मंगळवार, १५ सप्टेंबर, २०२०

पडवीवरचा दासबोध, दिवस पहिला.

 

।।श्रीराम।।

पडवीवरचा दासबोध

लेखिका- आशालता उर्फ आक्का वेलणकर



दिवस पहिला

     सुटलो बुआ एकदाचा हातवारे करीत गणपती आला. पडवीवर आल्यावर तर नाचायलाच सुरवात केली.

            गद्र्यांचा गणपती, काळ्यांचा विलास, गोऱ्यांचा मधुकर जमलं त्रिकूट.

     आम्ही पण सुटलो‘ चला, आता कसं मोकळ मोकळं वाटतयं, आरडाओरडीने पडवी चांगलीच दुमदुमली.

     ‘निकाल लागला की काय?’ आजच तर परिक्षा संपल्या. सुटलो सुटलो काय? त्यांच्याच वयाची साठ्यांची सुधा बाहेर येत म्हणाली.

     ‘म्हटलं आजीबाई, कटकटीतून सुटलो, सकाळी वर्ग- दुपारी शाळा, संध्याकाळी खेळावं म्हटलं तर अभ्यासाचं लफडं, जरा म्हणून मोकळीक नाही. सुटलो या कटकटीतूनच‘. गणपती एका दमात बोलला, व लागला पुन्हा नाचायला.

     ‘अरे, पण जरा हळू ओरडा. आत आजी पोथी वाचत आहेत‘. सुधा समजवणीच्या सुरात म्हणाली.

     तोच आजी हातात दासबोध घेऊनच बाहेर आल्या.

     बसा बाळांनो, ‘ऐकलं मी सारं. विलास, कसली रे कटकट’?

     ‘मी नाही म्हणालो. हा गण्या म्हणाला कटकट‘ विलासने खुलासा केला.

     ‘धप्‘! पाठीत धपाटा बसला विलासच्या.

     ‘अरे अरे कां मारतोस त्याला? आजी म्हणाल्या.

     ‘तो बघा नं मला गण्या म्हणतो. ‘ गणपतीची तक्रार.

     ‘मला विल्या म्हणतोस ते नाही सांगितलेस?’ विलास त्याला मारण्यासाठी सरसावला.

     शहाणी सुधा दोघांना सावरीत दोघांच्या मध्ये जाऊन बसली.

     ‘हे पहा बाळांनो, देवाने गोड वाणी दिली आहे. तिचा वापर सरळच करावा. आजच करु या आपण निश्चय. सगळ्यांनी एकमेकांना सरळ नावानेच हाक मारायची. ठऱलं हं. आणि गणपती अभ्यासाला कटकट म्हणायचं कां? आजींनी विचारले.

            गणपती म्हणाला, ‘कटकट नाहीतर काय‘? सकाळी सहा नाही वाजत तोवरच ‘उठ क्लासला जायचय.‘ बाबांनी पांघरुण काढून घ्यावे. कसे बसे उरकून क्लासला जाऊ यावे. तोच पाणी जाईल, आंघोळ करुन घे लवकर. आईचे टुमणे, जरा तासभर जात नाही तोच मार सायकल, शाळा लांब. शाळा सुटल्यावर क्लास करूनच ये. ताईचे दरडावणे, नुसता वैतागलो मी1 दिवसभराचा दमलो तरी उद्याचा अभ्यास करुन ठेव मग नीज. आई गरजलीच, कटकट शिंची!

            आजी हसतच म्हणाल्या, तुमच्या हितासाठीच ना मोठी माणसे सांगतात. पहाटे उठायची सवय लावलीत, अभ्यास नियमित केलांत तर वर्गाला शिकवणीला जायची गरजचं काय? हे बघ पुढील वर्षाची तयारी आत्तापासूनच सुरु करुया. मग कटकट वाटणार नाही.

     या दासबोधात समर्थ लहानांच काय पण मोठ्यांना सुध्दा सांगत आहेत. प्रात:काळी उठावे.

     थांबा, तुम्हाला दाखवतेच म्हणजे पटेल, आजींनी दशक अकरा मधला समास तिसरा उघडला आणि म्हणाल्या हे बघा.

     बघू बघू’, मधुकर पुढे सरसावला. आजींचा दासबोध हाती घेतला. पाने परतली गेली. बोटाला थुंकी लाऊन तो पाने पुढे मागे करू लागला.

     मधू दादा पोथीला थुंकी नको लाऊस. सुधाने सुचवले.

     तिला शाबास म्हणत आजींनी नेमकी ओवी दाखविली.

     मधुकरने ओवी वाचली.

     प्रातःकाळी उठावें | कांहीं पाठांतर करावे |

     येथानशक्ती  आठवावें | सर्वोत्तमासी ||११-३-१५|| श्रीराम।।

     आजी म्हणाल्या, मधुकर, दासबोधच काय कोणतेही पुस्तक, ग्रंथ, वही थुंकी लाऊन उघडू नये. घाण सवयी टाकाव्यात. पुस्तकांची वह्यांची काळजी घेऊन वापरणेही देवपूजाचे ठरेल.

     इतक्यांत सान्यांची जया पळतच आली.

     आजी आज सहावी गोष्ट संपली. तुम्ही सांगितलंत मला फार आवडलं. केशव पण रंगतोय. आज ऐकतो आणि तिच गोष्ट दुसऱ्या दिवशी मला सांगतो. चांगल लक्षांत रहात त्याच्या. आमचे दोन तास सहज मजेत जातात. जया म्हणाली.

     कोण केशव? तो आंधळा होय, काळे आणि फाटके कपडे असतात त्याचे. बाबा म्हणतात, गरीब, भिकारी त्यांची मैत्री नको. विलास पटकन बोलुन गेला.

     जया म्हणाली, विलास, तो पैशाने गरीब असेल. पण मनाने आणि विचाराने श्रीमंत आहे. खूप शिकेन ही त्याची जिद्द आहे. त्याची शाळा आणि पुस्तके वेगळी आहेत. त्याला अवांतर ज्ञानाची गरज आहे. ज्याला ज्याची गरज असते ते त्याला देण हेच खरं दान. होय की नाही आजी”?

     आजी म्हणाल्या, विलास जयाचे म्हणणे बरोबर आहे. ती परीक्षा संपल्यापासून त्याला दुपारचे वाचून दाखवते. ही तिची देवपूजाच. अशी भक्ती देवाला फार आवडते.

     पण भक्ती का करायची”? मधुकरने हळूच विचारले.

     सुधाने दासबोध उघडला, आजी यात आहे नाही कां?” भक्ती कां करायची?

     हो तर, हे बघ दशक पहिला समास पहिला त्यातली ही ओवी बघं. असे म्हणून आजींनी ओवी दाखविली. भक्तिचेन योगें देव | निश्चयें पावती मानव | ऐसा  आहे  अभिप्राव  |  ईये  ग्रन्थीं ||१-१-|| श्रीराम।।

     म्हणजे आम्हाला समजेल असे दासबोधात आहे तर!” गणपती उत्सुकतेने म्हणाला.

