धीरच सोडला. कारण तिच्या आई बाबांचा रात्री अकरा वाजता चिपळुणला असल्याचा फोन होता. त्यानंतर त्यांचा संपर्क झालाच नव्हता. पुल वाहून गेल्याची वेळ आणि त्यांची महाडच्या आसपास असण्याची वेळ एकच असल्याचे त्यांच्या लक्षांत आले. दरम्यान राजापुर डेपोची आणि रत्नागिरी डेपोची अशा दोन बस बेपत्ता असल्याचे सांगण्यात येत होते. मग मात्र अनिकेत, अशोकराव, अनिकेतची आई यासर्वांनी आपल्या मोबाईलवरुन त्यांच्याशी संपर्क करायचा प्रयत्न करायला सुरवात केली. एकुणच सर्व हकीगत समजताच अंजर्लेकर गुरुजींच्या मुलानेही आपले कॉन्टॅक्ट वापरुन बातमी काढायचा प्रयत्न करायला सुरवात केली. त्याने चिपळुण येथिल आपल्या मित्राला एस्. टी. स्टँडवर जाऊन खात्रीची बातमी द्यायला सांगितले.
मधल्या काळात माधवलाही फोन लावायचा प्रयत्न करत होते पण तो सारखा एंगेज लागत होता. थोड्याच वेळात चिपळुणहून गुरुजींच्या मुलाला त्याच्या मित्राचा फोन आला. त्याने बातमी सांगितली ती अशी होती. रात्री अकरा वाजता चिपळुणच्या कँटीनमध्ये मुंबईकडे जाणा-या तिन बसेस उभ्या होत्या पैकी जयगड मुंबई आणि राजापुर बोरीवली बस एकदम निघुन गेल्या, मात्र राजापुर मुंबई बस थोड्या उशिराने चिपळुणहून निघाली. पैकी राजापुर बोरीवली आणि जयगड मुंबई बस मिसींग असल्याचे समजते. या सर्वच गाड्यांना महाड थांबा नाही त्यामुळे पेणच्या रामवाडी स्थानकावर चौकशी करायला लागेल.
ती बातमी ऐकुन आर्या म्हणाली, आई बाबाची राजापुर बोरीवली बस चुकली होती. ते राजापुर मुंबई बसमध्येच असतिल. त्या गाडीची बातमी काढायला पाहीजे. त्या गाडीची बातमी कशी काढायची या विचारात ते सर्वजण बसले.
********
देवी हंसोळ येथे भक्तनिवासमध्ये मॅनेजर जोशी देखिल टी. व्ही.वर बातम्या बघत बसले होते. तेही पाटणकर दांपत्य सुखरुप असेल नां किंवा कसे या विचारात बसले होते. तेवढ्यांत त्याच्या मोबाईलची रींग वाजली. बघतात तर चव्हाण ड्रायव्हर यांचा फोन होता. मोठ्या उत्सुकतेने त्यांनी फोन घेतला.
फोनवर हॅलो करताच, चव्हाणांचा एकदम उत्तेजीत झालेला आवाज ऐकु येत होता. ते म्हणाले अहो जोशी तुम्हाला लाख लाख धन्यवाद. त्यावर जोशींनी विचारले मी अस काय केले म्हणून तुम्ही सकाळी सकाळी मला धन्यवाद देत आहात.
अहो! तुमच्यामुळेच आज माझ्यासह माझ्या गाडीतल्या एकोणीसजणांचे प्राण वाचले आहेत! चव्हाण म्हणाले.
ते कसे कायमी काय केले! जोशींनी विचारले.
अहो तुमच्याच सांगण्यावरुन मी तुमचे पाव्हणे पाटणकर जोडप्याला देवी हंसोळहून राजापुरला आणले. पुढे मी तिकडुन आणलेली बसच कंट्रोलरनी मुंबईकरीता लावली. आणि आम्हा दोघांची जोडीच मुंबईला पाठवली. नंतर त्यांनी सविस्तर हकिगत सांगितली. शेवटी ते म्हणाले, अहो शेवटच्या क्षणी जेव्हा त्या तुटलेल्या पुलाच्या आधी जर पाटणकर जागे नसते तर मी त्या गाडी अडवणा-या माणसाला भूत समजुन त्याच स्पीडमध्ये पुढे न्यायचा विचार करत होतो.
मग यात माझे क्रेडीट काहीच नाही. देवीचा आशिर्वादाचे कवच तुमच्या पाठीशी होते म्हणूनच देवीने ही लिला केली आहे. नाहीतर सौ पाटणकर  रुमाल विसरल्याच नसत्या. त्या रुमालाच्या रुपाने आई आर्यादुर्गेने आपले कवचच तुमच्या बरोबर दिले होते. तेव्हा तुम्ही राजापुरला आलात की सगळी कामे सोडुन आधी देवीच्या दर्शनाला या आणि माझ्या ऐवजी तिचे मनापासुन आभार माना.
**************
आता नऊ वाजुन गेले होते. आई बाबांचा पत्ता लागत नाही म्हणून आर्याचे डोळे रडुन रडुन लाल झाले होते. अशोकराव आणि अनघाताई तिला समजवायचा प्रयत्न करीत होते. ते बाहेरुन दाखवत नसले तरी त्यांचाही जीव वरखाली होत होता. सोय-यांचा फोनही लागत नव्हता. त्यांचा नाही तर नाही माधवचाही फोन लागत नव्हता. तेवढ्यात अशोकरावांचा फोन वाजायला लागला. बघतायत तो देवी हंसोळच्या जोशींचा फोन होता. तो फोन नंबर बघुनतर त्यांना धसकाच बसला, आता काय बातमी ऐकायला मिळते या चिंतेत त्यांनी आर्यादुर्गेचे स्मरण करुन फोन उचलला.
पलिकडुन जोशींचा आवाज एकदम उत्साहाने भरलेला ऐकायला येत होता. त्यावरुन त्यांनी बातमी चांगली आहे असा अंदाज बांधला. पलिकडुन जोशी म्हणत होते, तुम्ही चिंतेत आहात असा तुमचा आवाज सांगतोय. तेव्हा मी सांगतो ते ऐका तुमचे सोयरे अगदी सुखरुप आहेत. आताच मला चव्हाण ड्रायव्हर यांचा फोन आला होता. त्यांनी तुमच्या सोय-यांना पनवेलला पुण्याच्या बसमध्ये बसवुन दिले आहे. आतापर्यंत ते जागेवर पोचले असतिल. त्यांच्या फोनची बॅटरी संपल्याने ती चार्ज केल्याशिवाय त्यांचा फोन लागणार नाही. असे म्हणून त्यांनी देवीने सर्वांचे कसे रक्षण केले, ती चव्हाणांनी सांगितलेली सर्व हकीगत त्यांना सांगितली.
