बुधवार, १४ डिसेंबर, २०१६

वृक्ष मंदिर भाग १७

१७
संध्याकाळचे सात वाजले होते. सोमजाई मंदिराच्या सभामंडपामध्ये नवीनच बसवलेल्या एल्. ई. डी. दिव्यांचा प्रकाश पसरलेला होता. मंदिरात येण्याचा रस्ताही अशाच  एल्. ई. डी. दिव्यांच्या प्रकाशात उजळला होता. रस्त्याच्या दुतर्फा नवीनच लावलेल्या रोपांनी आता बाळसे धरलेले दिसत होते. सभामंडपामध्ये सतरंजीवर गोविंदराव, हंबीरराव, शेळके गुरुजी, दिनकरराव, फॉरेस्टर श्री मारुति माने, हेरंब, खेर्डीचे सरपंच श्री दत्तात्रेय सावंत, गोवेल्याचे सरपंच श्री नारायण शिंदे, मारुती माने, जितेंद्र, गणेश आणि हेमंत ही सगळी वृक्ष मंदिराची विश्वस्थ आणि संचालक मंडळी बसली होती. दर पंधरा दिवसांनी ही लोक कामाचा आढावा घेण्यासाठी आणि पुढिल योजना ठरविण्यासाठी संध्याकाळी देवीच्या आरतिच्या वेळी जमत असत. आजही त्याप्रमाणेच ही मंडळी जमली होती.
सर्वप्रथम हेमंतने झालेल्या कामांचा अहवाल द्यायला सुरवात केली. तो म्हणाला आतापर्यंत आपले सौरशक्ती पॅनेल आणि पवनचक्कीचे काम पूर्ण झाले आहे. आपण ठरविल्याप्रमाणे मंदिराच्या पूर्ण रस्त्याच्या आणि मंदिराच्या परिसरातील पथदिपांचेही काम पूर्ण झाले आहे. आपल्या कार्यालय आणि मंदिरातिल इलेक्ट्रीक वायरींगचेही काम बरेचसे पूर्ण झाले आहे. अजुन प्रसाद बनविण्याच्या पाकगृहाचे थोडे वायरींग बाकी आहे पण ते दोन दिवसांत पूर्ण होईल.
आपण ठरविल्या प्रमाणे दोन हजार बालतरुंच्या रोपणाकरिता खड्डे खणण्याचे काम जोरात सुरु आहे. आतापर्यंत अठराशे खड्डे पूर्ण झाले आहेत. दोनशे खड्डे येत्या पाच सहा दिवसात पूर्ण होतील. या खड्यांमध्ये रोपण करण्याकरिता बालतरुंची आपण निरनिराळ्या ठिकाणी ऑर्डर दिली आहे. त्याचा तपशिल जितू देईल.
आपण आपल्याच देवी भक्तांकडुन एक हजार बालतरु घेणार आहोत. त्या मध्ये मुख्यत: आंब्याची आणि काजुची कलमे आपण घेणार आहोत. याशिवाय जांभुळ पांचशे, औषधी वृक्षांची पाचशे बालतरु आपण निरनिराळ्या नर्सरी मधुन खरेदी करणार आहोत. हे सर्व बालतरु येत्या चार पांच दिवसात आपल्या ताब्यात येतिल. जितूने सांगितले.
सगळ्यांना आपण योग्य मोबदला देत आहोत नां? हंबिररावांनी विचारले.
हो! आपण बाजारभावाप्रमाणे रक्कम अदा केली आहे! जितूने उत्तर दिले.
अवजारे पुरेशी खरेदी केली आहेत नां? त्याची कमतरता पडायला नको! मानेसाहेब आपण आखुन दिलेल्या पद्धतीने सगळे व्यवस्थित चालले आहे नां? दिनकररावांनी शंका उपस्थित केली.
अवजारे पुरेशी आहेत आणि कामही ठरवलेल्या प्लॅन प्रमाणे व्यवस्थित चालू आहे. उलट माझ्या अपेक्षेपेक्षा कामाची गती खूपच जास्त आहे. मात्र पावसाळा संपल्यावर आपल्याला पाईपलाईन टाकुन पाझर तलावातिल पाणी वरती टाकी बांधुन किंवा तयार प्लॅस्टीक टाक्या बसवनुन चढवावे लागेल म्हणजे सर्व झाडांना व्यवस्थित पाणी देता येईल. मानेसाहेबांनी सांगितले.
टाक्या, पाईप, मोटार वगैरे सामान थेट मुंबईहूनच मागवावे म्हणजे चांगले होईल. नाहितर कोल्हापुरहून सुद्धा चालेल. नारायण शिंदे यांनी आपले मत दिले.
या दोन हजार बालतरुंचे रोपण कधी पर्यंत पूर्ण होईल? त्यानंतर आपण किती लागवड करु शकतो? गोविंदरावांनी विचारले.
आपली ही दोन हजार झाडे जुलै अखेर पर्यंत लावुन पूर्ण होतील. त्यानंतर महिन्याभरात ती व्यवस्थित जीव धरतिल असे वाटते. गणेशने सांगितले.
आतापर्यंत आपण जवळपास सातशे झाडे लावली आहेत. ही दोन हजार म्हणजे सरासरी तिन हजार होतील. आपण या पूर्ण जागेत सात ते साडेसात हजार झाडे लावु शकतो. म्हणजे त्यांना वाढायला पुरेशी जागा मिळेल. म्हणजेच आपण अजुन साडे चार हजार झाडे लावु शकतो. व्यवस्थित हिशेब करुन हेरंबने उत्तर दिले.
बरोबर आहे हेरंबने सांगितले ते! माने साहेबांनी हेरंबला दुजोरा दिला.
आपल्या कामाच्या आजच्या गतीने पूर्ण डोंगर हिरवा करायला आणि या आपल्या कामातुन काही उत्पन्न सुरु व्हायला किती कालावधी लागेल? आपण सध्या नुसता खर्चच करतो आहोत. आपल्याकडे दाता आहे म्हणून त्याचा आपण गैरफायदा घेतो असे व्हायला नको! हंबीररावांनी चर्चेला व्यावहारीक पातळीवर आणले.
आपल्याला जर आपला खर्च या लागवडीतुनच काढायचा असेल तर नगदी आणि कमी कालावधीत उत्पन्न देणारी झाडे लावायला लागतिल. गणेशने सांगितले. याकरिता आपण शेवगा, अननस लागलेचतर आपण अगदी भातासारखे पीक सुद्धा आता थोड्याफार प्रमाणात घेऊ शकतो.
कोणती झाडे लावायची याचा विचार गणेश, हेरंब आणि माने साहेब आपण तिघांनी मिळुन घ्यावा. मात्र आपल्याला शक्यतो लवकर आपला दैनंदिन खर्च भागु शकेल एवढे उत्पन्न होईल अशी योजनाही करायला हवी. आपण भांडवली रक्कम दानाच्या स्वरुपात घेतली इथपर्यंत ठिक आहे. परंतु आपला दैनंदिन खर्च आपणच भागवायला हवा असे मला वाटते. हंबीररावांनी आपले मत दिले.
पुढल्या अक्षय तृतियेला आपण आपले नियमित उत्पन्न चालू केलेले असेल याची ग्वाही आम्ही देतो. आम्ही त्यादृष्टीने नियोजन करु. हेरंब आणि गणेशने एकदम सांगितले.
अशाप्रकारे भविष्यातिल नियोजन करुन आजची बैठक बरखास्त करण्यांत आली. त्यानंतर आरती होऊन सर्व मंडळी आपापल्या घरी निघुन गेली.

************

वृक्ष मंदिर भाग १६

१६
          गेले ३०-४० दिवस देवीचा डोंगर गजबजलेला होता. रोज खणाखणी चालू होती. माणसांबरोबरच यंत्राचा वावर देखिल येथे वाढला होता. देवीच्या डोंगराच्या २०१ एकरचे क्षेत्रापैकी मंदिराचा चार पाच एकराचा सपाट भाग वगळता बाकी सगळा भाग उंच सखल होता. पारंपारीक पद्धतीने जमिनीतील पाणी हातात नारळ घेऊन पाण्याचा उगम शोधणा-या पाणक्याने नेमकी पाणी असणारी जागा शोधुन काढली होती. त्याशिवाय आधुनिक तंत्राच्या मदतिनेही त्याच ठिकाणी जमिनीत पाणी असल्याची खात्रीही करुन घेतली होती.
     त्या पाणी लागण्याची खात्री असलेल्या त्या जागेवर तिन एकर एवढ्या विस्तिर्ण क्षेत्रामध्ये पाझर तलाव खोदण्यास सुरवात केली होती. या पाझर तलावाकरीता सुवातीला देवीच्या भक्तांच्या श्रमदानाने जवळपास सात फुटापर्यंत असलेला मातीचा थर कुदळ फावड्यांच्या सहाय्यान खणून काढला होता. त्यातुन निघालेली माती आणि दगड गोटे यांच्या सहाय्याने त्या उंच सखल जागेचे १०-१० एकराचे सलग सपाट प्लॉट तयार करण्यात येत होते. माणसांच्या जोडीला यंत्राची मदत देखिल घेतली गेली होती. उताराप्रमाणे निरनिराळ्या लेव्हलवर असे ५ एकरापासुन १५ एकरांपर्यंत मोठे मोठे प्लॉट तयार करुन घेण्यांत आले होते.
     मातीचा थर संपल्यानंतर सुरुंग लाऊन कातळ फोडण्यात आला. परवाच जवळपास पस्तीस फुटावर पाण्याचे सात मोठ्ठे जोरदार झरे तिथे लागले होते. त्या पाण्याचा जोर एवढा होता की त्या तिन एकर तलावाच्या दहा फुट उंची एवढे पाणी गेल्या दोन दिवसात साठले होते.
     आज जेष्टातली पोर्णिमा म्हणजेच वटपोर्णिमा. महिलावर्गाच्या दृष्टीने हा महत्वाचा दिवस. आजच्या दिवशी पुराणकाळातल्या चतुर सावित्रीने यमाला आपल्या चातुर्याने फसवुन आपल्या पतीचे प्राण परत मिळवले. एका अर्थाने हा निसर्गाशी जवळीक साधण्याचा दिवस. या निमित्ताने आपल्या मैत्रिणींसह नटुन थटुन मिरवण्याचाही दिवस. शेतकऱ्यांच्या दृष्टीने कामाला लागण्याचा दिवस.