     होय तर! आता ही दुसरी ओवी वाच,असे म्हणून आजींनी दासबोध त्याच्या हातात दिला. जयाचा भावार्थ जैसा | तयास  लाभ  तैसा | मत्सर धरी जो पुंसा|  तयास तेंचि प्राप्त ||१-१-३८|| श्रीराम।।  

     शाबास, छान वाचलेस, आजी म्हणाल्या. केशवला वाचून दाखवून  त्याचे ज्ञान वाढवले, तर देव तिलाही ज्ञानात कमतरता येऊ देणार नाही. कारण ती शुध्द विचाराने देवाचीचच पूजा करीत आहे. हीच पूजा देवाला आवडते.

     मग मी ही त्या पांगळ्या शेखरला माझ्या सायकलवरुन शाळेत किंवा त्याचे दुकानात पोहोचवत जाईन मग ती देवपूजाच ठरेल, कां?” गणपतीने विचारले.

     नक्कीच, आजी ठामपणाने म्हणाल्या.

     जरा दबलेल्या आवाजात विलासने विचारले, आजी तुम्हाला एक विचारु?’ तुम्हाला देव व देवपूजा खरी कोणती हे कळलं, आम्हाला ते का कळत नाही?

     आजी हसल्या, छान विचारलेस. सगळ्यांना बुध्दी देतो त्या गणपतीचा उत्सव तुझ्या घरी होतो नां?’

     हो तर! विलास म्हणाला. दहा दिवस असतो गणपती मखरांत. खूप मजा येते. आरत्या, प्रसाद, मिरवणूक मजाच मजा.

     हे बघ विलास, आजी म्हणाल्या, आरतीचा आरडा ओरडा नी प्रसादाची चंगळ यासाठी नसतो, आणि नसावा गणपती उत्सव. त्या गणेशाची मनोभावे पूजा करुन त्याची कृपा हा खरा प्रसाद मिळवायचा असतो.

     हो पण आजी, मधुकरने विचारले, असले कसले विचित्र देव हो. एकाला तीन तोंड, एकाला लांबलचक सोंड. ते नाक म्हणे त्याचं. एकाला शेपूट. त्यांची पूजा करुन प्रसाद कसा मिळवायचा?”

     बरं झालं विचारलंस, आजी म्हणाल्या. ही त्या त्या शक्तीची काल्पनीक रुपे मानवानेच दिली. त्यांचे अर्थ कळायला हवेत. त्यासाठी बुध्दी हवी, ही बुध्दी देणारी शक्ती म्हणजेच गणपती.

     आजी मी सांगू?’ सुधा आजींना थांबवत म्हणाली. त्या गणपतीचे सुपासारखे कान सारखे हलतात. म्हणजे वाट्टेल ते ऐकू नका. घाण विचार उडवुन लावा व चांगले ते ऐका. त्याचे बारीक डोळे सांगतात की बारकाईने सगळीकडे पहा. मोठे पोट सांगते की..

     तिला थांबवत विलास म्हणाला, खूप खा, लठ्ठ व्हा. सगळेच खदखदून हसले.

     आजींनी दासबोध त्याचे हाती देत म्हटले, हे बघ विलास, समर्थ म्हणतात, वाच तू. विलासने वाचले, जयाचें आठवितां ध्यान | वाटे परम समाधान | नेत्रीं  रिघोनियां  मन  |  पांगुळे  सर्वांगी ||१-२-||श्रीराम।।

     समजलं!’ आजी म्हणाल्या. बुध्दीला तरतरी आणून देणाऱ्या गणपतीचे जर मनोभावे पूजन केले, दर्शन घेतले तर खूप समाधान लाभते. आनंद होतो. थट्टा मस्करी, अभद्र बोलणे, यातून मन बाहेर पडते. व डोळ्यातच येऊन रहाते, कोण? आपेल मन, म्हणजे मनांत सारखी तीच मूर्ती येऊन ठसते. चित्त एकाग्र होते. मग आपसूकच सगळी कामे कशी छान पार पाडतात.

     सुधाने मध्येच हात वर केला. ती म्हणाली, ही ओवी बघा आजी. जयासि ब्रह्मादिक वंदिती | तेथें मानव बापुडे किती |असो  प्राणी  मंदमती | तेहीं गणेश चिंतावा ||१-२-२७||श्रीराम।।

     स्वच्छ मनाने ब्रह्मा विष्णू महेश हे देवादिक ज्याला वंदन करतात. त्यापुढे मानवाची काय पाड? मानव देवांच्या पेक्षा कमी शक्तीचा, कमी बुध्दीचा. त्याने गणेशाला वंदन करावेच.ज्याची बुध्दी मंद असेल त्याने तर गणपतीची उपासना जरुर करावी.

     सुधा म्हणाली, आजी तुम्ही आम्हाला गणपती अथर्वशीर्ष शिकवाल कां? आम्ही सगळेच पाठ करु. होय नारे?’

     सर्वांनी होsss म्हणून हात वर केले.

     शंकेखोर विलास हळूच म्हणाला, पण आजी विद्येची देवता सरस्वती. मग गणपतीची उपासना पूजा प्रार्थना करायची कीं सरस्वतीची?’

     छान विचारलेस. आजींनी उत्तर दिले. विलास, सरस्वती हे गणपतीचेच एक अंग. ती शारदा काय करते, माहीत आहे? ही सहावी ओवी वाच.

     विलासने ती ओवी वाचली. जे अनंत ब्रह्मांडें घडी | लीळा विनोदेचि मोडी। आपण आदिपुरुषीं  दडी  |  मारून  राहे ||१-३-||श्रीराम।।

     शाबास, आजी म्हणाल्या. गमतीचा खेळ म्हणून मुली भातुकलीचा खेळ खेळतात नां? तशी ती सारी विश्वरचना करते. प्राणी, पशू, पक्षी सारे अगदी आकाशातले चंद्र, सूर्य सुध्दा निर्माण करते आणि मनात आले की सारे मोडते. मुली खेळ आवरुन बोळकी टोपल्यात ठेवतात. तस्सेच माया करते. पुन्हा मोठ्या देवाच्या इच्छेने केले म्हणून नामानिराळी होते. विश्वजननीच ती.

     माझा पत्त्यांचा बंगला मधुदादाने फुंकरीने मोडला व साबासुबा आजोबांच्या जवळ जाऊन बसला तस्सच नां?’ सुधाने विचारले.

     बाईसाहेब, तिला अडवीत मधू म्हणाला, पत्त्यांचा बंगला बांधलास तू आणि मोडला मी तसे हे नाही. तीच बांधते आणि तीच मोडते असे आजी म्हणतात. कळलं! होय की नाहीं आजी?

     होय. ती महामंगला अचाट कर्मे करते. आजी म्हणाल्या.