त्यावर अरुणरावांनी जोशींचे योग्यवेळी फोन करुन चिंतामुक्त केल्या बद्दल मनापासुन आभार मानत फोन ठेवला आणि हॉलमध्ये बसलेल्या सर्वांना सविस्तर हकिगत सांगितली. त्यावर नुकतेच ही बातमी समजली म्हणून घरी आलेले अंजर्लेकर गुरुजी म्हणाले, देवीचे कवच पाठीशी होते म्हणूनच हे सर्व शक्य झाले! नाहीतर आज काळ आलेला होताच, पण देवीने आपल्या शक्तीने त्याला पार दूर पळवुन लावला! हे नक्कीच!
तेवढ्यात आर्याचा फोन वाजायला लागला, त्यावर आईचा नंबर बघताच आर्या एकदम खूष झाली. तिने फोन उचलताच, अग आई कुठे आहेस तू इथे टि. व्हीवर निरनिराळ्या बातम्या ऐकुन आमच्या जीवाचे काय झाले असेल याची काही कल्पना ? बॅटरी संपलीतर दुस-या कोणाच्या फोनवरुन फोन करायचा नां!
अगं हो! हो! मला समजतेय तुझी काय अवस्था झाली असेल तीपण इथे काय झालेय माहीत आहे का? आताच माधवी प्रसूत होऊन कन्यारत्न झालेयअग तू आत्या झालीयसइथे उतरल्या उतरल्या हे सर्व झाल्यामुळे आम्हाला फोन चार्ज करायलाच मिळालाच नाही. अजुन आमचे माधवशी रात्रीच्या प्रवासातिल प्रसंगाबद्दल बोलणे देखिल झाले नाही. तरीपण सॉरी, मी कुठुनतरी फोन करायला हवा होता हे अगदी बरोबर. पण आजी झाल्याच्या नादात राहूनच गेले. सगळ्यांनाच मनापासून सॉरी सांग. सगळेचजण काळजीत असतिल. बाकी सर्व आपण प्रत्यक्ष भेटीतच बोलू. सगळ्यांना आम्ही इकडे बोलावले आहे असे सांग. तुझे बाबा तसा फोन करतिलच.
आईशी फोनवर झालेले बोलणे आर्याने सगळ्यांना सांगितले आणि सगळे एकदम खूष झाले. त्यामुळे मगाच पर्यंत काळजीने भरलेले वातावरण एकदम बदलुन गेले.
सगळ्या गोष्टी सुरळीत झालेल्या बघुन अंजर्लेकर गुरुजींनी सर्वांचा निरोप घेतला. त्यांनी सांगितले मला आता निघायला हवे. आज पहिला श्रावणी सोमवार असल्याने देवळात बरीच कामे आहेत. त्यामुळे मला यायला उशिर होईल. तरीही तुम्ही सर्वांनी आता इथुन जेऊनच जा. ज्याला कोणाला सोमवारचा उपवास असेल त्यांचीही सोय होईल. तेव्हा अनमान करु नका.
डेक्कन जिमखान्यावरील पाटणकरांच्या फ्लॅटमध्ये आज एकदम उत्साहाचे वातावरण होते. सनईचे मंद सूर वातावरणांत भरुन राहिले होते. सगळीकडे लगबग जाणवत होती. हॉलमध्ये फुलांनी सजवलेला पाळणा ठेवला होता. आजुबाजुला बारश्याची परंपरागत तयारी केलेली दिसत होती. पाटणकर आणि फणसळकरांच्या दोन्ही परिवारातले सर्व सदस्य आज येथे उपस्थित होते. समारंभ अगदी घरगुती स्वरुपाचा ठेवलेला होता. फक्त फणसळकर आणि माधवच्या सासुरवाडीच्या लोकांनाच कार्यक्रमाला बोलावले होते.
मुलीला पाळण्यात घालायचा मुहूर्त होताच हजर असलेल्या पांच सुवासिनींच्या हस्ते तिला पाळण्यांत घालण्यांत आले. मुलीचे नांव आजीच्या खास आग्रहास्तव दुर्गा ठेवण्यांत आले. दुर्गाच्या अंगावर घालण्यासाठी मोहिनीताईंनी म्हणजेच तिच्या आजीने खास दुलई तयार करुन घेतली होती. ती दुलई त्या प्रसिद्ध आर्यादुर्गचा प्रसाद म्हणून आणलेल्या छोट्या साडीपासुन बनवीली होती. ती तीच साडी होती. जिचा फोटो घराघरांत सगळ्यांना माहित झाला होता.
दुर्गाच्या जन्माच्या आधी झालेल्या सावित्री नदी दुर्घटनेतुन आश्चर्यकारकरीत्या बचावलेल्या पाटणकर दांपत्याचा शोध घेत घेत सगळे चॅनेलवाले पुण्याला त्यांच्या घरी पोचले होते. त्यापूर्वी म्हणजे पुलाची दुर्घटना झाली, त्याचा सविस्तर  रिपोर्ट महाड पोलीसांना दिल्यानंतर चव्हाण बस घेऊन मुंबई सेंट्रल बस स्थानकावर पोचले. तेव्हा चॅनेलच्या सर्व पत्रकारांची फौज त्यांची वाटच बघत कॅमे-यांसह हजर होती. तेव्हा चव्हाणांनी चॅनेलवाल्यांना देवी हंसोळहून निघाल्या पासुनची सर्व हकिगत सविस्तर स्वरुपांत सांगितली होती.
त्यानंतर न्यूज चॅनेल, प्रिंटमिडीयाच्या पत्रकारांनी पाटणकर दांपत्याला गाठले होते आणि देवी कवच या विषयावर वर्तमानपत्रामध्ये कव्हर स्टोरी छापली होती. त्यात आर्यादुर्गा मंदिरापासुन ते अगदी त्यांच्या जवळ असलेल्या प्रसादाच्या साडी पर्यंत सर्व बाबी फोटोसह छापल्या होत्या. तर चॅनेलवर स्पेशल स्टोरी सगळ्या व्हीडीओ सह वारंवार दाखविली होती.
सगळ्यांचे दुर्गाला औक्षण करुन झाल्यावर मोहिनीताई उठल्या आणि आपल्या जवळची ती खास दुलई दुर्गाच्या अंगावर पांघरत म्हणाल्या आई आर्यादुर्गेने आमचे जसे आलेल्या अरिष्टापासुन रक्षण केले, तसेच या तिच्या कवचाने माझ्या नातीचेही सर्वप्रकारच्या अरिष्टापासुन कायम रक्षण करो ही तिच्या चरणी प्रार्थना. त्यावर उपस्थित असलेल्या सगळ्यांनी तथाSSस्तु तथाSSस्तु  म्हणून त्याला अनुमोदन दिले.





