सोमवार, २५ जून, २०१८

ब्रह्मणस्पती विनायक भाग २

                   ब्रह्मणस्पती विनायक
                               लेखक अनिल वाकणकर,
श्रीवर्धन, रायगड

सकाळचे सहा वाजले होते. रेडीओवर सकाळचा भक्ती संगिताचा कार्यक्रम लागलेला होता. लता मंगेशकर यांच्या सुमधुर आवाजात गजानना श्री गणराया, आधी वंदू तुज मोरया हे गणेशाला वंदन करणारे गीत लागले होते. अजुन सुर्योदय झाला नव्हता. आता कोणत्याही क्षणी सुर्योदय होईल आणि पूर्व दिशेला लाल रंगाची उधळण होईल असे वातावरण होते. हवेत हलकासा गारवा होता. लतादिदिंच्या भावमधुर आवाजाने वातावरण भक्तीमय झाले होते.
     रोज पहाटे पांचाच्या ठोक्याला उठणारे थोरात गुरुजी आज जरा उशिरा उठले होते. रात्री अंगात थोडी कण कण असल्याने जाग आली तरी अंथरुणात पडुन राहिले होते. परंतु रेडिओवरच्या लता दिदिंच्या  गजानना श्री गणराया, आधी वंदू तुज मोरया या गाण्याने त्यांची मरगळ कुठल्या कुठे पळुन गेली. थोरात गुरुजी पक्के गणेश भक्त आहेत. दर संकष्टी चतुर्थीला ते उपवास करतात. नित्यनेमाने रोज आंघोळ झाल्यावर ते गणपति अथर्वशिर्ष म्हणतात. आजच्या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी प्रभात समयाला गणेश वंदना ऐकुन त्यांचे मन प्रसन्न झाले. लगेचच अंथरुण सोडून ते आपल्या दैनंदिन व्यवहाराला लागले.
     ते अंथरुणातुन उठतात नाही तोच त्यांच्याकडे भांडी  घासायला येणारी सगुणा मोठ्या मोठ्याने गुरुजींना हाक मारत त्यांच्या घराकडे आली. अहो गुरुजी! तुम्हाला समजला काय, परांजप्यांच्या वावरात म्हणं गणपति बाप्पा गावलाय!”
            काय सांगतेस काय सगुणे! अगो आज पौष महिन्यातली संकष्टी चतुर्थी आहे आणि साधी नाही अंगारीका संकष्टी आहे आज! काय समजलीस! ! आज गणपति सापडणे म्हणजे फार चांगला योगायोग आहे. पण काय गं सगुणे तुला ही बातमी कोणी दिली? तू स्वत: पाहिलेस काय! थोरात गुरुजी एकदम उत्साहीत सुरात म्हणाले.
     नाय वो गुरुजी! आमचं मालकच परांजप्यांच्या वावरात कामाला हैती! गेले आठ दहा दिवस त्यांच्याच वावरात काम चालू हायं बघा. नानांचा ल्येक दापोलीस्न आलाय तो बाव पाडतोय म्हणं! सगुणेने उत्तर दिले.
     बरं! बरं! मीच बघतो तिकडे जाऊन काय प्रकार आहे तो. असे म्हणून गुरुजींनी आपले आन्हीक पटापट आवरायला सुरवात केली. तसे ही आज शाळेत जाणे होणार नव्हतेच. कारण दर संकष्टीला त्यांची शाळा सकाळची असते. त्यांना ताप आल्याने आज त्यांनी सुट्टीच घेतली होती.