 आज वट पोर्णिमेच्या मुहूर्तावर पांच देवी भक्त दांपत्याद्वारे पाझर तलावातिल पाण्याचे जल पूजन करण्यांत येणार आहे. त्याच प्रमाणे त्या पवित्र जलाने सोमजाईला सोळा पुरोहितांद्वारे अभिषेक करण्यांत येणार आहे. त्या नंतर आजच देवीच्या १०१ भक्त दांपत्याच्या हस्ते प्रत्येकी पांच बालतरुंचे रोपणही करण्यांत येणार आहे.
देवी मंदिराच्या बाजुलाच श्री सोमजाई वृक्ष मंदिर संस्थानची नवीनच झालेली इमारत आज सजवण्यांत आली आहे. त्याचप्रमाणे सोमजाईचे मंदीरही झेंडूची फुले आणि आम्रपल्लव यांच्या माळांनी सजविण्यांत आले आहे. मंदिराच्या आणि संस्थानच्या इमारतीच्या मधल्या जागेत मोठ्या आकाराची सुरेख रांगोळी काढण्यांत आली आहे. त्या रांगोळीमधुन श्री सोमजाई वृक्ष मंदिराचे संकल्पचित्र रेखाटण्यात आले आहे.
गोविंदराव जोशी, हंबीरराव, शेळके गुरुजी, दिनकरराव, गोवेल्याचे सरपंच श्री नारायण शिंदे हे पांचजण आपापल्या पत्नींसह नुकतेच पाझर तलावाकडे गेलेले आहेत. त्यांच्या बरोबर सावंतवाडीहून खास बोलावलेले पांच पुरोहितही गेलेले आहेत. पाचही दांपत्यांनी बांबुच्या परडीत खण, नारळ, तांदूळ, हळद, कुंकू, फुले ठेवली नतंर त्या परडीची पुरोहितांनी सांगितल्या प्रमाणे विधिवत पूजा केली. पूजा झाल्यावर प्रत्येकाने ती परडी पाझर तलावातिल पाण्यांत सोडली आणि बरोबर आणलेल्या तांब्याच्या लखलखित घागरीने त्या तलावातिल पाणी काढले आणि ते पाणी घेऊन आई सोमजाईच्या मंदिरात गेले.
श्री सोमजाई मंदिराच्या सभामंडपात पांच फुलांच्या माळांनी सजवलेले पाच चौरंग ठेवलेले होते. या पांचही दांपत्यांनी पाझर तलावातुन भरुन आणलेल्या त्या चकचकीत घागरी सजवलेल्या चौरंगांवर ठेवल्या. प्रत्येक चौरंगासमोर दोन दोन पाट या दांपत्यांना बसण्याकरिता मांडले होते. ती पांचही दांपत्ये त्या पाटांवर स्थानापन्न होताच त्यांच्या हस्ते त्या पांचही कलशातिल गंगेचे पुरोहितांच्या मार्गदर्शनाप्रमाणे विधीवत पूजन केले गेले.
देवीचा गाभाराही आज विशेष सजविण्यांत आला होता. देवींच्या तिनही मूर्ती महाराजांनी पहाटेच स्वच्छ केलेल्या होत्या. आज पहाटे तीन वाजताच ते उठले होते. देनंदिन प्रात:स्मरण होताच त्यांनी देवीचा गाभारा आणि सभामंडप पुष्करीणितुन पाणी आणून धुवुन काढला होता. त्यानंतर त्यांनी देवींच्या मूर्तींची पूजा केली होती. आता तिनही मूर्तींच्या डोक्यावर अभिषेक पात्रे टांगण्यात आली होती.
पांचही दांपत्याच्या द्वारे देवीच्या भक्तांच्या कल्याणाकरिता जलाभिषेकाचा संकल्प केल्यावर पांचही घागरी गाभाऱ्यामध्ये नेण्यांत आल्या. सभामंडपामध्ये आठ आठच्या दोन रांगामध्ये सांवतवाडीहून खास बोलावण्यांत आलेले पुरोहित बसले होते. हेरंब आणि जितूकडे अभिषेकपात्रामध्ये पाणी ओतण्याची ड्युटी लावली होती. पुरोहितांनी सूचना देताच पूजन केलेल्या कलशांमधील गंगाजल अभिषेकपात्रांत ओतण्यांत आले.
सोळाही पुरोहित एकाच वेळी श्री सूक्ताचे पठण करित होते. ते त्यांचे पठणाचे स्वर संपूर्ण देवीच्या डोंगरावर लाऊडस्पीकरच्या माध्यमातुन ऐकू येत होते. त्यामुळे वातावरणांत एक वेगळेच पावित्र्य भरुन राहिले. श्रीसूक्ताची सोळा आवर्तने झाल्यावर सोळाही पुरोहितांनी एकाच सुरात श्रीवर्चस्वम् आयुष्यम् आरोग्यमाविधात् शोभमानं महियते । धनं धान्यं पशुं बहुपुत्रलाभं शतसंवत्सरं दीर्घमायुः॥हा आशिर्वाद मंत्र म्हटला.
अशाप्रकारे पाझर तलावाचे जलपूजन आणि त्या पाण्याने देवीला अभिषेक करण्याचा कार्यक्रम पार पडला. त्यानंतरचा कार्यक्रम अतिशय भव्य स्वरुपात करण्यांत येणार होता.
***********
सोमजाई मंदिराच्या भव्य प्रांगणात १०-१०च्या रांगामध्ये १०१ जोडपी बसली होती. हे सगळेजण आई सोमजाईचे निस्सीम भक्त आहेत. त्यांनी अक्षय तृतियेच्या दिवशी श्री सोमजाई वृक्ष मंदिर संस्थानच्या कार्यामध्ये सक्रीय भाग घेण्याचा संकल्प केला होता. त्या संकल्पाप्रमाणे गेले महिना दिडमहिना ते आपली सेवा येथे देत होते. आज वटपोर्णिमेच्या पवित्र दिवशी बालतरुंच्या रोपणाचा मुहूर्त करण्याचे ठरविले होते. त्यानुसार ही एकशे एक दांपत्य आज प्रत्येकी वड, उंबर, बेल, पिंपळ आणि अशोक अशा सावली देणा-या आणि देवाच्या पूजेसाठी लागणा-या पांच वृक्षांच्या बालतरुंची विधिवत पूजा करुन त्यांचे आधीच तयार करुन ठेवलेल्या खड्ड्यांमध्ये रोपण करणार आहेत.
या तयारीत बसलेल्या १०१ जोडप्यांच्या समोर वर सांगितलेल्या पांच प्रकारचे बालतरु ठेवलेले आहे. प्रत्येकाच्या डाव्या हाताला पूजेचे साहित्य ठेवलेले आहे. देवीच्या सभामंडपातही दोन रांगामध्ये सर्व विश्वस्थ मंडळी अशाच प्रकारे समोर पांच प्रकारचे बालतरु घेऊन त्यांच्या पूजेकरिता तयारीत बसलेले आहेत. या मंडळींच्या शेजारीच पांच पुरोहित समोर लाऊड स्पिकरचा माईक घेऊन पूजा सांगण्या साठी बसलेले आहेत.
त्या पांचही पुरोहितांनी एकाचवेळी सर्वांना पूजेचा संकल्प सांगण्यास सुरवात केली. पुरोहित सांगत होते त्याप्रमाणे प्रत्येक दांपत्य आपल्या समोरच्या बालतरुंची पंचामृती पूजा करित होते. पूजा संपन्न होताच प्रत्येकजण आपापल्या नेमलेल्या खड्यांमध्ये बालतरुंचे रोपण करण्यास गेले. प्रत्येक पुरुषाच्या एका हातात फावडे  आणि दुस-या हातात बालतरु ठेवलेली पिशवी होती. आपल्या पतीच्या मागोमाग चाललेल्या महिलांच्या डोक्यावर पाण्याने भरलेला तांब्याचा कलश होता.
देवीला जाण्याच्या रस्त्याच्या दुतर्फा हे सर्व बालतरु रोपण करण्यासाठी आधीच खड्डे तयार करुन ठेवलेले होते. या शिवाय देवीच्या देवालयासमोरील मोकळ्या मैदानाभोवतीही हे बालतरु लावले जाणार होते. एकाच वेळी साडे पाचशे सावली देणा-या आणि देवपूजेमध्ये मानाचे स्थान असणा-या या वृक्षांचे रोपण करण्यांत येत होते. आता लावण्यात येत असलेल्या प्रत्येक झाडाची देखभाल आज ज्या दांपत्यांनी ती रोपण केली त्यांनी घेतली होती.
ते आपले दैनंदिन कामकाज सांभाळुन या झाडांची काळजी घेणार आहेत. आता पावसाळा सुरु झाला असल्याने या झाडांना पाणी घालण्याची आवश्यकता नव्हती. देवीच्या डोंगराला पूर्णपणे संरक्षक भिंत बांधण्यात आलेली असल्यामुळे ढोरे गुरे त्रास देतील हा देखिल प्रश्न शिल्लक राहीला नव्हता. फक्त वा-या वादळापासुन त्या बालअवस्थेत असलेल्या वृक्षांची काळजी त्यांना घ्यायची होती. पावसाळा संपल्यावर पाझर तलावातील पाणी डोंगरमाथ्यावर टाक्या बसवुन त्यात साठवण्यांत येणार होते. आणि तेच पाणी ठिबक सिंचनाद्वारे प्रत्येक झाडाला देण्याची योजनाही कार्यान्वीत करण्यात येणार आहे.
देवीच्या डोंगराच्या सर्वात उंच असलेल्या पठारावर पवनचक्की उभारण्याचे काम जोरात सुरु होते. त्याच प्रमाणे देवीच्या मंदिराच्या जवळच सौरउर्जेसाठी पॅनेल बसवण्याचेही काम एकीकडे सुरु होते. या दोनही उर्जा स्त्रोतातुन देवीच्या मंदिरातिल आणि श्री सोमजाई वृक्ष मंदिर संस्थानच्या इमारतिमधील सर्व इलेक्ट्रीकल उपकरणे चालविण्यांत येणार होती. वृक्ष मंदिराच्या दररोज सेवेला येणा-या भक्तांना देण्यांत येणारा खिचडी प्रसाद बनविण्याकरिता तयार केलेल्या पाकगृहातिल शेगड्या देखिल या उर्जेवरच चालविण्यांत येणार आहेत. याशिवाय देवीच्या मंदिरात येण्या करिता असलेल्या रस्त्याच्या कडेला आणि मंदिर परिसरात देखिल या हायब्रीड उर्जेतुन पथदिप लावण्यांत येणार आहेत.