**********

दुर्गा कवच भाग ३

 दुर्गा कवच

भाग ३

पाटणकर दांपत्य राजापुर बस स्थानकावर पोचले तेव्हा नुकतीच राजापुर बोरीवली बस सुटुन गेली होती. त्यांनी कंट्रोलरकडे कोल्हापुरला जाण्याकरिता बसची चौकशी केली तेव्हा त्यांनी गेल्या पाच सहा तासात कोल्हापुरहून एकही बस आली नाही, बहुदा कोल्हापुरला जाणारा घाट दरड कोसळुन बंद झाला असावा. नंतर त्यांनी पुण्याला जाण्यासाठी आता कसे जावे असे विचारले असता, आज सगळीकडेच जोरदार पाऊस कोसळत असल्याने कोणत्याही घाटाने जाणे धोकादायकच आहे. त्यातच चिपळुण, खेड, महाड, नागोठणे या गावांत पाणी भरल्याच्या बातम्या येत आहेत. अजुनतरी मुंबई हायवे चालू आहे, आता पांच मिनिटात येथुन मुंबईला जाणारी बस सुटेल तिने जाणार असाल तर पनवेल पर्यंत जा. पुढे पनवेलहून एक्सप्रेस हायवे ने तुम्ही पुण्याला जाऊ शकाल. असा सल्ला कंट्रोलरने दिला.
     पाटणकरांना कंट्रोलरचे म्हणणे पटले व ते दोघेजण राजापुर मुंबई बस मध्ये बसले. योगायोगाने देवी हंसोळहून ते ज्या बसने आले होते तिच बस त्याच ड्रायव्हर कंडक्टर सह मुंबईला जात होती. त्यामुळे त्यांना हायसे वाटले. त्यांना अगदी पुढची म्हणजे ड्रायव्हरच्या मागची सिट मिळाली होती. त्यामुळे रस्त्यावरच्या खड्ड्यांमध्ये गाडी आपटली तरी फारसे धक्के जाणवत नव्हते.
     बसने राजापुर सोडल्यानंतर लगेचच त्यांनी फोन करुन ही गोष्ट अनिकेतला सांगितली. त्याचप्रमाणे त्यानी आपला मुलगा माधवला बाकी सगळे मार्ग बंद आहेत म्हणून आम्ही राजापुरहून पनवेलकडे निघालो आहोत. एक्सप्रेस हायवे ने उद्या आठ वाजे पर्यंत पोचू असे फोन करुन सांगितले.
     राजापुर सोडल्यापासुन पावसाची संततधार चालू होती. रस्त्याच्या दुतर्फा पाण्याचे लोटच्या लोट वहाताना दिसत होते. बघता बघता गाडीने संगमेश्वर गाठले. संगमेश्वरला सर्वत्र पाणीच पाणी झालेले दिसत होते. पुलाच्या काठोकाठ पाणी होते. सगळीकडे काळोखमिट्ट होता. पावसामुळे हवेत गारठा आला होता. म्हणून सौ पाटणकरांनी देवीच्या देवळात घेतलेली ती छोटी साडी बाहेर काढली आणि ती रुमालासारखी डोक्याला बांधली. त्यामुळे त्यांची थंडी जरा कमी झाली.
     रात्रीचे पावणे अकरा वाजले. बस चिपळुण बस स्थानकात जेवण्यासाठी थांबली. तेव्हा पाटणकर दांपत्यही उतरले. आज बसमध्ये फारशी गर्दी नव्हती. राजापुरमधुन आठ जण बसले. त्यानंतर वैभववाडीला तिघेजण चढले होते. शेवटी संगमेश्वरला दोन जोडपी चढली होती. त्यापैकी बरीच लोक पनवेललाच उतरणार होती. कंडक्टरने नेहमीप्रमाणे गाडी जेवणासाठी वीस मिनिटे थांबेल अशी घोषणा केली. चिपळुण स्थानकातही सर्वत्र पाणीच पाणी झालेले होते.
     चिपळुणचे एस्. टि. कँटीन त्यामानाने स्वच्छ होते. पाटणकरांनी सौंना विचारले काय मागवुयात्यावर त्यांनी मला फारशी भूक नाही मी फक्त कॉफी आणि बिस्कीटे घेईन. तुम्ही पाहीजे तर जेवा नाहीतर काहीतरी खायला मागवां. त्यावर पाटणकर म्हणाले मीही कॉफीच घेईन. कँटीनमध्ये जरा गर्दी जाणवत होती. एकदम पांच सहा गाड्यांचे पॅसेंजर जमा झालेले दिसत होते.
     वेटर ऑर्डर घ्यायला आल्यावर त्यांनी त्याला कॉफी आणि गुड डे बिस्कीटपुडा आणायला सांगितला. त्यांनी सहजच वेटरला विचारले आज इथे खूप गर्दी वाटते आहे. त्यावर त्याने हो राजापुर-बोरीवली, जयगड-मुंबई, दोन मुंबईहून आलेल्या बस आणि राजापुर-मुंबई एवढ्या बस एकदम आल्याने गर्दी दिसत आहे असे सांगितले. कॉफी येईपर्यंत मी आर्याला फोन करते असे सौ. मोहीनीनी पाटणकरांना सांगितले. त्यावर कशाला उगाच एवढ्या रात्री फोन करतेस ती झोपली असेलअसे ते म्हणाले. परंतु एवढ्यात काही ती झोपत नाही, म्हणून मोहिनी यांनी तिला फोन केलाच. फार काही न बोलता, आम्ही चिपळुण पर्यंत पोचलो आहोत. आता आमच्या दोघांच्याही फोनच्या बॅट-या संपत आल्या आहेत तेव्हा परत फोन करायला जमेलच असे नाही. असे त्यांनी आर्याला सांगितले. तिनेही इकडेपण खूपच पाऊस पडतच आहे. तरीही आम्ही पहाटे साडेपांच पर्यंत गुहागरला जायला निघणार आहोत. त्यातच इकडे वीजही गेलेली आहे, त्यामुळे आमचेही फोन कितपत टिकतात ते बघुया.
            फोना फोनीच्या गडबडीत त्यांचा खूप वेळ गेला. त्यामुळे कँटीनमधील सर्वजण गाडीमध्ये निघुन गेले. गाडीमध्ये कंडक्टर सारखा बेल वाजवु लागला होता म्हणून ती दोघे गडबडीने गाडीकडे गेली. गाडीत बसल्यावर मोहीनीच्या लक्षांत आले आपला डोक्याला बांधायचा रुमाल कॅंटीन मध्येच राहीला. म्हणून त्यांनी चव्हाण ड्रायव्हरना विनंती केली, माझा देवीचा प्रसाद म्हणून घेतलेला रुमाल कॅंटीनमध्ये राहीला आहे, प्लीज तेवढा मी तो घेऊन येते. त्यावर त्यांनी झटकन या! आधीच खूप उशीर झाला आहे. आपल्या नंतर आलेल्या बसदेखिल पुढे निघुन गेल्या आहेत.
     त्यावर हो ही आलेच! असे म्हणून त्या झटकन कँटीन मध्ये गेल्या. तिथे त्यांना तो रुमाल दिसेना. म्हणून त्यांनी त्यांना सर्व्ह करणा-या वेटरला शोधुन काढले. त्याने तो रुमाल उचलुन ठेवला होता. तो काढुन दिला. या गडबडीत बसला मात्र चांगला वीस मिनीटे लेट झाला. 