*******
नाना परांजपे हे भोस्ते गावातिल एक शांत आणि समंजस व्यक्ती आहेत. त्यांची आर्थिक परिस्थिती तशी बेताचीच आहे. परंतु ते खाऊन पिऊन सुखी आहेत. रोजच्या वरणभाताला तोटा नाही. हां, रोकड, नसेल फारशी. परंतु खलाटीला पोटापुरते भात पिकणारी शेती आहे. त्यातुन खंडिभर भात पिकते. जोडीला जवळच्या चार गावांचे पौराहित्य ते करतात. कोणाचा सत्यनारायण, कोणाची घरभरणी, कोणाचे लग्न, तर कुठे बारसे कधी बारावा देखिल ते करतात. त्यातुन फारशी कमाई होते असे नाही. कारण ते हे काम सेवा म्हणून करतात. कोण काय देईल ते न बघता खिशात टाकतात. मिळालेला शिधा, फळे त्यांच्या घरापर्यंत कधीच येत नाहीत. वाटेत भेटणाऱ्या बाळगोपाळांना ते फळफळावळे वाटुन मोकळ होतात. शिधा देखिल कोणी गरजु भेटला तर त्याला देऊन मोकळे होतात. त्यामुळे कधी कधी पदरचे पैसे घालुन प्रवास खर्च केला जातो. त्यामुळेच नाना परांजपे सर्वांना हवेसे वाटतात. सर्वांनाच ते आपल्या घरातलेच वाटतात.
     त्यांचे घर गावाच्या मध्यवर्ती भागातच होते. त्यांच्या घरा समोर जांभ्या दगडाची पाखाडी आहे. घराच्या पाठीमागेच त्यांची खलाटी आहे. खलाटीच्या बाजुला थोडीशी जांभ्या दगडाचा कातळ असलेली डोंगराळ जमिनही त्यांचीच आहे. तेथे गवताशिवाय काही पिकत नाही. आज त्यांच्या घराच्या पाठिमागच्या खलाटीत बरीच गर्दी जमलेली दिसत होती. खलाटीच्या एका कोपऱ्यात विहिरी सारखे काहीतरी खणलेले दिसत होते. खड्डा साधारण पाच साडेपांच फुट एवढा खोल दिसत होता. सगळीकडे मातीच माती झालेली होती. एकीकडे मातीचा मोठ्ठा डोंगर तयार झालेला दिसत होता. खड्याच्या मध्यभागी साधारण दोन फुट उंचीची संगमरवरी मूर्ती दिसत होती. त्या मूर्तीच्या पायाशी ताजी फुले वाहिलेली दिसत होती.
       थोरात गुरुजींनी जमलेल्या गर्दीतुन वाट काढीत पुढे जायला सुरवात केली. भोस्ते गावातिल जवळ जवळ सर्वच आबालवृद्ध येथे जमा झाले होते. एवढ्याशा गावांत ही बातमी पसरायला जेमतेम अर्धातासच लागला असेल. जो तो पुढे पुढे जाण्याचा प्रयत्न करीत होता. सर्वांचा एकच गलका चालू होता. त्यामुळे थोरात गुरुजींना त्या गर्दीतुन पुढे जायला जरा वेळच लागला. ते पुढे जाऊन पहातात तो काय, ते रोज पठण करीत असलेल्या गणपति अथर्वशिर्षातिल एकदंतं चतुर्हस्तं पाशमं कुशधारिणंरदंचवरदं हस्तैर् बिभ्राणं मूषकध्वजम् या वर्णनाबरहूकुम ती संगमरवरी मूर्ती दिसत होती. तरीही अजुन त्या मूर्तीला नीट साफ केले नव्हते. बरीच धुळ मूर्तीवर दिसत होती. त्यामुळे ती मलिन झालेली दिसत होती. गणेशाचे ते देखणे रुप पाहून गुरुजी सद्गदित झाले आणि त्यांनी त्या धुळीतच त्या अद्भुत रुपासमोर साष्टांग दंडवत घातला. त्यांचे पाहून गर्दीतिल एक एकजण पुढे येऊन त्या धुळीतच गणेशाला सांष्टांग नमस्कार घालु लागला.
     सर्वांचे दर्शन घेऊन झाल्यावर एक एक जण आपापल्या उद्योग धंद्याला निघुन गेले. तिथे मोजकेच लोक उरले. त्यात थोरात गुरुजी, अर्जुन शिंदे, अनिल आणि नाना परांजपे आणि एक दोन गावकरी असे पांच सहाजणच तिथे शिल्लक राहीले.
     आता बोलण्याचा पुढाकार थोरात गुरुजींनी घेतला. नाना! आज अंगारिका संकष्टी चतुर्थी आहे आणि आजच्या या पवित्र दिवशी आपल्या गावांत श्री गजाननाचे आगमन होणे ही फार मोठी घटना आहे. या घटनेने आपल्या गावाची भरभराट होईल. या आनंददायी प्रसंगी आपण या गणेशाचे नम्रपणाने स्वागत करुया! बोलता बोलता गुरुजींचा आवाज कातर झाला. त्यांच्या डोळ्यांतुन घळा घळा पाणी वहायला लागले.
     व्हय! व्हय! आक्षी बराबर हाय तुमचं गुर्जी! पन आता त्या द्येवाला कवा पास्न धुळीत ठेवलया त्याला आदी भायर काडुया. अर्जुन शिंदेंनी सुचना केली.
     अहो गुरुजी! आमच्या घराण्यांत अनेक पिढयांपासुन ब्रह्मणस्पतीसूक्ताचे पठण केले जाते. त्यामुळे त्या उपासनेच्या परंपरेचे फलस्वरुप म्हणून हा ब्रह्मणस्पती विनायक आमच्या परसात प्रकट झाला अशी माझी भावना आहे. म्हणून या बाप्पाला आपण “ब्रह्मणस्पती विनायक” या नांवाने संबोधुया. या बाप्पाची पूजा करताना गणपती सूक्त आणि ब्रह्मणस्पती सूक्त यांचे अनुष्ठान केल्यास विशेष फलप्राप्ती होईल अशी माझी धारणा आहे.
पण नाना! एवढी साजरी मूरत कशी काय गावली? एका गावकऱ्याने सहजच चौकशी केली. वास्तविक सगळ्यांच्या मनांत हाच प्रश्न होता.
     त्याचं काय झाले, बि. कॉम् झाल्यापासुन मी नोकरीच्या प्रयत्नाकरीता दापोलीत रहात होतो. परंतु या वशिल्याच्या जमान्यात मला अजुन पर्यंत काही नोकरी धंदा मिळाला नाही. तिथे रिकामे बसण्यापेक्षा नानांना शेतीच्या कामात मदत होईल म्हणुन मी परत गावाला यायचे ठरवले. आता घरी परत आलो आहेच तर काही आंब्याची, काजुची कलमे लावावी हा विचार केला. त्या कलमांना पाण्याची सोय व्हावी याकरीता डवऱ्यासारखी विहिर खोदायची ठरवले. म्हणून गेले आठ दहा दिवस सहदेवच्या मदतीने डवरा खोदायला सुरवात केली. अनिलने झालेली हकिगत सांगायला सुरवात केली.
     अरे अनिल! थांब हे सगळे नंतरही समजले तरी चालेल. पण त्याआधी अर्जुन शिंदे यांच्या म्हणण्या प्रमाणे आपण देवाला किती काळ ताटकळत ठेवणार. आधी आपण बाप्पाला खड्यातुन बाहेर काढु. त्याची विधिवत पूजा अर्चा करु नंतर सावकाश सगळी हकिगत सांग. कसे काय मंडळी?
     आक्षी बराबर हाय! सगळ्या गावकऱ्यांनी सामुहीक उत्तर दिले. त्यानंतर सर्वांनी मिळुन गणपती बाप्पाची मूर्ती बाहेर काढुन तिला स्वच्छ धुतली. खणलेल्या डवऱ्यातुन निघालेले जवळपास पडलेले जांभे दगड गोळा करुन त्याचा एक ओटा तयार केला. त्यावर मातीचा भराव करुन ती चोपण्याने व्यवस्थित दाबुन त्यावर गायीच्या शेणाने सारवण काढुन त्यावर गणपती बाप्पाची तात्पुरती प्रतिष्ठापना केली.

