शनिवार, ८ ऑक्टोबर, २०१६

दुर्गा कवच भाग १

दुर्गा कवच

भाग १
तप्तस्वर्णो ज्वलांगी धृतमहिषशिखां धारयंतीं त्रिशुलम्।
खङंगचर्मो S पि दोर्भि: प्रबलरिपुगणां त्रासयंतीं कटाक्षै:।।
सिंहस्कंधादिरुढां त्रिनयन लसितां सेवितां सिद्धसंङगै:।
आर्यादुर्गाभजेहं भजनपरजन: नंददात्रीं प्रसन्नाम्।।
      अनिकेतने आर्यादुर्गेच्या समोर डोळे मिटुन नतमस्तक होऊन मनातल्या मनांत ध्यान मंत्र म्हणू लागला. अनिकेतच्या बाजुला त्याची पत्नी आर्या देखिल अतिशय भक्तिभावाने देवीसमोर नतमस्तक झाली होती.
नुकतेच त्यांचे देवी हंसोळ येथे आगमन झाले होते. नेहमीच्या प्रथेप्रमाणे प्रथम देवीच्या मंदिरात जाउन देवीचे दर्शन घेण्यासाठी आता ते आले होते. त्यांच्याबरोबर अनिकेतचे आई-बाबा आणि आर्याचे आईबाबा देखिल आले होते. मंदिरामध्ये आता अजिबात गर्दी नव्हती. देवीचे पुजारी तिन्हीसांजा झाल्याने दिवाबत्ती करत होते. ही पांचजणे आणि पुजारी यांच्या व्यतिरिक्त मंदिरात आता कोणीही नव्हते. त्यांचा ड्रायव्हर दिनेश त्त्यांनी आणलेली स्कार्पिओ समोरच असलेल्या भक्तनिवास मध्ये लावित होता. कारण आज ते तेथेच मुक्काम करणार होते.
      अनिकेतने पुजारी काकांना विचारले काका! आपले उपाध्ये गुरुजी आज आले नाहित कां?
      त्यावर पुजारी म्हणाले, नाही ते आले होते पण थोड्यावेळापूर्वीच घरी गेलेत! सकाळी येतिल! काही काम होते कां?
      त्यावर अनिकेतने सांगितले, हो मला उद्या अभिषेक करावयाचा आहे!
      त्यानंतर सर्वजण मंदिरासमोर असलेल्या भक्त निवासमध्ये गेले. तेथिल व्यवस्थापक श्री जोशी यांनी त्यांचे स्वागत केले. आज आषाढ महिन्याची चतुर्दशी होती. उद्याच अमावस्या असल्याने पावसाचा जोर भरपुर होता. आजुबाजुचे डोंगर देखिल दिसेनासे झाले होते. पावसाने पाण्याची जणू चादरच धरली होती. पडणा-या पाण्याचा आवाज इतका मोठ्ठा आवाज येत होता, की आपसातले बोलणे देखिल ऐकु येत नव्हते. व्यवस्थापक जोशी यांनी किचनमधुन गरमागरम वाफाळलेला चहा आणला. त्या चहाकडे पाहून सर्व मंडळी खूष झाली.
            सर्वप्रथम मी आपली सर्वांशी ओळख करुन देतो, अनिकेतचे बाबा श्री अशोक फणसळकर श्री जोशी यांना म्हणाले. मी, अशोक फणसळकर, हा माझा मुलगा अनिकेत आणि ही त्याची पत्नी आर्या. ही माझी पत्नी अनघा, हे आर्याचे बाबा मुकुंद पाटणकर आणि या त्यांच्या पत्नी सौ. मोहीनी पाटणकर. आपली तशी पूर्वीपासुनची ओळख आहेच. आम्ही सध्या सुरत येथे माझ्या मुलाकडे अनिकेत कडेच रहातो. आणि आमचे व्याही त्यांच्या मुलाकडे पुण्याला असतात.
      माझ्या मुलाने अनिकेतने आपल्या भक्तनिवासचे ऑनलाईन बुकींग केलेले आहे. या त्याच्या प्रिंटस. जोशींनी त्या प्रिंटस घेउन त्यांना आलेल्या ई मेल बरोबर पडताळुन पाहिल्या. त्यानंतर त्यांनी आपल्या सर्वांकडे आपली ओळखपत्रे आहेत ना, असे विचारले. त्यावर सर्वांनी होकार देताच त्यांनी अनिकेतकडे त्याचे ओळखपत्र प्रिंट काढण्याकरिता मागितले. ते त्याने देताच त्यांनी लगेचच रिसेप्शन काऊंटरवर असलेल्या फॅक्स मशीन मधुन त्याची प्रिंट काढली. अँडमिशन प्रोसेस पूर्ण करुन झाल्यावर त्यांनी दुस-या मजल्यावरिल खोल्या उघडुन दिल्या. तिथे एकुण तिन रुम होत्या, त्यात तिनही जोडप्यांनी आपापले सामान नेले. त्यानंतर रुममध्येच असणा-या गरमपाण्याच्या सहाय्याने सगळेजण फ्रेश झाले. त्यांच्या ड्रायव्हरची सोय जोशी यांनी तळमजल्यावर लाऊन दिली.