*******
            चिपळुणहून सुटल्यावर कंट्रोल पॉईंटवर नोंद करण्यापुरतीच बस घाटात थांबली होती. बसमधले कंडक्टर आणि पाटणकर दोघे वगळता गाढ झोपले होते.  पोलादपुरला बस पोचली तेव्हा सव्वा बारा वाजले होते. तिथे फक्त एक  मिनिटच बस थांबली आणि भरधाव वेगाने निघाली. पहाता पहाता आठ दहा किलोमिटर अंतर मागे गेले आणि अचानक रस्त्याच्या मधोमध एक माणूस वेड्यासारखा दोन्ही हात हलवत उभा होता. हे लांबुनच चव्हाणांनी पाहिले ते बघुन त्यांनी गाडीचा स्पीड एकदम कमी केला आणि त्यांनी पाठीमागे जागे असलेल्या पाटणकरांना विचारले, पाटणकर साहेब मी बघतोय तेच तुम्ही बघताय नां?
            हो! हो!! चव्हाण, तो माणूसच आहे, काहीतरी अँक्सीडेंट झालेला दिसतोय. तुम्ही गाडी थांबवापाटणकरांचा आणि चव्हाणांचा हो संवाद ऐकुन अर्धवट झोपेत असलेले पवार कंडक्टर चांगले जागे झाले.
     गाडी अचानक थांबताच गाडीतले सगळेचजण जागे झाले आणि खाली उतरले. खाली उतरल्यावर बघतात तो एक माणूस हाफ चड्डीतच रस्त्यांत उभा होता. चेह-यावरुन खूप घाबरलेला दिसत होता. पाटणकरांनी आधी त्याला आपल्या जवळच्या बाटलीतुन पाणी प्यायला दिले. तो जरा नॉर्मल होताच त्याला काय झाले असे चव्हाणांनी विचारले. त्यावर त्याने हातातल्या बॅटरीने समोरचा रस्ता दाखवला. तो बघताच चव्हाण अक्षरशत्याच्या पाया पडले. तेव्हा बाकी सगळेजण हा काय प्रकार आहे ते विचारायला लागले. तेव्हा चव्हाण गाडीत गेले आणि त्यांनी गाडीचे हेड लाईट लावले.
     गाडीच्या हेडलाईटच्या प्रकाशात समोर पहातात तो काय? रस्त्यातल्या पुलाचा मोठ्ठा भागच गायब झालेला होता. ते दृष्य बघताच सगळ्यांच्याच काळजाचे पाणी पाणी झाले. त्यानंतर मग त्यांनी त्या रस्त्याच्या मधोमध आपल्या जीवाची पर्वा न करता बसला थांबवणा-या त्या देवदूताची चौकशी करायला सुरवात केली. तेव्हा त्याने आपण काय बघितले ते सांगितले.
     तो म्हणाला पुलाच्या पलिकडे जे गॅरेज दिसत आहे तिथे मी काम करतो. अकरा वाजे पर्यंत आम्ही काम करित होतो. त्यानंतर बाकी सगळे आपापल्या घरी गेले. मी रात्री गॅरेजमध्येच झोपतो. झोप येईपर्यंत खिडकीत बसुन मी मोबाईलवर गाणी ऐकत होतो. खिडकीतुन हायवेवरील जाणा-या येणा-या गाड्यांचे हेडलाईट मला दिसत होते. पण बघता बघता माझ्या लक्षांत आले, अरे! मुंबईकडे जाणा-या गाड्यांचे हेडलाईटस् अचानक गायब होत आहेत.
पहिल्यांदा मला हा भास वाटला. पण नंतर मला काहितरी गडवबड आहे हे लक्षांत आले. कोणाला मदतिला बोलावायला कोणीच नव्हते. शेवटी मी मनाची तयारी केली, गॅरेजमधली बॅटरी घेतली आणि या गोव्याच्या दिशेने जाणा-या नव्या पुलावरुन पलिकडे गेलो. बघतो तो जुन्या पुलाचा मधला मोठा भागच गायब झालेला होता. तेव्हा मला गाड्यांचे हेडलाईट का गायब होते ते लक्षांत आले. आतापर्यंत ब-याच गाड्या वाहुन गेल्या असाव्यात. म्हणून मग मी मनाशी ठरवले आपण आता रस्त्याच्या मधोमध उभे राहुन येणारी गाडी थांबवायची. आणखी कोणतीही गाडी वाहुन जाऊ द्यायची नाही. तेवढ्यांत तुमची गाडी आली.  तुम्ही भूत बित समजुन सरळ गाडी पुढे आणलित नाही म्हणून नशिब! नाहितर तुमच्याबरोबर मी सुद्धा नदीत गेलो असतो.
अरे बाबा! तू खरचं देवदूत म्हणून पुढे आलास! नाहीतर आज आम्ही देखिल नदीच्या प्रवाहात कुठे असतो कोण जाणेचव्हाण म्हणाले. माझी गाडी अगदी शंभरच्या स्पीडने धावत होती. तुम्हाला पाहिले तेव्हा मला क्षणभर भूतच आहे असे वाटले. परंतु हे पाटणकर काका जागे होते म्हणून मी स्पीड कमी करुन गाडी थांबवली.
बरं ते असु दे! आमच्या गाडीत फायबरचे दोन रेडीयम इंडीकेटर आहेत आपण ते रस्त्यात मधोमध दगडांच्या सहाय्याने लाऊन ठेवु. रात्रीच्या वेळी रस्त्याच्या मधोमध उभे राहुन वाहन थांबवणे धोक्याचे आहे. ही फार मोठी घटना आहे, त्यामुळे याची खबर पोलीसांना आणि बाकी सर्व सरकारी खात्यांना द्यायला हवी. तेव्हा आम्हाला जायला हवे. आम्ही महाडहून तातडीने इकडे मदत पाठवतो. तिथुन मदतीला येणा-या माणसांची गाडी येईपर्यंत आम्ही महाड सोडणार नाही. तुझ्या मदतिला कोणाला थांबवु कायपण तू ही आता गॅरेजवर जाऊन आराम कर. आपण आता हा रस्ता अडथळा लाऊन पूर्ण बंद करु.
गाडीतल्या प्रवाशांच्या मदतीने चव्हाणांनी गॅरेज मधुन गाडीच्या मोडक्या सिट आणल्या त्या, आजुबाजुचे मोठे दगड आणि त्यांच्या गाडीतल्या इंडीकेटरच्या सहाय्याने मुंबईच्या दिशेने जाणारा रस्ता पूर्ण बंद केला. नंतर सिद्धुला गॅरेजमध्ये सोडुन ते महाडला निघुन गेले. एवढे सर्व होऊन त्यांना महाडच्या एस्. टी स्टँडवर पोचायला त्यांना पाऊण वाजला होता.
महाडच्या स्थानकावर सर्वत्र काळोखाचे साम्राज्य दिसत होते. महाडच्या स्टँडवर ड्युटीवर असलेल्या ट्रॅफिक कंट्रोलरला ही सर्व घटना सांगताच त्याने पोलीस स्टेशनला फोन लाऊन घटनेची माहिती दिली. पोलीस स्टेशनमधील पोलीसांनी ताबडतोब ही घटना जिल्ह्याच्या पोलीस कंट्रोल रुमला कळवली आणि त्यांची गाडी पुलाकडे जाण्यासाठी निघाली. जाता जाता ते एस्. टी. स्टँडवर सविस्तर चौकशी करिता आले. चव्हाण आणि पाटणकर यांच्याकडे चौकशी करुन त्यांची गाडी त्वरीत घटना स्थळी रवाना झाली. त्यांच्यापैकी एकजण सविस्तर वर्दी लिहून घेण्यासाठी थांबला.