*******

ब्रह्मणस्पती विनायक भाग १


 ब्रह्मणस्पती विनायक

लेखक-अनिल अनंत वाकणकर,
श्रीवर्धन, जिल्हा रायगड



     अनिल, सुरेश आणि प्रदिप तिघेजण लाटवणच्या समुद्राकिनाऱ्यावर पुळणीत गप्पा मारीत बसले होते. समुद्राचा घन गंभिर आवाज सर्वत्र निनादत होता. नुकताच सूर्यास्त झाला होता त्यामुळे क्षितिजावर आकाशात सर्वदूर गुलालाची उधळण झालेली दिसत होती. वातावरण धुसर झाले होते. धड उजेड नाही आणि धड काळोख नाही असे विलक्षण वातावरण होते.
     हे तिघेही अगदी जिवश्च कंठश्च मित्र होते. त्यातला अनिल हा बेकार होता. सुरेश आणि प्रदिप दोघे छोटी मोठी नोकरी करीत होते. तिघांचेही शिक्षण एकाच कॉलेज मध्ये झाले. तिघांनाही बि. कॉम् मध्ये सारखेच मार्क मिळाले होते. सुरेश लाटवणमध्ये बदली शिक्षक म्हणून तात्पुरत्या स्वरुपात कामाला लागला होता. त्यालाच भेटायला आज अनिल आणि प्रदिप आले होते. प्रदिप दापोली येथिल एका खाजगी फार्म हाऊस मध्ये अकाउंटंट म्हणून काम करीत होता. सांगायला अकाउंटंट परंतु तेथे त्याला अनेक प्रकारची कामे करावी लागत होती.
अनिलचेही नोकरीकरीता प्रयत्न चालू होते. परंतु त्याला अद्याप नोकरी धंदा मिळाला नव्हता. सतत अर्ज विनंत्या करुन तो कंटाळला होता. त्याची घरची आर्थिक परिस्थिती देखिल बेताचीच होती. त्याचे आई वडिल आता वृध्द झाले आहेत. जवळ होते नव्हते ते किडूक मिडूक विकुन त्यांनी अनिलचे बी. कॉम् पर्यंतचे शिक्षण केले होते. त्यांची थोडीफार शेती होती, त्यातुन पोटापुरते भात यायचे. परंतु ती शेती देखिल पावसावर अवलंबुन. शेतीच्या जोडीला आजुबाजुच्या गावातिल पूजा, लग्न या सारखी पौराहित्याची थोडीफार कामे करुन ते प्रपंचाचा गाडा रेटत होते.
सध्या अनिल आणि प्रदिप दापोलीला एकाच खोलीत रहात होते. दापोलीतिल एका चाळवजा घरात एका खोलीत दोघांचा ब्रह्मचाऱ्यांचा संसार मांडलेला होता. त्या तिघा मित्रांनी आज लाटवणला एकत्र जमण्याचे ठरविले होते. लाटवणला फिरायला जाण्यासारखे एकच ठिकाण होते, ते म्हणजे समुद्र किनारा. सुर्यास्ताची वेळ साधुन आज ते समुद्रावर फिरायला व त्या निमित्ताने एकमेकांच्या सुखदु:खाच्या गोष्टी शेअर करायला आले होते.
आज अनिलची मनस्थिती ठिक नव्हती. सूर्यास्ताच्या त्या धुसर वातावरणात तर त्याची खिन्नता आणखिनच वाढली होती. बरेच दिवसाच्या बेकारीने त्याला खूपच निराश केले होते. त्या तिघांपैकी दोघे नोकरीला लागल्याने आता त्यांचे एक वेगळे विश्व निर्माण झाले होते. त्यामुळे तो सध्या तो एकटा पडला होता. आता दापोलीला मित्राच्या जिवावर रहाणे त्याला मिंध्यासारखे वाटत होते. त्या विचारातच तो सुरेशला म्हणाला, सुरेश! मला वाटते आता गावाला जाऊन रहावे. उगाचच बाबांकडे आणखी पैसे मागणे नको. घरी गेलो तर कमीतकमी बाबांना त्यांच्या शेतीच्या कामात मदत तरी करता येईल.
खरंय तुझे! दापोलीला राहून आतापर्यंत फारसा काही फायदा झाला नाही. अर्थात तू कितीही राहिलास तरी माझी काहीच हरकत नाही. परंतु तू दिवसभर एकटा असल्याने तुझी मनस्थिती जास्त निराशाजनक व्हायला लागली आहे. प्रदिप म्हणाला.
तरी पण अनिल! तू धीर सोडू नकोस. तो परमेश्वर काही झोपलेला नाही,  ज्याने चोच दिली तो चारा देणारच नां! अरे हेही दिवस जातिल, तो देव आपली परिक्षा बघत असतो.  सुरेश म्हणाला.
मला कधी कधी वाटतं की, देव वगैरे सगळ झूट आहे. सगळ थोतांड आहे. निराश सुरात अनिल बोलला.
चला! काळोख वाढत चालला आहे आता आपण निघुया! या चर्चेतुन काहीच निष्पन्न होणार नाही. शिवाय रुमवर जाऊन आपल्याला आपल्या पोटापाण्याची व्यवस्था करायची आहे. हे काही दापोली नाही, खाणावळीत गेल्यावर आयत ताट समोर यायला. असे म्हणून सुरेश लगेच उठलाच.
त्यानंतर प्रदिप देखिल लगेचच उठला. सुरेशच्या बोलण्यातला अर्थ तो समजला. सुरेशला ही चर्चा आणखी वाढवुन अनिलच्या नैराश्यात भर घालायची नव्हती. त्यानंतर तिघेजण समुद्राच्या किनाऱ्या  किनाऱ्याने सुरेशच्या रुमकडे जायला लागले. वाटेल अनिलला ठेच लागली आणि तो जोरात आSS आईSS गं असे ओरडला. त्याचा आवाज ऐकुन प्रदिपने विचारले, काय रे काय झाले? त्यावर अनिलने काही नाही रे जोरात ठेच लागली.
त्यावर सुरेशने इथे समुद्र किनाऱ्यावरील पुळणीत आणि ठेच कसे काय शक्य आहे? असे विचारले आणि आपल्या हातातल्या बॅटरीचा प्रकाश अनिलच्या पायावर पाडला. बघतोय तो अनिलच्या पायाच्या करंगळीतुन रक्त येत होते. ते रक्त बघुन सुरेशने पायाच्या बाजुला बॅटरीचा प्रकाश पाडला.
अरे हे काय! इथे पुळणीत गणपतिची मूर्ती कशी काय? अनिल आश्चर्याने बोलला.
अरे मागे याच किनाऱ्यावर अशिच एक शंकराची पिंडी देखिल सापडली होती. सुरेशने सागितले.
त्यानंतर त्या तिघांनी ती वाळुत रुतलेली गणपतिची मूर्ती बाहेर काढली. तिला समुद्राच्याच पाण्याने स्वच्छ धुतली. त्यानंतर तिचे स्वरुप प्रकट झाले. गणपति अथर्वशिर्षामध्ये वर्णन केलेल्या एकदंतं चतुर्हस्तं पाशमंकुश धारणं रदंच वरदं हस्तैर्बिभ्राणं मुषकध्वजम् प्रमाणे ती गणेशाची मूर्ती होती.
आता त्या तिघांपुढे प्रश्न पडला या मूर्तीचे काय करायचे? तिथेच ती मूर्ती टाकून जाणे त्यांच्या श्रद्धाळु मनाला पटेना. दापोलीच्या किंवा लाटवणमधल्या खोलीत एवढी मोठी मूर्ती ठेवणे शक्य नव्हते. कारण तिथे जेमतेम त्यांना झोपण्यापूर्ती जागा होती.
मी माझ्या गावी ही मूर्ती नेली तर? नाहीतरी माझ्या गावांत गणपतिचे मंदिर नाहीये. अनिलने आपले मत मांडले.
काहीच हरकत नाही! कारण मागे अशीच सापडलेली शंकराची पिंडी लाटवणच्या लोकांनी परत समुद्रात सोडली होती. ही मूर्ती देखिल अशीच परत सागरार्पण करतिल.    
*******