      थोड्यावेळाने अनिकेतचे बाबा आपले आवरुन खाली येऊन श्री जोशी यांच्या बरोबर बोलत बसले. तशी त्यांची पूर्वीपासुनची ओळख होती. अनिकेतचे बाबा गेली अनेक वर्षे आपल्या कुलस्वामीनीला येत होते. देवी हंसोळ येथे आल्यावर ते नेहमी याच भक्त निवास मध्ये मुक्काम करित असत. सुरवातिला हा भक्त निवास अगदी छोटा होता. आता दोन मजली सुसज्ज इमारतिमध्ये त्याचा विस्तार झालेला होता. सोलर सिस्टीम, वाय् फाय्, पार्कींगची सोय, प्रत्येक रुम मध्ये दूरदर्शन संच अशा सर्व सुविधा सध्याच्या भक्त निवासात उपलब्ध होत्या. दुस-या मजल्यावरच्या खोल्या ए. सी केलेल्या होत्या. शुभ कार्याकरिता सुसज्ज हॉल देखिल बांधला होता. ऑनलाईन रुम बुकींगची सुविधाही उपलब्ध करुन दिलेली होती. त्यामुळे अनिकेतने रुमचे बुकींग ऑनलाईनच केलेले होते.
      भक्तनिवासचा एकदम कायापालट झालेला दिसत आहे! अशोकराव जोशींना बोलले.
त्यावर त्यांनी हो! सरकारच्या तिर्थक्षेत्र विकास कार्यक्रमा अंतर्गत निधी मिळाला. शिवाय आर्यादुर्गेच्या भक्तांनीही खूप मोठी मदत केली. आणि देवीने मनात आणल्यावर काय होणार नाही! नाही कां? असे जोशी म्हणाले.
      आजच्या जेवणाच्या मेनू संबधी आधीच फोनवर बोलणे झालेले होते. परंतु उद्याच्या बाबतित काय करायचे? असे जोशींनी विचारल्यावर अनिकेतचे बाबा अशोकरावांनी आपली योजना काय आहे ते सांगितले. ते म्हणाले, आम्हाला उद्या देवीला अभिषेक करायचा आहे. अनिकेतचे हल्लीच मे महीन्यात लग्न झाले आहे. तेव्हा त्याच्या हस्ते कुलस्वामिनीला अभिषेक करायचा आहे. तसा उपाध्ये गुरुजींना फोन झालेला आहेच.
      हो, दुपारी मला उपाध्ये गुरुजी तसे बोलले होते! जोशी म्हणाले.
      उद्या देवीला पुरणावरणाचा नैवेद्य दाखवायचा आहे त्याची सोय आपल्याकडे होईल काय? अशोरावांनी विचारले. त्यावर अगदी पुरणपोळी शक्य होणार नाही. पण नैवद्या पुरत्या पांच पुरणपोळ्या करु. सगळ्यांना जेवायला मात्र पुरणपोळी शक्य होणार नाही. कारण माझ्याकडे माणूसबळ नाही. असे जोशी म्हणाले.
      ठिक आहे! पण उद्या जेवायला उपाध्ये गुरुजी, देवीचे भोपी गुरव आणि कुवारी सवाशिण, त्याचप्रमाणे दांपत्यही  सांगायचे आहे. असे अशोकराव बोलताच त्यावर जोशी म्हणाले अहो, उद्या रविवार आहे त्यामुळे शाळेला सुट्टी आहे. तेव्हा माझी मुलगी तुम्हाला कुवार सवाष्ण मिळु शकते आणि दांपत्य भोजनासाठी तुमच्या बरोबर आलेले तुमचे सोयरे आहेतच. नाहीतर आम्हीही आहोतच. त्यामुळे ते सर्व होऊन जाईल. अशाप्रकारे त्यांची बोलणी चालू होती तोच जोशी वहिनींनी जेवण तयार असल्याची वर्दी दिली. तेव्हा अशोकरावांनी मोबाईलवरुन अनिकेतला निरोप दिला व सगळ्यांना खाली भोजनगृहात येण्यास सांगितले.
      भक्त निवासाच्या आधुनिकीकरणा बरोबरच मोठ्ठे भोजनगृह आणि सर्व सोयींनी युक्त आधुनिक स्वयंपाकगृह देखिल बांधण्यात आले होते. सोलर सिस्टीमचा जास्तित जास्त वापर करण्यावर भर दिला होता. भक्त निवासच्या गच्चीवर सोलर पॅनेल बसवण्यांत आली होती. त्याच प्रमाणे भक्त निवासाच्या कंपाऊंड मध्येच मोठी पवन चक्कीही बसवण्यात आली होती. त्यामुळे पवन उर्जा अधिक सौर उर्जा असा हायब्रीड उर्जास्त्रोत येथे निर्माण केला होता.
      भोजनगृहामध्ये जेवायला बसण्यासाठी टेबल खुर्च्यांची सोय केलेली होती. जेवण वाढण्याऐवजी ओट्यावर तयार झालेल्या स्वयंपाकाची भांडी मांडुन ठेवली होती. प्रत्येकाने आपल्या रुची प्रमाणे आणि आवश्यक तेवढे स्वत:च्या हाताने वाढुन घ्यायचे आणि टेबल खुर्चीवर बसुन जेवायचे अशी व्यवस्था तेथे केलेली होती. जोशी स्वत: तिथे हजर राहुन सर्व व्यवस्थेवर नजर ठेवत होते. अशाप्रकारे सर्वजण साधेच पण स्वादीष्ट जेवण जेऊन आणि त्याबद्दल जोशींना धन्यवाद देऊन सगळेजण विश्रांती करीता आपापल्या रुममध्ये गेले.
क्रमश: ..............




*************

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा