मला भावलेल्या व्यक्ती लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
मला भावलेल्या व्यक्ती लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

मंगळवार, १० सप्टेंबर, २०१९

विश्वनाथ विष्णू तथा राजाभाऊ मेहेंदळे.


।।श्रीराम।।
मला भावलेले व्यक्तिमत्व:
विश्वनाथ विष्णू तथा राजाभाऊ मेहेंदळे.
लेखक- अनिल अनंत वाकणकर,
श्रीमंत पेशवे मार्ग,
श्रीवर्धन, जिल्हा- रायगड


            माझ्या आयुष्यात अनेक व्यक्ती आल्या आणि गेल्या. काही लक्षांत राहिल्या काही विस्मरणांत गेल्या. परंतु फारच थोड्या व्यक्ती अशा आहेत ज्यांनी मनांत कायमचे घर करुन ठेवले आहे. त्यातिलच एक व्यक्ती म्हणजे मेहेंदळे रावसाहेब. त्यांचे पूर्ण नांव आहे, विश्वनाथ विष्णू मेहेंदळे त्यांच्या परिचयाचे लोक त्यांना राजाभाऊ म्हणून ओळखत असत.
     त्याचे मूळगांव गणपतीपुळ्याजवळचे मालगुंड. हे गांव केशवसुतांचे गांव म्हणून प्रसिध्द आहे. सुरवातिला त्यांनी मालगुंड नजिक असणाऱ्या नांदिवडे येथे प्राथमिक शिक्षक किंवा त्याकाळातले शाळामास्तर म्हणून काम केले. त्यांनी त्याकाळात शिकवलेल्या त्यांच्या एका विद्यार्थ्याचीही माझी भेट झाली होती. त्यानंतर त्यांची पोस्टखात्यात निवड झाली. त्याकाळात पोस्ट ऑफिसमध्ये सर्वात जास्त पगार मिळत असे. असे म्हणतात त्याकाळी लोकांनी रिझर्व बँकेतली नोकरी सोडून पोस्टात नोकरी स्विकारली होती. पोस्ट ऑफिसमध्ये निवड झाल्यानंतर त्याचे ट्रेनिंग आणि सुरवातिचे पोस्टींग देखिल गुजराथमध्ये झाले होते.
     माझी त्यांची पहिली भेट झाली गोरेगांवच्या पोस्टांत. मी नुकताच श्रीवर्धनहून माणगांव येथे लिव्ह रिझर्व पोस्टमन म्हणून रुजु झालो होतो. मला पहिलेच डेप्युटेशन गोरेगांवचे आले होते. त्यावेळी गोरेगांव येथे मेहेंदळे रावसाहेब पोस्टमास्तर म्हणून काम पहात होते. डेप्यूटेशनवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्याला तेव्हा दैनंदिन भत्ता मिळत असे. मी तेव्हा माणगांव येथे नुकतीच खोली भाड्याने घेतली होती. त्यामुळे मी माणगांव गोरेगांव जाऊन येऊन करण्याचा विचार केला होता.
     मी गोरेगांव येथे हजर झाल्यावर त्याच दिवशी त्यांनी मला खडसावले होते. तुम्ही माणगांवला राहून गोरेगावचयेथे काम करणार आहात आणि भत्ताही घेणार आहात! तेव्हा मी कोणतेही सर्टिफिकेट देणार नाही. इथे रहायचे असेल तर त्याची सोय मी करु शकतो. पहिल्याच भेटीत त्यांनी दिलेला दम ऐकून मी खूपच घाबरलो होतो. कारण तेव्हा मला नोकरी लागुन जेमतेम सहा महिने झाले होते. परंतु नंतर त्यांचा परिचय झाला आणि त्यांचा सडेतोड स्वभाव हा  त्यांचा मुखवटा आहे हे लक्षांत आले. मेहेंदळे रावसाहेब कोणालाही कधीही मदतीला तत्पर असायचे. अनेकांचे आयुष्य त्यांनी मार्गी लावले आहे.

     त्यांचा माझा परिचय वाढला तो ते श्रीवर्धन पोस्टांत सब पोस्टमास्तर म्हणून हजर झाल्यानंतर. त्यावेळी माझीही बदली परत श्रीवर्धनला झाली होती. तेव्हा माझी सर्व्हीस तिन वर्षे पूर्ण झाली होती. पोस्टाच्या नियमाप्रमाणे तिन वर्षे पूर्ण झाल्यावर प्रमोशन परिक्षा देता येत असे. मात्र त्या कर्मचाऱ्याला परमानंट अथवा क्वाझी परमानंट केलेले असणे गरजेचे होते. मेहेंदळे रावसाहेब हजर झाल्यावर त्यांनी माझी क्वाझी परमानंट केल्याची ऑर्डर काढली. त्यानंतर लगेचच दोन वर्षांनी परमानंटची ऑर्डर देखिल त्यांनीच काढली होती. जेव्हा प्रमोशन परिक्षा जाहिर झाली तेव्हा त्यांनी मला अभ्यास करण्याकरीता कामाच्या वेळेत सवलत तर दिलीच, त्याशिवाय त्यांनी मला असे सांगितले की,  त्याचे जिवश्च कंठश्च असणारे पेंडसे मास्तर महाड येथे प्रमोशन परिक्षेकरीता क्लास घेत आहेत तिकडे जा.
     त्या क्लासला जायचे म्हणजे महाड येथे रहाण्याची, जेवणाखाणाची सोय बघायला पाहिजे होती. याशिवाय जवळपास महिनाभर तेथे रहाण्याकरीता दामाजीपंतांची देखिल जरुरी होती. माझ्या या सगळ्या सबबी ऐकल्यावर त्यांनी माझी रहाण्याची, जेवणाची आणि पैशाची देखिल सोय केली. दुर्दैवाने मी त्यावेळी ती परिक्षा पास होऊ शकलो नाही. किंबहूना ते श्रीवर्धनला असे पर्यंत मी क्लार्क झालो नाही. परंतु या सर्व प्रसंगातुन त्यांच्यातील माणूसकीचे दर्शन झाले. एखाद्याचे आयुष्य बनावे याकरीता त्यांच्या ठाई असणारी तळमळ दिसुन येत होती.
     ते सेवानिवृत्त झाले तेव्हा ते पेण येथे कार्यरत होते. त्यामुळे त्यांचा निरोप समारंभ आम्हाला करता आला नव्हता. ती इच्छा पूर्ण करण्याकरीता आम्ही जेव्हा दिवेआगर येथे श्री केमनाईक साहेबांचा निरोप समारंभ आयोजित केला होता. त्यावेळी त्यांचाही सत्कार समारंभ करायचे ठरवले होते. हा समारंभ दिवेआगर येथे यज्ञेश्वर उर्फ भाऊ करमरकर यांचे मांडवात आयोजित केला होता. त्यावेळी श्रीवर्धन तालुक्यातिल त्यांच्या परिचयाचे अनेकजण हजर होते.