कोंकण दरिद्री बोलते कोण, छे छे ती सोन्याची सुंदर खाण या कवितिल उक्ती प्रमाणे सर्व कोंकण प्रदेशच निसर्ग सौंदर्याने नटलेला आहे. हिरवेगार डोंगर, जांभ्या दगडाच्या पाखाड्या, जांभ्या दगडाचीच घरे हे तर कोंकणचे वैशिष्ट. रत्नागिरी जिल्हा हा त्या कोंकणाचाच एक भाग. त्या रत्नागिरी जिल्ह्यातिल महत्वाचा तालुका आहे दापोली तालुका. दापोली तालुक्यातिल मंडणगडहून दापोलीला जाणाऱ्या रस्त्यावर असणारे भोस्ते हे गांव देखिल कोंकणाच्या वर्णनाला साजेसेच आहे. येथिल जांभ्या दगडाच्या पाखाड्या, घनदाट जंगल, उंच डोंगर आणि खोल दऱ्या हे या गावाचे वैशिष्ट. येथिल जंगलात, साग, ऐन, किंजळ, असाणा ही झाडे विपुल प्रमाणात आढळतात. घरांजवळच्या परसात आंब्याची कलमे, रातांब्याची, जांभळाची, फणसाची, काजुची झाडे हे या गावाचे वैभव.
डोंगर उतारावर टप्या टप्यावर सुपारीची झाडे त्या झाडांना पाणी देण्याकरीता बांधलेले पाट हे इथले वैशिष्ट आहे. डोंगर उतारावर भात, नागली, वरी लागवडीकराता बारीक बारीक चोंढे पाडलेले सर्वत्र दिसतात. अशा या भोस्ते गांवात दिवसातुन दोन वेळा एस्. टी. ची बस येते. दापोली मंडणगड हा रस्ता हा डांबरी आहे. परंतु त्या रस्त्यापासुन भोस्ते गावापर्यंत येणारा रस्ता लाल मातीचा आहे. कोणतेही वाहन त्या रस्त्यावरुन गेले की, सर्वत्र धुळीचे लोटच्या लोट उठतात. त्यात एस्. टी. ची बस आल्यावर तर उडणारी लाल धुळ जवळपास असणाऱ्या सर्वांना लालेलाल करुन टाकते. मग ती माणसे असोत, जनावरे असोत किंवा झाडे असोत. रस्त्याच्या कडेला असणाऱ्या झाडांची सर्व पाने लाले लाल झालेली असतात.
दापोलीहून संध्याकाळी सहा वाजता सुटणारी दापोली भोस्ते बस नेहमी प्रमाणे उशीरा सुटली. तिला भोस्ते गाव गाठे पर्यंत  काळोख पडायला आला होता. ही बस भोस्ते येथे वस्तीला असते. गावाच्या तिठ्यावर असणाऱ्या पिंपळाच्या पारावर नेहमीप्रमाणे रिकामटेकड्या लोकांची बैठक बसलेली होती. त्यातच आता शेतीचा हंगाम संपला होता. त्यामुळे शेतावर जाण्याचे काही काम उरले नव्हते.
 एस्. टी. बसच्या ड्रायव्हरने गाडी रिव्हर्समध्ये घेऊन तिचे तोंड परत दापोली कडे जाणाऱ्या रस्त्याकडे केले आणि तो उडी मारुन खाली उतरला. दरम्यान पारावरच्या मंडळींचे गाडीत कोण कोण दिसतेय याचे निरीक्षण चालू होते. गाडीमध्ये ड्रायव्हर कंडक्टर आणि एकच प्रवासी दिसत होता. तिघेही लालमातीने पुरे माखले होते. गाडी थांबताच गाडीतल्या प्रवाशाने पारावर बसलेल्या विठुकाका उर्फ विठ्ठल शिंदे यांना हाक मारली. 
अहोS विठुकाका! मला ही ट्रंक उतरायला मदत करा नां.
त्याची हाक ऐकुन पारावर आपल्याच विचारात दंग असलेले विठुकाका दचकुन उभे राहिले. त्यांनी हाक मारणाऱ्या प्रवाशाकडे निरखुन पाहिले आणि ते म्हणाले, कोण अनिल बाळं! अरे एवढ्या उशिरा कसा काय आलासं? आणि ट्रंकेत एवढे जड  काय आणले आहेस? असे म्हणून त्यांनी अनिलला ट्रंक उतरायला मदत केली.
काही नाही काका! दापोलीचे बिऱ्हाड गुंडाळुन सर्व सामान आणले आहे. अनिलने विठु काकांना उत्तर दिले. त्यानंतर पारावरच बसलेल्या तुकाराम अण्णांना मदतीला घेऊन तो ती ट्रंक घेऊन आपल्या घराकडे गेला.
इकडे पारावर लगेच चर्चा सुरु झाली. काय हो विठुकाका हा परांजप्यांचा अनिल नां? एकाने विचारले.
काय हो एवढा बॅलिस्तर झाला आणि परत गावाला कसा काय आलाय? दुसऱ्याने आपली पिंक टाकली.
अहो! असे बॅलिस्तर हल्ली गल्लो गल्ली असतात. त्यांना विचारतय कोण? परत पहिल्याने आपले मत टाकले.
नायSहो आपला अनिल बाळं कुठबी सापडणारा बॅलिस्टर नाय! तो खराचं डोकेबाजं पोर हाय! पण परत का आला काय जाणं? पण पोर लयं वाळलाय ह्या बाकी खरां! विठूकाकांनी आपले मत सांगितले आणि ते गावाच्या रस्त्याला लागले.