दरम्यानच्या काळांत सर्वजण सावरले होते. महाडच्या कंट्रोलरने समोरच असलेल्या रस्त्यावरच्या चहाच्या टपरीवरुन सर्वांकरिता चहा मागवला. त्यामुळे सर्वप्रवासी बसलेल्या धक्यामधुन थोडे भानावर आले. ते सर्वजण सौ पाटणकरांचे आभार मानायला लागले. त्यावर मोहीनीताईंनी माझे आभार कशाबद्दल असे विचारताच, सर्वजण त्यांना तुम्ही जर चिपळुणला कँटीनमध्ये राहिलेला रुमाल आणायचा आग्रह धरला नसतात, तर आज आपण सर्वजण नदीत पाण्याखाली असतो असे म्हणाले.
त्यावर त्यांनी जे वक्तव्य केले ते फार महत्वाचे होते. त्या म्हणाल्या, अहो तो नुसता साधा रुमाल असता तर मी परत कँटीनमध्ये गेलेच नसते. पण तो मी कालच श्री आर्यादुर्गादेवीचा प्रसाद म्हणून घेतलेला होता. तो रुमाल तिथे विसरण्यामागे तिचाच काहितरी सुप्त हेतू असला पाहिजे. नाहितर मी सहसा माझा डोक्याला बांधायचा रुमाल काढुन न ठेवता गळ्यांत अडकवुन ठेवते. मला वाटते तो रुमाल हे जणू आपल्या सर्वांकरिता देवीने दिलेले कवचच होते.
मोहिनी पाटणकरांचे हे बोलणे चव्हाण ड्रायव्हरसह सर्वांनाच पटले. मग सर्वांनीच श्री व सौ पाटणकरांचे त्या रुमालासह आपापल्या मोबाईलवर फोटो काढुन घेतले. काहींनी त्या रुमालरुपी देवी कवचाचे हात जोडून आणि तो मस्तकी लाऊन दर्शन घेतले. त्यांचे हे बोलणे पोलींसाचा तिथे थांबलेला माणूस लक्षपूर्वक ऐकत होता. मग त्यानेही त्या देवी कवचाचे हात जोडून दर्शन घेतले. त्यानतर त्याने बसमधले प्रवासीड्रायव्हरकंडक्टर यांच्याशी बोलुन सविस्तर रिपोर्ट तयार केला त्यावर त्या सर्वांच्या सह्या घेतल्या.
सर्व सोफस्कार झाल्यावर ती बस मार्गस्त झाली. आता एवढ्या रात्री कोणाला काही कळवायला नको म्हणून पाटणकरांनी कोणालाच फोन केला नाही. त्या दोघांच्या फोनची बॅटरी देखिल संपण्याच्या बेतात होती. यथावकाश त्यांची बस पनवेलला पोचली. चव्हाणांनी स्वत: थांबुन पाटणकर दांपत्याला पुण्याला जाणा-या बसमध्ये बसवुन दिले.
सकाळी आठ वाजता ते दोघे त्यांच्या सूनेला अँडमीट केलेल्या मॅटर्निटी होममध्ये पोचले. ते पोचल्यावर काही मिनीटातच त्यांची सून माधवी प्रसूत होऊन तिने गोंडस कन्यारत्नाला जन्म दिला.

***********

दुर्गा कवच भाग २

दुर्गा कवच

भाग २
आज रविवार देवीचा वार. आज अनिकेत आणि सौ.आर्याच्या हस्ते त्यांच्या विवाहानंतर प्रथमच कुलस्वामिनी आर्यादुर्गेची षोडशोपचारे विधीवत पूजा होणार होती. त्यांच्या लग्नानंतर अनिकेतला लगेचच कंपनीच्या कामासाठी अमेरीकेला जावे लागले होते. त्यामुळे हा कुलाचार लांबणीवर पडला होता. आता त्याला रजा मिळताच सर्वप्रथम त्याने देवी हंसोळला जाण्यासाठी प्लॅनिंग केले होते. ते जाणार म्हटल्यावर त्याचे सासु सासरे आम्हालाही गुहागरला व्याडेश्वराला जायचे आहे असे म्हणून त्यांच्या सोबत आले होते. कारण उद्याच श्रावण महिना सुरु होणार होता. पहिलाच दिवस सोमवार आला होता म्हणून त्यांचा कुलस्वामी व्याडेश्वराला या नव दांपत्याच्या हस्ते  अभिषेक व्हावा ही त्यांचीही इच्छा होती.
      आज आषाढ महिन्यातला शेवटचा दिवस होता. अमावस्या दुपारनंतर संपणार होती. त्यामुळे आज देवीची यथासांग पूजा करुन सर्वजण रात्री येथेच मुक्काम करणार होते. उद्या पहाटे निघुन आठ वाजेपर्यंत गुहागरयेथे व्याडेश्वराला त्यांना जायचे होते. तेथिल अभिषेकाचा कार्यक्रम उरकुन नंतर तेथुनच सर्वजण पुण्याला जाणार होते.
      अनिकेत सकाळी लवकर उठुन आर्यासह मॉर्नींग वॉक आणि साईट सिईंग हा दुहेरी उद्देशाने फिरायला बाहेर पडला होता. त्यांना दोघांना फिरायला जाताना पाहुन जोशींनी त्यांना गुड मॉर्नींग केले. पावसाचे दिवस आहेत तेव्हा सरपटणारे प्राणी फिरत असतात त्यांच्या पासुन सावध राहुन फिरण्याचा आनंद घ्या अशी सूचनाही त्यांनी केली. नंतर ते दोघे फिरत फिरत पांडवांनी खोदलेली विहीर, कातळामध्ये कोरलेले नागयंत्र पाहून आले. आज हवामान पावसाळी होते. कोणत्याही क्षणी मुसळधार पाऊस कोसळायला सुरवात होईल असे वाटत होते.
      थोड्या वेळाने सर्वजण आंघोळी उरकुन खाली भोजनगृहात आले. सर्वांनी चहापान केले आणि मंदिरात दर्शनाला गेले. अनिकेतने आज छान कुसुंबी रंगाचा कद नेसला होता. त्यावर त्याच रंगाचे उत्तरीय घेतले होते. आर्याने त्याच रंगाची पैठणी नेसली होती. दोघांची जोडी अगदी दृष्ट लागावी अशी दिसत होती. नुकतीच देवीची पूजा झालेली होती. सर्वांनी मनोभावे देवीचे दर्शन घेतले. त्यानंतर परिसर देवतांचेही दर्शन घेतले. तिथपर्यंत उपाध्ये गुरुजी आले. गुरुजींनी येताना सर्व तयारी आणलेली होतीच.