     ते सेवानिवृत्त झाल्यानंतर बरेच वर्ष श्रीवर्धन येथेच रहात होते त्यामुळे त्यांच्याशी सतत संपर्क होता. ते नारायण पाखाडीत दादा टेमकर यांच्या घरात रहात होते. त्यांच्या सेवानिवृत्तीनंतर श्रीवर्धन येथे हळबे रावसाहेब पोस्टमास्तर म्हणून आले होते. त्यांना श्री शिवमहिम्न शिकायचे होते, माझेही अर्धे झालेले होते. तेव्हा आम्ही दोघे आणि आमच्या जोडीला मेहेंदळे साहेब देखिल मोरुतात्या उपाध्ये यांच्यकडे महिम्न शिकायला जायचो. तेव्हा दररोज संध्याकाळी आधी मेहेंदळे साहेबांकडे बैठक असायची त्यानंतर महिम्न. ते टेमकरांच्या घरांत रहात असताना अधिक महिना आला होतो. तेव्हा आम्ही (म्हणजे मी, माझी सौ., मेहेंदळे साहेब, मेहेंदळे बाई आणि सौ. गंद्रे) त्यांच्या घरी दासबोधाचे पारायण केले होते.
     कालांतराने मेहेंदळे बाई देखिल सेवानिवृत्त झाल्या आणि त्यांनी आपला मुक्काम लोणेऱ्याला स्वत:च्या घरात हलवला. मी देखिल प्रमोशन होऊन दिवेआगर, वाळवटी आणि श्रीवर्धन येथे क्लार्क अथवा सबपोस्टमास्तर म्हणून काम केले होते. त्यानंतर मुलांच्या शिक्षणाच्या दृष्टीने मी माझी बदली गोरेगांव येथे करुन घेतली. तेव्हा परत आमचा मेहेंदळे साहेबांशी संपर्क झाला. त्यावेळी आम्ही मॉर्निंग वॉकला लोणेऱ्या पर्यंत जात असू. तेव्हा जाता येता कधीतरी त्यांची गाठ पडत असे. विशेष म्हणजे गोरेगांव येथे आम्ही आमचे बिऱ्हाड मेहेंदळे साहेब पूर्वी जेथे रहात असत त्या बबन मोने यांच्या घरांतच केले होते. मेहेंदळे साहेब जवळपास दररोजच गोरेगांव येथे येत असत त्यामुळे त्यांची रोजच भेट होत असे.
     केदारला लोणेरे येथिल बाटु मध्ये डिप्लोमा करीता प्रवेश घेतला होता. त्याचा डिप्लोमा पुरा झाल्यावर त्याचे कँपस इंटरव्ह्यू मध्ये सिलेक्शन झाले होते. ही गोष्ट मेहेंदळे साहेबांना समजली तेव्हा ते ताबडतोब माझ्या घरी आले आणि केदारला नोकरी न करता डिग्री पूर्ण कर असे निक्षुन सांगितले. त्यावर आम्ही गोलमाल बोलल्यावर, त्यांनी पैशाची अडचण आहे कां असे स्पष्ट विचारले. तेव्हा पैशाचा प्रश्न नाही आणि जरुर वाटली तर बँकेतुन लोन घेता येईल असे म्हटले. त्यानंतर त्यांनी त्यांचा मुलगा विनय याच्याशी बातचित करुन एक प्रस्ताव माझे समोर ठेवला होता. त्यांनी मला केदारच्या डिग्री करीता लागणारे पैसे बँकेतुन न घेता ते देणार आहेत असे बजावले. त्यांनी विनयला असेही सांगितले होते की, मी जरी नसलो तरी केदारचे शिक्षण पूर्ण होईपर्यंत लागणारी रक्कम तो देईल. सुदैवाने मला त्यांच्याकडून पैसे घेण्याची वेळ आली नाही. परंतु त्यांनी ते असोत अथवा नसोत केदारच्या शिक्षणाकरीता लागणाऱ्या पैशाची तरतूद केली होती. ही गोष्ट त्यांचा मनाचा मोठेपणा आणि परोपकारी वृत्ती दाखवत होती.  अशाच प्रकारे त्यांनी अनेकांना मदत केली होती.
     पुढे त्यांची पंचाहत्तरी गोरेगांव येथे आयोजित केली होती. त्या कार्यक्रमाला मी उपस्थित होतो. त्यावेळी त्यांनी त्यांना अती प्रिय असणारा तंबाखु सोडला होता. त्याचप्रमाणे यापुढे अंगाला सोने लावणार नाही हा देखिल निर्धार त्यांनी केला होता. लोणेऱ्याला असताना मी अनेकदा पोस्टाच्या कामासंदर्भात त्यांचा सल्ला घ्यायला जात असे. गोरेगांवहून नंतर माझी बदली दासगांव येथे पोस्टमास्तर म्हणून झाली. ती बदली मी केवळ गोरेगांव येथुन जाऊन येउन करता येईल म्हणून मी स्विकारली होती. मला साहेब तिथे जाण्यापेक्षा दुसरे सेफ ऑफिस देतो म्हणून सांगत होते. त्याला कारण असे होते, दासगांवला पैशांची अफरातफर झालेली होती. त्यामुळे तेथे अगदी डोळ्यांत तेल घालुन काम करणे आवश्यक होते.  त्यावेळी मला मेहेंदळे साहेबांची खूपच मदत झाली. त्यावेळी मी दररोज लोणेरे येथे त्यांच्याकडे थांबुन दासगांव येथे दिवसभरांत झालेल्या सर्व घटनांबाबत मी त्यांच्याशी चर्चा करुन त्याचा सल्ला घेऊन काम करीत असे. त्यांच्या बहुमोल सल्ल्यामुळे मी दासगांवचे शिवधनुष्य पेलू शकलो.