वृक्ष मंदिराच्या सेवेकरिता सध्या सरासरी १०० भक्त रोज हजेरी लावत आहेत. या भक्तांनी आतापर्यंत पाझर तलाव खणणे, संपुर्ण डोगराचे निरनिराळ्या लेव्हलवर निरनिराळ्या आकाराचे प्लॉट पाडणे ही कामे केली आहेत. या त्यांच्या सेवेबद्दल त्यांना मानधन म्हणून सरकारी रोजगार हमी योजनेमध्ये मिळणाऱ्या रोजमजुरीपेक्षा जास्त रक्कम देण्यांत येते आहे. आता उद्यापासुन आणखी दोन हजार बालतरुंचे रोपण करण्याच्या दृष्टीने नियोजन चालू आहे.
या सर्व चालू असलेल्या कामावर सरपंच हंबीरराव जातीने लक्ष देतात. त्यांनी हेमंतला या कामी मॅनेजर म्हणून काम पहाण्यास सांगितले आहे. त्याला मदतनिस म्हणून जितेंद्र काम करित आहे. हेरंब आणि गणेशला त्यांनी सर्व चालू असलेल्या कामांवर  देखरेख करण्यासाठी नियुक्त केले आहे. होत असलेल्या या कामांमध्ये शेतीशास्त्र आणि वनीकरण शास्त्र यांच्या दृष्टीने कामचा दर्जा राखणे हे त्यांचे मुख्य काम होते. त्यामुळे ते दोघे करायच्या कामाचा आराखडा तयार करित असत त्यावर दिनकररावांचे फॉरेस्टर स्नेही श्री मारुति माने आपल्या अनुभवी नजरेने मार्गदर्शन करित असत.
आतापर्यंत या सर्व चालू असलेल्या कामांचा खर्च दहा लाखांच्या घरात गेला होता. महाराजांनी सरपंचांकडे दोन वेळा आठ आठ लाखांचे चेक दिले होते. सरपंचांनी कबुल केल्याप्रमाणे त्यांनी आणि स्टेट बँकेतिल मॅनेजर आचार्य मॅडम यांनी महाराजांचे नाव गुप्त ठेवले होते. महाराजही त्यांचा दैनंदिन उपासनेचा आणि भिक्षेचा काळ वगळता दिवसातले जवळपास दहा तास वृक्ष मंदिराच्या कामात व्यतित करत होते.
*************


वृक्ष मंदिर भाग १५

१५
     आज अक्षय तृतीया! सकाळपासुनच सोमजाई मंदिराच्या परिसरामध्ये धावपळ दिसत होती. रोजची सकाळची उपासना पूर्ण झाल्यावर महाराजांनी मंदिराच्या प्रांगणाच्या कडेला परंतु मंदिराच्या अगदी नजिक जमिनीत आठ खड्डे  खणले होते. त्यांना मदत करायला हेमंत आणि गणेश आला होता. त्यांचे खड्डे खणून होईपर्यंत सरपंचानी पाठविलेली माणसे प्रसाद बनविण्याकरिता लागणारे साहित्य घेऊन आले होते. त्यांनी मंदिराच्या मागच्या बाजुला आडोसा तयार करुन चुली मांडुन ठेवल्या होत्या. त्या लोकांनीच येताना पिण्याचे पाणी साठवण्याकरिता दोन मोठे मातीचे रांजण आणले होते. त्यांनी ते रांजण स्वच्छ करुन त्यात पाणी भरुन ठेवले होते. हेरंब आणि जितूने मंदिराच्या सभामंडपाच्या प्रांगणाच्या बाजुला लागुन असणा-या भागात मोठी सतरंजी अंथरुन तो भाग स्टेजसारखा तयार केला होता.
आता तिन वाजले होते. सोमजाई मंदिराच्या प्रांगणात आतापर्यंत बरीच लोकं जमा झाली होती. मंदिराच्या सभामंडपाच्या बाजुला तयार केलेल्या स्टेजवर हंबीरराव, खेर्डीचे सरपंच श्री दत्तात्रेय सावंत, गोवेल्याचे सरपंच श्री नारायण शिंदे, शेळके गुरुजी, गोविंदराव जोशी, दिनकरराव, महाराज यांच्याशिवाय हनुमानवाडी, खेर्डी आणि गोवेले ग्रामपंचायत सदस्य बसले होते.
     खाली प्रांगणात एका बाजुला महिला वर्ग तर दुस-या बाजुला पुरुषवर्ग बसला होता. सर्व मिळुन १००-१२५ लोकं उपस्थित होती. हजर असलेली सर्व लोकं सोमजाईची निस्सीम भक्त होती. उपस्थितांमध्ये महिलांचे प्रमाण जास्त होते. जमलेल्या लोकांना आजच्या या विशेष सभेबद्दल खूप औत्सुक्य होते. कारण गेले ८-१० दिवस हनुमानवाडीतील लोकांनी सगळ्या वाड्यांवर जाऊन सोमजाई भक्तांची भेट घेऊन वातावरण निर्मिती केली होती. वृक्ष मंदिर संकल्पने बाबत सूतोवाच केले होते. त्यांच्या सोमजाईवरील श्रद्धेला आवाहन केले होते.
     सभेला पुरेशी उपस्थिती झाली आहे. आता आणखी कोणी येण्याची शक्यता नाही  याचा अंदाज आल्यावर सरपंच हंबीरराव बोलायला उभे राहिले. राम राम मंडळी! येथे उपस्थित असलेल्या सर्व सोमजाई भक्तांचे हार्दिक स्वागत करतो. मला माहित आहे आपल्याला सगळ्यांना आजच्या या सभेबद्दल खूपच उत्सुकता आहे. काही दिवसांपूर्वी आपल्या गावात काही स्वाध्यायी मंडळी आली होती. ती लोक आपल्या सर्व वाड्यांमध्ये देखिल आली होती. हे आपल्याला माहित आहेच.
     हो! हो! माहित आहे आम्हाला! उन्हातान्हातून फिरत आमच्या वाडीवर देखिल आले होते. येताना स्वत:ची शिदोरी देखील बरोबर घेऊन आले होते. अगदी देवमाणंस बघा! साधा चहा देखिल घेतला नाही त्यांनी! देवाचे काही बाही सांगत होते. शेजारच्या उंबरवाडीतल्या पार्वतीकाकूंनी आपला अनुभव सांगितला. त्या उंबरवाडीतील महिला मंडळाचे काम करतात.
     हो! हो! तेच स्वाध्यायी! आमच्या गावातिल मारुति मंदिरात त्यांचा एक कार्यक्रम झाला होता. त्यांच्याच आग्रहावरुन आम्ही गावातील काही माणसं त्यांच्या गोवेले येथिल भाव मिलन सोहळ्याला गेलो होतो. त्या भावमिलन सोहळ्यामध्ये गुजराथमधिल डॉ. नवनीत शहा यांनी त्यांच्या गावाला चालू असलेल्या वृक्ष मंदिराच्या प्रयोगाबाबत सांगितले. ते ऐकुन आम्ही खूप प्रभावित झालो. तो प्रकल्प आपल्याकडे राबवता येईल काय या दृष्टीने आम्ही विचार सुरु केला. त्याच संदर्भात आपल्या गोविंदरावांचा मुलगा गणेश तो वृक्ष मंदिराचा प्रयोग पहायला थेट गुजराथ मध्ये जाऊन आला. त्याने सामाजिक वनिकरण या विषयामध्ये डीग्री घेतली आहे. त्याच प्रमाणे त्याचा मित्र हेरंब याने देखिल शेतीशास्त्रा मध्ये डीग्री घेतली आहे. या दोघांनीही या प्रकल्पाबाबत साकल्याने विचार करुन हा प्रकल्प आपल्याकडे राबवता येईल याची खात्री दिली.
 आपल्या दिनकररावांचे एक मित्र फॉरेस्टर आहेत त्यांनी आपण आता जमलो आहोत हा देवीचा डोंगर या प्रकल्पाकरीता योग्य जागा आहे हे सांगितले. माझ्या बालपणी हो डोगंर हिरवागार होता. त्यातिल झाडीमध्ये निरनिराळे प्राणी पक्षी रहात होते. परंतु मध्यंतरीच्या काळात त्या देवीच्या डोंगराला आपणच उघडा बोडका करुन टाकलेला आहे. त्याचा परिणाम आता आपण भोगतो आहोतच. अनियमित पाऊस आणि पाण्याचा दुष्काळ हा त्याचाच परिणाम आहे. वास्तविक ही देवीच्या डोंगराची जागा आपण समजतो तशी सरकारी जागा नाही. तर आपल्या सावंतवाडीच्या राजांनी देवीच्या दैनंदिन पूजेकरिता आणि उत्सवाच्या खर्चाकरीता आपल्या गोविंदरावांच्या पूर्वजांच्या नावाने दान केलेली आहे. आम्ही विनंती करताच ही सर्व जागा गोविंदरावांनी आपल्याला म्हणजेच श्री सोमजाई वृक्ष मंदिर संस्थानला वापरायला दिली आहे.
     कालच आम्ही या श्री सोमजाई वृक्ष मंदिर संस्थान या संस्थेची स्थापना केली आहे. त्या संस्थेचे अध्यक्षपद गोविंदरावांनी स्विकारले आहे. या संस्थेच्या विश्वस्त पदी गोविंदरावांनी खेर्डीचे सरपंच श्री दत्तात्रेय सावंत, गोवेल्याचे सरपंच श्री नारायण शिंदे, आणि खास महिला प्रतिनिधी म्हणून उंबरवाडीतिल पार्वती काकूंचीही नेमणूक केली आहे. आपल्याला आता सोमजाईचे भक्त म्हणून देवीच्या या डोंगराला पूर्वीचे वैभव प्राप्त करुन देण्याचा निर्धार आजच्या अक्षय तृतियेच्या दिवशी करायचा आहे.
     आता आपल्याला गुजराथ मध्ये जाऊन वृक्ष मंदिर प्रत्यक्ष पाहून आलेला गणेश जोशी वृक्ष मंदिर म्हणजे काय? त्याचे पूजारी आपण कसे व्हायचे? आपल्या सर्वांची यात काय भूमिका राहिल हे सर्व स्पष्ट करुन सांगेल. त्याच प्रमाणे आपल्या सर्व शंकांचे निरसन देखिल करेल.
     आता गणेशने बोलायला सुरवात केली. सोमजाईच्या सर्व भक्तांचे मी या देवीच्या भूमीवर स्वागत करतो. सर्व प्रथम इतके कडक उन असूनही इतक्या मोठ्या संख्येने आमच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन आलात त्यावद्दल धन्यवाद. आताच सरपंचांनी सांगितले त्याप्रमाणे मी आणि सोमजाईचाच भक्त असणारा हनुमानवाडीचा माझा मित्र पांडुरंग वृक्ष मंदिराला भेट द्यायला गुजरात मध्ये गेलो होतो.