*******

सोमवार, १८ जून, २०१८

नवविधा भक्तीमधिल अग्रगण्य होऊन गेलेले भक्त


नवविधा भक्तीमधिल अग्रगण्य होऊन गेलेले भक्त


     शुकासारिखे  पूर्ण वैराग्य ज्याचे। 
     वसिष्टापरी ज्ञान योगेश्वराचे।।
     कवी वाल्मिकासारिखा मान्य ऐसा। 
     नमस्कार माझा सद्गुरु रामदासा।।१।।
     उपदेस ज्याला असे राघवाचा। 
     श्रवणी जसा गुण परिक्षितीचा।।
     विवेकी विरागी जगी पूर्ण तैसा। 
     नमस्कार माझा सद्गुरु रासदासा।।२।।
     करी किर्तने नारदासारखाची। 
     कदर्यूपरी शांती ज्याचे सुखाची।।
     जया वाटते कांचनू केर जैसा। 
     नमस्कार माझा सद्गुरु रामदासा।।३।।
     स्मरणी जसा शंकर की प्रल्हाद। 
     चकोरापरी आठवी रामचंद्र।।
     रमा सेवी पादांबुजे जाण तैसा। 
     नमस्कार माझा सद्गुरु रामदासा।।४।।
     पृथुसारिखा अर्चनी वाटताहे। 
     खरा अक्रूरा सम वंदिताहे।।
     नसे गर्व काही अणूमात्र ऐसा। 
     नमस्कार माझा सद्गुरु रामदासा।।५।।
     खरी भक्ती हो त्या जगी मारुतिची। 
     असे रामदासा परी मारुतिची।।
     नसे भेद दोघां जळी गार जैसा। 
     नमस्कार माझा तया रामदासा।।६।।
     जये अर्जुनासारिखे सख्य केले। 
     मुळीहूनिया द्वैत नि:शेष केले।।
     सितानायकू दृढ केला कुवासा। 
     नमस्कार माझा तया रामदासा।।७।।
     बळी आत्मनिवेदनी पूर्ण झाला। 
     विदेहीपणे दास तैसा मिळाला।
     म्हणे उध्दवसुत वर्णू मी कैसा। 
     नमस्कार माझा सद्गुरु रामदासा।।८।।   