     या ठिकाणी त्यांची एक आठवण आवर्जुन सांगाविशी वाटते. ते नियम आणि व्यवहार यांची सांगड घालुन काम करीत असत. ते श्रीवर्धन येथे कार्यरत असताना एका गावांत जवळपास साठ सत्तर आर्.डी. खात्यांची मुदत संपल्याने त्या लोकांना एका दिवशी रक्कम अदा करायची होती. त्या सर्व खातेदारांनी श्रीवर्धन येथे येण्याकरीताचा वेळ आणि पैसे खर्च करुन येण्याऐवजी त्यांना त्यांच्या गावात जाऊन रक्कम वाटप करण्याची योजना श्री मेहेंदळे साहेब यांनी केली होती. त्याकरीता आवश्यक असणाऱ्या तरतुदी त्यांनी केल्या आणि त्या खातेदारांना सर्व रक्कम त्यांच्या गावांत जाऊन अदा केली होती. या मध्ये कोणाचेही नुकसान नव्हते की फायदा. परंतु ही गोष्ट नियमाविरुध्द होती. या गोष्टीचा लेखी रिपोर्ट आमच्याचपैकी एकाने साहेबांना केला होता. या व्यवहारांत खातेदारांची सोय झाली परंतु मधल्या मधे मेहेंदळे साहेबांना खात्यामार्फत चौकशीला सामोरे जावे लागले त्यातुन त्यांना किरकोळ शिक्षा देखिल झाली होती.
     श्रीवर्धन पोस्टांत सन १९८० पासुन सत्यनारायणाची पूजा आयोजित केली जाते. हा कार्यक्रम ऑफिस स्टाफ आणि त्यांचे कुटूंबीय मिळून साजरा करतात. मेहेंदळे साहेब श्रीवर्धनला येण्यापूर्वी हा कार्यक्रम अगदी साध्या स्वरुपात साजरा केला जात असे. मेहेंदळे साहेब पोस्टमास्तर म्हणून हजर झाल्यावर पहिल्याच वर्षी सत्यनारायणाची पूजा साजरी करण्याचा विषय आला होता. त्यावेळी त्यांनी त्यांच्या स्वभावाप्रमाणे सर्वांना सांगितले, हा कार्यक्रम जर बंद करायचा असेल तर तुम्ही तसे करु शकता त्याकरीता मी परवानगी देत नाही असे जाहिर केले तरी चालेल. परंतु जर चालू ठेवायची असेल तर ती परत बंद करुन चालणार नाही. परंतु सर्वांनी ही परंपरा चालू ठेवायचीच असे सांगितले. त्यानंतर मात्र हा पूजेचा कार्यक्रम हा एक सोहळाच व्हायला लागला. परंपरेप्रमाणे आदल्या रात्री सर्व ऑफिस धुण्यापासुन पूजेच्या दिवशी रात्री भजनाची बारी होई पर्यंत सर्व स्टाफ मनापासुन भाग घेत असे. अशाप्रकारचे कार्यक्रम साजरा करण्याकरीता मॉनेटरची भूमिका महत्वाची असते. ती भूमिका मेहेंदळे साहेब तन, मन, धन खर्च करुन निभावायचे. त्यावेळी त्यांचा उत्साह एवढा असायचा की, जेवण तयार करण्याकरीता इंधन जमा करण्यापासुन ते भाजी, आमटी फोडणीला टाकेपर्यंत त्यांचा सहभाग असे. त्यांचा तो उत्साह पाहून सर्वांचाच उत्साह वाढत असे.
     अशा या जगमित्र असणाऱ्या मेहेंदळे साहेबांचे निधन झाल्याचा फोन त्यांची मुलगी वीणा हीने केला होता. त्यानंतर त्यांच्या आठवणींना उजाळा देऊन त्यांना श्रध्दांजली वहावी असे ठरवले होते. हे लेखन ही त्यांना वाहिलेली माझी श्रध्दांजलीच आहे. ते माणूस म्हणून किती मोठे होते याचा अनुभव त्यांचा सहवास लाभलेलेच जाणतात. मालगुंड येथिल नारळाप्रमाणेच ते वरुन कठोर आणि अंतर्यामी मधाळ, स्निग्ध असे होते. त्यांना माझी ही आदरांजली!