     तिथे आम्ही एक वेगळेच देऊळ पाहिले. त्या देवळाला ना भिंत होती, ना छप्पर. तिथे कोणतीही मूर्ती बसवलेली नव्हती की घंटा लावलेल्या असे विलक्षण मंदिर होते ते.
     देवळात जर मूर्तीच नसेल तर त्याला देऊळ कसे म्हणायचे? गोवेल्याच्या विष्णू कांबळेनी विचारले.
     कसं तेच मी आता सांगतोय! आपण पोथी पुराणांत वाचले आहे. नरसिंह अवतारात एका निर्जीव खांबातुन देव बाहे पडला. तो निर्जीव खांब काय देव आहे कां! देव सगळीकडे आहे. तो दगडांत आहे, सोन्यात आहे, रुप्यात आहे. आपण गाईला देव मानतो म्हणजे गाईमध्ये देव आहे! म्हणजेच प्रत्येक वस्तूत देव आहे! बरोबर नां? गणेशने लोकांनाच प्रश्न विचारला.
     बरोबरच आहे! आम्ही बायका तुळशीची पूजा करतो म्हणजे तुळसही देवच आहे. तुळसाकाकू बोलल्या.
     बरोबर आहे काकू तुमचे! गणेशने परत आपले बोलणे चालू केले. आपण वड पोर्णिमेला वडाची पूजा करतो. शनिवारी पिंपळाची पूजा करतो. उंबराला आपण दत्तस्थान म्हणून पूजतो. अशा अनेक प्रकारच्या झाडांमध्ये आपण देव पहातो. त्याची भक्ती करतो पूजा करतो. बरोबर आहे नां मंडळी. त्यावर सगळ्यांनी कोरसमध्ये होकार दिला.
     तर त्या वृक्ष मंदिरात मी नेमके हेच पाहिले. आपल्या देवीच्या या डोंगरा सारखाच डोंगर तिथे आहे. त्या सर्व जागेवर आखिव रेखीव पद्धतीने वृक्षाची लागवड केलेली आहे. एक एक स्वाध्यायीनी एक एक  झाड पूजेकरिता स्विकारले आहे. त्या रम्य परिसरांत सर्वत्र एक वेगळेच पावित्र्य भरलेले आहे. मोर, हरणे मुक्त पणाने कोणालाही न घाबरते तिथे फिरत होती. देवळाच्या घंटेच्या मधुर नादासारखा तेथे अनेक प्रकारचे पक्ष्यांचे आवाज तिथे ऐकू येत होते. तर अशाचप्रकारचे वृक्ष मंदिर या आपल्या देवीच्या डोंगरावर निर्माण करायचा आम्ही संकल्प केला आहे. त्याला आपल्या सर्वांची साथ हवी आहे. आपण आम्हाला आपली साथ देणार नां? गणेशने सर्वांना साद घालत विचारले.
     होSSSS! आम्ही नक्की साथ देऊ! पण त्या पूर्वी आमच्या काही शंका आहेत. खेर्डीचे सरपंच श्री दत्तात्रेय सावंत बोलले.
     काका, आपल्या कोणत्याही शंकेचे आम्ही निरसन करायचा प्रयत्न करु! विचारा आपली काय शंका आहे ती. गणेशने शंका निरसन करण्याची तयारी दाखवली.
     यात आम्ही नेमके काय करायचे? या सर्व गोष्टीकरिता किती वेळ द्यावा लागेल? आम्हाला काही पैसे खर्च करावे लागतिल कां? आपण म्हणता ती पूजा कशी करायची? सरपंच सावंतांनी आपल्या शंका विचारल्या.
     आपल्या शंकांचे उत्तर देण्यापूर्वी आपण या जागेत नेमके काय करणार आहोत ते आधी सांगतो. आपण आत्ता पहात आहात हा डोंगर उघडा बोडका झालेला आहे. त्यावरील जागा ही कुठे खड्डे तर कुठे टेकाडं अशा स्वरुपात आहे. आता चैत्रमहिना चालू आहे. तरीही आपल्या या पोखरणी मध्ये एवढ्या उंचीवर असून देखिल आत्ता भरपुर पाणी आहे. त्याच प्रमाणे आजु बाजुला देखिल ब-याच ठिकाणी ओलावा आहे. तेव्हा आपण या जागेला लागवड करण्यायोग्य असे उतारात मोठे मोठे प्लॉट करणार आहोत. त्याकरिता आपल्याला माती आणि दगड लागतिल ते मिळविण्याकरिता आणि भविष्यात आपली पाण्याची आवश्यकता पूर्ण करण्याकरिता एक विस्तिर्ण पाझर तलाव तयार करणार आहोत. त्या पाझर तलावामुळे आजुबाजुच्या सर्व विहीरींची आणि तळ्यांच्या पाणी पातळीत वाढ होईल.
     हा झाला प्राथमिक भाग. त्यानंतर लागवडी साठी आवश्यक असणारे बालतरु म्हणजेच रोपे एकतर येथेच तयार करायची आहेत, किंवा जिथे उपलब्ध होतील तिथुन आणायची आहेत. ती रोपे लावण्याकरीता खड्डे खणून तयार ठेवायचे आहेत. पावसाळा सुरु झाला की चांगला मूहूर्त पाहुन आपल्याला लागवड करायची आहे. पुढे प्रत्येक भक्ताला रोपे वाटुन दिली जातिल. त्या रोपांची काळजी त्या भक्ताने घ्यायची आहे. आपण लागवड करित असलेल्या रोपाला ईश्वर मानुन त्याची पूजा करायची आहे.
     आपण सर्व सोमजाईचे भक्त आहोत. आपण येथे करित असलेले प्रत्येक काम हे तिची सेवा म्हणून करायचे आहे. त्या भावनेने हे काम केल्याने ते देवीला पोचेल. आता आपले प्रश्नांची उत्तरे बघुयात.
आपला पहिला प्रश्न आहे. आपल्याला नेमके काय करायचे आहे? तर याचे उत्तर असे आहे आपणच देवीला कोणती सेवा देऊ शकतो याचा विचार स्वत:च करायचा. आपल्या प्रकृतिला झेपेल ते आणि तेवढे आपण देवीला अर्पण करायचे. आपण या ठिकाणी जी कामे करणार आहोत त्यात आपला सहभाग द्यायचा. मग तो जमिन लेव्हल करण्याचा असूदे, तलाव खोदण्याचा असूदे, खड्डे खणण्याचा असूदे किंवा रोपे तयार करण्यापासुन रोपे वाढवण्या पर्यंत प्रत्येक कामात सेवा म्हणून आपला सर्वांचा सहभाग अपेक्षीत आहे.
     आता दुसरा प्रश्न आहे, किती वेळ द्यायचा? या प्रश्नाचे उत्तर मी जरा सविस्तर देतो. आपण एकादशीचा उपवास करतो. म्हणजे काय करतो फक्त खाण्या पिण्यात वेगळे पदार्थ सेवन करतो. स्वाध्याय परिवारात एकादशीची व्याख्या वेगळी आहे. महिन्यातुन येणारे हे दोन दिवस आपल्या प्रपंचाला न देता ते परमेश्वराला द्यायचे. म्हणजे वर्षभरातले चोवीस दिवस आपण भगवंताची सेवा करायची. तेव्हा हे एकादशी व्रत आचरायचे. आपण आपल्याला शक्य असेल तेवढा वेळ सोमजाईकरिता द्यायचा. तिची सेवा म्हणून आपल्या प्रकृतीला झेपेल त्या कामात आपला सहभाग द्यायचा. कोणाला आठवड्यांतुन एक दिवस देता येईल तर कोणाला महिन्यांतुन एक दिवस देता येईल. एखाद्याला दररोज काही तास आपली सेवा देता येईल.
     आपण सर्व सोमजाईचे भक्त आहोत. शुक्रवाराला आपण देवीचा वार मानतो. त्या दिवशी आपण देवीच्या नावाने उपवास करतो. हा उपवास म्हणजे काय? फक्त आहारात बदल म्हणजे उपवास होतो कां? असे कसे असेल? तेव्हा उपवास म्हणजे देवीच्या साठी काही काम करणे! तिच्या सान्निध्यात रहाणे म्हणजे उपवास! ! महिन्यांतुन चार किंवा पाच शुक्रवार येतात. आपण जर सोमजाईच्या नावाने हे चार पांच दिवस देवीच्या या वृक्ष मंदिरात आपली सेवा दिली तरी खूप झाले.
     आता आपला पुढचा प्रश्न आपल्याला काही पैसे खर्च करावे लागतिल का? हा सहभाग ऐच्छीक आहे. जर कोणाला शक्य असेल तर तर तो पैशाच्या रुपात, वस्तूच्या रुपात आपला सहभाग देऊ शकतो. सध्यातरी आवश्यक तेवढी आर्थिक मदत देणारा सोमजाईचा भक्त आपल्याला मिळाला आहे. तरीही कोणी ती बाजू सावरणार असेल तर त्याचे स्वागतच असेल. मात्र मी देणगी दिली  म्हणून माझ्या नावाचा बोर्ड लावा अशी अट असेल तर अशी मदत आपल्याला नको. आपल्याला या प्रकल्पासाठी आर्थिक मदत करण्या-याने माझे नांव कुठे येऊ द्यायचे नाही या अटीवरच मदत दिली आहे.
     आपला शेवटचा प्रश्न असा आहे आपण म्हणता ती पूजा कशी करायची? याचे उत्तर असे आहे. आपण देवाची पूजा कशी करतो त्याला न्हाऊ घालतो, त्याला निरनिराळे उपचार अर्पण करतो. त्याला आवडते ते ते त्याला अर्पण करतो. आपल्या या मंदिरातला देव आहे बालतरु. त्या बालतरुचे संगोपन करायचे, संरक्षण करायचे, त्याला पोषक आहार द्यायचा, त्याचे लाड करायचे हीच आपली पूजा. भगवान श्रीकृष्णांनी गीते मध्ये सांगितले आहे मी सर्व जींवांच्या ठिकाणी आहे. त्यामुळे आपण झाडामध्ये असणाऱ्या त्या भगवंताची पूजा करुया. आपण केलेल्या या सेवेने आई सोमजाई आपल्यावर प्रसन्न होईल आणि आपली, आपल्या परिसराची, आपल्या पर्यावराणाची भरभराट करेल. एवढे बोलुन मी आपली रजा घेतो. आपल्या अजुनही काही शंका असल्यास नि:संकोचपणाने विचारा.