शनिवार, २ जून, २०१८

श्रीवर्धनचे चितळे मास्तर


श्रीवर्धनचे चितळे मास्तर
अनिल अनंत वाकणकर,
श्रीवर्धन, जिल्हा रायगड.
     परवा पु.लं.ची चितळे मास्तर ही कथा ऐकली आणि मला आमच्या गावांतिल व्ही.सी. जोशी सरांची आठवण आली. माझी त्यांची पहिली भेट झाली तेव्हा त्यांचे वय ६५ ते ७० च्या दरम्यान होते. ते जवळच असणाऱ्या दिवेआगर येथिल हायस्कूलला इंग्रजीचे शिक्षक होते. त्यांचे लहानपण अतिशय कष्टात गेले. कोकणातिल ब्राह्मण समाजातिल बहुसंख्य कुटुंबे पूर्वी जेमतेम खाऊन पिऊन सुखी या वर्णनात बसतिल अशीच असायची. त्यामुळे मुलांना शिकवायला उचलुन पैसे देणे शक्य नसायचे. गावात जिथपर्यंत शाळा असेल तिथपर्यत शिक्षण घ्यायचे आणि थांबायचे किंवा जर पुढील शिक्षण घ्यायची दुर्दम्य इच्छा असेल तर कष्ट करायची तयारी हवी. श्रीवर्धनमध्ये पूर्वी अगदी प्राथमिक स्तरावरचे शिक्षण मिळत असे. आतासुद्धा शिक्षणाची फार चांगली सोय आहे अशातला भाग नाही. परंतु सध्या हायस्कूल मुबलक आहेत आणि हल्ली कॉलेजचीही सोय झाली आहे.
     श्रीवर्धन हे तेव्हा जंजिरा संस्थानात होते. जर माध्यमिक किंवा इंग्रजी शिक्षण घ्यायचे असेल तर जंजिरा मुरुड येथे सोय होती. सध्या दळणवळणाची साधने खूप झाली आहेत परंतु व्ही. सी. सरांच्या काळात तशी काही सोय नव्हती. श्रीवर्धन ते दिघी हे तिस किलोमिटर अंतर चालत जायचे. त्यानंतर खाडीतुन पलिकडे जाण्याकरीता तर(होडी) असायची. त्या तरीतुन खोऱ्यात जायचे खोऱ्यातुन जंजिरा मुरुडला जायला परत पैची तर असायची. त्या तरीचे भाडे एक पै होते म्हणून तिला पैची तर असे म्हटले जायचे. जर श्रीवर्धनहून किंवा मुरुडहून निघायला उशिर झाला तर बोर्ली पंचतन येथे मुक्काम करावा लागायचा. कारण पुढे जंगल होते त्यात सर्वप्रकारची श्वापदे असायची.
     जंजिरा मुरुडला शिक्षणाला जाणाऱ्यांकरीता तिथे बोर्डींग असायचे. परंतु ब्राह्मण समाजाच्या मुलांना ती सोय उपलब्ध नव्हती. मुरुडला इंग्रजी शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या समोर दोनच पर्याय होते. एकतर नातेवाईकांकडे रहायचे किंवा वारावर शिक्षण घ्यायचे. जे पैसेवाले विद्यार्थी असायचे त्यांची सोय सहज व्हायची कारण ते पैसे मोजु शकायचे परंतु गरिबांना त्यांचे नातेवाईकही कायमचे ठेवायला तयार नसायचे. त्यात त्यांचा दोष होता असा भाग नाही परंतु त्यांची देखिल परिस्थिती त्याला कारण असे. अशा मुलांना नातेवाईकांकडे मुक्कामाला रहायच्या बदल्यात त्यांच्याकडची पडेल ते काम करायचे आणि रहायचे हाच पर्याय स्विकारावा लागे. रोजच्या जेवणाची सोय रोज वेगळ्या घरी करायची. ज्याच्याकडे जेवायला जायचे त्याला सकाळी जाऊन सांगायचे आज माझा वार तुमच्याकडे आहे. त्या बदल्यात त्यांच्याकडची पूजा करायची किंवा काही काम असेल तर करायचे. सगळेच वारवाले कनवाळु असायचेच असे नाही. कोणी शिळेपाके वाढायचे किंवा कोणी उरले सुरले वाढायचे. त्यामुळे पोट भरेलच याची खात्री नाही. कधी कधी एखादा वारवाला अचानक परगावी जायचा त्यामुळे बदली कोणीतरी शोधायचा. कोणी नाहीच मिळाला तर तो दिवस उपाशीच काढायचा.
     व्ही.सी सरांनी अशा प्रतिकुल परिस्थितीत आपले शिक्षण घेतले. त्यांना जरी स्वत:ला शिक्षणाकरीता कष्ट घ्यावे लागले असले तरी त्यांनी त्याचा परिणाम आपल्या अध्यापनावर पडुन दिला नाही. त्यांचे असंख्य विद्यार्थी त्यांचे नांव मोठ्या आदराने घेतात. माणसाचे मोठेपण त्याच्या अंत्यदर्शनाला कितीजण आले यावर मोजण्याची पद्धत आहे. जेव्हा व्ही.सी.सर वारले तेव्हा त्यांच्या अंत्यदर्शनाला सगळ्या स्तरांतुन त्यांचे विद्यार्थी आले होते माझ्या मते हेच त्यांचे वैभव होते.
     व्ही.सी. सरांचा मी काही शाळेतला विद्यार्थी नव्हे. कारण मी जेव्हा इंग्रजी शिकायला सुरवात केली तेव्हा ते सेवानिवृत्त होऊन बरीच वर्षे जाली होती. माझ्या सारख्या अनेक गरजु विद्यार्थ्यांना त्यांनी विनामोबदला शिकवले. सेवानिवृत्त झाले होते तरी त्यांच्याकडे इंग्रजी शिकायला येणार्या विद्यार्थ्यांची गर्दी असायची. त्यांची शिकवण्याची पद्धत मोठी विलक्षण असायची. ते शाळेतल्या पुस्तकातील फार कमी शिकवायचे. त्यांचा भर तडखर्कर पाठमाला या पुस्तकांवर असायचा. त्यांची तडखर्करांची तिनही पुस्तके पाठ होती. कोणत्या पानावर कोणता शब्द आहे. कोणता काळ कुठल्या पुस्तकात किती पानावर आहे हे ते अचूक सांगत असत.
     ते व्याकरण शिकवायचे ते फार मजेशिर असायचे. त्यांचा भर प्रॅक्टीकलवर जास्त असायचा. I am walking हे वाक्य ते चालुन दाखवायचे. I am crawling हे वाक्य शिकवताना ते चक्क रांगुन दाखवायचे. हाच प्रकार प्रत्येक क्रियापदाकरीता असायचा. रोज दहा शब्द पाठ करायला लावणे हे तर रोजचेच असायचे. जेव्हा ते दिलेली वाक्ये किंवा शब्द तपासत तेव्हा जर चुकले तर वही अक्षरश: फेकून द्यायचे. परंतु नंतर वह्यांच्या किमती वाढल्या आणि त्यांनी वह्या फेकून देणे सोडून दिले. त्यांच्याकडे मी तडखर्करांच्या तिनही पाठमाला शिकलो. आज मी जे काही चार शब्द इंग्रजीमध्ये लिहू शकतोय ती त्यांचीच कृपा आहे.
     त्यांच्या बद्दल एक गोष्ट आवर्जुन सांगाविशी वाटते. शिकवणीच्या वेळा सोडून जेव्हा जेव्हा मी त्यांना बघत असे तेव्हा त्यांच्या हातात झाडू असायचा. त्याचे अंगण कधीही पहा लख्ख असायचे. अंगणाच्या कुंपणीचे पान पिवळे झाले की, ते लगेचच ते काढुन टाकायचे. त्यांचे अंगण आणि रस्त्याच्या कडेच नगरपालीकेचे गटार ते नेहमी अगदी स्वच्छ ठेवायचे. जरा जरी घाण पडली तरी ते तत्परतेने उचलायचे. असा प्रकार मी हल्ली शेगावला गजानन महाराज संस्थानमध्ये पाहिला.  
     अशा या आमच्या व्ही. सी सरांना माझे त्रिवार वंदन.