      उपाध्ये गुरुजींना आलेले पहाताच अशोकराव पुढे झाले. त्यांनी गुरुजींना ओळखले कां म्हणून विचारले. त्यावर गुरुजींनी आपण अशोक फणसळकरच नां? असे विचारले. एकमेकांचे क्षेम कुशल विचारुन झाल्यावर अशोकरावांनी आपल्या सगळ्या परिवाराची गुरुजींना ओळख करुन दिली. त्यांनी गुरुजींना विचारले, आपले फोनवर बोलणे झाले होते त्याप्रमाणे आज माझ्या मुलाच्या हस्ते देवीला अभिषेक करायचा आहे. आपण सर्व तयारी घेऊन आला आहात नां?
            त्यावर गुरुजींनी हो! हा काय मी तयारीत आलो आहेचला, जवळपास दहा वाजलेच आहेत, आता आपण पूजेला सुरवात करु याम्हणजे अभिषेक, पूजा आरती सगळे अकरा, साडे अकरा  पर्यंत पूर्ण होईल.
      उपाध्ये गुरुजींनी अनिकेत आणि आर्याला मोठ्या माणसांना नमस्कार करुन देवीच्या गाभा-यात यायला सांगितले. त्याप्रमाणे दोघेही वडिलधा-यांच्या आणि उपाध्ये गुरुजींच्या पाया पडुन गाभा-यांत पाटावर जाऊन बसले. बाकी सर्वजण बाहेर सभामंडपात बसले.
      गाभा-यांत देवीच्या पायाजवळ बसुन देवीची पूजा सुरु झाली. उपाध्ये गुरुजी एक एक विधी सांगत होते त्याप्रमाणे अनिकेत ते करत होता. त्यानंतर गुरुजींनी अभिषेकास सुरवात केली. ते श्रीसूक्ताचा पाठ म्हणू लागले. त्यांच्या बरोबर अनिकेतही म्हणू लागला. ते बघुन गुरुजी त्याला म्हणाले तुला जर व्यवस्थित म्हणता येत असेल तर तू एक स्वतंत्र आवर्तन म्हटलेस तरी चालेल. मग त्यांच्या सूचने प्रमाणे त्याने शेवटचे सोळावे आवर्तन संथ स्वरात म्हणायला सुरवात केली.
हरिः ॐ हिरण्यवर्णां हरिणीं सुवर्णरजतस्रजाम् ।
चन्द्रां हिरण्मयीं लक्ष्मीं जातवेदो म आवह ॥
      अशा प्रकारे पूर्ण श्रीसूक्त म्हणून झाल्यावर यथावकाश त्यांची पूजा पूर्ण झाली. त्यांनी सूरतेहून येताना खास देवीसाठी तयार करुन घेतलेली साडी आणली होती. त्या खास साडीने आर्याने देवीची ओटी भरली. नंतर भक्त निवासमधुन आणलेला नैवद्य दाखवला. सर्वांनी मिळुन आरती केली. उपस्थित असलेल्या सर्वांना प्रसाद दिला.
            इकडे देवीवर अभिषेक सुरु झाला आणि आकाशांत आधिपासुनच दाटुन आलेल्या मेघांनी जोरदार बरसात करायला सुरुवात केली. अक्षरशढगफुटी झालेली दिसत होती. पावसाच्या धारा इतक्या जोरदार बरसत होत्या की देवळातुन समोरच असलेले भक्तनिवास दिसत नव्हते. आता थांबेल मग थांबेल असे करताना एक तास झाला तरी पावसाचे थांबायचे चिन्ह दिसत नव्हते.
            दरम्यानच्या काळात आर्याच्या आई सौ. मोहिनी पाटणकर, अनिकेतची आई सौ. अनघा फणसळकर आणि आर्या यांना देवीला नेसवलेल्या साड्यांचा येथे लिलाव होऊन त्यांची विक्री केली जाते असे समजले. तेव्हा त्यांनी भोपी गुरवांकडे चौकशी केली असता त्यांनी अशा साड्या आताही मिळु शकतिल असे सांगितले. तेव्हा त्या तिघींनीही देवीचा प्रसाद म्हणून अशा साड्या खरेदी करायच्या ठरवल्या. मग त्या तिघीही गुरवांच्या बरोबर त्या साड्या बघायला गेल्या. त्या तिघींनीही आपल्या स्वत:करिता तसेच आपल्या परिचयातिल व्यक्तींकरिता मिळुन पंधरा सोळा साड्या खरेदी केल्या. त्यातल्या दोन साड्या लांबीला खूपच लहान होत्या. परंतु त्या प्युअर कॉटनच्या आणि छान डिझाईन असलेल्या होत्या. त्या दोन्ही साड्या सौ पाटणकर आणि सौ फणसळकर यांनी डोक्याला बांधायला रुमाल म्हणून वापरायच्या ठरवल्या आणि आपल्या पर्स मध्ये ठेवुन दिल्या.
      बराच वेळ वाट बघुन पावसाचे थांबण्याचे लक्षण दिसेना असे पाहून शेवटी उपाध्ये गुरुजी, गुरव यांच्या सह सर्वजण भक्त निवासमध्ये भोजनाकरिता गेले. आज भोजनगृहात टेबल खुर्ची ऐवजी पंगत मांडली होती. अनिकेत आणि आर्या सोडून सर्वजण भोजनास बसले. जोशी दांपत्यालाही ते नाही म्हणत होते तरी जेवायला बसायला लावले. त्या सर्वांना अनिकेत आणि आर्या वाढायचे काम करित होते. सर्वांची जेवणे झाल्यावर सवाष्णींची साडीने ओटी भरण्यांत आली. उपाध्ये गुरुजींची योग्य ती पाठवणी करण्यांत आली. त्यानंतर अनिकेत आणि आर्या भोजनास बसले. सर्वांचे भोजन उरकताच सर्वचजण वामकुक्षी करिता गेले.
      दुपारचे चार वाजले तरी पावसाची संततधार चालूच होती. अती पर्जन्य वृष्टीमुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले होते. दरम्यान राजापुरहून भालावली मार्गे पावसकडे जाणारी एस्. टी. बस परत आली होती. पावसाच्या पाण्याने आणि एका ठिकाणी दरड कोसळल्याने रस्ता बंद झाला होता. त्या गाडीचा ड्रायव्हर भक्तनिवासच्या व्यवस्थापक जोशींच्या ओळखीचा होता म्हणून तो भक्तनिवासमध्ये त्यांना भेटायला आला होता. जोशींनी त्याला आणि कंडक्टरला आत बोलावुन चहा बिस्कीटे दिली आणि त्याच्याबरोबर गप्पा मारत बसले होते. बघता बघता एक तास निघुन गेला. दरम्यान त्या बसच्या ड्रायव्हरने डेपो मॅनेजरना फोन करुन काय करु म्हणून विचारले. त्यावर डेपो मॅनेजर साहेबांनी थोडी वाट पाहून रस्ता सुरु होत नसेल तर परत राजापुरला परत या असे  सांगितले.