।। जय जय रघुवीर समर्थ ।।

जयंत जयराम उर्फ बंधू केमनाईक



मला भावलेल्या व्यक्ती
जयंत जयराम उर्फ बंधू केमनाईक



     मला भेटलेल्या आणि भावलेल्या व्यक्तीमत्वांचे चित्रण करायचा मी प्रयत्न करीत आहे. आज मी अशा एका व्यक्तीची माहिती सांगणार आहे, जिने आयुष्यभर कष्टच केले आणि जबाबदाऱ्यांचे ओझे वागविले. ते आहेत माझे क्लार्कच्या नोकरीतले पहिले गुरु. त्याचे नांव आहे, जयंत जयराम केमनाईक. त्यांना संबोधन मात्र बंधू असे आहे. बंधू म्हणजे अर्थातच मोठा भाऊ. मोठ्याभावाला नेहमी कर्तव्यच करायचे असते. आपल्या लहान भावंडांची काळजी घेणे त्यांच्या अडीनडीला धाऊन जाणे हिच भूमिका त्यांनी कायम निभावली. त्याकरीता ती भावंडे रक्ताचीच असायची जरुरी नाही. त्यांना बंधू म्हणून मानणारी सर्वच त्यांची भावंडे होती.
     त्यांचे आतापर्यंतचे सर्व आयुष्य जबाबदाऱ्या सांभाळण्यातच गेले. आता कोठे चार सुखाचे समाधानाचे दिवस आले तेव्हा त्यांच्या प्रकृतीने दगा दिला आहे. त्यांनी आपले तन आणि मन पोस्टाच्या सेवेला वाहिलेले होते. त्यांच्या नोकरीची सुरवात बॉय मेसेंजर या पदाने झाली. त्याकाळात आलेल्या तारा(Telegrams) वाटपा करीता १६ वर्षे पूर्ण झालेल्या मुलांची नेमणूक करीत असत. वयाची अठरा वर्षे पूर्ण झाल्यावर ते रेग्युलर पोस्टमन म्हणून काम करु लागले. त्याकाळात पोस्टात कामावर जाण्याकरीता परिक्षा वगैरे द्याव्या लागत नसत. कारण तेव्हा पोस्टात कामाला माणसेच मिळत नसत. आपल्या ओळखितील लोकांना पोस्टात चिकटवत असत.
     त्या काळांत पोस्टामध्ये व्हीलेज पोस्टमन म्हणून काही जागा असत. त्यांना आठवड्याची बीट असे. श्रीवर्धन येथे देखिल तेव्हा व्हीलेज पोस्टमनची पोस्ट होती. त्याची कामगीरी सोमवारी सुरु होत असे. सोमवारी मुख्यालयातुन आपली सर्व कामगिरी म्हणजेच पत्रे, मनीऑर्डर, रजी पत्रे इ. ताब्यात घेऊन त्याचप्रमाणे मनी ऑर्डर पेमेंट करीता लागणारी कॅश घेऊन व्हीलेज पोस्टमन निघत असे. पहिल्या दिवशी चालत चालत श्रीवर्धन दांडे येथिल तरीने कुरवडे, काळींजे, सायगाव पर्यंत पत्रे वगैर वाटत, पेमेंट करत, त्या त्या गावांमधिल पाठवायची पत्रे गोळा करत तो सायगांव येथे वस्ती करत असे. दुसऱ्या दिवशी मंगळवारी निगडी, निवळा, गालसुर, बापवन, रानवली या गावांचे टपाल वाटुन व जमा करुन रानवली येथे वस्ती करीत असे. तिसऱ्या दिवशी  बुधवारी जसवली, भट्टीचा माळ येथिल टपाल वाटून व गोळा करुन तिन दिवसात केलेल्या कामगिरीचा हिशेब द्यायला श्रीवर्धन येथे येत असे. त्यानंतर गुरुवारी परत सोमवार प्रमाणेच सर्व कामगिरी ताब्यात घेऊन वाळवटी, आरावी, कोंडवीली, शेखाडी, चिखलप, शिरवणे, मामवली, गुळधे, या विभागातिल टपाल वितरण आणि जमा करणे ही कामगीरी शनिवार पर्यंत करुन हिशेब द्यायला शनिवारी श्रीवर्धनच्या पोस्टांत हजर होत असे. अशी ही सात दिवसांची व्हीलेज बीट देखिल बंधूनी बदली कामगार म्हणून केली होती.  पोस्टमनच्या नोकरी पुरेशी झाल्यावर त्यांनी मेल ओव्हरसिअरचे काम स्विकारले. हे काम म्हणजे मोठ्या जबाबदारीचे काम होते. शाखा डाकघरांची नियमित तपासणी करणे ही मुख्य जबाबदारी मेल ओव्हरसिअरची असायची. जर एखाद्या शाखा डाकपालाने काही गफला केला तर त्याची पहिली जबाबदारी मेल ओव्हरसिअरवर थोपवली जायची.
     त्याकाळात सर्व पत्रव्यवहार पोस्टानेच होई. कोणी जन्माला आले किंवा कोणी मरण पावले तर ती बातमी पत्रानेच समजायची. त्यामुळे पत्रांच्या वितरणावर पोस्ट खात्याची बारीक नजर असायची. एक आण्याला मिळणारे पोस्टकार्ड जर नियत काळापेक्षा उशिरा वितरीत झाल्याचे सिध्द झाले तर त्याला जबाबदार असणाऱ्या कर्मचाऱ्याला तात्काळ कामावरुन निलंबित करण्यात येत असे. अशा प्रकारची कार्यवाही करण्याचे अधिकार तेव्हा ओव्हरसिअरला देखिल असत.
     शाखा डाकपालांचे दैनंदिन हिशेब तपासणे, पोस्टाच्या बचत खात्यांच्या खातेदारांना त्यांच्या घरी जाऊन भेटून त्यांच्या पासबुकांची तपासणी करणे आणि त्यात काही गफलत असेल तर तसा रिपोर्ट करुन योग्य ती कार्यवाही करणे, खेडोपाडी जाऊन तेथिल लेटर बॉक्स वेळेवर उघडले जातात का नाही ते तपासणे, शाखा डाकघरांतुन वितरणाला जाणाऱा कर्मचारी नियमितपणे खेडेगावांना भेट देतो की नाही हे तपासणे अशी अनेक जबाबदारीची कामे ओव्हरसिअरला करावी लागत असत. त्याच्या पोस्टचे नांव ओव्हरसिअर असले तरी तो वठवित असलेली भूमिका इन्स्पेक्टरचीच असायची. फार तर सब इन्स्पेक्टर म्हणूया. हे जबाबदारीचे काम बंधूंनी समर्थपणाने पेलले. या कामामध्ये रोजचा प्रवास, रोज नवे नांव, रोज वेगळे पाणी, वेगळे जेवण यामुळे प्रकृतीला हे त्रासदायक असायचे. याशिवाय दररोजचे टेन्शन एखादा गफला झाला आणि तो नजरेआड झाला तर पहिली कारवाई ओव्हरसिअरवर व्हायची.   
     मेल ओव्हरसिरची नोकरी बरेच दिवस केल्यावर त्यांनी क्लार्कची परिक्षा देण्याच्या दृष्टीने तयारी सुरु केली. परंतु घोडे इंग्रजीशी अडू लागले कारण त्यांचे शिक्षण कौटुंबीक परिस्थिती मुळे कमी झाले होते. त्यामुळे त्यांना इंग्रजीचा  बाऊ वाटत असे. पोस्टाच्या नियमाची सर्व पुस्तके त्या काळांत इंग्रजीतच असत. तेव्हा त्यांनी श्रीवर्धनचे चितळे मास्तर व्ही. सी. जोशी सरांकडे इंग्रजी शिकणे सुरु केले. त्यांना या कामात माझ्या माहितीप्रमाणे त्यावेळी श्रीवर्धन येथे असणारे पोस्टमास्तर वैद्य आणि कोल्हटकर यांनी मदत केली. आणि त्यांना क्लार्कची परिक्षा देण्यास मनाने आणि अभ्यासाने तयार केले. यामधिल वैद्यमास्तर हे श्रीवर्धन येथील पेशवे आळीतिलच होते. बंधू सांगायचे त्याप्रमाणे एखाद्या वकिलाला जसे सर्व कायदे मुखोद्गत असावेत तसे वैद्य मास्तरांचे पोस्टाचे नियम कोणत्या पुस्तकांत कोणत्या पानावर आहेत हे तोंड पाठ होते. अशा माणसाचे बंधूंना पाठबळ होते म्हटल्यावर बंधू क्लार्कच्या परिक्षेचे शिवधनुष्य पेलणार नाहीत असे होणारच नाही. अर्थातच बंधू पोस्टल क्लार्क झाले.