शुक्रवार, १ जून, २०१८

श्री समर्थ रामदास स्वामी विरचित होळी पंचक


।। श्री समर्थ रामदास स्वामी विरचित होळी पंचक ।।
श्री रामदास स्वामी देखील आपल्या होळीवरील भारुडातून होलिकोत्सवाचे स्वानुभूत मार्मिक स्वरूप सांगताना म्हणतात
अवघेचि बोंबलती ।  होळी भोंवते भोविती ॥१॥
मायाहोळी प्रज्वळली ।  सृष्टि वेढारे लाविली ॥२॥
ज्याकारणे गुंडाळती । तेचि वाचे उच्चारती ॥३॥
होळीमध्ये खाजे आहे ।  ते तूं विचारुनि पाहे ॥४॥
खाजे खातां सुख होय । परी कठिण हातां नये ॥५॥
खोल दृष्टीने पाहिले ।  खाजे त्याच्या हातां आले ॥६॥
एक झडा घालूं जाती ।  लंडी चकचकून पळती ॥७॥
एक देहाचे पांगिले ।  ते आंगी हुर्पळले ॥८॥
उडी अवघ्यांचीच पडे । परि ते हातांसी न चढे ॥९॥
एके थोर धिंवसा केला ।  खाजे घेऊन पळाला ॥१०॥
एक आपणचि खाती ।  एक सकळांसि वांटती ॥११॥
एक घेऊन पळाले । परी कवंठी वरपडे जाले ॥१२॥
रामीरामदासी होळी । केली संसाराची धुळी ॥१३॥
(समर्थ गाथा - ओवी १००५.)
समर्थ म्हणतात, भगवंतांच्या मायेने ही सृष्टी रचलेली आहे, तीच जणू त्यांची मायारूप होळी पेटलेली आहे. यच्चयावत् सर्व जड-जीव आपापल्या कर्मांनी बद्ध होऊन या पेटलेल्या मायारूप होळीभोवती बोंबलत फिरत आहेत. त्यांना या रामरगाड्यात ज्या कर्मांनी बांधलेले आहे, त्याच कर्मांविषयी ते सतत बोलत आहेत, त्यातच गुरफटून पडलेले आहेत. त्या बंधनकारक कर्मांशिवाय त्यांना दुसरा चिंतन-विषयच नाही. 
ही माया देखील भगवंतांची अचिंत्यशक्तीच आहे. त्या माध्यमातून भगवंतच सृष्टीरूप झालेले असल्याने, त्या सृष्टीचे मूळकारण हे परब्रह्मच आहे. तेच होळीतील खाजे होय. होळीत पुरणपोळी व नारळ घालतात, तो नारळ नंतर प्रसाद म्हणून खातात. तेच त्यातले खाजे वरवर पाहता सापडत नाही. पण ज्या जीवावर श्रीसद्गुरूंची कृपा होते, त्याच्या दृष्टीला फाटा फुटतो व जेव्हा तो त्या दृष्टीने पाहू लागतो तेव्हाच त्याला भासमान मायेच्या आत गढलेले आनंदमय परब्रह्मतत्त्व दिसू लागते. अशी खोल दृष्टी लाभणे म्हणजेच सद्गुरुकृपा होणे, असे श्री समर्थ आवर्जून सांगतात.
पण जे स्वत:च्याच बळावर त्या मायेचा थांग लावू पाहतात, तिचा झाडा घेऊ जातात, ते तिच्या झगमगाटात, विविधरंगी शोभेत वाहावत जाऊन कुठल्या कुठे फापलतात. ती माया त्या लंडी जीवांना भुलवतेच. आपण निघालो कशासाठी व जायचे कुठे? हेच ते पार विसरून जातात. जे जीव आपल्या देहाच्या बंधनात अडकलेले असतात, म्हणजे ज्यांची देहबुद्धी खूप तीव्र असते, ते त्या मायारूप होळीत होरपळून जातात, त्यांचे अस्तित्वच पूर्णपणे संपते. देहजळात मासोळी बनून बुडी दिलेल्या जीवालाच सुख-दु:खरूपी अनुभवात अडकून पडावे लागते, असे माउली देखील सांगतात. 