     आता आपल्याला आमच्या गावातिल महाराज चार शब्द सांगतिल. आमच्या या निर्णय प्रक्रियेत त्यांचाही मोठा सहभाग आहे. अतिशय निरीच्छ असणारी ही व्यक्ती योगायोगाने आपल्याला लाभलेली आहे. तेव्हा महाराज आपण आता आम्हाला मार्गदर्शन करावे ही विनंती. सरपंचांनी महाराजांना विनंती केली.
     हंबीररावांच्या विनंतीला मान देऊन महाराज उभे राहीले. सोमजाईला नमस्कार करुन त्यांनी तिचे ध्यान केले आणि बोलायला सुरवात केली.
     आई सोमजाईच्या सर्व उपासकांना माझा दंडवत. मी कोणी महाराज वगैरे कोणी नाही परंतु  माझ्या नकळत मला न आवडणारी ही उपाधी मला चिकटली आहे. गेले काही दिवस मी अनेक गावे भटकत भटकत या गावात आलो. आपल्या लोकांनी घातलेल्या भिक्षेवर जगणारा मी आपल्याला काय मार्गदर्शन करणार पण आता सरपंचांना मी नाही म्हणू शकत नाही.
असो. मी आताच सांगितल्या प्रमाणे माझी गेले अनेक दिवस भटकंती चालू आहे. या ठिकाणी आहे तशीच परिस्थिती जवळपास सगळीकडे दिसते आहे. दिवसें दिवस हवेतील उष्णता वाढत चालली आहे. प्यायला पाणी नाही. जनावरांना चारा नाही. सगळीकडे उघडे बोडके डोंगर. या गावातल्या जुन्या लोकांनी मला सांगितले हा देवीचा डोंगर एके काळी हिरवागार होता. त्यामध्ये अनेक प्रकारचे पक्षी, प्राणी रहात होते. आज काय परिस्थिती आहे?  सगळीकडे रखरखाट आहे. देवीचा डोंगर चढताना दम लागल्यावर बसायचे म्हटले तर सावली नाही. पूर्वी माकडांचे दर्शन गावात कधी व्हायचे नाही. परंतु रानात खायला नाही म्हणून त्यांना माणसाच्या वस्तीमध्ये अतिक्रमण करावे लागले.
     पण हे सगळे का झाले? कसे झाले? याला जबाबदार कोण आहे? सरकार का देवी? पाण्याचा दुष्काळ झाला. पावसाचे प्रमाण कमी झाले. जनावरांना खायला चारा नाही. या सगळ्या प्रश्नांना काही उत्तर आहे कां? या सगळ्या प्रश्नांचे उत्तर एकच आहे! पूर्वी एक प्रश्नांची मालीका विचारली जायची. घोडा का अडला? भाकरी का करपली? असे प्रश्न त्याचे एकच उत्तर होते न फिरवल्या मुळे! त्याचप्रमाणे आपल्याला सध्या सतावणा-या या सर्व गंभीर प्रश्नांचे उत्तर एकच आहे. पर्यावरणाचा समतोल बिघडल्या मुळे.
     पर्यावरणाचा समतोल बिघडवण्याला कारण आपणचे आहोत. आपण काय करतो! चुलीला जळवण पाहीजे, तोड झाड. घर बांधायचय, तोड झाडं. फर्निचर करायचय तोड झाड. रस्ता बांधायचाय, निरनिराळे प्रकल्प उभे करायचेत लाव झाडाला कु-हाड. पूर्वीपण लोक झाड तोडायचे पण त्या एका झाडाच्या बदल्यात बागा उभ्या करायचे. तात्पर्य काय आता आपल्याला सोमजाईने जागे केले आहे. तेव्हा या संधीचा फायदा घ्या. देवीचा डोंगर तर हिरवा कराच, पण आपल्या परसात, रस्त्याच्या कडेला जिथे मोकळी जागा मिळेल तिथे झाडे लावा आणि ती जगवा. त्यानंतर देवीचा प्रसाद आपोआपच मिळेल. आई सोमजाई आपल्या सर्वांना सुबुद्धी देवो आपले कल्याण करो हीच तिच्या चरणी प्रार्थना करुन माझे चार शब्द पुरे करतो. काही कमी अधिक बोललो असेन तर माफ करा.
     आता आपले गोविंदराव जोशी चार शब्द सांगतिल. सरपंचांनी जाहिर केले.
त्यानंतर गोविंदरावांनी उभे राहून देवीचे आशिर्वाद घेऊन बोलायला सुरवात केली. आई सोमजाईच्या भक्तगणांना माझा नमस्कार. मी या देवीचा आपल्या प्रमाणेच एक अज्ञानी भक्त आहे. आता महाराजांनी सांगितले त्याप्रमाणे या डोंगराची दुर्दशा होण्याला मी देखिल तेवढाच जबाबदार आहे. आता आपण येथे एक यज्ञ करत आहोत. त्या मध्ये प्रत्येकाने आपली समिधा अर्पण करावी असे मी आपल्याला आवाहन करतो.
ही एवढी मोठी जागा देवीची आहे आणि मी तिचा विश्वस्त आहे ही गोष्टच आठ पंधरा दिवसापूर्वीपर्यंत मला माहीत नव्हती. आपल्या प्रमाणे मीही ही रिकामी जागा सरकारी आहे असे समजत होतो. माझे वडिल माझ्या लहानपणीच वारले. माझ्या विधवा आत्याने मला वाढविले त्यामुळे या विश्वस्तपणाची परंपरा मला ज्ञात नव्हती. काही दिवसापुर्वी वृक्ष मंदिराची कल्पना निघाल्यामुळे आमच्या पूजेत असलेल्या पेटीतील ताम्रपट वाचण्याची बुद्धी देवीने आम्हाला दिली.
त्या ताम्रपटात असलेल्या उल्लेखानुसार आमचे घराणे या जागेचे फक्त विश्वस्त आहे. या जमिनीचा उपयोग देवीच्या पूजेकरीता, उत्सवाकरीता आणि देवीच्या भक्तांच्या कल्याणाकरिता करायचा आहे. त्यामुळे ही जमिन वापरायला परवानगी दिली म्हणजे मी काही विशेष केलेले नाही. फक्त तीचा दुरुपयोग होणार नाही याची आपण सर्वांनी काळजी घेऊया. आपली सभा संपल्यानंतर येथे सर्वांना देवीचा प्रसाद देण्यांत येणार आहे तो घेऊनच सर्वांनी परत जावे ही विनंती आहे.
आता शेळके गुरुजी पुढील नियोजन काय आहे ते सांगतिल. हंबीररावांनी परत सूत्र आपल्या हाती घेत जाहीर केले.
 लगेचच शेळके गुरुजी उभे राहीले त्यांनी देवीभक्तांचे स्वागत करुन थेट विषयाला हात घातला. ते म्हणाले, तर मंडळी आता मला सांगा आपला काय विचार ठरलाय? कोण कोण या वृक्ष मंदिराचे पूजारी होणार आहे?
गुरुजींनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर म्हणून जवळ जवळ सर्वांनीच आपला हात वर करुन आपली संमती दर्शवली.
जे कोणी यामध्ये आपला सहभाग देऊ इच्छीतात त्यांनी आपली नांवे सभा संपल्याबरोबर आमचा एक सहकारी हेरंब याच्याकडे नोंदवावित. ती नोंदवताना आपण आपला किती वेळ देऊ शकाल तेही सांगावे म्हणजे त्या प्रमाणे नियोजन करता येईल. सुरवातिला आपल्याला जास्त काम आहे परंतु एकदा आपली लागवड झाली की फक्त देखभालीचीच सेवा आपल्याला करायची आहे. एक गोष्ट मी येथे स्पष्ट करतो की येथे जे कोणी सेवेला येतिल त्यांनी आपला दुपारचा जेवणाचा डबा आणण्याची आवश्यकता नाही. देवीचा महाप्रसाद त्यांना दुपारी देण्यांत येणार आहे. आपण उद्या पासुनच आपल्या कामाला सुरवात करीत आहोत. तेव्हा जास्तित जास्त भक्तांनी सहभाग नोंदवावा ही विनंती आहे. पहिले दोन दिवस ज्यांना शक्य होईल त्यांनी आपली अवजारे आणावित त्यानंतर आपण ती खरेदीच करुन टाकु.
आता आपण आपल्या विश्वस्तांच्या हस्ते देवीला प्रिय असणाऱ्या फुलझाडांची नऊ रोपे देवीच्या परिसरात लावुन आपल्या श्री सोमजाई वृक्षमंदिर संस्थानच्या कार्यास प्रारंभ करणार आहोत. ही एकप्रकारे आपण नवदुर्गांची स्थापनाच करीत आहोत. तेव्हा आता आपण आहोत त्या जागेवरच बसुन हा वृक्षारोपण सोहळा बघुया.
मी सर्वप्रथम गोविंदरावांना विनंती करतो की त्यांनी येथे असलेले सोनचाफ्याच्या वृक्षाचे पहिल्या खड्यात रोपण करुन आपल्या या शुभ कार्याचा शुभारंभ करावा. वृक्षारोपण झाले की आपण सगळे आई सोमजाईची उदो उदो अशी मोठ्याने गर्जना करुन तीचा जागर करुया.
त्यानंतर गोविंदरावांनी आपल्या दोन्ही हातात सोन चाफ्याचे बालतरु घेऊन पुढील ध्यानमंत्र म्हणून त्रिगुणात्मक सोमजाईचे ध्यान केले.
खड्गं चक्र गदेषु चाप परिघान् छूलं भुशुंडीं शिरः।
शंखं संदधतीं करैस्ञिनयनां सर्वांग भूषावृतिम्।।
नीलाश्म द्युतिमास्य पाददशकां सेवे महाकालिकाम्।
याम्स्तौत् स्वपिते हरौ कमलजो हंतुं मधुं कैटभम्।।1।।
अक्षस्रक परशू गदेषु कुलिशं पद्मं धनुः कुंडिकां।
दण्डं शक्तिमसिं च चर्म जलजं घंटां सुराभाजनम्।।
शूलं पाश सुदर्शनेच दधतीं हस्तैः प्रवालप्रभाम्।
सेवे सैरिभ मर्दिनी मिह महालक्ष्मीं सरोजस्थितिम्।।2।।
घंटाशूल हलानि शंख मुसले चक्रं धनुः सायकम्।
हस्ताब्जैरदधतीं धनांत विलसच्छीतांशु तुल्यप्रभाम्।
गौरीदेह समुद्भवां ञिजगतां आधारभूतां महा
पूर्वामञ सरस्वती मनुभजे शुंभादि दैत्यार्दिनीम्।।3।।
त्यानंतर त्यांनी त्या बालतरुचे रोपण केले, त्याला जलसंजीवन दिले. त्यानंतर सर्वांनी ठरल्याप्रमाणे आई सोमजाईचा उदोSSउदो म्हणून गर्जना केली. त्यानंतर हंबीररावांनी मोग-याच्या, शेळके गुरुजींनी जाईच्या, दिनकररावांनी जुईच्या, खेर्डीचे सरपंच श्री दत्तात्रेय सावंत यांनी शेवंतीच्या, गोवेल्याचे सरपंच श्री नारायण शिंदे यांनी तुळशीच्या, हेमंतने जास्वंदीच्या, गणेशने चाफ्याच्या आणि हंबीररावांच्या खास आग्रहाखातर महाराजांनी जास्वंदीच्या बालतरुंचे रोपण केले. प्रत्येक खेपेला आई सोमजाईचा जागर केला गेला.