     विलास पुढे सरसावून म्हणाला, थांबा आजी, आत्ता ही महामंगला कोण आली? मघाशी सरस्वती म्हणालात. मग शारदा म्हणालांत. लगेच विश्वजननी म्हणालांत आत्ता महामंगला म्हणता किती नांवे ही. एकीचीच की, या सगळ्या वेगवेगळ्या आहेत?’

     हे बघ विलास तू कमलताईंना काय म्हणतोस?’ आजींनी विचारले.

     ती माझी आई आहे. मी तिला आई म्हणतो. विलासने उत्तर दिले.

     ठिक आहे, हा मधू काय म्हणतो त्यांना?’ आजींनी परत विचारले.

     विलासची आई असे म्हणतो. विलासने सांगितले.

     आणि सुमन, तुझी मुंबईची बहीण काय म्हणते?’ परत एकदा आजींनी विचारले.

     काकू, विलास म्हणाला.

     आजी मी त्यांना मावशी म्हणते. सुधा म्हणाली. आई नी कमल मावशी बहिणी सारख्या वागतात.

     गणपतीने हटकले, तू बोलू नको मधे मधे. सांगा आजी पुढे?”

     आजी म्हणाल्या, हे बघा कोणी आई, कोणी मामी, कोणी काकू, तर कोणी आत्या, कोणी मावशी, तर कोणी वन्स, तर कोणी वहिनी, तर कोणी ताई माई बाई. काहीही म्हटले तरी कमलताई एकच. तशी शारदा अनेक नावांनी ओळखली गेली तरी चैतन्य शक्ती एकच. ही ओवी पहा. सुधाने ओवी वाचली. जें जें दृष्टीनें देखिलें | जें जें  शब्दें वोळखिलें | जें जें मनास भासलें | तितुकें रूप जयेचें ||१-३-२४||श्रीराम।।

     आजी म्हणाल्या, आपण जे डोळ्यांनी पाहतो ते तिचेच रूप. शब्दाने जे कळते ते तिचेच रूप. मनाने कल्पिले ते तिचेच रुप. अशी ही सरस्वती. तिची उपासना केली की कटकट हा शब्दच रहात नाही.

     आता पांच वाजायला आलेत. थोडे मोकळ्या हवेत फिरा आणि दिवे लागणीचे आंत आपापल्या घरी परता.

     गणपती झटकन उठून म्हणाला, मग आम्ही उद्या पण येऊ कां? आमच्या करीता दासबोध काय आहे ते कळेल.

     या. या बरं. आजींनी दासबोध बासनात बांधला आणि त्या पण उठल्या.

    समर्थभक्त सौ. मेधाताई कुलकर्णी, उस्मानाबाद, यांनी या भागाचे केलेल्या अभिवाचानाच्या ध्वनी फितीची लिंक पुढिल प्रमाणे.

https://drive.google.com/file/d/148Xvs5BRrsEuQFKQVxJt_W5-NfWtJyxO/view?usp=sharing 

।। जय जय रघुवीर समर्थ ।।

 

 


बुधवार, १९ ऑगस्ट, २०२०



 ।। श्रीराम ।।

    ई साहित्य प्रतिष्टान या वेब साईटवर माझी पुढील पुस्तके उपलब्ध आहेत. कृपया आपण ती वाचावीत आणि इतरांनाही वाचायला सांगावित. प्रत्येक पुस्तकाची लिंक दिलेली आहे. आपण .

१) वृक्षमंदिर ही दिर्घकथा अथवा लघु कादंबरी आहे. त्यात स्वाध्याय परिवार आणि समर्थ संप्रदाय यांच्या विचाराची सांगड घालुन सामाजिक वनीकरणातुन रोजगार निर्मिती हा विषय घेतला आहे.

http://www.esahity.com/uploads/5/0/1/2/501218/vrukshmandir_anil_wakankar.pdf

२) सेवक भूषण या कथेत शासकिय सेवेत असताना समाजसेवा कशी करता येते याचा आदर्श सांगणारी पोस्टमनची कथा आहे.

३) गुरु दक्षिणा या कथेमध्ये आपले शालेय शिक्षण जरी पूर्ण झाले तरी आपण शिकत होतो त्या शाळेकरीता काय करु शकतो हे दाखवले आहे.

४) ब्रह्मणस्पती विनायक या कथेमध्ये बेरोजगार युवक काय करु शकतो याचा लेखाजोखा मांडला आहे. http://www.esahity.com/uploads/5/0/1/2/501218/vinayak_anil_wakankar.pdf

५) भाऊबीज या कथेमध्ये दुकानदाराने फसवल्यावर ग्राहक म्हणून आपण काय करु शकतो हे दाखविण्याचा प्रयत्न केला आहे.

)  सुंदर हा देश हे मी केलेल्या काश्मिर, हिमाचल प्रदेश, पंजाब आणि हरियाणा या भागातील सहलीचे प्रवासवर्णन केले आहे. त्यात जिथे जिथे गेलो तेथिल स्थान महात्म्य सांगण्याचा प्रयत्न केला आहे.


७) दुर्गा कवच या कथेत महाड येथे झालेल्या सावित्री पुल दुर्घटनेच्या आधारावर कथा बेतली आहे.

http://www.esahity.com/uploads/5/0/1/2/501218/durgakavach_anil_wakankar.pdf


८) प्रचिती दिव्यत्वाची - माझ्या आयुष्यात आतापर्यंत आलेल्या आणि परंतु  मनाला भावल्या. त्या जणू माझ्या काळजातला एक कप्पाच झाल्या. त्यातिल मोजक्या काही व्यक्तींचे व्यक्तीचित्र मी माझ्या शब्दांत साकारले. फेसबुक, व्हॉट्स अँपवर मी ते वेळोवेळी प्रकाशित केले. अनेकांनी त्यावर प्रतिक्रिया व्यक्त केल्या. काहिंनी मला अशीच व्यक्ती चित्रे रेखाटत रहा अशी प्रेमळ सूचना केली.
   आपल्याला जशा व्यक्ती भावतात तशाच काही काही जागा देखील आपल्याला जीव लावतात. जणू त्या जागा आपल्या काळजात घरच करतात. त्याचप्रमाणे काही झाडे देखील आपल्या कुटूंबाचाच एक भाग बनतात. अशाच मला भावलेल्या व्यक्तींचे, एका नारळाच्या झाडाचे आणि भावलेल्या दोन जागांचे देखील व्यक्तीचित्र या पुस्तकांत समाविष्ट केले आहे.  

    
        






८)

सोमवार, २२ जून, २०२०

मोहाचा नारळ

मोहाचा नारळ



अनिल अनंत वाकणकर,
श्रीवर्धन-रायगड
     काका! मोठ्या काळजीतुन मुक्त झालो! आत्ताच आपल्या परसातला माड आडवा करुन घेतला! आता आज रात्री पासुन मी निवांत झोपू शकेन! परवा माझ्या पुतण्याचा मला व्हॉटस् अँपवर मेसेज आला.
     दोन जूनला टी.व्ही.वरुन हवामान खात्यातर्फे जाहिर करण्यांत आले की, निसर्ग नांवाचे चक्रीवादळ तयार होत आहे आणि ते रायगड जिल्हयातील हरिहरेश्वर येथे दिनांक ३ जून रोजी दुपारी तीनच्या दरम्याने धडकेल. वाऱ्याचा वेग ताशी १०० ते १२० किलोमिटर एवढा असेल. टि.व्ही वरील ही बातमी ऐकल्यापासून आम्हा सर्वांच्याच डोळ्यासमोर आमच्या परसात असलेल्या ३५ ते ४० फूट उंचीच्या माडाचे चित्र डोळ्यासमोर दिसू लागले. सध्या हा माड आमचे रहाते घर, शेजारची चाळ आणि एक संडास यांच्या बरोबर मधोमध उभा आहे. एवढ्या मोठ्या वेगाने येणाऱ्या वाऱ्यांपुढे हा आपला माड निश्चितच शरण जाईल आणि कुठल्यातरी घराचा घात करेल असे सतत वाटत होते.
     दिनांक ३ रोजी दुपारी बारा वाजले तरी वातावरण शांत होते. वाऱ्याचा अजिबात पत्ता नव्हता. परंतु टी. व्ही वर आणि सर्व माध्यमांवर चक्रीवादळाच्या प्रगतीची रनींग कॉमेंट्री चालू होती. जस जशी ती कॉमेंट्री ऐकत होतो तसे काळजात धस्स होत होते. अखेर एक वाजल्यानंतर वाऱ्याचा वेग वाढायला सुरवात झाली. सर्वचजण आपापल्या घरांत जीव मुठीत घेऊन बसलेले होते. थोड्याच वेळात वीजेने राम म्हटला. त्यानंतर वाऱ्याने आपले तांडव सुरु केले. बघता बघता आमच्या घराचे कोने उडाले त्यानंतर कौलांच्या वरच्या रांगामधील कौले उडाली. शेजारच्या आंगणात असलेल्या आंब्याच्या झाडाने आपले स्थान सोडले. ते झाड आमच्या शेजाऱ्यांच्या पुढच्या पडवीवर पडले. त्याची एक फांदी आमच्या चिक्कूच्या झाडावर पडली. त्यामुळे चिक्कूच्या झाडाच्या एकामागोमाग एक फांद्या मोडून पडल्या. या प्रकारामध्ये अंगणातल्या मांडवाच्या कोपऱ्यातल्या पत्र्यांनी जमीनीवर उडी मारली. अंगणाच्या उजव्या बाजुला असलेली पोफळ चक्रीवादळात गोल गोल फिरुन पिंजली. अखेर तीही मोडून पडली.
     आजुबाजुच्या प्रत्येक वाडीतुन काही पडल्याचे, काही मोडल्याचे आवाज येत होते. या वाऱ्याचा झंझावाताच्या जोडीला आता पावसाने सुरवात केली. अखेर दुपारी चारच्या सुमाराला वारा शांत झाला पाऊस कमी झाला. या एवढ्या वाऱ्यामध्ये आमचा परसातला माड मात्र एखाद्या योध्याप्रमाणे त्या तुफानाला तोंड देत ठामपणाने उभा होता. मात्र तो महाकाय वाऱ्याच्या झंझावाताने थोडासा दक्षिणेकडे झुकला होता. आता घराघरामधुन लोक बाहेर पडून झालेल्या नुकसानीची पहाणी करीत होते. आमच्या आजुबाजुच्या प्रत्येक घराचे काही ना काही नुकसान झालेले होते. कोणाचे पत्र्याचे पूर्ण छप्पर उडाले होते. तर कोणाची कौले उडाली होती. कित्येक घरांवर जवळची झाडे कोसळली होती. प्रत्येकावरच हा प्रसंग आला होता त्यामुळे कोण कोणाचे सांत्वन करणार हा मोठा प्रश्न होता. वाडीमध्ये जाऊन बघायची त्यादिवशी कोणाची हिम्मतच झाली नाही. परंतु प्रत्येकजण तर्क करत होता. हा सगळा प्रकार मला माझ्या पुतण्याने रात्री अकरावाजता फोनवर सांगितला. सांगताना तो फक्त रडायचा बाकी होता. जीव मुठीत धरुन बसणे म्हणजे काय याचा त्याने प्रत्यक्ष अनुभव घेतला होता.
     या महाकाय वादळाच्या पार्श्वभूमीवर या वादळात तग धरुन राहिलेल्या आमच्या परसातल्या माडाची धोक्याची टांगती तलवार मात्र डोक्यावर कायम होती. परत केव्हाही वारा सुरु होईल आणि हा माड आपला घात करील ही भीती सतत कायम होती. वास्तवीक माडाला म्हणजे नारळाच्या झाडाला कल्पवृक्ष म्हणतात. मी माझ्या लहानपणापासून ऐकत आलो होतो की, नारळाचे झाड कधीही कोणाच्याही जीवाला इजा होऊ देत नाही. परंतु तो काळ वेगळा होता. प्रत्येकजण आपल्या मर्यादा पाळून होता. माणूस नेहमी मोठ्या झाडांपासून सुरक्षीत अंतरावर रहात होता. त्यावेळी माडाचा नारळ पडलाय म्हणून किंवा झाप पडलाय म्हणून कोणी जखमी झाल्याचे कधी ऐकले नव्हते. हल्ली शहरांमध्ये आपण बघतो, सोसायटीच्या कंपाऊंडमध्ये नारळाचे झाड लावलेले असते. हळू हळू ते मोठे होते. त्या झाडाखाली कार पार्कींग केली जाते. मग कधीतरी त्या माडाचा झाप अथवा नारळ त्या कारवर पडतो. गाडीचा पत्रा फाटतो, काच फुटते. याचा दोष त्या माडाला देऊन कसा चालेल.  
     वादळाच्या परिस्थितीतून सगळे थोडेफार सावरल्या नंतर आमच्या परसातल्या माडाला तोडायचे ठरले. परंतु आता सगळीकडेच झाडे उन्मळुन पडलेली होती. वीजेच्या खांबावर, तारांवर झाडे आणि झाडाच्या फांद्या पडल्या होत्या. अनेक घरांवर झाडे कोसळली होती. त्यामुळे एवढा मोठा चाळीस फूट उंचीचा घरांना धोकादायक झालेला माड तोडायचा म्हणजे कसबी तोड्याची जरुरी होती. आत्ताच्या परिस्थितीत त्यांचीच वानवा होती. कारण प्रत्येकाचेच काम तातडीचे होते. शेवटी आमच्या पाखाडीतील एकाला माझ्या पुतण्याने तयार केले. त्याची एक अडचण होती. त्याच्याकडे एकच कटर होता तो दुसरीकडे अडकला होता. त्यामुळे त्याला कटरची गरज होती. ती गरज देखील पुतण्याने भागवली. श्रीवर्धनमधील सर्व ए.टी.एम्. बंद होती म्हणून लागणाऱ्या पैशाची व्यवस्था करण्याकरीता पुतण्याने महाड गाठले. अशातऱ्हेने आमचा परसातला माड आज धारातिर्थी पडला. हे काम पूर्ण झाल्यावर त्याने मला व्हॉटस् अँपवर वरील मेसेज पाठवला. तो मेसेज वाचल्यानंतर मला त्या माडाच्या जन्मापासूनचा इतिहास आठवला.

*******
     आक्षीच्या स्तंभावरुन नागांवला जाणाऱ्या रस्त्यावर लगेचच पेठे गल्ली नावाची गल्ली आहे. त्या गल्लीतुन आत गेल्यावर समोरच पेठ्यांचे खाजगी गणपतीचे मंदिर आहे. त्या मंदिराकडे तोंडकरुन पेठ्यांचा भलामोठा वाडा आहे. त्या वाड्यामध्ये पेठेकाकू नांवाच्या आजी रहात होत्या. मी त्यांना पहिल्यांदा १९८५ साली पाहिले तेव्हा त्या जवळपास पंचाहत्तर वर्षांच्या असाव्यात. त्यांच्या घरामागे त्यांची नारळा पोफळींची वाडी होती. त्या वाडीच्या पाठिमागे त्यांचे भाट होते. त्या भाटाच्या मागे त्यांचीच शेती होती. वास्तवीक पेठेकांकूंच्या वयाचा विचार करता त्यांना त्यांच्या वाड्याचा पूर्ण केर काढणे देखील शक्य नव्हते. तरीही त्या शेतीवाडी सांभाळायची म्हणून आक्षीत एकट्या रहात होत्या. त्यांची मुलगी नाशिकला तर मुलगा मुंबईला रहात असे.
     माझे सासरे त्याच काळात आपला मुंबईचा संसार मोडून गांवी आक्षीला रहायला आले होते. गावी शेती वाडी करायची जोडीला म्हशी घेऊन त्यांनी दुधाचा व्यवसाय सुरु केला, त्याच्या जोडीला एक बैलजोडी घेऊन ते बैलगाडी भाड्याने लावीत असत. दारात असलेल्या गुराढोरांना चारापाण्याची व्यवस्था करणे मोठे जिकीरीचे काम असायचे. त्याकरीता ते सतत शोधात असायचे. त्याकरीता कुठे वाल निवडायला जा कुठे, भाताची मळणी चालू असेल तर तिथे जाऊन पेंढे खरेदी कर असा त्याचा व्याप चालू असायचा.
     याच काळांत एके दिवशी त्यांना पेठेकाकूंचा निरोप आला एकदा येऊन मला भेटून जा. येताना बायकोला देखील आण. पेठेकाकूंचा निरोप समजल्यावर माझे सासरे उभयता पेठेकाकूंना भेटायला गेले. पेठेकाकूंनी त्यांचे आणि माझ्या सासुबाईंचे स्वागत करुन झाल्यानंतर दोघांनाही विचारले, अरे बगाराम! माझे आता वय झाले आहे, त्यामुळे दारातल्या गणपतीची पूजा करणे मला जमत नाही रे! तू हल्लीच मुंबईहून आक्षीत रहायला आला आहेस, माझ्या या गणपतीची पूजा करायची जबाबदारी तू घेशील कां?
            त्यावर माझ्या सासऱ्यांनी गणपतीची पूजा करायचे कबुल केले. फक्त मीच नव्हे तर घरातिल कोणीतरी येऊन पूजा करुन जाईल असे सांगतले. त्यानंतर पेठेकाकूंचा आणि माझ्या सासुरवाडीचा घरोबा वाढला. पुढे माझे सासरे त्यांचे शेत करु लागले.
     काही काळाने आमचे लग्न झाले. आपल्याकडे लग्नामध्ये नवऱ्यामुलीची पाठवणी करताना असोली नारळाने ओटी भरायची पध्दत आहेच. त्याप्रमाणे आमच्या लग्नात पाटवणी करताना ओटी भरण्याकरीता म्हणून पेठेकाकूंनी त्यांच्या भाटातल्या मोहाच्या नारळाची सुकड आवर्जुन पाठवुन दिली होती. या नारळाचे वैशिष्ट म्हणजे हा नारळ सर्वसाधारण नारळाच्या दिडपट ते दुप्पट होईल एवढा मोठा होता. त्या नारळाचे खोबरे खवल्यावर मध्यम आकाराचे एकवीस मोदक सहज होत असत.
     लग्नांत ओटी भरलेली ती सुकडीला नंतर मोड आला त्यानंतर तो माडाचा रोपा आम्ही आमच्या परसात लावला. बघता बघता तो रोपा मोठा होऊ लागला. त्याच्या बरोबरच आम्ही दोन सिंगापुरी आणि एक केरळमधील संकरीत नाराळाचे रोपे लावले होते. त्यातील सिंगापुरी माडाला नारळ येऊन आठ दहा वर्षांत ते माड मरुन देखील गेले. केरळी माडाला देखील सात आठ वर्षांत नारळ यायला लागले होते. परंतु दहा वर्षे झाली, अकरा वर्षे जाली तरी हा मोहाचा माड मात्र नुसताच वाढत होता. त्यानंतर मात्र त्या माडाला नारळ यायला लागले.
     नारळाच्या झाडाला कल्पवृक्ष म्हणतात. त्याला कारण नारळाच्या झाडाचा कोणताच भाग निरुपयोगी नसतो. नारळाचे झाड लहान असले तरी त्याच्यापासुन झाप मिळतात. त्या झापांपासुन विणलेले झाप तयार होतात. पूर्वी घराचे पावसाच्या झडी पासुन रक्षण करण्याकरीता पागोळी बांधायला हे झाप उपयोगी पडत. पावसाळा सुरु होण्यापूर्वी कोळी लोक आपल्या मच्छीमारी नौका बंदरात आणून उभ्या करीत असत. नारळी पोर्णिमा होईपर्यंत त्या नौका शाकारुन ठेवीत असत. त्या नौका म्हणजेच गलबते शाकारायला माडाचे विणलेले झाप लागत असत. त्या सिझनमध्ये झापांचे दुर्भिक्ष निर्माण व्हायचे. याशिवाय त्या काळात आडोसा करायला कुड बांधले जायचे त्या कुडांना देखील विणलेले झाप उपयोगी पडायचे. कोंकणातिल गरीबाची  झोपडी देखील या झापांनी शाकारलेली आणि आडोसा म्हणून झापांच्या कुडांनी झाकलेली असायची. इतकेच नाही तर त्याकाळात घरोघरी फारसे संडास नव्हते. माडाच्या झापांनी कुडलेले गावठी संडास तेव्हा सगळीकडे सर्रास बघायला मिळायचे. त्याकाळात बाथरुम देखील झापांचे छप्पर, झापांच्या कुडाच्या भिंती आणि आंघोळीला बसायला मोठ्ठा जांभ्यादगडाचा चौरंग अशा पध्दतीचे असायचे.  आता प्लॅस्टीकचा जमाना आला त्यामुळे या इको फ्रेंडली वस्तूकडे दुर्लक्ष झालेले आहे. नारळाच्या झापांच्या पात्यामधिल हिर काढले की, त्याची उत्तम केरसुणी होते. तिला मात्र आजही खूप मागणी आहे. हिर काढुन उरलेल्या पात्या पाणी तापवायला जळवण म्हणून उपयोगी पडतात. हा झाला माडाला नारळ येईपर्यंत मिळणाऱ्या उत्पन्नाचा भाग.
     माडाला नारळ यायला लागल्यानंतर त्यापासून नारळ मिळतात. ते नारळ सोलल्यानंतर त्याची चोडे एकतर जळणाकरीता उपयोगी होतात. किंवा कसबी कारागिर असेल तर त्या चोडांपासुन उत्तम दोरी तयार करतो. या शिवाय हल्ली या चोडांपासून मॅट्रेसेस तयार करतात त्याला खूप मागणी आहे. नारळाची करवंटी सुध्दा उपयोगी आहे. तिच्यापासून तेल काढतात, ते तेल पावसात पाय सतत पाण्यामध्ये राहिल्यामुळे कुजतात त्यावर उत्तम एक औषध आहे. अशा तऱ्हेने एक नारळाचे झाड कितीप्रकारे उत्पन्न देते हे लक्षांत येते.
     काही कारणाने नारळाचे झाड पडले, मोडले किंवा अनेक वर्षांच्या सेवेतून निवृत्त होऊन धारातिर्थी पडले तर त्याचे खोड देखिल उपयोगी पडते. त्याच्या खोडापासुन घराकरीता टिकाऊ भाले किंवा वासे होतात. आमच्या जुन्या घरात माझ्या पणजोबांपासुनची माडाची भाले होती. जुन्या काळातील घर म्हणजे चार मेढी उभ्या करायच्या त्या मेढींवर माडाचे अखंड न चिरता भाल ठेवायचे, त्यावर माडाचेच खांब उभे करुन, त्यावर माडाचेच वासे घालायचे. त्या वाशांवर पोफळीच्या रिफा बांधायच्या त्यावर पोफळीच्या झावळ्यांनी घर शाकारायचे सर्व वस्तू मागच्या वाडीतल्या असायच्या. हे सगळे बांधण्याकरीता नारळाच्या चोडांपासुन बनवलेली दोरी आणि केळीचे सोपट यांचा वापर व्हायचा. अशा प्रकारे कोंकणातिल लोक या माडाच्या भरवश्यावर आत्मनिर्भर होते.  
     असा हा आमचा परसातला माड आमच्या लग्नाची जिती जागती आठवण होता. गेली चौतीसस वर्षे तो आम्हाला काही ना काही देत आला आहे. हा नारळ मोहाचा होता. जर उतरला तर त्याचे खोबरे खूप गोड लागायचे. नारळाची साईज देखील बाजरात मिळणाऱ्या केरळी नारळाच्या दुप्पट मोठी होती. त्या माडाच्या नारळाची रोपे अनेक ठिकाणी दिली होती. त्यातिल किती या वादळात तग धरुन आहेत देवजाणे. आता सुध्दा एवढ्या भयानक वादळात त्याने आम्हाला कोणतीही हानी पोचवीली नाही. आता तो आम्हाला धोकादायक वाटायला लागला कारण, आम्ही आमच्या मर्यादा ओलांडल्या. आमच्या घरापासुन तीस फुटावर असणाऱ्या या झाडाखाली आम्ही अतिक्रमण केले. आम्हाला रहायला घर कमी पडू लागले, आम्हाला सुखसोई हव्या म्हणून आम्ही त्याच्या छायेखाली गेलो. त्याची शिक्षा त्याने आम्हाला दिली नाही. त्याने आमच्यावर मोह दाखवुन आम्हाला माफच केले. परंतु आम्ही मात्र आमच्या मोहापायी त्याच्या या उपकाराची फेड त्याचा बळी देऊन केली. या जगात मानवाच्या जीवाला जादा महत्व आहे हेच खरे.
     अशा या गेली पस्तीस वर्षे माझ्या कुटूंबाच्या सहवासात असणाऱ्या आणि सतत काहीतरी देत रहाणाऱ्या आमच्या या मोहाच्या नारळाला माझी भावपूर्ण श्रध्दांजली.