     काही वर्षे क्लार्कचे काम केल्यानंतर त्यांची बदली बोर्लीपंचतन येथे झाली. तेथे त्यांना भिसे साहेब पोस्टमास्तर होते. भिसेमास्तर शिस्तप्रिय आणि सर्व नियमांची जाण असणारे होते. बंधूदेखिल त्याच प्रवृत्तीचे होते त्यामुळे त्यांचे तेथे छान मेतकूट जुळले. नियमांच्या बारकाव्या वरुन त्यांचे आणि भिसे साहेबांचे कधी वाद होत असत. परंतु त्यातुन त्या नियमांचे नव्याने ज्ञान होत असे. तेथे अनेकवेळा सिंगल हँडेड पोस्टमास्तर म्हणून स्वतंत्रपणाने काम करण्याचा अनुभव बंधूंना मिळाला, अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या.
     त्यानंतर त्यांनी अनेक वर्षे सिंगल हँडेड पोस्टमास्तर म्हणून काम केले. त्यात बागमांडला हे त्यांचे अशाप्रकारचे पहिले ऑफिस. येथे त्यांचा स्वतंत्र संसार सुरु झाला. सुरवातिला गाडग्या मडक्यांच्या सहाय्याने सुरु केलेला संसार पुढे भरभराटीला आला. तिथपर्यंत माझा आणि त्यांचा परिचय नव्हता. मी पोस्टांत नोकरीला लागेपर्यंत पोस्टाशी देखिल संबध नव्हता. मी जेव्हा पोस्टमन म्हणून श्रीवर्धन येथे हजर झालो तेव्हा बंधूंचा मला अभिनंदनाचा फोन आला होता. ही त्यांची आणि माझी पहिली अप्रत्यक्ष भेट. त्यानंतर त्यांची बदली श्रीवर्धन येथे झाली तेव्हा त्यांची प्रत्यक्ष भेट झाली. त्यानंतर परिचय वाढत गेला. दरम्यान त्यांची दिवेआगर, म्हसळा येथे बदली झालेली होती. त्यानंतर मी जेव्हा क्लार्कची परिक्षा पास झालो तेव्हा माझे पहिले पोस्टींग दिवेआगर येथे झाले होते. त्यावेळी बंधू तिथे पोस्टमास्तर म्हणून काम पहात होते.
     दिवेआगरयेथे माझी प्रमोशनवर बदली झाली परंतु आर्थिक परिस्थिती खालावली कारण श्रीवर्धन येथे स्वत:च्या घरात रहात होतो. पोस्टमन म्हणून कपडे, जोडे, छत्री सर्व सरकारी मिळत असे. येथे त्याच्या उलट होते. पगार वाढला पस्तिस रुपये आणि खर्च वाढला दोनशे रुपये. कारण घरभाडे आणि इतर खर्च वाढला होता. तेव्हा मला बंधूनी खूप धीर दिला कारण तेही या परिस्थितीतुन गेले होते. त्यांनी दिवेआगर मध्ये अनेक माणसे जोडली होती, लोकाचा त्यांच्यावर पूर्ण विश्वास होता. बंधूंनी त्यांच्या परिचयाचे आणि अगदी कुटूंबातिल एकच असल्यासारखे असणारे बाळ करमरकर उर्फ भाऊ यांच्याकडे मला रहायला जागा मिळवुन दिली. ते घर पोस्टाच्या अगदी जवळ होते. त्यानंतर करमरकर कुटूंबाचा परिचय खूप वाढला आणि आम्ही त्यांच्या कुटूंबातलेच एक झालो.
     केमनाईक, वाकणकर आणि करमरकर यांचे जणू एक कुटूंबच तेथे स्थापित झाले होते. तेथे आम्ही प्रथम जिलेबी तयार करायचा प्रयत्न केला होता. त्यानंतर अनेक वेळा आम्ही हा प्रयोग केला होता. इतके की, तेथिल दुकानदार प्रकाश दातार त्यांच्या दुकानात गेल्यावर  आम्हाला बरेच दिवसात जिलेबी झाली नाही कां? असे विचारायला लागले होते. आमच्या तिन कुटूंबाचा अनेकवेळी एकत्र जेवणाचा कार्यक्रम होई. त्याला कोणतेच कारण लागत नसे. आले मनांत की लगेचच अमलात आणले जाई.
     बंधूच्याकडे मी पोस्टाच्या कामा संदर्भात अनेक गोष्टी शिकलो. पोस्टाचे अहर्निशं सेवा महे हे ब्रीदवाक्य ते अक्षरश: जगत होते. वास्तविक दिवेआगर पोस्टाची वेळ सात वाजता सुरु होई, परंतु ते सकाळी साडेसहालाच तयार होऊन कामावर हजर झालेले असत. त्याला कारण होते तेथिल शाखा डाकघरांचे टपाल घेऊन जाणारी गाडी सकाळी साडे सहाला दिवेआगर गावात जायची आणि सात वाजता परत फिरुन  घेऊन जायची. या दिवेआगर गावात जाऊन परत येण्याच्या काळात बंधू शाखा डाकघराकडून आलेला हिशेब तपासुन त्यात काही गफलत असेल तर परत जाणाऱ्या टपालाबरोबर तसा निरोप द्यायचे.
            सध्या स्वच्छ भारत या योजनेला खूप प्रसिध्दी देण्यांत येत आहे. परंतु बंधू आपल्या कार्यालयात आणि त्याच्या परिसरात स्वच्छते बाबत खूप दक्ष असत. कागदाचा अगदी छोटासा कपटा जरी पडलेला त्यांना दिसला तरी ते तो स्वत: उचलुन डस्टबीनमध्ये टाकीत असत. त्यामुळे व्हायचे काय की, दुसरा कोणी ऑफिसमध्ये कचरा करताना कचरायचा. स्वत: साहेब कचरा उचलतायत हे बघितल्यावर सर्व स्टाफवर त्याचा परिणाम व्हायचा. त्यामुळे बंधू असलेल्या ऑफिसमध्ये सर्व चकाचक असायचे. याची दखल प्रशासकिय अधिकाऱ्यांनी देखिल घेतली होती. त्यांना दोनवेळा स्वच्छ कार्यालचाचा खास पुरस्कार मिळाला होता.
     कोणत्याही कार्यालयामध्ये जशी स्वच्छता, उत्तम प्रशासन आवश्यक असते त्याचप्रमाणे दररोज निर्माण होणारे रेकॉर्ड व्यवस्थित ठेवणे देखिल अतिशय जरुरीचे असते. त्यामुळे जेव्हा आवश्यकता असेल तेव्हा ते त्वरीत मिळते. ठरावीक मुदतीनंतर पोस्ट ऑफिसमधिल रेकॉर्ड बाद होत असते त्याचे वेळीच डिस्पोजल करणे हे देखिल तितकेच महत्वाचे असते. हे काम करायला अनेकजण टाळाटाळ करीत असतात. नियमांची योग्य ज्ञान असेल ते सोपे असते. त्यामुळे नविन तयार होणाऱ्या रेकॉर्डला जागा तयार होत असते. हे सर्व काम बंधूच्या कार्यालयात अप टू डेट असायचे त्याबद्दल देखिल बंधूना प्रशासनाकडून पुरस्कार मिळाला होता. 