वृक्ष मंदिराच्या शुभकार्याचा रितसर प्रारंभ केल्यानंतर सर्वांनी मिळुन आई सोमजाईची महाआरती केली. त्यानंतर ठरल्याप्रमाणे प्रत्येकाला द्रोणातुन देवीचा प्रसाद म्हणून शिरा देण्यांत आला त्यानंतर कोकम सरबतही देण्यांत आले.
एकीकडे प्रसाद आणि सरबताचे वाटप चालू असतानाचे दुसरीकडे हेरंब आणि हेमंत दोघेजण एक रजिस्टर घेऊन सहभागी होऊ इच्छीणा-या भक्तांची नांवे नोंदवत होते. हेमंत प्रत्येकाला विचारुन तो नक्की किती वेळ देऊ शकेल याची खात्री करुन घेत होता.
तासाभरात बाहेरगावाहून आलेली सर्व लोक निघुन गेली. मोजकीच लोक पुढील नियोजना करिता थांबली होती. प्रत्येकाला कामे वाटुन दिली जात होती. संध्याकाळी सात वाजेपर्यंत ही गडबड चालू होती. उद्या पासून प्रत्यक्ष कामाला सुरवात होणार होती. सरते शेवटी सगळे गेले देवीजवळ फक्त महाराज राहिले.
रोजच्या प्रथे प्रमाणे महाराजांनी देवीजवळ दिवा लावला. त्यानंतर त्यांनी सभामंडपात बसुन आपला दैनंदिन सायंप्रार्थना आणि दासबोध वाचनाचा कार्यक्रम सुरु केला.
***************


वृक्ष मंदिर भाग १४

१४
            गोवेले येथिल स्टेट बँकेची शाखा गावाच्या मध्यवर्ती भागात होती. बँकेच्या बाजुलाच पोस्ट ऑफीस आणि सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची शाखा होती. स्टेट बँकेची ही शाखा व्हीलेज ब्रँच म्हणून चालू केलेली होती. त्यामुळे तेथे स्टाफ मोजकाच होता. शाखा व्यवस्थापक म्हणून आचार्य मॅडम काम करित होत्या. तर कॅशियर म्हणून गोवेल्यातलेच सुहास गोवेलेकर आणि सावंतवाडी येथिल प्रमोद गायकवाड क्लार्क म्हणून काम करित होते. तर शिपाई म्हणून हनुमानवाडी येथिल हेमंतचा चुलतभाऊ समीर धुमाळ काम करित होता.
            दुपारचे १२ वाजले होते. चैत्र महिना असल्याने हवेत खूपच उकाडा जाणवत होता. आचार्य मॅडम आपल्या केबीनमध्ये बसुन दैनंदिन काम बघत होत्या. बँकेच्या काऊंटरला एक माणूस पैसे काढायला आला होता. समीर त्याला पैसे काढायचा फॉर्म भरुन देत होता. तेवढ्यात त्याला महाराज बँकेत येताना दिसले. त्याने त्यांचे स्वागत करीत विचारले, काय महाराज इकडे कुठे? एवढ्या उन्हाचे काय काम काढलेत? मला सांगितले असते तर मी केले असते.
काही विशेष नाही! जरा आचार्य मॅडमना भेटायचे होते. त्या आहेत कां? महाराजांनी विचारले.
हो आहेत नां! तिकडे केबीनमध्ये आहेत, चला मी आपली ओळख करुन देतो! असे म्हणून समीर त्यांना घेऊन आचार्य मॅडमच्या केबीनमध्ये गेला आणि महाराजांची मॅडमना ओळख करुन देऊ लागला. तेव्हा त्या त्याला म्हणाल्या अरे समीर मी ओळखते यांना! परवा तुमच्याच गावातल्या शाळेतिल कार्यक्रमाला आले होते तेव्हा त्यांची ओळख झाली आहे.
मग त्यांनी महाराजांचे स्वागत करुन त्या म्हणाल्या या महाराज! आमच्या बँकेत आपले स्वागत आहे! प्लीज बसा नां! काय काम काढलेत?
समीर केबीनमधुन बाहेर जाताच महाराज बोलले, मॅडम! हे महाराज वगैरे राहूदे आता मी माझी ऑफिशिअल ओळख करुन देतो. माझे नांव मंगेश सोमनाथ आंबेकर असे आहे. हे माझे पासबुक मला माझे खाते इथे ट्रान्स्फर करुन घ्यायचे आहे. असे म्हणून त्यांनी आपले पासबुक झोळीतुन काढले आणि त्यांच्या ताब्यात दिले.
थांबा! थांबा! हे नांव मी कुठेतरी ऐकले आहे, आणि ते माझ्या चांगले लक्षांत आहे! कुठे बरे? हां आत्ता आठवले म्हणजे आपण आपल्या खेड ब्रँचचे मॅनेजर आंबेकर साहेब. अहो माझ्या नोकरीच्या अगदी सुरवातीला मी आपल्या हाताखाली काम केलेले आहे. तुम्ही तेव्हा कदाचित अकाउंटंट असाल. आपल्यावर कोसळलेल्या आपत्तीबद्द्लही मी खूप ऐकले आहे. बापSSरे! आपण मला अशाप्रकारे भेटाल हे माझ्या स्वप्नात देखिल आले नव्हते. परवा हनुमानवाडीला मी आपणाला खरंच ओळखले नाही. बरं पणं आता आपण काय घेणार? चहा, कॉफी का काही थंड?
नाSही नाSही! खरंच काही नको! महाराज म्हणाले.
ते काही नाही, आपल्याला काहीतरी घ्यावेच लागेल! शिवाय माझ्या बरोबर आता जेवायलाही थांबायच आहे! हवेत उष्मा खूप आहे मी थंडच मागवते! मी समिरला बोलावते.
मॅडम एक एक मिनिट! थंड काही मागवु नका फारतर लिंबु सरबत मागवा! आणि आणखी एक, कृपा करुन माझी ही आंबेकर साहेब नावाची ओळख शक्यतो गुप्त ठेवा. मला चिकटलेला महाराज हा बुरखा तसाच राहु दे! तुमच्या स्टाफ मधल्या लोकांनाही सांगा प्लीज. महाराजांनी त्यांना  विनवणी केली.
हो ठिक आहे! पण तुम्हाला माझ्या बरोबर जेवायला थांबावे लागेल या अटीवर मी हे मान्य करीन. मॅडमनी बजावले. मग त्यांनी समीरला लिंबू सरबत आणायला सांगितले. बरं आता, तुमचे बँकेचे काम काय आहे ते बघुया असे म्हणून त्यांनी खाते ट्रान्स्फर करण्याची प्रोसेस सुरु केली.
मला या खात्याला चेकबुक देखिल पाहिजे आहे. ते इथेच मिळेल की कुठुन बाहेरगावाहून येईल? महाराजांनी विचारले.
नाही ती पद्धत अजुन इथे सुरु झाली नाही. त्यामुळे तुम्हाला चेकबुक येथेच मिळेल. मॅडमनी माहिती दिली.
बरं मॅडम! एक विनंति आहे! हनुमानवाडीत एक नविन प्रकल्प सुरु करायची प्रोसेस सुरु आहे. त्याचा ट्रस्ट स्थापन झाल्यावर त्याचे खाते आपल्याकडे उघडायचे आहे. तेव्हा त्यांना प्लीज मदत करा. कारण मी त्या ट्रस्टला फायनान्स करणार आहे. ही गोष्ट देखिल जेवढी गुप्त राहिल तेवढे बरे. महाराजांनी विनंती केली.
अहो आंबेकरसर! ते माझे कामच आहे. तुम्ही विनंती करण्याची काहीच गरज नाही. परंतु तुम्ही सांगताय म्हणून ते काम जास्त आपुलकीने करीन हे माझे वचन आहे.
अशाप्रकारे खाते ट्रान्स्फर करुन आणि चेकबुक घेऊन महाराज दुपारी तिन वाजता बँकेतुन बाहेर पडले तेव्हा आचार्य मॅडम स्वत: त्यांना निरोप द्यायला बँकेच्या दारापर्यंत आल्या होत्या ते पाहून स्टाफच्या लोकांना खूपच आश्चर्य वाटले. कारण त्या कडक शिस्तीच्या म्हणून स्टाफ मधले सगळे त्यांना ओळखत होते.
************
सोमजाई मंदिराच्या सभामंडपात हेमंत, गणेश आणि हेरंब तिघे बसले होते. देवीचा डोंगर चढुन आल्यानंतर आलेला थकवा पोखरणीमध्ये पाय धुतल्याबरोबर दूर झाला होता. देवीचे दर्शन झाल्यावर त्यांनी आजुबाजुला बघितले तो त्यांना आठ दिवसात बराच बदल झालेला जाणवला. सर्व आवार स्वच्छ केलेले दिसत होते. मंदिराच्या छपराच्या आडोशाने अबोली, मोगरा, तगर, जास्वंदीची  रोपे लावलेली दिसत होती. आता दुपारच्या वेळी देखिल ती रोपे टवटवीत दिसत होती. त्या प्रत्येक रोपाच्या बुंधात  एक एक मडके पाण्याने भरुन ठेवलेले दिसत होते.
महाराजांना सोमजाई मंदिरात रहायला आल्याला आता आठ दिवस होऊन गेले होते. पहिल्या दिवशी ते सरपंचांबरोबर येथे आले होते. त्यानंतर त्याच दिवशी संध्याकाळी आपल्या गड्याबरोबर एक सतरंजी, चादर, दोन बालद्या, पिण्याच्या पाण्याकरिता एक मातीचे मडके एवढ्या वस्तु पाठवुन दिल्या होत्या. सध्या येथे महाराज एकटेच रहात होते. रोजचा सकाळचा कार्यक्रम आटोपुन ते मंदिराच्या परिसराची स्वच्छता करित असत. त्याच बरोबर त्यांनी गावातुन फुलांची तयार रोपे मागुन आणली होती. त्या रोपांच्या बुंधात ठेवायला मातीची मडकीही त्यांनी कुठुनतरी पैदा केली होती. आता त्यांचा उद्योग डोंगरावर येण्याच्या मार्गावर काही सावलीच्या दृष्टीने रोपे लावण्याचा होता. त्या करिता त्यांनी खड्डे तयार करायला सुरवात केली होती.