*******
            पावसाच्या रिपरिपीला कंटाळुन आर्या, तिची आई आणि अनिकेतची आई पॅसेजमध्ये खुर्च्या टाकुन गप्पा मारत बसल्या होत्या. एका रुममध्ये अनिकेत, त्याचे बाबा आणि त्याचे सासरे मुकुंद पाटणकर गप्पा मारत बसले होते. तेवढ्यात मुकुंद पाटणकरांचा फोन वाजला. तो त्यांच्या मुलाचा माधवचा फोन होता. ते फोन घेण्याकरिता थोडे बाजुला गेले. फोन घेऊन परत जागेवर आल्यावर त्यांचा चेहरा चिंतेत दिसु लागला. तेव्हा अनिकेतनी विचारले, काय झाले बाबा, एनी थिंग सिरियस?
            होतसे सिरियसच म्हणायला पाहिजे. कारण आमची सूनबाई माधवीला लेबर पेन्स सुरु झाल्याचे लक्षण दिसते असे माधव म्हणत होता. तिला आता हॉस्पिटल मध्ये अँडमिट करावे लागेल असेही तो म्हणाला होता. त्यामुळे आता आम्हाला निघावे लागेल. पुण्याला जायला या पावसात कसे काय जमेल तेच आता बघावे लागेल.
      त्यावर तुम्ही आर्याच्या आईला सांगुन तयारी करा, मी खाली जाऊन जोशींशी बोलतो. ते काय म्हणतात ते बघुया, असे म्हणून अशोकराव लगेचच गडबडीने खाली निघुन गेले. तेव्हा एस् टी ड्रायव्हर चव्हाणांचे डेपो मॅनेजर बरोबरचे बोलणे चालूच होते.
      अशोकरावांना गडबडीत खाली आलेले पाहून जोशी त्यांना सामोरे गेले आणि काय गडबड आहे म्हणून विचारले. तेव्हा अशोकरावांनी पाटणकरांना तातडीने पुण्याला जावे लागत आहे तेव्हा काय करता येईल असे विचारले. त्यावर जोशींनी आपण याबाबत येथे चव्हाण ड्रायव्हर आहेत त्यांनाच विचारुया असे म्हटले.
            तेव्हढ्यात श्री पाटणकरही खाली आले. मग जोशी, पाटणकर आणि अरुणराव तिघेही चव्हाणांजवळ गेले व त्यांना परिस्थितीची कल्पना दिली. त्यावर ते म्हणाले, मला आत्ताच आमच्या साहेबांनी राजापुरला परत यायला सांगितले आहे. त्यामुळे मी आता ही बस घेऊन लगेचच राजापुरला जातो आहे. तेव्हा तुम्ही याच बस मधुन राजापुरला चला. तिथुन पुढे कोल्हापुर मार्गे पुण्याला जाता येईल. पण तो मार्ग एवढ्या पावसात चालू असेलच असे नाही. तेव्हा त्यामार्गाने नाहीच जमले तर आता राजापुरहून दोन बस सुटतात बोरीवली सहा वाजता आणि मुंबई साडेसहा वाजता दोनपैकी कुठलीतरी बस नक्कीच मिळेल तिने पनवेल पर्यंत जा. तिथुन एक्सप्रेस वेने दोन अडीच तासात पुण्याला जाल. म्हणजे सकाळी सात साडेसात पर्यंत तुम्ही पुण्यात पोचु शकाल.
***********

शनिवार, ८ ऑक्टोबर, २०१६

दुर्गा कवच भाग १

दुर्गा कवच

भाग १
तप्तस्वर्णो ज्वलांगी धृतमहिषशिखां धारयंतीं त्रिशुलम्।
खङंगचर्मो S पि दोर्भि: प्रबलरिपुगणां त्रासयंतीं कटाक्षै:।।
सिंहस्कंधादिरुढां त्रिनयन लसितां सेवितां सिद्धसंङगै:।
आर्यादुर्गाभजेहं भजनपरजन: नंददात्रीं प्रसन्नाम्।।
      अनिकेतने आर्यादुर्गेच्या समोर डोळे मिटुन नतमस्तक होऊन मनातल्या मनांत ध्यान मंत्र म्हणू लागला. अनिकेतच्या बाजुला त्याची पत्नी आर्या देखिल अतिशय भक्तिभावाने देवीसमोर नतमस्तक झाली होती.
नुकतेच त्यांचे देवी हंसोळ येथे आगमन झाले होते. नेहमीच्या प्रथेप्रमाणे प्रथम देवीच्या मंदिरात जाउन देवीचे दर्शन घेण्यासाठी आता ते आले होते. त्यांच्याबरोबर अनिकेतचे आई-बाबा आणि आर्याचे आईबाबा देखिल आले होते. मंदिरामध्ये आता अजिबात गर्दी नव्हती. देवीचे पुजारी तिन्हीसांजा झाल्याने दिवाबत्ती करत होते. ही पांचजणे आणि पुजारी यांच्या व्यतिरिक्त मंदिरात आता कोणीही नव्हते. त्यांचा ड्रायव्हर दिनेश त्त्यांनी आणलेली स्कार्पिओ समोरच असलेल्या भक्तनिवास मध्ये लावित होता. कारण आज ते तेथेच मुक्काम करणार होते.
      अनिकेतने पुजारी काकांना विचारले काका! आपले उपाध्ये गुरुजी आज आले नाहित कां?
      त्यावर पुजारी म्हणाले, नाही ते आले होते पण थोड्यावेळापूर्वीच घरी गेलेत! सकाळी येतिल! काही काम होते कां?
      त्यावर अनिकेतने सांगितले, हो मला उद्या अभिषेक करावयाचा आहे!
      त्यानंतर सर्वजण मंदिरासमोर असलेल्या भक्त निवासमध्ये गेले. तेथिल व्यवस्थापक श्री जोशी यांनी त्यांचे स्वागत केले. आज आषाढ महिन्याची चतुर्दशी होती. उद्याच अमावस्या असल्याने पावसाचा जोर भरपुर होता. आजुबाजुचे डोंगर देखिल दिसेनासे झाले होते. पावसाने पाण्याची जणू चादरच धरली होती. पडणा-या पाण्याचा आवाज इतका मोठ्ठा आवाज येत होता, की आपसातले बोलणे देखिल ऐकु येत नव्हते. व्यवस्थापक जोशी यांनी किचनमधुन गरमागरम वाफाळलेला चहा आणला. त्या चहाकडे पाहून सर्व मंडळी खूष झाली.
            सर्वप्रथम मी आपली सर्वांशी ओळख करुन देतो, अनिकेतचे बाबा श्री अशोक फणसळकर श्री जोशी यांना म्हणाले. मी, अशोक फणसळकर, हा माझा मुलगा अनिकेत आणि ही त्याची पत्नी आर्या. ही माझी पत्नी अनघा, हे आर्याचे बाबा मुकुंद पाटणकर आणि या त्यांच्या पत्नी सौ. मोहीनी पाटणकर. आपली तशी पूर्वीपासुनची ओळख आहेच. आम्ही सध्या सुरत येथे माझ्या मुलाकडे अनिकेत कडेच रहातो. आणि आमचे व्याही त्यांच्या मुलाकडे पुण्याला असतात.