     पोस्ट खात्यात दर तिन वर्षांनी रिव्हीजन केस तयार करण्यांत येते. या रिव्हिजन केसचे महत्व स्टाफच्या दृष्टीने आणि जनतेच्या दृष्टीन देखिल खूप असते. कारण या रिव्हिजन केस मधुनच त्या त्या पोस्टामधिल स्टाफची संख्या ठरत असते. असलेला स्टाफ टिकवणे देखिल फार जिकिरीचे असते. कर्मचारी करत असलेल्या प्रत्येक कामाकरीता एक टाईम फॅक्टर असतो. तो अगदी सेकंदात मोजला जातो. त्यामुळे अगदी डोळ्यांत तेल घालुन रिव्हीजन केस बनवावी लागते. ती बनविण्या करीता आवश्वक असणाऱ्या खुब्या बंधूनी मला दिवेआगर येथे त्यांच्या हाताखाली काम करीत असताना शिकवल्या.
     पोस्टामध्ये बऱ्याच वेळा स्टाफ कमी आणि काम जास्त अशी परिस्थिती असते. त्याला कारण ही रिव्हीजन केस योग्य दक्षता न घेता बनविली जाणे हे होऊ शकते. अनेक वेळा टाईम फॅक्टर प्रमाणे पूर्ण वेळ कर्मचारी बसत नसतो. तेव्हा असलेल्या कर्मचाऱ्यांनाचे ते जास्तिचे काम करावे लागते. अशा वेळी अशी कामे जास्तवेळ बसुन करावी लागतात. कधी कधी त्याकामाकरीता नियमात बसत असेल तर ओव्हरटाईम भत्ता मंजूर केला जातो. तो देखिल खूपच अल्प असतो. परंतु त्याला देखिल टाईम फॅक्टर मध्ये बसवुन मंजूर करावा लागतो. ती सुध्दा एक  कसरत असे. या दोन गोष्टी बंधूनी मला उत्तम पध्दतीने शिकवल्या होत्या. त्यामुळे मी नंतर श्रीवर्धन, गोरेगांव, दासगांव आणि पाली या ऑफिसच्या देखिल रिव्हीजन केसेसे बनवल्या होत्या. त्या मी तयार करु शकलो याला बंधूंचे योग्य मार्गदर्शन हे एकमेव कारण होते.
      अशाच प्रकारे पोस्टात एक किचकट काम असते ते म्हणजे, मयत माणसाच्या वारसांना मयताच्या नावावर असलेली रक्कम अदा करणे. यात दोन प्रकार असतात. वारस नेमलेला असेल तर आणि नसेल तर वेगळ्या पध्दतीने ही कागदपत्रे तयार करावी लागायची. आमच्यामधले अनेकजण अशा केसेस टाळायच्या किंवा टोलवायचा प्रयत्न करायचे. परंतु नियमांची योग्य जाण आणि व्यवहार यांचा समतोल साधुन अशा प्रकारच्या केसेस कशा हाताळायच्या यांचे प्रात्यक्षिक बंधूंनी माझ्याकडून करवुन घेतले. त्यामुळे भविष्यात मला अशा केसेस करताना अडचण आली नाही. विशेषत: मी जेव्हा दासगांवला बदलुन गेलो तेव्हा तेथे दरड कोसळण्याची घटना नुकतीच घडली होती. तेथे प्राथमिक शाळेतिल मुलांची १५-२० खाती अशा पध्दतीने बंद करायची होती. त्या प्रत्येक खात्यात अगदी किरकोळ रक्कम जमा होती. परंतु त्या केसेस सहा सात महिने नुसत्याच टोलवल्या जात होत्या. माझ्या दिवेआगर येथील अनुभवाच्या जोरावर मी त्या अगदी कमी कालावधित पूर्ण केल्या होत्या.
     बंधूच्याकडे तेव्हा अनेक प्रकारच्या पोस्टाच्या दैनंदिन व्यवहारात न लागणाऱ्या फॉर्मस् चा खजिना होता. त्यामध्ये डुप्लिकेट पासबुक, डुप्लिकेट बचतपत्र मिळवण्याचा अर्जाचा फॉर्म, वारस नेमणे, बदलणे या सारखे क्वचित लागणारे फॉर्म असायचे. अशा प्रकारचे जवळपास शंभर प्रकारचे तरी फॉर्म त्यांच्या जवळ होते. ते फॉर्मस त्यांनी नंतर माझ्या ताब्यात दिले होते. त्या अर्थाने मी बंधूचा पोस्ट ऑफिसमधिल वारस होतो. पुढे पालीला बदलुन गेल्यावर मी त्याचे एक पी.डी.एफ्. मध्ये हँडबुक तयार केले व ते सर्व पोस्टाच्या स्टाफला विनामूल्य उपलब्ध करुन दिले होते. या शिवाय याची सॉफ्ट कॉपी आजही नेटवर उपलब्ध आहे.   
     बंधूंच्या मार्गदर्शनाखाली मी पोस्टातील नियमांचे आणि निरनिराळ्या तक्त्यांचे माझ्या उपयोगाकरीता एक डायरी तयार केली होती. ती नंतर मी सार्वजनिक केली. त्या डायरीत पोस्टाच्या काऊंटरवर काम करताना किंवा सिंगल हँडेड पोस्टमास्तर म्हणून काम करताना चांगला उपयोग होत असे. त्याचे देखिल मी पोस्टल हँडबुक हे पुस्तक तयार केले. हे पुस्तक देखिल तेव्हा मी सर्वांना मोफत उपलब्ध करुन दिले होते. त्याची देखिल सॉफ्टकॉपी नेटवर उपलब्ध आहे.  त्या पाठिमागची मूळ कल्पना बंधूंचीच होती. अशा प्रकारे बंधूची छाया माझ्या पौष्टीक(पोस्टातील कामकाजात) जीवनार पडलेली आहे.
     दिवेआगर आणि बागमांडला हे त्यांचे घरच होते. त्यांच्यावर डोळे मिटून विश्वास ठेवणारे या दोन्ही गावांत असंख्य लोक होते. त्याला कारण ते नेहमीच मोठ्या भावाच्या भूमिकेत असत. छोट्या पोस्टांत कॅश मॅनेजमेंट हा मोठा जिकिरीचा विषय असायचा. परंतु बंधूच्या लोकांशी असलेल्या घरगुती संबंधामुळे ते तो सहज सोडवायचे. त्याकाळात पोस्टामध्ये टारगेट हा विषय नसायचा, परंतु जेव्हा ग्रामिण डाक जिवन विमा हा नवीन सेवेचा प्रकार सुरु झाला तेव्हा त्याचे टारगेट देणे सुरु झाले. तेव्हा बंधूच्या मोठ्या भावाच्या भूमिकेची खूपच मदत झाली. आम्हाला तेव्हा कोणाच्याही घरी न जाता आमचे टारगेट पूर्ण करता यायचे. ते पोस्टाच्या बाहेरच्या बाकावर बसायचे तेव्हा तिथे अनेक जण यायचे त्यांची चौकशी करता करता ते उत्पन्न किती खर्च किती असे एखाद्याला सहज विचारायचे. त्यातुन शिल्ल्क रहाणारी रक्कम किती याचा हिशेब करुन त्याला पोस्टात खाते काढुन त्याला बचतीची सवय लावायचे. असे तेथे अनेकजण होते.
     अशा या माझ्या वडिल बंधूंना आणि पोस्टातील गुरुंना माझा मानाचा मुजरा. त्यांना निरामय दिर्घायुष्य लाभो ही परमेश्वराच्या चरणी प्रार्थना.  