हा झालेला सगळा बदल हेमंत, गणेश आणि हेरंब हे तिघे बघत होते. तेवढ्यात त्यांना खालुन महाराज डोंगर चढताना दिसले. म्हणजे येणा-या व्यक्तीचे पांढरे कपडे दिसले. त्यावरुन ते महाराजच असावेत असे अनुमान त्यांनी काढले होते. देवीच्या मंदिरात येण्याच्या वाटेवरच ते त्यांची वाट बघत उभे राहिले.
महाराज डोंगर चढुन वर येताच त्यांना हे तिघे दिसले. त्यांना पहाताच महाराजांनी त्यांना विचारले, आज तिघेच कसे काय? जितू कुठाय?
जितू सरपंचकाकांबरोबर शेजारच्या वाडीवर गेलाय. सरपंच, शेळके गुरुजी आणि जितू असे तिघेजण आज तिकडे गेलेत. आज त्यांची शेवटची बैठक आहे. आता परवाच अक्षय तृतिया आली आहे आणि त्या दिवशी या इथे आपण सर्व देवी भक्तांची सभा आयोजित केली आहे नाही कां? हेमंतने उत्तर दिले.
चला! मी हातपाय धुवुन फ्रेश होतो, मग आपण सविस्तर बोलुया! तिथपर्यंत तुम्ही तिघेजण देवीच्या सभा मंडपात बसा. महाराजांनी सांगितले.
१५-२० मिनिटांत महाराज हात पाय धुवुन आणि तोंडावर पाणी मारुन फ्रेश झाले. त्यानंतर देवीला नमस्कार करुन त्या तिघांच्यात येऊन बसले. त्यांनी गणेशला विचारले तू गुजराथ मधुन कधी आलास? आणि तुमच्या दोघांचे काय? कशा झाल्या वाड्या वाड्यांमधिल बैठका?
मी कालच गुजराथ मधुन आलो. तिकडचे काम बघितले आणि तिकडे गेल्याचे सार्थक झाले असे वाटले. खूप मोठ्या प्रमाणावर तिकडे काम केलेले आहे. त्यांच्या या कामातिल एक समान सूत्र स्वाध्याय हे आहे. त्यामुळे त्या कामात जसे रोजमजुरी करणारे आहेत तसेच डॉक्टर, वकील, इंजिनीअर देखिल आहेत. वृक्ष मंदिराकरीता करायचे काम हे त्यांच्या स्वत:च्या परस बागेतिल काम असल्याप्रमाणे प्रत्येकजण आपली सेवा तिथे देतो. गणेशने सविस्तर उत्तर दिले.
काका, आम्ही देखिल वाड्या वाड्यांतुन फिरलो. लोकांना ही कल्पनाच नविन आहे. परंतु देवीचे काम आहे म्हणून ते श्रद्धेने ऐकुन घेत होते. वृक्ष मंदिर म्हणजे नेमके काय हे त्यांना उद्याच्या मिटींग मध्ये समजल्यानंतर प्रत्यक्ष किती लोक सहभागी होतील ते समजेलच. परंतु सध्यातरी लोकांचा उत्साह प्रचंड आहे. हेरंबने आपला रिपोर्ट दिला.
आज संध्याकाळी शेळके गुरुजी, सरपंचकाका, दिनकरदादा आणि गणेशचे बाबा आपल्याला भेटायला देवीच्या मंदिरात येणार आहेत. हेमंतने सांगितले.
*************
सोमजाई मंदिराच्या सभामंडपात घातलेल्या सतरंजीवर शेळके गुरुजी, सरपंचकाका, दिनकरदादा, गणेशचे बाबा आणि महाराज बसले होते. वृक्ष मंदिर संकल्पनेच्या  प्रारुपाला अंतिम स्वरुप देण्यासाठी आज ही बैठक होती. बैठकीमध्ये हेमंत, गणेश, जितू आणि हेरंब हे देखिल सामिल होणार आहेत. ते मगाशी गावात गेले होते. ते आता परत येणार होते. या ठिकाणी उपस्थित असणारे सर्वजण त्यांचीच वाट बघत बसले होते.
शेळके गुरुजी, सरपंच आपण वाड्या वाड्यांमधुन फिरलात त्या लोकांचा प्रतिसाद कसा काय आहे? कोणी या प्रकल्पात सामिल होण्यास उत्सुक आहेत कां? गोविंदराव जोशींनी विचारले.
लोकांचा प्रतिसाद खूपच चांगला आहे. उद्याच्या मिटींगला किती लोक उपस्थित होतात त्यावरुन नेमका अंदाज येईल. शेळके गुरुजी म्हणाले.
बरं या प्रकल्पाच्या खर्चाकरीता लागणा-या निधीची काय तरतुद झाली आहे? कारण या सगळ्या कल्पना पैशाशिवाय व्यर्थ आहेत. दिनकर दादांनी विचारले.
त्या सगळ्या बाबीच आता आपण फायनल करणार आहोत. आपल्याला एक रकमी निधी पुरवण्यासाठी एक संस्था तयार आहे. फक्त ते कोणा व्यक्तीला पैसा देणार नाहीत. आपण जर सोमजाई देवीच्या नांवे एक विश्वस्थ संस्था स्थापन केली तर ती संस्था काही अटींवर आपल्याला आवश्यक असेल तेवढा निधी पुरवायला तयार आहे. फक्त त्यांना आपले नांव गुप्त ठेवायचे आहे. सरपंचांनी सांगितले.
तेवढ्यात आपल्या चौघा मित्रांचे आगमन झाले आणि तेही बैठकीत सामिल झाले. हेरंबने विचारले काय विषय चालला आहे?
त्यावर दिनकरदादांनी सांगितले की, आपली आर्थिक विवंचना दूर झाली आहे. हंबीररावांनी आपल्या प्रकल्पाला निधी देण्यासाठी एक धर्मादाय संस्था शोधुन काढली आहे. परंतु त्या करिता आपल्याला सोमजाईच्या नावाने एक विश्वस्त संस्था स्थापन करावी लागेल. त्यांच्या काही अटी देखिल आहेत.
पण त्यांच्या अटी काय आहेत? हेरंबने विचारले.
हा बघा त्यांच्या अटींचा तपशिल. असे म्हणून सरपंचांनी आपल्या हातातिल कागद वाचुन दाखवला. त्या अटी अशा आहेत १) हा प्रकल्प सरकारी कायद्या प्रमाणे विश्वस्त संस्था म्हणून रजीस्टर करुन घ्यावा. २) गोविंदराव जोशी यांच्याबरोबर रितसर करार करुन जागा वृक्ष मंदिर म्हणून विकसित करायला त्या संस्थेच्या ताब्यात घ्यावी. ३) त्या विश्वस्त संस्थेत गोविंदरावांचा किंवा त्यांच्या वारसाची अध्यक्ष म्हणून कायम स्वरुपी निवड करावी. ४) विश्वस्त म्हणून हंबीररावांनी स्वत: त्यात सामिल होऊन प्रकल्पाच्या कामावर देखरेख करावी. ५) या प्रकल्पाचा उद्देश देवीच्या भक्तांचे आणि पर्यावरणाचे रक्षण करुन देवीचे वैभव वाढविणे हा असावा. ६) या प्रकल्पातुन स्थानिक बेकारांना सन्मानाने रोजगार मिळावा हा देखिल त्यातिल मुख्य हेतू असावा.
मग त्यांचे बरोबरच आहे. लाखो रुपये द्यायचे म्हणजे तो पैसा सत्कारणीच खर्च होतोय याची कोणीही खात्री करुन घेणारच. तेव्हा त्यांच्या सर्व अटी मान्य करायला काहीच हरकत नाही. शेळके गुरुजींनी आपले परखड मत व्यक्त केले. त्याला सर्वांनी अनुमोदन दिले.
मग आता घोडं अडलय कुठे?आपल्या या संस्थेला मी नांव सुचवु कां? श्री सोमजाई वृक्ष मंदिर संस्थान हे नांव कसे वाटते. गणेशने विचारले.
खूपच छान! माझे या नावाला पूर्ण अनुमोदन आहे. सरपंचांनी आपला पाठींबा दिला.
आमचीही या नांवाला संमती आहे. सगळ्यांनी कोरसमध्ये सांगितले.
चला संस्थेचे नाव तर पक्के झाले. आता या श्री सोमजाई वृक्ष मंदिर संस्थानचे अध्यक्ष कोणाला करायचे? दिनकररावांनी विचारले.
या सर्व जागेचे वहिवाटदार आपले गोविंदराव जोशी आहेत. त्यांना वंशपरंपरागत ही वहिवाटदारी मिळालेली आहे तेव्हा या संस्थानचे अध्यक्षही गोविंदराव जोशीच व्हायला हवेत ते सुद्धा वंशपरंपरेने असे माझे स्पष्ट मत आहे. सरपंचानी सांगितले.
बरोबर आहे आणि ते कायदेशिरही होईल. आपल्या अर्थसहाय्य करणाऱ्या संस्थेची तीच इच्छा आहे. दिनकरारावांनी आपले कायदेशिर मत दिले.
हे बघा! माझा तसा काही आग्रह नाही! कोणत्याही निमित्ताने सोमजाईचे वैभव वाढावे. या जमिनितुन तिच्या भक्तांचेही कल्याण व्हावे हीच माझी इच्छा आहे. त्या ताम्रपटातिल अटीचे कोणत्याही कारणाने उल्लंघन होणार नाही हे बघितले की झाले. मग अध्यक्ष कोणिही झाला तरी काही फरक पडत नाही. गोविंदरावांनी आपले स्पष्ट मत सांगितले.
नाही नाही गोविंदराव आपणच या संस्थानचे अध्यक्ष व्हायला पाहिजे. तुम्ही होणार नसाल तर मगं गणेशला करावे लागेल. शेळके गुरुजी म्हणाले. त्यापेक्षा तुमचे हातपाय चालतायत तोवर तुम्ही अध्यक्ष व्हा असा माझा आग्रह आहे. तरुण मुलांना जरा अनुभव आला की आपल्याला हे सर्व त्यांच्याकडेच सोपवायचे आहे.