शुक्रवार, १३ मार्च, २०२०

पद्मश्री डॉक्टर विष्णू श्रीधर तथा हरिभाऊ वाकणकर एक उत्तुंग व्यक्तिमत्व भाग पहिला


     
पद्मश्री डॉक्टर विष्णू श्रीधर तथा

हरिभाऊ वाकणकर एक उत्तुंग व्यक्तिमत्व
भाग पहिला


      दहा वर्षापूर्वी मला श्रीवर्धन तालुक्यांत रहात असणाऱ्या आम्हा वाकणकरांच्या चार घरांपलिकडे कोणी वाकणकर आहेत हेच माहित नव्हते. त्यानंतर अचानक माझ्या मनांत वाकणकर कुठे कुठे रहातात हे शोधावे असे आले. त्याकरीता प्रयत्न सुरु केले तेव्हा अक्षरश: वाकणकरांच्या माहितीचा धबधबाच समोर प्रकट झाला. वाकणकरांमध्ये अनेक दिग्गज व्यक्तिमत्वे होऊन गेली आणि सध्या देखिल आहेत. त्यामध्ये विशेष उल्लेख करायचा तर त्यात अग्रणी असलेले नांव आहे, पद्मश्री डॉक्टर विष्णू श्रीधर तथा हरिभाऊ वाकणकर.
     मी जेव्हा वाकणकरांचा शोध सुरु केला तेव्हा गुगल सर्च मध्ये नुसते वाकणकर नांव टाकले की, हरिभाऊंच्या बाबत माहिती असलेली अनेक पाने समोर यायची. या वर्षी हरिभाऊंची जन्म शताब्दी आहे. त्यानिमित्ताने संस्कार भारती तर्फे अनेक कार्यक्रम आयोजित केले जात आहेत. हरीभाऊंच्या कार्याची आपल्या परिचितांना ओळख व्हावी म्हणून या लेखाचा प्रपंच करीत आहे. हरिभाऊंच्या कार्याची नुसती ओळख करुन द्यायची म्हटली तरी मला अक्षरष: घाम फुटला आहे. ते खरोखरच शापित गंधर्व होते. त्यांनी हातात घेतलेली प्रचंड कामे पाहिली की, आपण किती क्षुद्र आहोत याची जाणिव होते. तेव्हा आता नमनालाच घडाभर तेल वाया न दवडता त्यांचा आणि त्यांच्या कार्याचा अल्प परिचय करुन द्यायचा प्रयत्न करीत आहे.
     हरिभाऊंचा जन्म मध्यप्रदेशांतिल मंदसौर जिल्र्ह्यातिल निमच या गांवी दिनांक ४ मे १९१९ रोजी झाला. त्याचे प्राथमिक शिक्षण मध्य प्रदेशांतच झाले. शालेय जीवनापासूनच त्यांना कलेविषयी, विशेषतः चित्रकलेबद्दल, ओढ होती. त्यांना निरनिराळ्या ठिकाणी फिरून चित्रे काढायला व प्रवास करायला आवडत असे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक म्हणून आदिवासींमधे समाजकार्य व शैक्षणिक कार्य करण्यासाठी ते घनदाट जंगलात जात असत. त्यांनी मुंबई येथे जी. डी. आर्ट केले.
     त्यांनी अखिल भारतिय विद्यार्थी परिषदचे मध्यप्रदेश प्रांत प्रमुख म्हणुन काम केले होते. ते काही वर्षे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक म्हणून काम करीत होते. राष्ट्रिय स्वयंसेवक संघाचे मध्यप्रदेशातिलच असलेले जेष्ट स्वयंसेवक श्री मोरोपंत पिंगळे यांनी हरिभाऊंना भारतिय संस्कृतीच्या इतिहासाचे दर्शन सर्व जगाला होईल असे संशोधन करण्याची मुख्य प्रेरणा दिली. आता मी त्यांच्या जिवनातिल महत्वाच्या संशोधनाविषयी मला जमेल तशी थोडक्यांत माहिती देणार आहे.
 १)  हरिभाऊंचे ऐतिहासिक संशोधन भिमबैठका येथिल कातळचित्रे(Rock Painting)  आणि गुंफा(Rock Shelters).
    १९५७ साली हरिभाऊ राष्ट्रिय स्वयंसेवक संघाच्या एका बैठकिला हजर रहाण्यासाठी नागपुरला जात होते. उज्जैनहून रेल्वेने नागपुर येथे जाताना त्यांची पॅसेंजर ट्रेन ओबेदुल्ला गंज या रेल्वे स्थानकात थांबली होती तेव्हा विंध्याचल पर्वत रांगांमध्ये त्यांना प्राचिन शिलाखंडांचा एक समुह दृष्टीस पडला. त्यांच्या अनुभवी नजरेने आणि त्यांच्यामध्ये लपुन बसलेल्या संशोधकाला त्यात विशेष काहीतरी आहे हे जाणवले. म्हणून त्यांनी आपला प्रवास अचानक संपवण्याचे ठरवुन ते तेथिल बरखेडा या रेल्वेच्या छोट्याशा स्थानकावर उतरले. नागर वेषातला कोणीतरी प्रवासी या जंगलातल्या छोट्याशा स्थानकावर उतरलेला बघुन तेथिल स्टेशन मास्तर देखिल चकीत झाला. त्याने त्यांची विचारपुस केली आणि त्यांना त्या दुर्गम प्रदेशात रात्रीच्यावेळी न जाता दिवस उजाडल्यावर जाण्याचा सल्ला दिला. तेथे तो स्टेशन मास्तर एकटाच रहात होता. त्याने आपल्याबरोबर हरिभाऊंचे देखिल जेवण बनवले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी पहाटेच हरिभाऊंनी त्या डोंगराकडे प्रस्थान केले.

तो दिवस होता २३ मार्च १९५७. हरिभाऊ जेव्हा जेव्हा अशाप्रकारे शोधकार्याला जात असत तेव्हा आपल्या खिशांत तिखटमीठ आणि बटाटे घेऊन जात असत. किंबहूना असे साहित्य त्यांच्याकडे कायमच असे. यावेळी देखिल त्यांच्या सोबत असेच बटाटे होते ते त्यांनी वाटेतल्या जामुनजेरी नावाच्या एका नाल्याच्या कोरड्या पात्रातील वाळूंत पुरले आणि आपल्या पुढीला मार्गाला लागले. तेथे त्यांना एक दुर्गा मंदिर दिसले. त्या दुर्गा मंदिरात शालिग्रामदासमहाराज होते. त्यांच्याशी मुलाखत झाल्यावर ते देखिल हरिभाऊंच्या सोबत सर्व परिसर त्यांना दाखवायला गेले.