आनंदाचे ते खाजे मिळवण्यासाठी या मायारूप होळीवर सर्वच जण जाणतेपणी वा अजाणतेपणी  आपापल्या परीने उडी घेतात, पण ते खाजे तसे सहजासहजी कोणाच्याही हाती लागतच नाही. त्यातूनही ज्या जीवांवर सद्गुरुकृपा होते व जे सद्गुरुचरणीं शरण जाऊन धैर्याने साधना करतात, त्यांनाच ते परब्रह्मरूप खाजे प्राप्त होते. मात्र असे भाग्यवान जीव ते खाजे घेऊन त्या मायेपासून दूर पळून जातात.
अशा मायेचे रहस्य जाणणा-या महात्म्यांचेही दोन प्रकार असतात, असे समर्थ येथे सांगतात. एक प्रकार म्हणजे मायाहोळीतून मिळालेले खाजे फक्त स्वत: एकटेच खाऊन तृप्त होणारे महात्मे व दुसरा प्रकार म्हणजे तेच खाजे अधिकार जाणून इतरांनाही वाटून खाणारे महात्मे. पहिल्या प्रकारातील महात्मे म्हणजे आत्माराम अवस्थेला पोचून जगाशी काहीही घेणे देणे नसणारे अवलिया संत होत. ते लोकांच्या भानगडीत पडत नाहीत, आपल्याच आनंदात रममाण होऊन राहतात. तर दुस-या प्रकारातील महात्मे हे श्री ज्ञानेश्वर माउली म्हणतात तसे, "जाणते व दाविते" असे असतात. ते स्वत: तर ब्रह्मस्वरूप होतातच, पण जनांच्या कळवळ्याने तोच ब्रह्मरूप कृपाप्रसाद सुयोग्य व्यक्ती पाहून प्रदान करतात व त्यांचाही उद्धार करतात. 
या व्यतिरिक्त अजून तिसरा प्रकारही श्री समर्थ मार्मिकपणे सांगतात की, असे काही जीव असतात, जे ते खाजे समजून फक्त नारळाची करवंटीच घेऊन पळून जातात, पण शेवटी त्यांची फसगत होते. त्यांच्यावर सद्गुरुकृपा नसल्याने सुरुवातीला परमार्थच होतोय असे दिसते पण शेवटी ते त्या मायेच्या कचाट्यात पूर्ण अडकतात व आत्मलाभ न होता त्याचा केवळ आभासच त्यांना प्राप्त होतो. असे जीव भगवंतांच्याच संकल्पाने महात्मे म्हणून जगात मिरवतात खरे, पण त्यांच्यापाशी परमार्थाची कसलीही खरी अनुभूतीच नसते. यांनाच शास्त्रांनी 'असद्गुरु' असे नामाभिधान दिलेले आहे. म्हणूनच श्री समर्थ त्यांना नारळ सोडून करवंटीच लाभली, असे खेदाने म्हणतात.
समर्थ रामदास स्वामींना मात्र सद्गुरुकृपेने मायारूप होळीचे रहस्य पुरेपूर समजले व त्यांनी श्रीसद्गुरूंनी सांगितलेल्या युक्तीनुसार, रामदास्य करून मायेची होळी पेटवली व तिचेच भस्म सर्वांगाला लावून धुळवडही साजरी केली. त्यांनी श्रीसद्गुरुप्रदत्त साधन करून मायारूप भ्रामक संसाराचीच धुळवड केली. त्यांचा कर्मबंधरूप संसार धुळीला मिळाला व अखंड आनंदरूप परमार्थ त्यांचे सर्वस्व व्यापून भरून उरला !
समर्थ श्री रामदास स्वामींचा होळीचा हा गूढ अभिप्राय समजून घेणे खरेतर अत्यंत अवघड आहे, पण सद्गुरुकृपेने त्याचा थोडा विचार होऊ शकला. समर्थांच्या या प्रसन्न  रूपकाचे सार म्हणजे, *"श्रीसद्गुरूंनी दिलेली साधना निष्ठेने व प्रेमाने तसेच त्यांनी सांगितलेल्या युक्तीने मनापासून करणे, हेच आहे. असे जो करतो, त्याचीच होळी खरी साजरी होते व तोच अखंड, अद्वय आनंदाचा धनी होतो.

।। जय जय रघुवीर समर्थ ।।