तर आता संस्थानचे अध्यक्ष गोविंदराव होतील आणि ते आपले विश्वस्त मंडळ निवडतिल असे मी सूचवतो. शेळके गुरुजींनी सूचना मांडली आणि त्याला सरपंचांनी अनुमोदन दिले.
गोविंदरावांनी अध्यक्षपद स्विकारताच सर्वांनी त्यांचे टाळ्या वाजवुन स्वागत केले. त्यानंतर गोविंदरावांनी उपाध्यक्ष म्हणून हंबीरराव, कार्यवाह म्हणून शेळके गुरुजी आणि विश्वस्त म्हणून दिनकरराव, हेरंब, खेर्डीचे सरपंच श्री दत्तात्रेय सावंत, गोवेल्याचे सरपंच श्री नारायण शिंदे यांची नियुक्ती केली.
 गोविंदराव मी आपणाला एक दुरुस्ती सुचवु कां? आपल्या चर्चेत आतापर्यंत एक शब्दही न बोललेल्या महाराजांना या संस्थान मध्ये विश्वस्त म्हणून घ्यावे अशी माझी सूचना आहे. शेळके गुरुजींनी एक प्रस्ताव मांडला.
छे! छे! भलतेच काय? कृपा करुन मला या गोष्टीत अडकवु नका! मी आपल्याला लागेल ती मदत करीन पण विश्वस्त वगैरे नकोच! महाराज म्हणाले.
माफ करा! खरंच मी ही गोष्ट विसरुन गेलो! पण मी आता त्यांचे नाव जाहिर करतो. गोविंदरावांनी जाहिर करुन टाकले.
नाही! नाही! मला हे मान्य नाही! असे जर होणार असेल तर मी आपला माझा मुक्कामच हलवतो! मी काय फकिर आहे! आज या गावात तर, उद्या त्या गावात! महाराजांनी निर्वाणिचा इशारा दिला.
ठिक आहे! पण तुम्ही गाव वगैरे सोडून जायची गोष्ट करु नका! आता कुठे हा प्रकल्पाची नांदी झाली आहे. हा वृक्ष मंदिराचा प्रकल्प अर्धवट सोडून जाणार नाही असे सोमजाईच्या साक्षीने वचन देत असाल तरच तुमचे म्हणणे आम्ही मान्य करु. सरपंचानी यावर तोडगा काढला.
बरं नाही जाणार! हा प्रकल्प अर्धवट सोडुन माझ्या या बोलण्याला सोमजाई साक्ष आहे. महाराजांनी आपला शब्द दिला.
एक मुद्दा राहिला, आपण आता निर्माण केलेली संस्था सरकारदरबारी नोंद करायला हवी. त्याकरिता वकीलांना भेटुन कायदेशिर कागदपत्रे तयार करायला हवित. ती कोण करणार? हंबीररावांनी विचारले.
ती जबाबदारी मी घेतो! जितून ती जबाबदारी स्वत:हून अंगावर घेतली.
त्याच बरोबर या संस्थेचे आर्थिक व्यवहार करण्याकरिता स्टेट बँकेत खाते देखिल उघडायला हवे. त्याकरीता आजच्या बैठकीचा पद्धतशिर ठराव करुन तो बँकेत देऊन खाते उघडायला हवे. महाराजांनी सुचवले. ही जबाबदारी हेमंत पार पाडु शकेल. काय हेमंत मान्य आहे काय?
हो चालेल,  हे काम मी करीन! हेमतने ही कामगिरी स्विकारली.
बरं आता मला सांगा दिनकरदादा तुमचे फॉरेस्टवाले मित्र पहाणी करायला आले होते त्यांनी काही अहवाल दिला आहे कां? किती खर्च येईल असा त्यांचा अंदाज आहे? सरपंचांनी विचारले.
हो दिला आहे त्यांनी अहवाल. त्यात त्यांनी अगदी तपशिलवार योजना दिली आहे. त्याच्या म्हणण्यानुसार आपल्याला प्रथम ज्या ठिकाणी आजही ओलावा आहे त्या ठिकाणी विस्तिर्ण पाझर तलाव खोदायला पाहिजे म्हणजे त्यातुन निघणा-या दगड मातितून लेव्हलिंग आणि संपूर्ण डोंगराला गडगा किंवा कुंपण घालता येईल. या शिवाय त्यांनी सोलर प्लँट आणि पवनचक्की बसवण्याचेही सूचविले आहे. म्हणजे सगळीकडे पाणी फिरवण्याकरिता वेगळी वीज घ्यायला नको. पाझर तलावात साठलेले पाणी पवन चक्कीच्या सहाय्याने पाईपलाईन टाकून डोंगराच्या माथ्यावर पाण्याची मोठ्ठी टाकी बांधुन त्यात साठवायचे नंतर सगळ्या डोंगरावर फिरवायचे अशी त्यांची योजना आहे. त्यांनी ढोबळमानाने, साधारण आठ ते दहा लाख लागतिल असे सांगितले आहे. याशिवाय कुठली झाडे कुठे लावावित हे देखिल त्यांनी तपशिलवार सांगितले आहे.
माझ्या मते दिनकरदादांच्या या मित्राला आपण सल्लागार म्हणून या योजनेत सामिल करुन घ्यायला पाहिजे. त्यांना मान्य असेल तर एक विश्वस्त म्हणून देखिल घेता येईल. त्यांच्या सल्याकरीता त्यांना योग्य मानधन देखिल द्यायला हवे. महाराजांनी सूचवले.
आपला सल्ला बरोबरच आहे. त्याच बरोबर आपल्याकडे हेरंब, गणेश, जितू, हेमंत यांच्या सारखे या क्षेत्रातले शिक्षण घेतलेले तरुण आहेत त्यांना देखिल आपण योग्य मानधन देऊन यात पूर्णवेळ सामिल करुन घ्यायला पाहिजे. शिवाय सोमजाईच्या भक्तांनी जरी सेवा म्हणून काम केले तरी त्यांच्या श्रमाचा मोबदला त्यांना प्रसादाच्या स्वरुपात काहीतरी द्यायला पाहिजे. त्या करिता मापदंडही ठरवायला पाहिजे. सरपंचांनी चर्चेला जरा वास्तवात आणले.
त्याकरिता मंदिराच्या बाजुला एक शेड बांधुन त्या मध्ये या संस्थानचे कार्यालय तयार केले पाहिजे. त्याच बरोबर कुदळी, फावडी, घमेली, या सारखी हत्यारे मोठ्या प्रमाणावर खरेदी करायला पाहिजेत. या सर्व कामाकरीता पूर्णवेळ व्यवस्थापक नेमला पाहीजे. या सगळ्या गोष्टींचा अधिकार आपण सरपंचांना देऊ. ते योग्य माणसे शोधुन त्यांच्या कडुन कामे करुन घेतील. गोविंदरावांनी अध्यक्षांच्या भूमिकेतुन सांगितले. सरपंचांनी ते विनाअट मान्यही केले.
आता आपली सगळी तपशिलवार चर्चा झाली आहे. तेव्हा आता उद्याच्या सभेविषयी देखिल ठरवुयात. शेळके गुरुजींनी तातडीच्या विषयाला हात घातला.
उद्याच्या सभेमध्ये मुख्य वक्ता गणेश असेल. तो सर्व योजना तपशिलवार समजाऊन सांगेल. सभेची सुरवात सरपंच करतील. त्यानंतर महाराज बोलतील. सभेचा शेवट शेळके गुरुजी करतील. गोविंदरावांनी सांगितले.
एवढी सगळी लोक भर उन्हाची डोंगरावर येणार त्यांना आपण काहितरी अल्पोपहार देणे आवश्यक आहे असे मला वाटते. महाराज बोलले.
बरोबर आहे! पण काय देता येईल? साधारण दोन अडिचशे माणसे येतिल! त्यांना प्रसाद म्हणून शिरा देता येईल! देवीचा विश्वस्त म्हणून मी वस्तू पुरविन पण बनवणार कोण? गोविंदरावांनी विचारले.
त्याची चिंता नको! मी डोंगरावर भांडी आणून शिरा आणि कोकम सरबत बनवायची व्यवस्था गावातल्या महिला मंडळामार्फत करतो! सरपंचांनी सांगितले.
मी सर्व वस्तु पाठविण्याची व्यवस्था करतो. गोविंदराव म्हणाले.
आता आपली आजची बैठक बरखास्त करण्यापूर्वी आज आपण काय काय ठरवले ते बघुया! दिनकररावांनी आजच्या कामकाजाचा आढावा घ्यायला सूचवले.
बघा मी तपशिलवार सांगतो. १) आपण श्री सोमजाई वृक्ष मंदिर संस्थान या संस्थेची स्थापना केली. २) त्याचे अध्यक्ष आणि विश्वस्त मंडळ निवडले. ३) ही संस्था सरकारी दप्तरांत नोंदवुन घ्यायचे ठरविले. ४) या संस्थेच्या नावांने स्टेट बँकेत खाते उघडण्याचे ठरविले. ५) संस्थे मार्फत पहिले काम पाझर तलाव बांधणे आणि जमिनीची लेव्हल करणे हे ठरवले. ६) संस्थे करिता सोमजाई मंदिराच्या बाजुला कार्यालय बांधण्याचे ठरविले. ७) संस्थेकरिता एक मॅनेजर आणि दैनंदिन कामकाज चालविण्याकरिता योग्य व्यक्तींची योग्य मानधनावर नेमणूक करण्याचा अधिकार हंबिररावांना दिला. ८) उद्याच्या बैठकीचा कार्यक्रम ठरविला आणि बैठकीनंतर उपस्थित लोकांना प्रसाद देण्याचे ठरविले. ९) संस्थेचे दैनंदिन कामावर देखरेख ठेवण्याची जबाबदारी हंबीररावांनी स्विकारली आहे. जितूने बरोबर आणलेल्या वहित हे सर्व लिहून घेतले होते ते वाचुन दाखवले.
शाबास जितू योग्य काम केले आहेस! महाराजांनी त्याला प्रोत्साहन दिले.
अशा त-हेने आजची बैठक संपन्न झाली आहे असे मी जाहिर करतो. गोविंदरावांनी अध्यक्ष म्हणून जाहिर केले.
 आता आरतिची वेळ झालीच आहे तर सगळेजण देवीची आरति करुन आपापल्या घरी जाऊ. हंबीररावांनी सुचविले. त्यानंतर त्या सर्वांनी देवीची आरति केली आणि मग ते सगळे आपापल्या घरी गेले. एकटे महाराज देवीजवळ राहिले. ते देखिल आपल्या दैनंदिन सायंप्रार्थनेला लागले.
****************