      माझ्या मुलाने अनिकेतने आपल्या भक्तनिवासचे ऑनलाईन बुकींग केलेले आहे. या त्याच्या प्रिंटस. जोशींनी त्या प्रिंटस घेउन त्यांना आलेल्या ई मेल बरोबर पडताळुन पाहिल्या. त्यानंतर त्यांनी आपल्या सर्वांकडे आपली ओळखपत्रे आहेत ना, असे विचारले. त्यावर सर्वांनी होकार देताच त्यांनी अनिकेतकडे त्याचे ओळखपत्र प्रिंट काढण्याकरिता मागितले. ते त्याने देताच त्यांनी लगेचच रिसेप्शन काऊंटरवर असलेल्या फॅक्स मशीन मधुन त्याची प्रिंट काढली. अँडमिशन प्रोसेस पूर्ण करुन झाल्यावर त्यांनी दुस-या मजल्यावरिल खोल्या उघडुन दिल्या. तिथे एकुण तिन रुम होत्या, त्यात तिनही जोडप्यांनी आपापले सामान नेले. त्यानंतर रुममध्येच असणा-या गरमपाण्याच्या सहाय्याने सगळेजण फ्रेश झाले. त्यांच्या ड्रायव्हरची सोय जोशी यांनी तळमजल्यावर लाऊन दिली.
      थोड्यावेळाने अनिकेतचे बाबा आपले आवरुन खाली येऊन श्री जोशी यांच्या बरोबर बोलत बसले. तशी त्यांची पूर्वीपासुनची ओळख होती. अनिकेतचे बाबा गेली अनेक वर्षे आपल्या कुलस्वामीनीला येत होते. देवी हंसोळ येथे आल्यावर ते नेहमी याच भक्त निवास मध्ये मुक्काम करित असत. सुरवातिला हा भक्त निवास अगदी छोटा होता. आता दोन मजली सुसज्ज इमारतिमध्ये त्याचा विस्तार झालेला होता. सोलर सिस्टीम, वाय् फाय्, पार्कींगची सोय, प्रत्येक रुम मध्ये दूरदर्शन संच अशा सर्व सुविधा सध्याच्या भक्त निवासात उपलब्ध होत्या. दुस-या मजल्यावरच्या खोल्या ए. सी केलेल्या होत्या. शुभ कार्याकरिता सुसज्ज हॉल देखिल बांधला होता. ऑनलाईन रुम बुकींगची सुविधाही उपलब्ध करुन दिलेली होती. त्यामुळे अनिकेतने रुमचे बुकींग ऑनलाईनच केलेले होते.
      भक्तनिवासचा एकदम कायापालट झालेला दिसत आहे! अशोकराव जोशींना बोलले.
त्यावर त्यांनी हो! सरकारच्या तिर्थक्षेत्र विकास कार्यक्रमा अंतर्गत निधी मिळाला. शिवाय आर्यादुर्गेच्या भक्तांनीही खूप मोठी मदत केली. आणि देवीने मनात आणल्यावर काय होणार नाही! नाही कां? असे जोशी म्हणाले.
      आजच्या जेवणाच्या मेनू संबधी आधीच फोनवर बोलणे झालेले होते. परंतु उद्याच्या बाबतित काय करायचे? असे जोशींनी विचारल्यावर अनिकेतचे बाबा अशोकरावांनी आपली योजना काय आहे ते सांगितले. ते म्हणाले, आम्हाला उद्या देवीला अभिषेक करायचा आहे. अनिकेतचे हल्लीच मे महीन्यात लग्न झाले आहे. तेव्हा त्याच्या हस्ते कुलस्वामिनीला अभिषेक करायचा आहे. तसा उपाध्ये गुरुजींना फोन झालेला आहेच.
      हो, दुपारी मला उपाध्ये गुरुजी तसे बोलले होते! जोशी म्हणाले.
      उद्या देवीला पुरणावरणाचा नैवेद्य दाखवायचा आहे त्याची सोय आपल्याकडे होईल काय? अशोरावांनी विचारले. त्यावर अगदी पुरणपोळी शक्य होणार नाही. पण नैवद्या पुरत्या पांच पुरणपोळ्या करु. सगळ्यांना जेवायला मात्र पुरणपोळी शक्य होणार नाही. कारण माझ्याकडे माणूसबळ नाही. असे जोशी म्हणाले.
      ठिक आहे! पण उद्या जेवायला उपाध्ये गुरुजी, देवीचे भोपी गुरव आणि कुवारी सवाशिण, त्याचप्रमाणे दांपत्यही  सांगायचे आहे. असे अशोकराव बोलताच त्यावर जोशी म्हणाले अहो, उद्या रविवार आहे त्यामुळे शाळेला सुट्टी आहे. तेव्हा माझी मुलगी तुम्हाला कुवार सवाष्ण मिळु शकते आणि दांपत्य भोजनासाठी तुमच्या बरोबर आलेले तुमचे सोयरे आहेतच. नाहीतर आम्हीही आहोतच. त्यामुळे ते सर्व होऊन जाईल. अशाप्रकारे त्यांची बोलणी चालू होती तोच जोशी वहिनींनी जेवण तयार असल्याची वर्दी दिली. तेव्हा अशोकरावांनी मोबाईलवरुन अनिकेतला निरोप दिला व सगळ्यांना खाली भोजनगृहात येण्यास सांगितले.
      भक्त निवासाच्या आधुनिकीकरणा बरोबरच मोठ्ठे भोजनगृह आणि सर्व सोयींनी युक्त आधुनिक स्वयंपाकगृह देखिल बांधण्यात आले होते. सोलर सिस्टीमचा जास्तित जास्त वापर करण्यावर भर दिला होता. भक्त निवासच्या गच्चीवर सोलर पॅनेल बसवण्यांत आली होती. त्याच प्रमाणे भक्त निवासाच्या कंपाऊंड मध्येच मोठी पवन चक्कीही बसवण्यात आली होती. त्यामुळे पवन उर्जा अधिक सौर उर्जा असा हायब्रीड उर्जास्त्रोत येथे निर्माण केला होता.
      भोजनगृहामध्ये जेवायला बसण्यासाठी टेबल खुर्च्यांची सोय केलेली होती. जेवण वाढण्याऐवजी ओट्यावर तयार झालेल्या स्वयंपाकाची भांडी मांडुन ठेवली होती. प्रत्येकाने आपल्या रुची प्रमाणे आणि आवश्यक तेवढे स्वत:च्या हाताने वाढुन घ्यायचे आणि टेबल खुर्चीवर बसुन जेवायचे अशी व्यवस्था तेथे केलेली होती. जोशी स्वत: तिथे हजर राहुन सर्व व्यवस्थेवर नजर ठेवत होते. अशाप्रकारे सर्वजण साधेच पण स्वादीष्ट जेवण जेऊन आणि त्याबद्दल जोशींना धन्यवाद देऊन सगळेजण विश्रांती करीता आपापल्या रुममध्ये गेले.
क्रमश: ..............




*************