     हरिभाऊंनी अनेक वर्षे आदिवासी विभागात आणि मध्यप्रदेशमधिल खेडेगावातून संघाचे काम केलेले होते त्यामुळे त्यांना स्थानिक भाषा चांगल्या बोलता येत असत. डोंगराजवळ गेल्यावर त्यांनी तेथिल स्थानिक आदिवासींकडे या मोठाल्या कातळांविषयी चौकशी केली तेव्हा त्यांना त्यांनी अनेक दंतकथा सांगितल्या.
     या शिलाखंडाचा आणि त्यातिल चित्रांचा संबंध पांडवांशी देखिल लावला जात असे. पांडव जेव्हा वनवासात होते तेव्हा ते या भागात रहात होते आणि येथे आजुबाजुला असलेली पठारे ही त्यांचे बैठकीचे स्थान होते म्हणून या भागाला भिमबैठका असे संबोधले जाते. या दंतकथेला अनुसरुनच येथे बाणगंगा नावाचे एक स्थान आहे. तशी बाणगंगा नावाची अनेक स्थाने भारतभर पसरलेली आहेत. पांडवांना लाक्षागृहात जाळण्याचा प्रयत्न केला असा महाभारतात उल्लेख आहे. त्याकथेला अनुसरुन या वनविभागाला लाखाजुवार असे संबोधले जाते. त्याचप्रमाणे येथे  पंडापुर आणि भिमपुर या नांवाची गांवे देखिल आहेत. दुसरी दंतकथा म्हणजे ही चित्रे जखणीने म्हणजे स्त्री भूताने काढली आहेत असा येथिल आदिवासींचा समज होता.
     हरिभाऊंनी आपल्या मदतनिसांसह येथिल सर्व शैलचित्रांचा(Rock Painting) अभ्यास केला. त्यांचे विषयवार ग्रुप बनवले. त्यामध्ये शिकारीची, युध्दाची, धार्मिक प्रसंगाची, नृत्याची अशी विविध प्रकारची चित्रे होती. प्रत्येक प्रकारच्या चित्रांच्या समुहाला त्यांनी स्वतंत्र नावे दिली होती. आजही तिच नांवे तेथे प्रचलित आहेत.  ते स्वत: चित्रकार होते, तसेच चित्रकला शिक्षक देखिल होते. त्यामुळे त्यांनी स्वत:  आणि त्यांच्या चित्रकला विद्यार्थ्यांच्या मदतीने सर्व शैलचित्रांचे स्केचेस काढले. आधुनिक कॅमेऱ्याच्या सहाय्याने त्यांचे चित्रिकरण केले.
     या भागात एकुण सात ठिकाणी अशाप्रकारच्या गुंफा(Rock Shelter) आणि कातळचित्रे आहेत. त्यामध्ये तीस हजार ते दहा हजार वर्षांपूर्वी पासुनची चित्रे त्यांना आढळली. ही सर्व कातळचित्रे(Rock Painting)  आणि गुंफा(Rock Shelter)  नऊ किलोमिटर परिसरांत पसरलेल्या आहेत. विध्यांचलाच्या १) विनायक, २) भोन्रावली, ३) भिमबैठका, ४) लाखाजुआर पूर्व ५)लाखाजुआर पश्चिम ६) झोंड्रा, ७)मुनीबाबकी पहाडी अशा सात टेकड्यावर  ही सर्व कातळ चित्रे(Rock Painting) आणि गुंफा(Rock Shelter)  त्यांना आढळल्या होत्या.
     आज आपण भिमबैठका येथे भेट देतो तेव्हा तिथे डांबरी रस्ता, प्रत्येक गुंफेपर्यंत जायला व्यवस्थित बांधलेली पायवाट अशा सुखासिन वाटेने जातो तरी आपल्याला दम लागतो. हरिभाऊंनी जेव्हा हे ठिकाण शोधुन काढले तेव्हा तेथे माणसाची वर्दळ फार कमी होती. त्यामुळे पायवाटा त्यासुध्दा खाचखळगे, काटेकुटे यांनी भरलेल्या होत्या. त्यातच सर्वत्र हिंस्त्र श्वापदांचा मुक्त वावर होता. अशा परिस्थितीत हरीभाऊ सतत पंधरा वर्षे स्वत:ची शिदोरी बरोबर घेऊन तिथे जात होते संशोधन करीत होते. सर्व परिसराचे डॉक्युमेंटेशन करत होते.
     या ठिकाणी एकुण ७६० गुंफा त्यांनी शोधुन काढल्या. या सर्व गुंफांमध्ये अनेक प्रकारची चित्रे काढलेली होती. या ७६० पैकी जवळपास ५००च्यावर गुंफांमध्ये गुंफेच्या छतांवरही चित्रे काढलेली आढळली आहेत. या सर्व गुफामध्ये पुरातन काळातिल कलेचा नमुना असलेल्या चित्रांचा अक्षरष: खजिनाच हरिभाऊंना सापडला होता. ही चित्रे काढण्याकरीता वापरलेले रंग वनस्पतींपासुन अथवा उपलब्ध असणाऱ्या खजिनांमधुन म्हणजेच गेरु वगैरे नैसर्गिक साधने यांच्यापासुन बनवले होते. त्यामध्ये पांढरा, लाल आणि हिरवा रंग वापरल्याचे आपल्याला आढळते.
     या चित्रांमध्ये ह्त्ती, घोडे, वाघ, शेतकरी, निरनिराळी शेतीची अवजारे, भाला, काठी यासारखी शिकारीची अवजारे यांची चित्रे आपल्याला आढळतात. आपण म्हणतो भारत मागासलेला देश आहे. परंतु तीस हजार वर्षापूर्वी जेथे बाकीचे जगच अस्तित्वात होते का नाही य़ाची खात्री नाही तेथे चिरंतन टिकणारी काळाच्या ओघात निरनिराळ्या नैसर्गिक आपत्तींना तोड देऊनही तगुन राहीलेली कलाकृती आज आपण येथे पाहू शकतो. या सर्व चित्रांमधुन एक एक संदेश दिलेला असतो. ती ती चित्रे त्याकाळातल्या घटनांचे प्रतिनिधित्व करीत असतात. त्यामुळे या चित्रांना ऐतिहासिक महत्व आहे. या चित्रांना एक भाषा आहे, मात्र ती भाषा ओळखणारा तज्ञ तेथे पाहिजे, तोच या सर्व चित्रांतुन दिलेला संदेश उलगडु शकेल.

     त्यानंतर १९७२ साली येथे पुरातत्वीय उत्खनन केले गेले. त्या उत्खननात हरिभाऊंना पाषाणयुगातिल हत्यारे सापडली. त्यामध्ये दगडाचे भाले, कुऱ्हाड अशी अनेक प्रकारची हत्यारे होती. ती आपल्याला उज्जैन येथिल वाकणकर म्युझियम मध्ये पहायला मिळतिल. त्यावरुने येथे लाखो वर्षांपूर्वी देखिल मानवी वस्ती होती हे पुराव्याने सिध्द झाले आहे. या परिसरातील एका उत्खननात त्यांना एका छोट्या मुलाचे दहा हजार वर्षापूर्वीचे शव मिळाले. ते आतापर्यंत जगात मिळालेल्या शवांमध्ये सर्वात पुरातन आहे. त्याचा अभ्यास करण्याकरीता जगभरातुन अनेक संशोधक विक्रम युनिव्हर्सिटीमध्ये येतात.
     या सर्व संशोधनाचे सादरीकरण त्यांनी फ्रान्समध्ये भरलेल्या पुरातत्वशास्त्रज्ञांच्या एका परिषदेमध्ये सर्वप्रथम सादर केले. युरोप अमेरिकेतही या सर्व चित्रांचे प्रदर्शन आणि सादरीकरण त्यांनी व्याख्यानांसह केले. त्यानंतर रितसर संशोधनानंतर युनेश्कोने त्यांच्या या संशोधनाला मान्यता दिली. भारतिय पुरातत्व खात्याने ऑगस्ट १९९० मध्ये भिमबैठकाला राष्ट्रिय वारसा स्थळ म्हणून घोषित केले. यानंतर २००३ साली या स्थळाला जागतिक वारसा म्हणून युनेस्कोने जाहिर केले.
     या पाषाण चित्रांचे पुरातत्व शास्त्रानुसार रितसर संशोधन व्हावे या हेतूने हरिभाऊंनी पुण्याच्या डेक्कन कॉलेजमधिल जेष्ट पुरातत्वशास्त्रज्ञ प्रा. एच्. डि. सांकरिया यांच्या मार्गदर्शनाखाली या गुंफाचित्रांवर शोधनिबंध सादर केला. या त्यांच्या संशोधनाला पी. एच् डि देण्यांत आली. अशातऱ्हेने हरिभाऊ डॉ. विष्णू श्रीधर वाकणकर झाले.

         जगाने देखिल त्यांच्या या संशोधनाची दखल घेतली. त्यांना जगातिल अनेक देशांनी या आणि संशोधनाशी संबधित अनेक विषयांत मार्गदर्शन करण्या करीता त्यांना मानाने बोलावले होते. त्यांनी परदेशांत व्हरकोनियम या रोमन साईटवर इंग्लंड येथे १९६१ साली, फ्रान्स मध्ये इनकेलिव्ह येथे १९६२ मध्ये त्यांनी उत्खनन केले होते.
हरिभाऊंनी चार हजारपेक्षा जास्त कातळ शिल्पे, कातळ चित्रे शोधुन काढली आणि त्यांचा अभ्यास केला. महेश्वर येथे १९५४ मध्ये, नावडा टोली येथे १९५५ मध्ये, इंद्रगड येथे १९५९ मध्ये, मनोटी आणि आवरा येथे १९६० मध्ये, कायथा येथे १९६६ मध्ये, आझादनगर आणि दंगवाडा येथे १९७४ मध्ये, रुनिजा येथे १९८० मध्ये पुरातत्वीय उत्खनन केले.

*******