।। जय जय रघुवीर समर्थ ।।

शुक्रवार, १९ जुलै, २०१९

हकिमबाबा

।।श्रीराम।।

मला भावलेले व्यक्तिमत्व:हकिमबाबा

          परवा सहज सायकलवर चक्कर मारायला बाहेर पडलो होतो. तेव्हा बुडन पाखाडी, सराई मोहल्ला, चौकर पाखाडी असा फिरत फिरत समुद्रावर गेलो होतो. त्यावेळी सराई मोहल्यातुन जाताना हकिमबाबांचा दवाखाना आणि दुकानाची जागा नजरेस पडली आणि जुन्या आठवणी जाग्या झाल्या. आपल्याला आयुष्यात अनेक प्रकारची माणसे भेटतात. प्रत्येकाचे व्यक्तिमत्व वेगळे असते. काहीजण आपल्या ह्रदयांत कायमची घर करुन बसतात. हकिमबाबा हे एक त्यातलेच व्यक्तिमत्व आहे. त्यांना विसरावे म्हटले तरी विसरता येणार नाही.
मी पोस्टमन म्हणून काम करताना त्यांना अनेक वेळा भेटलो. सुरवातिल पत्र टाकण्यापुरता संबंध होता. नंतर नंतर ओळख वाढत गेली. सराई मोहल्याच्या नाक्यावर त्यांचे दुकान आणि दवाखाना होता. त्याकाळात पोस्टाने पत्रव्यवहार जास्त होत असत. त्यामुळे त्यांच्या दुकानात पोस्टकार्ड, अंतर्देशिय पत्र, पाकिटे, मनी ऑर्डर फॉर्म विक्रिला ठेवलेले असत. मी जेव्हा पत्र वाटायला त्यांच्याकडे जात असे तेव्हा ते पोस्टातुन पोस्टाची स्टेशनरी(कार्ड, पाकिटे वगैरे) आणायला सांगत असत. कधी कधी अचानक आमची बीट बदलली जायची मग त्यांनी दिलेल्या पैश्यांची स्टेशनरी घेतली तरी लगेचच पोचवली जायची नाही. तरीही त्यांनी कधीही  अविश्वास दाखवला नाही. या व्यवहारातुन त्यांची ओळख वाढत गेली. सुरवातिला ते डॉक्टर आहेत हेच मला माहित नव्हते.
हकिमबाबा ही अतिशय धार्मिक व्यक्ती होती. तिन वेळचा त्यांचा नमाज कधी चुकला नाही. ते नियमितपणाने जशी अजमेर शरिफ येथे मनी ऑर्डर करायचे तशीच तुळजापुरला अथवा गाणगापुरला देखिल करायचे ते म्हणायचे मी कबीर पंथी आहे. त्यांनी नाशिक येथिल आयुर्वेद सेवा संघामध्ये आयुर्वेदाचे शिक्षण घेतले तर युनानी हकीमीचे शिक्षण उत्तर प्रदेशांत घेतले होते. एकुण जवळपास बारा वर्षे त्यांनी आयुर्वेद आणि युनानीचे शिक्षण घेतले होते.
त्यांच्याकडे शारंगधर संहितेची मूळ संस्कृत पोथी होती. त्यामध्ये निरनिराळ्या प्रकारचे काढे, भस्मे, रसायने, प्राश बनवायचे फॉर्म्युले होते. पूर्वी हकिमबाबा अनेक प्रकारची औषधे स्वत: बनवत असत. परंतु बाजारात तयार आयुर्वेदिक औषधे मिळायला लागल्यापासून त्यांनी औषधे बनवणे सोडले होते. नाशिकच्या दाते वैद्यांच्या आठवणी ते नेहमी सांगत असत. माझे एक चुलत चुलत आजोबा कै. धोंडो वाकणकर हे देखिल वैद्य होते. त्यांच्या आठवणी देखिल ते सांगत असत.
त्यांच्याकडे अनेक प्रकारचे काढे, आसवे, च्यवनप्राश सारखे प्राश, निरनिराळ्या मात्रा उपलब्ध असत. त्यांच्याकडे दुपारी खेडेगावातल्या रुग्णांची गर्दी होत असे. त्या रुग्णांवर ते अतिशय अल्पदरात उपचार करित असत. जुन्या दिर्घकाल असणाऱ्या रोगांवर ते खात्रीने उपचार करीत असत. मी देखिल अनेक वेळा किरकोळ किरकोळ रोगांवर त्यांच्याकडून उपचार घेत असे. आपल्या घरांत सहज उपलब्ध असणाऱ्या वस्तुंचा औषधी उपयोग ते सांगत असत. मला नेहमी तोड येण्याचा म्हणजेच छाले पडण्याचा त्रास होता. त्यावर त्यांनी त्याकाळी प्रत्येक घरी सहज उपलब्ध असणारे मायफळ उगाळुन लावायला सांगितले होते. त्याने मला ताबडतोब आराम पडत असे. त्यांनी सांगितलेला हा उपचार मी एका एम्. बी. बी. एस्. झालेल्या डॉक्टरांना देखिल सांगितला होता. विशेष म्हणजे त्या डॉक्टरांना त्या उपचाराचा लगेचच प्रत्यय देखिल आला होता.
हकिमबाबा जसे शरिरावरच्या रोगावर उपचार करित असत तसेच ते मानसिक रोगावर देखिल त्यांच्या पध्दतीने उपचार करीत असत. लोकांना हकिमबाबांना जादू टोणा करतात असे वाटायचे परंतु तो त्यांचा मानमिक उपचार असे. याबाबत मी त्यांच्याशी एकदा बोललो होतो. त्यावर त्यांनी सांगितले होते, ज्या रोग्याच्या मनात माझ्यावर करणी केली आहे, मला कुठलीतरी भूतबाधा झाली आहे असे ठाम बसले आहे. तो रोगी शरिरावर केलेल्या कोणत्याही  उपचाराने बरा होणार नाही. त्याला उपचार देखिल मानसिकच हवा. म्हणून ते त्या मानसिक रोगी असलेल्या रोग्याला उतारा वगैरे काढायला सांगत असत. त्यांच्या या उपचाराने आणि जोडीला आयुर्वेदिक औषधाने तो रोगी खडखडीत बरा होत असे.
या बाबतित मला माझ्या आतेभावाची गोष्ट आठवते तो प्राथमिक शिक्षक होता. या शिवाय खेडेगावांत पौराहित्यही करीत असे. त्याच्यावर अनेकांचा विश्वास होता. गुरुजींनी काही तोडगा सांगितला तर नक्की परिणाम होईल असा त्याच्या विषयी लोकांचा समज होता. एकदा मी त्याच्याकडे गेलो होतो. तेव्हा दोघीजणी सासवा सूना आल्या होत्या. त्या सासुचा  प्रश्न होता मुलाचे लग्न होऊन दोन वर्षे झाली तरी मुलबाळ काही नाही काहितरी तोडगा सांगा. त्यावर माझ्या भावाने त्यांना एका विड्याच्या पानावर हळदकुंकू, वगैरे साहित्य ठेवुन ठरावीक दिवशी तिन्हीसांजा ते पान मुलाने आणि सुनेने चव्हाट्यावर ठेवावे असे सांगितले.
त्या दोघीजणी निघुन गेल्यावर मी त्याला हे काय असे विचारले त्यावर त्याने सांगितले, अरे अनिल! या बाईचा मुलगा मुंबईत, आणि सून इथे गांवाला तेव्हा त्यांचे पोटपाणी पिकेलच कसे. परंतु मी जर असे सरळ सांगितले तर त्या बाईला पटणार नाही. परंतु आता मी सांगितलेला तोडगा पुरा करायला ती मुलाला गावाला बोलवेल त्यानंतर सुनेला आणि मुलाला  तो तोडगा पुरा करायसाठी एकत्र यावे लागेल हा असा माझा उपचार आहे. हकिमबाबा तरी काय वेगळे वागत होते. जसा रुग्ण तसा उपचार हे त्यांचे धोरण होते.
असे हे हकिमबाबा माझ्या कायम स्मरणात राहिलेले आहेत. माझ्या मनाचा एक कोपरा त्यांनी व्यापला आहे. पोस्टमन मधुन प्रमोशन झाल्यानंतर माझे श्रीवर्धन सुटले, त्यांचा संपर्कही तुटला. कधीतरी ते पैगंबरवासी झाल्याचे समजले. त्यांच्या दुकानावरुन जाताना हे सर्व आठवले. त्यांचे आता दुकान चालू दिसले परंतु दवाखाना मात्र बंद दिसला. त्यांच्या कडील शारंगधर संहितेतिल अनेक फॉर्म्युले मी लिहून घेतले होते. त्या वह्या कोणालातरी वाचायला दिल्या त्या त्याने परत केल्याच नाहित. त्यामुळे ती देखिल त्यांची आठवण आता शिल्लक नाही. त्यातल्या फॉर्म्युल्यावरुन मी आडुळशाचा काढा केला होता तो जवळपास दोन वर्षे आम्ही वापरत होतो.
अशा या हकिमबाबांना माझी ही आदरांजली.  

शनिवार, २ जून, २०१८

श्रीवर्धनचे चितळे मास्तर


श्रीवर्धनचे चितळे मास्तर
अनिल अनंत वाकणकर,
श्रीवर्धन, जिल्हा रायगड.
     परवा पु.लं.ची चितळे मास्तर ही कथा ऐकली आणि मला आमच्या गावांतिल व्ही.सी. जोशी सरांची आठवण आली. माझी त्यांची पहिली भेट झाली तेव्हा त्यांचे वय ६५ ते ७० च्या दरम्यान होते. ते जवळच असणाऱ्या दिवेआगर येथिल हायस्कूलला इंग्रजीचे शिक्षक होते. त्यांचे लहानपण अतिशय कष्टात गेले. कोकणातिल ब्राह्मण समाजातिल बहुसंख्य कुटुंबे पूर्वी जेमतेम खाऊन पिऊन सुखी या वर्णनात बसतिल अशीच असायची. त्यामुळे मुलांना शिकवायला उचलुन पैसे देणे शक्य नसायचे. गावात जिथपर्यंत शाळा असेल तिथपर्यत शिक्षण घ्यायचे आणि थांबायचे किंवा जर पुढील शिक्षण घ्यायची दुर्दम्य इच्छा असेल तर कष्ट करायची तयारी हवी. श्रीवर्धनमध्ये पूर्वी अगदी प्राथमिक स्तरावरचे शिक्षण मिळत असे. आतासुद्धा शिक्षणाची फार चांगली सोय आहे अशातला भाग नाही. परंतु सध्या हायस्कूल मुबलक आहेत आणि हल्ली कॉलेजचीही सोय झाली आहे.
     श्रीवर्धन हे तेव्हा जंजिरा संस्थानात होते. जर माध्यमिक किंवा इंग्रजी शिक्षण घ्यायचे असेल तर जंजिरा मुरुड येथे सोय होती. सध्या दळणवळणाची साधने खूप झाली आहेत परंतु व्ही. सी. सरांच्या काळात तशी काही सोय नव्हती. श्रीवर्धन ते दिघी हे तिस किलोमिटर अंतर चालत जायचे. त्यानंतर खाडीतुन पलिकडे जाण्याकरीता तर(होडी) असायची. त्या तरीतुन खोऱ्यात जायचे खोऱ्यातुन जंजिरा मुरुडला जायला परत पैची तर असायची. त्या तरीचे भाडे एक पै होते म्हणून तिला पैची तर असे म्हटले जायचे. जर श्रीवर्धनहून किंवा मुरुडहून निघायला उशिर झाला तर बोर्ली पंचतन येथे मुक्काम करावा लागायचा. कारण पुढे जंगल होते त्यात सर्वप्रकारची श्वापदे असायची.
     जंजिरा मुरुडला शिक्षणाला जाणाऱ्यांकरीता तिथे बोर्डींग असायचे. परंतु ब्राह्मण समाजाच्या मुलांना ती सोय उपलब्ध नव्हती. मुरुडला इंग्रजी शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या समोर दोनच पर्याय होते. एकतर नातेवाईकांकडे रहायचे किंवा वारावर शिक्षण घ्यायचे. जे पैसेवाले विद्यार्थी असायचे त्यांची सोय सहज व्हायची कारण ते पैसे मोजु शकायचे परंतु गरिबांना त्यांचे नातेवाईकही कायमचे ठेवायला तयार नसायचे. त्यात त्यांचा दोष होता असा भाग नाही परंतु त्यांची देखिल परिस्थिती त्याला कारण असे. अशा मुलांना नातेवाईकांकडे मुक्कामाला रहायच्या बदल्यात त्यांच्याकडची पडेल ते काम करायचे आणि रहायचे हाच पर्याय स्विकारावा लागे. रोजच्या जेवणाची सोय रोज वेगळ्या घरी करायची. ज्याच्याकडे जेवायला जायचे त्याला सकाळी जाऊन सांगायचे आज माझा वार तुमच्याकडे आहे. त्या बदल्यात त्यांच्याकडची पूजा करायची किंवा काही काम असेल तर करायचे. सगळेच वारवाले कनवाळु असायचेच असे नाही. कोणी शिळेपाके वाढायचे किंवा कोणी उरले सुरले वाढायचे. त्यामुळे पोट भरेलच याची खात्री नाही. कधी कधी एखादा वारवाला अचानक परगावी जायचा त्यामुळे बदली कोणीतरी शोधायचा. कोणी नाहीच मिळाला तर तो दिवस उपाशीच काढायचा.
     व्ही.सी सरांनी अशा प्रतिकुल परिस्थितीत आपले शिक्षण घेतले. त्यांना जरी स्वत:ला शिक्षणाकरीता कष्ट घ्यावे लागले असले तरी त्यांनी त्याचा परिणाम आपल्या अध्यापनावर पडुन दिला नाही. त्यांचे असंख्य विद्यार्थी त्यांचे नांव मोठ्या आदराने घेतात. माणसाचे मोठेपण त्याच्या अंत्यदर्शनाला कितीजण आले यावर मोजण्याची पद्धत आहे. जेव्हा व्ही.सी.सर वारले तेव्हा त्यांच्या अंत्यदर्शनाला सगळ्या स्तरांतुन त्यांचे विद्यार्थी आले होते माझ्या मते हेच त्यांचे वैभव होते.
     व्ही.सी. सरांचा मी काही शाळेतला विद्यार्थी नव्हे. कारण मी जेव्हा इंग्रजी शिकायला सुरवात केली तेव्हा ते सेवानिवृत्त होऊन बरीच वर्षे जाली होती. माझ्या सारख्या अनेक गरजु विद्यार्थ्यांना त्यांनी विनामोबदला शिकवले. सेवानिवृत्त झाले होते तरी त्यांच्याकडे इंग्रजी शिकायला येणार्या विद्यार्थ्यांची गर्दी असायची. त्यांची शिकवण्याची पद्धत मोठी विलक्षण असायची. ते शाळेतल्या पुस्तकातील फार कमी शिकवायचे. त्यांचा भर तडखर्कर पाठमाला या पुस्तकांवर असायचा. त्यांची तडखर्करांची तिनही पुस्तके पाठ होती. कोणत्या पानावर कोणता शब्द आहे. कोणता काळ कुठल्या पुस्तकात किती पानावर आहे हे ते अचूक सांगत असत.
     ते व्याकरण शिकवायचे ते फार मजेशिर असायचे. त्यांचा भर प्रॅक्टीकलवर जास्त असायचा. I am walking हे वाक्य ते चालुन दाखवायचे. I am crawling हे वाक्य शिकवताना ते चक्क रांगुन दाखवायचे. हाच प्रकार प्रत्येक क्रियापदाकरीता असायचा. रोज दहा शब्द पाठ करायला लावणे हे तर रोजचेच असायचे. जेव्हा ते दिलेली वाक्ये किंवा शब्द तपासत तेव्हा जर चुकले तर वही अक्षरश: फेकून द्यायचे. परंतु नंतर वह्यांच्या किमती वाढल्या आणि त्यांनी वह्या फेकून देणे सोडून दिले. त्यांच्याकडे मी तडखर्करांच्या तिनही पाठमाला शिकलो. आज मी जे काही चार शब्द इंग्रजीमध्ये लिहू शकतोय ती त्यांचीच कृपा आहे.
     त्यांच्या बद्दल एक गोष्ट आवर्जुन सांगाविशी वाटते. शिकवणीच्या वेळा सोडून जेव्हा जेव्हा मी त्यांना बघत असे तेव्हा त्यांच्या हातात झाडू असायचा. त्याचे अंगण कधीही पहा लख्ख असायचे. अंगणाच्या कुंपणीचे पान पिवळे झाले की, ते लगेचच ते काढुन टाकायचे. त्यांचे अंगण आणि रस्त्याच्या कडेच नगरपालीकेचे गटार ते नेहमी अगदी स्वच्छ ठेवायचे. जरा जरी घाण पडली तरी ते तत्परतेने उचलायचे. असा प्रकार मी हल्ली शेगावला गजानन महाराज संस्थानमध्ये पाहिला.  
     अशा या आमच्या व्ही. सी सरांना माझे त्रिवार वंदन.